फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची विटंबना थांबवा !

विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्र येथे
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन

यवतमाळ

अपर पोलीस अधीक्षक श्री. अमरसिंह जाधव हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन स्विकारतांना

फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी, तसेच आरोग्यासाठी घातक असलेले चिनी फटाके यांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ नोंद घेत माननीय जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुख यांनी पुढील कार्यवाहीसाठी लगेच निवेदन पाठवले आणि ‘‘मी पूर्णपणे प्रयत्न करतो’’, असे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना बजरंग दलाचे श्री. योगिन तिवारी, पतंजली योगपिठाचे श्री. रमेश राऊत, भाजपचे श्री. श्रीवास, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वश्री मंगेश खांदेल, संजय सिप्पी ई. कार्यकर्ते उपस्थित होते. तर दारव्हा येथील ठाणेदार श्री. अनिलसिंह गौतम व तहसीलदार यांच्या कार्यात निवेदन देण्यात आले त्यावेळी समितीचे सर्वश्री रवी वगरे, मुकेश आखरे, उपस्थित होते.

वर्धा

अपर जिल्हाधिकारी श्री. संजय दैने यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

येथेही ११ ऑक्टोबर या दिवशी अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात आले. चिनी फटाक्यांवरील कारवाईच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला २० धर्माभिमानी उपस्थित होते.

नंदुरबार

फटाके विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांचे आश्‍वासन

विदेशी स्फोटक बाळगणे दंडनीय अपराध असल्याने चिनी फटाके बाळगणार्‍यांवर आणि विक्रि करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. एम्. कलशेट्टी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी डॉ. एम्. कलशेट्टी यांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना दिले. निवेदन देतांना हिंदु जागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. डॉ. सतीश बागुल, सौ. भारती पंडित, भावना कदम, सौ. सोनार, जितू मराठे, जितेंद्र राजपूत आदींचा सहभाग होता.

पेण (जिल्हा रायगड)

निवेदन स्वीकारतांना तहसीलदार श्री. धनाजी क्षीरसागर

दिवाळीच्या कालावधीत देवतांची, तसेच राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले फटाके वाजवले जातात. ही विटंबना रोखण्यासाठी, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालून असे फटाके विकणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी नायब तहसीलदार श्री. अजय पाटणे आणि पेण पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक श्री. धनाजी क्षीरसागर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने श्री. जगन्नाथ जांभळे, तसेच सनातन संस्थेचे श्री. दिलदास म्हात्रे हे उपस्थित होते.

कराड

कराड येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. बी.बी. चौगुले, कराड शहर पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद जाधव, कराड ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. अशोक क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर आमले, श्री. विजय चव्हाण, श्री. रमेश जगदाळे, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण (जिल्हा सातारा)

येथील तहसीलदार विजय पाटील यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे, तसेच पोलीस निरिक्षक श्री. प्रकाश धस यांना देण्यात आले. या वेळी सौ. सुधा घाटगे, सौ. देशपांडे, श्रीमती डोईफोडे, सर्वश्री आशिष कापसे, सुहास काशीद आणि संदीप काशीद आदी उपस्थित होते.

बारामती

देशाच्या सुरक्षिततेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश नाकारावा, सिंहगड किल्ल्याच्या बांधकामातील भ्रष्टाचारी दोषींवर त्वरित कारवाई करावी, हिंदूंच्या देवता आणि धार्मिक ग्रंथ यांविषयी अपशब्द काढणार्‍या प्रा. के.एस्. भगवान यांच्यावर कारवाई करावी, तसेच फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदू देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबावी या मागण्यांचे निवेदने ७ ऑक्टोबर या दिवशी येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनील गायकवाड आणि नायब तहसीलदार श्री. संजय पांढरपट्टे यांना देण्यात आले.

देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके आणि चिनी फटाक्यांची विक्री न करण्याविषयीचे निवेदन फटाके विक्रेते श्री. संतोष कदम यांना देण्यात आले.

सोलापूर

महापालिका आयुक्त आणि फटाके विक्रेते असोसिएशन यांना पत्र पाठवू – पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण

महापालिका आयुक्त आणि फटाके विक्रेते असोसिएशन यांना देवतांचे चित्र असणार्‍या फटाक्यांची विक्री करू नये, अशा आशयाचे पत्र पाठवू, असे आश्‍वासन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर आणि पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवतांची चित्रे असलेले आणि चिनी फटाके यांच्या विक्रीवरील बंदीच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बार्शी (जिल्हा सोलापूर)

‘पोलीस आणि प्रशासन यांना पत्र पाठवतो’, असे आश्‍वासन येथील नायब तहसीलदार मुरलीधर भोये यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. समितीच्या वतीने त्यांना वरील विषयाचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कुर्डूवाडी

फटाके पूर्णपणे बंद करण्यासाठी श्री. रामदास कदम यांच्याशी चर्चा करतो ! – श्री. रवी वाघमारे, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक, कुर्डूवाडी

येथील नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. रवी वाघमारे, नायब तहसीलदार टी.डी. मुसळे, पोलीस निरीक्षक श्री. ईश्‍वर ओमासे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. नागनाथ थीटे, शंकर जाधव, जीवन रक्षा समितीचे राहुल धोका, औदुंबर कोल्हे, सोहम शहा, स्वप्नील बागल, सौ. महानंदा थिटे आदी उपस्थित होते.

विशेष प्रतिसाद !

१. श्री. रवी वाघमारे, कुर्डूवाडी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक –  हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. यापूर्वी मी समितीच्या कार्यात सहभागी होतो. फटाके पूर्ण बंद करण्यासाठी श्री. रामदास कदम यांच्याशी चर्चा करतो.

२. श्री. ईश्‍वर ओमासे – फटाके बंदीविषयी जनजागृती करण्यासाठी प्रबोधन करतो, तसेच अल्प कालावधीत प्रबोधन करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ द्वारे प्रबोधन करू शकतो.

३. राहुल धोका, जीवन रक्षा समिती संस्थापक –  मी वर्ष २००१ पासून फटाके बंदीसाठी प्रयत्न करत आहे. येथून पुढे समितीला कोणतेही साहाय्य करण्यास सिद्ध आहे. फटाक्याविषयी प्रबोधन करणारी हस्तपत्रके वितरीत करतो.

या निवेदनातील काही सूत्रे पुढीलप्रमाणे

१.  देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांच्यावरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्राच्या चिंधड्या होऊन त्या रस्त्यावर इतरत्र पडतात. चिंधड्या झालेली चित्रे आपल्या पायाखाली किंवा गाडीखाली येतात, तसेच कचर्‍यात आणि गटारातही पडतात. त्यामुळे देवतांची घोर विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, तर राष्ट्रपुरुषांच्या अवमानामुळे राष्ट्रीय अस्मितेचे हनन होत आहे .

२.  धार्मिक भावना दुखावणे हा एक गंभीर अपराध असल्याने अशा फटाक्यांची निर्मिती आणि विक्री होऊ नये, याची पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी गेली १५ वर्षे हिंदु जनजागृती समिती वैध मार्गाने करत आहे.

३. या जनजागृती चळवळीचा परिणाम म्हणून उद्योग संचनालय मंत्रालयाने मुंबईचे महापालिका आयुक्त आणि सहनिबंधक (केंद्र मार्क डिव्हिजन) यांना ३० जानेवारी २००८ या दिवशी पत्र पाठवून कार्यवाही करण्यास सांगितले आहे. तसेच उद्योग सहसंचालकांच्या कार्यालयातून या संदर्भातील पत्र उद्योजक आणि संबंधितांना पाठवण्यात आलेे आहे. तरीही काही उत्पादक उत्पादन करतांना, तसेच विक्रेते विक्री करत असल्याचे आढळून येतात.

४. भारतात आता चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम क्लोराईड आणि पोटॅशियम परक्लोराईड या विषारी घटकांचे प्रमाण पुष्कळ असून भारतात यावर बंदी आहे. त्यामुळे हे फटाके स्वस्त असले तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत. ‘एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्ट २००८’ नुसार परदेशी बनावटीचे स्फोटक पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे.

५. असे असले तरीही चिनी फटाके भारतात आणून त्याची विक्री होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. सध्या चीन भारताविरोधात सीमेवर घुसखोरी करण्यासह विविध क्षेत्रांत भारतविरोधी भूमिका घेत आहे.

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी
करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? सरकार याविषयी स्वतःहून कृती का करत नाही ?

पत्रकार परिषदेत डावीकडून सौ. वैशाली राजहंस, मार्गदर्शन करतांना अधिवक्ता समीर पटवर्धन आणि श्री. संतोष देसाई

मिरज – फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा आधार नाही. तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य अन् पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात तर दिवाळीच्या दिवशी सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात, तर वर्षभरातील ही संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रतीवर्षी सहस्रो कोटी रुपयांची होणारी उधळपट्टी करणे देशहिताच्या विरोधात आहे. हा पैसा राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास अनेक समस्या सुटण्यास साहाय्य होईल; म्हणून शासनाने अशा प्रदूषणकारी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. याचप्रकारे फटाके वाजवण्याची ही कुप्रथा बंद करत नागरिकांनी देशहितास हातभार लावावा, असे आवाहन समितीने पत्रकार परिषदेत केले. ही पत्रकार परिषद १३ ऑक्टोबर या दिवशी किल्ला भाग येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आली. या वेळी सांगली जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता समीर पटवर्धन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस उपस्थित होत्या.

प्रशासनाने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यात विषारी पदार्थांचे प्रमाण पुष्कळ असते. याच्या निर्मितीसाठी ‘पोटॅशियम क्लोराइड’ आणि ‘पोटॅशियम परक्लोराइड’ यांचे रासायनिक मिश्रणवापरले जाते; परंतु भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी आहे. यामुळे चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत. ‘एक्सप्लोजिव्ह अ‍ॅक्ट २००८’ नुसार परदेशी बनावटीचे स्फोटक पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. असे असले, तरी अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्याची विक्री होते.

यामुळे अशा फटाक्यांवर प्रशासनाने तात्काळ बंदी आणावी, तसेच चिनी फटाक्यांची विक्री करणार्‍यांवरही कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केली. या पत्रकार परिषदेत धार्मिक भावना दुखावणार्‍या देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर बंदी घाला, अशीही मागणी करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमाचे पत्रकारांकडून कौतुक

या वेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी हिंदु जनजागृती समिती फटाक्यांच्या संदर्भात राबवत असलेल्या अभियानाचे कौतुक केले. या संदर्भात समिती जे उपक्रम राबवील, त्याला आम्ही प्रसिद्धी देऊ, असे पत्रकारांनी सांगितले. या वेळी पत्रकारांनी हे अभियान आणखी चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी काही सूचनाही केल्या. ‘प्लास्टिकचे राष्ट्रध्वज बंद होण्यात हिंदु जनजागृती समितीचा सिंहाचा वाटा आहे’, असे एका पत्रकाराने सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment