दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ?

1350727602_fort

१. किल्ला बांधण्याचा इतिहास

१ अ. काही शतकांपूर्वी दिवाळीच्या वेळी किल्ला बांधण्याची प्रथा नव्हती.

१ आ. हिंदवी स्वराज्याची कल्पना बाल पिढीमध्ये रुजवण्याचे कार्य करणे : काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली. किल्ल्यांवर सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य चालू झाले.

२. आध्यात्मिक संकल्पना आणि जिवाला होणारा आध्यात्मिक लाभ

२ अ. प्रत्येक किल्ला भेद्य आणि विजय मिळवता येण्यासारखा असणे, देहबुद्धीरूपी किल्ल्याला भेदून आत्मबुद्धीरूपी धर्मपताका फडकवणे, म्हणजेच आत्मस्वरूप जाणून त्यामध्ये स्थिर होणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय असणे : मनुष्याचा देह हा किल्ला आहे. देहबुद्धी ही किल्ल्याप्रमाणे (जन्मोजन्मीचे संस्कार आणि षड्रिपू यांमुळे स्वस्वरूप किंवा आत्मबुद्धी झाकली जाते) आहे. काही किल्ले भेद्य आणि काही अभेद्य आहेत, असे वाटते. प्रत्यक्षात प्रत्येक किल्ला भेद्य आणि त्याच्यावर विजय मिळवता येण्यासारखा असतो. त्याप्रमाणे देहबुद्धीरूपी किल्ल्याला भेदून आत्मबुद्धीरूपी धर्मपताका फडकवणे, म्हणजेच आत्मस्वरूप जाणून त्यामध्ये स्थिर होणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे.

३. व्यष्टी आणि समष्टी यांच्या दृष्टीने महत्त्व

३ अ. षड्रिपू आणि वाईट संस्कार यांवर सत्त्वगुणाने मात करून नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून त्रिगुणातीत होणे : किल्ला बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रज-तम गुणांवर सत्त्वगुणाने मात करणे आणि नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून गुणातीत होणे. हे खरे हिंदुत्व आहे. या रूढीतून हीनानि गुणानि दूषयति इति हिंदु या व्याख्येनुसार अंतरात म्हणजे पिंडामध्ये हिंदवी स्वराज्याची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करणे हा व्यष्टी उद्देश युवा पिढीने स्वतःवर बिंबवणे आवश्यक आहे.

३ आ. पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र होणे : शत्रूच्या कह्यातील किल्ला लढून जिंकणे आणि त्यावर आपला झेंडा फडकवणे, म्हणजे पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र होणे. दिवाळी ही अंधारावर विजयाचे आणि प्रकाशाकडे जात असलेल्या प्रवासाचे द्योतक आहे. या अर्थाने दिवाळी हा पारतंत्र्यावर विजय अन् स्वातंत्र्याच्या प्रकाशाची अनुभूती देणारा सण आहे.

४. किल्ल्यावरील सजावट

४ अ. सिंहासन आणि राजा हे अनुक्रमे निर्गुण ब्रह्म (आत्मा) अन् सगुण ब्रह्म (नाशवंत शरीर) यांचे प्रतीक असणे : सिंहासन हे निर्गुण ब्रह्माचे, म्हणजे शाश्‍वत सत्तेचे प्रतीक आहे. राजा हे सगुण ब्रह्म, ज्याचा कालानुरूप लय होतो, अशा अशाश्‍वत ब्रह्माचे प्रतीक आहे. देहधारी राजा काळाप्रमाणे पालटतो; मात्र सिंहासन तेच असते. हे जिवाचे मूळ स्वरूप (आत्मा) आणि देहस्वरूप (नाशवंत शरीर) यांचे प्रतीक आहे.

४ आ. सिंहासनाचे हात, पाठ आणि छत्र अनुक्रमे क्षात्रतेज, ब्राह्मतेज अन् निर्गुण ईश्‍वरी कृपा यांचे, तसेच सिंहासनाच्या पुढे असलेली पाय ठेवण्याची जागा ही शत्रू आणि असुर यांना राजाने नियंत्रणात ठेवल्याचे प्रतीक असणे : सिंहासनाचे सिंहाच्या मुखाने बनलेले दोन हात निर्गुण ब्रह्माच्या मारक रूपाचे, म्हणजे क्षात्रतेजाचे प्रतीक आहे. सिंहासनाची पाठ ब्राह्मतेजाचे म्हणजे तारक रूपाचे प्रतीक आहे. सिंहासनावरील छत्र हे निर्गुण ईश्‍वरी कृपेच्या, म्हणजे तारक-मारक रूपांचे प्रतीक आहे. सिंहासनाच्या पुढे असलेली पाय ठेवण्याची जागा ही शत्रू अन् असुर यांना राजाने नियंत्रणात ठेवले आहे, याचे प्रतीक आहे.

४ इ. सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्‍वरी राज्याच्या संस्थापकाचे प्रतीक आहे.

– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.१०.२००५)

 

दिवाळीविषयीचे लघुपट पहा !