कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी ?

‘कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.

टीप : ही सूत्रे ज्या ठिकाणी दिवाळी हा सण नेहमीप्रमाणे साजरी करण्यास निर्बंध अथवा मर्यादा आहेत, अशांसाठीच आहेत. ज्या ठिकाणी प्रशासनाचे सर्व नियम पाळून नेहमीप्रमाणे सण साजरा करता येणे शक्य आहे, त्या ठिकाणी नेहमीच्या प्रथेप्रमाणे तो साजरा करावा.

श्री. चेतन राजहंस

प्रश्‍न : वसुबारस या दिवशी बाहेर पडून सवत्स गायीची पूजा करावी का ? पूजा करणे शक्य नसल्यास काय करावे ?

उत्तर : वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येत असल्याने त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. वसुबारस या दिवशी बाहेर पडून सवत्स गायीची पूजा करण्यास अडचण असेल, तेव्हा घरी एखादी गायीची मूर्ती असल्यास तिची पूजा करावी. घरी मूर्ती नसल्यास गायीचे पाटावर चित्र काढून त्याची पूजा करावी.

प्रश्‍न : नरकचतुर्दशीला आकाशात तारे दिसत असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीची फांदी डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत ३ वेळा गोलाकार फिरवतात. यासाठी मूळ असलेली आघाडा वनस्पती वापरतात. यासाठी आघाडा वनस्पती उपलब्ध न झाल्यास काय करावे ?

उत्तर : आघाडा वनस्पती उपलब्ध न झाल्यास देवाला प्रार्थना करून स्नान करावे.

प्रश्‍न : दिवाळीच्या दिवसांमध्ये यमतर्पण, ब्राह्मणभोजन, वस्त्रदान केले जाते. हे करणे शक्य नसल्यास काय करावे ?

उत्तर : यमतर्पण हा विधी घरी करणे शक्य आहे. यामध्ये यमाची १४ नावे घेऊन पाण्याने तर्पण केले जाते. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. ब्राह्मणभोजन घालणे आणि वस्त्रदान करणे शक्य नसल्यास अर्पणाचा सदुपयोग होईल, अशा ठिकाणी किंवा धार्मिक कार्य करणार्‍या संस्थांना काही रक्कम अर्पण करावी.

प्रश्‍न : लक्ष्मीपूजनासाठी धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे आदी साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही, तर काय करावे ?

उत्तर : लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले नाही, तर जेवढे उपलब्ध आहे, त्या साहित्यात भावपूर्णरित्या पूजाविधी करावा. बत्तासे आदी साहित्य न मिळाल्यास, देवाला घरातील तूपसाखर, गूळसाखर किंवा एखादा गोड पदार्थ यांचा नेवैद्य दाखवावा.

प्रश्‍न : अभ्यंगस्नासाठी उटणे उपलब्ध न झाल्यास काय करावे ?

उत्तर : अभ्यंगस्नासाठी उटणे उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी खोबरेल तेलात हळद घालून ते अंगाला लावावे.

प्रश्‍न : तुळशीविवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर काय करावे ?

उत्तर : तुळशीविवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर आपल्याला जशी जमेल, तशी भावपूर्ण पूजा करावी. तेही जमत नसेल, तर ‘श्री तुलसीदेव्यै नमः’ असा नामजप करत तुळशीची पूजा करावी. पूजा झाल्यावर रामरक्षेतील पुढील ओळी म्हणाव्यात.

‘रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥

रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥’

त्यानंतर पुढील श्‍लोक म्हणावा. ‘बृहद्स्तोत्ररत्नाकर’ या ग्रंथामधील सरस्वतीस्तोत्राच्या पूर्वी असलेला सरस्वतीच्या ध्यानाच्या संदर्भातील श्‍लोक आहे.

‘या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्मासना॥

या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥’

हे श्‍लोक म्हटल्यावर ‘सुमुहूर्त सावधान’ असे म्हणून तुळशीवर अक्षता वहाव्यात.

दिवाळी या सणाच्या दिवसांत मौजमजा करण्याची परंपरा पडली आहे. सध्याची आपत्कालीन स्थिती पहाता मौजमजेमध्ये वेळ वाया घालवणे योग्य नाही. जागतिक स्तरावर काही देशांमध्ये युद्धे चालू आहेत. अनेक देशांमध्ये परस्पर संघर्ष चालू आहेत. अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. या घडामोडी जगाला तिसर्‍या महायुद्धाकडे घेऊन जाणार्‍या आहेत. येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक आहे. सध्याचा काळ हा साधनेसाठी संधीकाळ असल्याने या काळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये मौजमजेमध्ये वेळ वाया न घालवता अधिकाधिक वेळ साधनेला देण्यासाठी प्रयत्न केल्यास व्यक्तीला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल.’

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (१९.१०.२०२०)

2 thoughts on “कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी ?”

  1. we all appreciate your efforts and following them .Kindly provide alternative for the birthday celebrations as per Hindu cultures and not केक oriented western culture. Similarly many such occasions need to be started in place of existing useless activities.

    Reply

Leave a Comment