घोर आपत्काळाविषयी द्रष्टे, संत, सप्तर्षि आणि देवता यांनी वर्तवलेली भाकिते !

तिसर्‍या महायुद्धाचे इतके स्पष्ट संकेत दिसत असतांनाही सुखाधीन जीवनात लिप्त झालेल्या आणि मी भले अन् माझे काम भले, अशी मानसिकता जपणार्‍या बहुतांश भारतियांना या संकटाचे गांभीर्य वाटत नाही. पुढील विवेचनावरून या विषयाचे गांभीर्य वाढण्यास साहाय्य होईल.

apatkal
१ अ. द्रष्टे : चारशे वर्षांपूर्वी नॉस्ट्रॅडॉमस नामक प्रसिद्ध द्रष्टा फ्रान्समध्ये होऊन गेला. त्याने बरीच भविष्ये वर्तविली, ती तंतोतंत खरी झाली. त्याने पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांविषयी जे सांगितले, तसेच वास्तवात घडले. त्याने तिसर्‍या महायुद्धाविषयीही सांगितले आहे, हे तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर होणार आहे की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !

१ आ. संत : प.पू. गगनगिरी महाराजांनी सांगितले होते, पुढे काळ इतका वाईट येणार आहे की, आम्हा संतांनाही वाटेल की, डोळे मिटले असते तर बरं झालं असतं ! बर्‍याच संतांनी अशाच प्रकारे सांगितले आहे.

‘नुकतेच महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसह कर्नाटक, केरळ या राज्यांमधील काही भागांमध्ये महापुराने थैमान घातले. सध्या चालू झालेल्या आपत्काळाविषयी द्रष्ट्या संतांनी अनेक वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे आणि तसेच आता घडतही आहे, हेच लक्षात येते. या आपत्काळाविषयी महाराष्ट्रातील एक थोर संत प.पू. गगनगिरी महाराज यांनी वर्ष १९९० मध्येच लिहून ठेवले आहे. या भीषण काळाविषयी त्यांनी काव्यपंक्तींद्वारे केलेले वर्णन त्यांच्या ‘चैतन्यलहरी’ या ग्रंथात प्रकाशित करण्यात आले आहे.

महायुद्ध, भूकंप आणि जलप्रलय होतील ।
पुराणभूमी जली जाऊनी नवीन वरती येईल ॥

समुद्रकिनारी भारतभूमी जलामाजी जाईल ।
सहा कोस जल पुढे येऊनी जलप्रलय होईल ॥

कृष्णेवरची धरणे सर्व पहा नष्ट होतील ।
तेणे योगे कृष्णा जल ते आकाशासी भिडेल ॥

श्रीशैल आणि कनकदुर्गा जलामाजि बुडतील ।
असंख्य शहरे पाण्यामाजी बुडोनिया जातील ॥

अतीव उष्णे हिम वितळोनी जल खाली येईल ।
तेणे योग अपरिमित ती जनहानी होईल ॥

विंध्य पर्वती हिमालयाचे जल येऊनि थडकेल ।
अनेक नगरे त्या योगाने जलमय ती होतील ॥

नद्यांवरची धरणे सारी तुटोनिया जातील ।
जलप्रलय तो जगावरी या, असा पहा येईल ॥

१ इ. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले : ‘तिसरे महायुद्ध अतिशय महाभयंकर असेल. यात भारत गोवला जाईल. अणूबॉम्बच्या साहाय्याने होणारा संहार पुष्कळ असेल. गावेच्या गावे उद्ध्वस्त होतील. तिसर्‍या महायुद्धामुळे पृथ्वीवरील रज-तम मोठ्या प्रमाणावर वाढतील. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीवरील सात्त्विकता वाढण्यासाठी पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. त्यासाठी अनेक संत सिद्ध व्हावे लागतील. याकरिता साधकांनी आतापासूनच साधना वाढवणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

१ ई. महर्षि : ‘आगामी काळ हा घोर आपत्काळ आहे. सर्वच ठिकाणी भूमी आपोआप दुभंगेल, म्हणजे भूकंप होतील. अनेक ठिकाणी अन्य नैसर्गिक आपत्तीही येतील. विमानांचे अपघात होतील. अनेक प्रकारची हानी होईल. सर्व नष्ट होईल. अशी प्रतिकूलता अनेक देशांत असणार आहे. या आपत्काळात साधकांचे रक्षण होणे, ही श्री गुरूंची कृपा आहे.’ [संदर्भ : महर्षि जीवनाडीवाचन क्र. २३, खोली क्र. ४१९, हॉटेल विश्‍वरत्न, गुवाहाटी, आसाम. (३.७.२०१५)]

टीप : शिव-पार्वती यांच्यात अखिल मानवजातीच्या संदर्भात झालेला संवाद सप्तर्षी आणि महर्षि यांनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीपट्ट्यांवर (विशिष्ट पट्ट्यांवर) लिहून ठेवलेल्या सांकेतिक भाषेतील भविष्य-वाचनाला ‘नाडीवाचन’ असे म्हणतात.

१ उ. देवता

१ उ १. पू. भगवान वाघापुरे महाराज यांच्या माध्यमातून श्री देव हालसिद्धनाथ यांनी केलेली भाकणूक (भविष्यकथन) : कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील आप्पाचीवाडी-कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ समाधी मंदिरात तेथील जागृत दैवत श्री देव हालसिद्धनाथ यांच्या भाकणुकीचा, म्हणजे भविष्यकथनाचा कार्यक्रम होतो. ही भाकणूक विशिष्ट बोलीत आणि लयीत होते. हा भाकणुकीचा कार्यक्रम सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातही दोनदा झाला. तेव्हा या भाकणुकीच्या माध्यमातून श्री देव हालसिद्धनाथ यांनी भावी आपत्काळाच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

१. ‘त्सुनामी आणि वादळे येतील. भूकंप होतील. दुनिया (जग) पेटेल.

२. भारतावरही संकट येईल. अतिरेकी मोठा घोटाळा (आक्रमणे) करतील. नरसंहार होईल. दिवसा डाके पडतील आणि लुटालूट होईल. कृष्णेच्या काठी ९ लाख बांगड्या फुटतील. (भावार्थ : महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीच्या काठी मृत्यूचे थैमान चालेल.) रक्ताचे पाट वाहतील.

३. नद्या कोरड्या पडतील. पाण्याचा ‘कप’ विकत मिळेल. (भावार्थ : पाणी महाग होईल, तसेच एकूणच महागाई वाढेल.)

४. रोगराई वाढेेल. औषधे मिळणार नाहीत. डॉक्टर हात टेकतील. चालता-बोलता मनुष्याचा प्राण जाईल.

५. काळी कांडी पोटाशी धरावी. (भावार्थ : जगण्यासाठी शेती करावी.)’

– श्री हालसिद्धनाथदेव [पू. भगवान वाघापुरे (डोणे) महाराज, जि. बेळगावी यांच्या माध्यमातून, भाकणुकीचे स्थळ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०१२ आणि २५.१.२०१९)]

 

२. आपत्काळाविषयीच्या भाकितांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका !

‘दुसर्‍या महायुद्धाच्या काळात एक दिवस एक फकीर मुंबई बंदरानजीक ‘अरे ! जान बचानी है तो भाग जाव !’, असे जोरजोराने ओरडत फिरत होता. त्याला वेडा समजून कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दोन दिवसांनंतर मुंबई बंदरात प्रचंड स्फोट झाला. अनेक घरे कोसळली आणि शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.’ (संदर्भ : ग्रंथ ‘मानवी जीवनातील गूढ रहस्ये – भाग ३’, पृष्ठ क्र. ३७, लेखक – स्वामी दत्तावधूत)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात