हिंदूंनो, सण साजरे करतांना त्यांचे महत्त्व लक्षात घ्या आणि संस्कृती भक्षकांना प्रतिरोध करा !

१. श्रीगणेशजन्माची कथा

१ अ. पार्वतीने आपल्या मळापासून श्रीगणेशाची निर्मिती करणे

एकदा शिव काही कार्यास्तव पुष्कळ कालावधीसाठी बाहेर जातात. त्या वेळी एकट्या असलेल्या पार्वतीला लक्ष्मी तिच्या मळापासून पुत्र बनवण्यास सांगते. त्यामुळे तिचे एकटेपणही दूर होईल आणि जगताचा उद्धारही त्या पुत्रामुळे होईल, असे ती सांगते. तिच्या आग्रहास्तव पार्वती आपल्या मळापासून एका मुलाची मूर्ती बनवून त्यात प्राणप्रतिष्ठा करते. तोच हा सर्वांचे कल्याण करणारा शुभकारी गणेश होय. या गणेशाला स्वतःच्या पित्याचे दर्शन घडलेले नसते. एकदा शिव येणार म्हणून पार्वती मंगलस्नानाला गेलेली असते. स्नानात सतत व्यत्यय येत असल्याने ती गणेशाला द्वाराजवळ उभा राहून कुणालाही आत न सोडण्याविषयी सांगते. गौरीनंदन गणेश मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून कुणालाही आत सोडत नाही.

१ आ. शिवाने गणेशाचे शिर धडावेगळे करणे

त्याच वेळी शंकर तेथे येतात. पार्वतीला भेटण्यासाठी ते आत जात असतांना गणेश त्यांना अडवतो. त्याला वारंवार सांगूनही तो त्यांना आत प्रवेश करू देत नाही. शिवभक्त, अनेक ऋषी, तसेच स्वर्गातील देवही त्याला शिवाला आत जाऊ देण्याची विनंती करतात; परंतु तो मुळीच विचलित होत नाही. उलट स्वतःच्या सामर्थ्याच्या अहंकारामुळे तो त्यांना तुच्छ लेखून युद्धासाठी आव्हान करतो. त्यांना युद्धास भाग पाडतो. देवतांना बांधून टाकतो. ऋषीमुनींना त्रास देतो. कुणाचेही तो ऐकत नाही. त्यामुळे शिव पुन्हा तिथे येतात. त्याला समजावतात; परंतु तो त्यांचाही अपमान करतो. त्यांना हीन लेखतो आणि त्यांच्यावर आपले शस्त्र सोडतो. शिवाचा नाइलाज होतो आणि शिव त्याच्यावर त्रिशूळ सोडून त्याचे शिर उडवतात. झालेल्या प्रकाराने सर्वच भयभीत होतात. पार्वतीला हा प्रकार कळल्यावर ती पुत्राला पुनर्जीवित करण्याचा शिवाजवळ हट्ट करते आणि ते शक्य नसल्याचे कळल्यावर ती रूद्र आणि प्रलयंकारी रूप धारण करते. देवदेवता सृष्टीच्या हितासाठी गणेशाला जिवंत करण्याची शिवाला विनवणी करतात. त्याला मूळ स्थितीत पुनर्जीवित करणे शक्य नसल्याने शिव त्याला दुसर्‍या कुणाचे तरी शिर लावण्यास सांगतात. तसे शिर सूर्यास्तापूर्वी जो प्रथम प्राणी दिसेल आणि जो स्वखुशीने शिर अर्पण करण्यास सिद्ध असेल त्याचेच असावे, असेही ते सांगतात.

१ इ. गजाचे शिर गणेशाच्या धडाला लावण्यात येणे

त्यानुसार एक गज स्वप्राण अर्पित करण्यास सिद्ध असल्याने त्याचे शिर आणून गणेशाला लावण्यात येते. हा गज म्हणजे गजासुर असतो. अनेक वर्षे शिवाचे तप करून तोे त्याला प्रसन्न करून घेतो. त्या वेळी तो शिवाला त्याच्या उदरात रहाण्यास सांगतो; परंतु ब्रह्मा आणि विष्णु त्याला तसे करण्यापासून परावृत्त करतात आणि त्याला कालांतराने तू शिवाजवळ कायमस्वरूपी रहाशील, असे वरदान देतात. या महाज्ञानी गजासुराला ते वरदान सफल होण्याची ही संधी मिळाल्याने तो अतिशय आनंदाने समर्पणास सिद्ध होतो.

२. शंकानिरसन न झाल्याने कथा कल्पित वाटणे

लहानपणापासून आपण पार्वतीने मळापासून बनवलेल्या गणेशाचा शंकर वध करतो आणि नंतर त्याला हत्तीचे म्हणजे गजाचे शिर लावून त्याला जिवंत करतो, अशी गणेशजन्माची कथा ऐकली असते. त्या वेळी अनेक प्रश्‍न पडायचे. मळापासून सजीव मूर्ती कशी बनते ? क्षुल्लक कारणावरून पिता पुत्राचा वध का करतो ? पुन्हा त्याला जिवंत का करतो ? तेही पूर्वीचे शिर न जोडता हत्तीचे शिर का जोडतो ? हे सर्व कसे शक्य आहे ?, असे वाटून या सर्व कथा कपोलकल्पित असाव्यात, असे वाटायचे. त्यानंतर वेळोवेळी वाचनात आलेल्या कथा, मुलाने विचारलेल्या प्रश्‍नांनी जागृत झालेली जिज्ञासा, काहींनी केलेले शंकानिरसन यातून त्यातील गर्भितार्थ लक्षात येत होता; परंतु प्रत्यक्षात शास्त्रार्थ मात्र साधनेत आल्यावरच कळत गेला. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता आहे. त्यांनीच जिज्ञासूपणे या प्रश्‍नांची उत्तरे शोधायला शिकवली.

३. कथेचा भावार्थ

३ अ. मळापासून शक्तीशाली पुत्र बनवणारी आदिशक्ती

आदिशक्ती पार्वती ही जगज्जननी आहे. तिच्यापासून समस्त प्रकृतीची उत्पत्ती होते. तिच्यातील प्रचंड शक्तीमुळेच ती शिवाची शक्तीदायिनी आहे. तिच्याविना शिव शव आहे, हे सर्वज्ञात आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाला मर्यादा असतात; परंतु साधनेच्या बळावर पार्वती पंचमहाभूतांनी युक्त देहाच्या मर्यादा ओलांडून गेलेली असते; म्हणूनच ती देवाशी एकरूप होऊ शकते. अशा आदिशक्तीला अशक्य ते काय आहे ? त्यामुळेच ती तिच्या मळापासून तिच्या चैेतन्याच्या अंशाला, पुत्राला सिद्ध करू शकली.

परात्पर गुरु प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या हातावरील दैवी कण दुसर्‍या हाताने खाली पाडले. त्या दैवी कणांचे आपण सारेच साक्षीदार आहोत. एका पंचमहाभूतांवरील स्वामित्वाने त्यांची खोली आणि वातावरण यात होणारे पालटही आज विज्ञानाला आव्हान देणारे आहेत. त्यामुळे कल्पांतापूर्वी दैत्यासुरमर्दिनी आदिशक्ती पार्वतीच्या मळातून महाशक्तीशाली पुत्राची निर्मितीही संभव आहे.

३ आ. जगत् कल्याणासाठी अहंकारी पुत्राला देहदंड देणारा जगत्पिता शिव !

गणेश महापराक्रमी होता. सामर्थ्याला म्हणजेच शक्तीला सात्त्विकतेची, म्हणजेच शिवाची जोड नसेल, तर सामर्थ्याचा अहंकार वाढतो. तो सर्वदा विनाशकारी असतो. त्याव्यतिरिक्त हा पुत्र आपली आज्ञा मानणारा असावा, असाही त्याच्या जन्माच्या वेळी पार्वतीचा एक स्वार्थी विचार असतो. स्वार्थी वृत्तीने केलेली कलाकृती सात्त्विकतेपासून दूर जाते. त्यामुळे मातेचे आज्ञापालन करतांना गणेश सारासार विवेकाच्या मर्यादा उल्लंघतो. करुणा, दया, क्षमा यांचे भान उरत नाही. रज-तम गुणांकडे झुकणारी ही शक्ती तमोगुणी अधिक होते. गणेशाच्या संदर्भातही असेच झाले होते. आदिशक्तीच्या मळापासून बनलेल्या गणेशाची शक्ती अफाट होती; परंतु बुद्धी मात्र मलिन, रज-तमोगुणी होती. वास्तविक हा पार्वतीनंदन विश्‍वाच्या कल्याणासाठी, ते मंगलमय करण्यासाठी अवतीर्ण झाला होता; परंतु अशी मलिन बुद्धी जगाचे कल्याण नव्हे, तर अकल्याणच करणार, हे त्रिकालज्ञानी शिवाने जाणले होते. आपल्या सामर्थ्याच्या अहंकाराने अन्याय करणार्‍या पुत्रामुळे जगाचे भवितव्य अंधकारमय होऊ नये, यासाठी त्याची मलिन बुद्धी जाणे आवश्यकच होते आणि ती घालवण्यासाठीच मलिन बुद्धी असलेले त्याचे शिर धडावेगळे करण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो. धन्य तो पिता, जो जगत् कल्याणासाठी पुत्राचे शिर उडवतो.

भारतीय संस्कृतीने आपल्यासमोर केवढा मोठा आदर्श ठेवला आहे ! असाच आदर्श संभाजीराजांच्या अपराधासाठी त्यांना दंड देणार्‍या छ. शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवला आहे. पुत्राच्या मोहबंधनातून मुक्त होऊन असा कठोर निर्णय छ. शिवाजी महाराज घेऊ शकले, ते केवळ हिंदु संस्कृतीतील अशा महान आदर्शांचा त्यांच्यावर सुसंस्कार करणार्‍या राजमाता जिजाबाईंमुळेच. केवढी महान आहे आपली हिंदु संस्कृती ! आज दुर्दैवाने भारतात पुत्रांचे कुकर्म लपवण्यासाठी त्याला पाठीशी घालणारे गर्वोन्मत्त राज्यकर्ते आपण गल्लोगल्ली पहात आहोत. त्याचे राष्ट्रविघातक परिणामही भोगत आहोत.

३ इ. महाज्ञानी गजासुराचे शिर लावून शिवाने गणेशाची मलिनबुद्धी शिवबुद्धी करणे

गजासुराचे शिर लावल्याने मलिनबुद्धी असलेले गणेशाची बुद्धी पुन्हा शिवमय होते. गजासुराने केलेल्या शिवाच्या कठोर तपस्येमुळे तो महाज्ञानी बनतो. त्यामुळे गजाननाला, म्हणजे गणेशाला उपजतच सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. शक्तीच्या मळापासून बनलेली मलिन बुद्धी शिव, म्हणजे पवित्र, सात्त्विक होते.

प.पू. डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवण्यास सांगण्याचे महत्त्व इथे प्रकर्षाने मनावर बिंबते. जोपर्यंत आमची मलिनबुद्धी आहे, आमच्यात अहं आणि स्वभावदोष आहेत, तोपर्यंत आम्ही सात्त्विक बनू शकत नाही आणि जोपर्यंत आम्ही सात्त्विक होत नाही, तोपर्यंत सत्त्वगुणी ईश्‍वराकडे आम्ही कसे जाणार ? त्याही पलीकडे म्हणजे गुणातीत होणे, तर फारच दूरची गोष्ट ! ईश्‍वराचे गुण अंगी येण्यासाठी मानवी देहाच्या या सर्व देहमर्यादा त्यागणे, तम-रजाकडून सत्त्वाकडे आणि सत्त्वाकडून गुणातीत होण्याकडे आमचा प्रवास होण्यासाठी प्रेमळ गुरुमाऊली किती प्रयत्न करते ! वेळप्रसंगी ती कठोरही होते; परंतु पुत्राच्या कल्याणासाठी कठोर झालेल्या शिवाप्रमाणेच ती आमच्या कल्याणासाठीच सारे काही करते. देवा, याची जाणीव तू यानिमित्ताने करून दिलीस, यासाठी कोटी कोटी कृतज्ञता !

४. गणेशोत्सवाचे महत्त्व

४ अ. श्रीगणेशाचे विडंबनात्मक चित्र आणि मूर्ती बनवणार्‍यांनो श्रीगणेशाची अवकृपा ओढवून घेऊ नका !

अनेकदा आपण समाजात काही धर्मद्रोह्यांनी बनवलेले श्रीगणेशाचे विडंबनात्मक चित्र वा मूर्ती पहातो. जो जसे देवाचे ध्यान करतो, तसा त्याला देव दिसतो आणि तो तशा पद्धतीने त्याला साकारतो. सात्त्विक व्यक्तींना ध्यानात गणेशाचे सात्त्विक रूपच दिसणार आणि ते त्याला तशाच रूपात साकारणार, उदा. मोरया गोस्वामींनी बनवलेली श्रीगणेशमूर्ती, तर तमोगुणी व्यक्ती स्वतःच्या गुणाधीन राहून श्रीगणेशाकडे पहाणार. त्यामुळे तिने बनवलेली मूर्ती असात्त्विकच असणार. तिच्यात श्रीगणपतीची गुणवैशिष्ट्ये, स्पंदने येण्याऐवजी विकृतीच अधिक असणार. त्यामुळे हिंदु संस्कृतीत अगदी लहानपणापासूनच मुलांवर श्रीगणेशाविषयी आत्यंतिक आदर, भाव आणि श्रद्धा वाढवणारे संस्कार करतात. जिथे अशा संस्कृतीचा अभाव आहे, स्वतःच्या देवतांविषयी अज्ञान आहे आणि श्रद्धांच्या ऐवजी अंधश्रद्धाच आहे, असे दुर्मती, विकृत आणि धर्मद्रोहीच देवतांचे विडंबन करण्यास धजावतात, कधी कलेच्या नावाखाली, तर कधी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, तर कधी सत्तेच्या ! परंतु ते हे विसरतात की, जो जगतत्पिता स्वतःच्या पुत्राची अमंगल अन् अहंकारी वृत्ती जाण्यासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी आणि पुत्र जगाचा कल्याणकारी होण्यासाठी त्याचा वध करतो, तो या विडंबनकर्त्या संस्कृतीभक्षकांना नक्कीच धडा शिकविल ! त्याची अवकृपा का ओढवून घ्यायची ?

४ आ. मंगलदायी श्रीगणेशाचे महत्त्व जाणून घ्या !

श्रीगणेश त्रिगुणातीत, शक्तीत्रयात्मक, शुभदायी, संकटनिवारक, बुद्धीदाता आणि कार्य सिद्धीस नेणारा आहे. तो गणनायक, उत्तम नेता आणि शक्तीशाली आहे. तो परमदयाळू आहे. जगताचे मंगल करणार्‍या श्रीगणेशाला प्रत्येक कार्यारंभी प्रथमपूजनाचा मान दिला जातो, तो याचसाठी. लहान मुलांना विद्यारंभी प्रथम श्री लिहायला सांगतात. हिंदु धर्मात श्रीगणेशाचे प्रथम पूजन करून नंतरच सर्व प्रकारच्या पूजांना आरंभ केला जातो. श्रीगणेशाच्या आवाहनामुळे देवता पूजास्थानी येऊ शकतात. हे श्रीगणेशाचे महत्त्व आजच्या पिढीला कळायला हवे.

५. हिंदूंनो, हिंदु संस्कृतीची महानता अनुभवा आणि भावी पिढी सुसंस्कृत करा !

अनेकदा पालक मुलांना श्रीगणेशोत्सवात ठिकठिकाणी दाखवण्यात येणारे देखावे, चलत्चित्रे दाखवण्यास कौतुकाने घेऊन जातात. पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवात विविध धार्मिक कथांमधील प्रसंग दाखवलेले असायचे. आम्हीही मुलांना घेऊन जायचो. त्या वेळी मुले जिज्ञासेने अनेक प्रश्‍न विचारायची. आपल्यालाच त्याची उत्तरे ठाऊक नसतील, तर मुलांना आपण काय उत्तर देणार ? मुलांची जिज्ञासा अर्धवट रहाते आणि त्यांना या कपोलकल्पित कथा वाटतात. पुढे शिक्षणक्रमातही त्यांना त्याविषयी काही माहिती मिळत नाही आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ही पिढी स्वसंस्कृतीपासून दूर जाते. त्यामुळे इतर पंथांचे लोक किंवा काही अश्रद्धावान, (कु)बुद्धीवादी, तथाकथित बुद्धीवान आणि काही अतिसुधारणावादी जेव्हा तुमच्या धर्मात माकड, हत्ती, साप असल्या प्राण्यांची पूजा करतात आणि तरीही हिंदु धर्म आणि संस्कृती महान आहे, असे तुम्ही म्हणता. ही विसंगती नाही का ?, अशा प्रकारचे प्रश्‍न विचारतात, तेव्हा त्यांच्याकडे त्याला उत्तर नसते.

६. हिंदूंनो, साधना करून देवतांची कृपा संपादन करून आपत्काळाला सामोरे जा !

हिंदूंनो, हिंदूंच्या सणांचे महत्त्व जाणून घ्या. कल्पकल्पांतापासून ऋषीमुनींनी विविध प्रकारे केलेले या देवतांचे गुणगौरव, स्तवन, त्यांच्या आशीर्वादासाठी सांगितलेले जप-तप-व्रते, तसेच परंपरागत सण-उत्सव यांचे महत्त्व जाणून घ्या. ऋषीमुनींनी देवतांचे ध्यान आणि उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि जगत्कल्याणासाठी त्यांच्याकडून वर मागून घेतले. वर्षानुवर्षे साधना करून अनेक विषयांवर ज्ञान मिळवून मानवजातीसाठी ते ज्ञानभांडार खुले केले. हे त्यांचे उपकार विसरू नका. आपणही उपासना करून, भक्त बनून देवतांची कृपा संपादन करूया. सारी मानवजात आज संस्कृतीहीन होऊन स्वार्थासाठी सृष्टी नष्ट करण्याला उद्युक्त झाली आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्याला आज विज्ञान नव्हे, तर अध्यात्म, धर्म आणि देवताच वाचवणार आहेत. त्यासाठी साधना करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, यासाठी धर्मशिक्षण घ्या. स्वतः धर्माचरण करून इतरांना प्रेरित करा. धर्म आणि संस्कृती वाचवा ! राष्ट्र वाचवा ! श्रीगणेश आणि श्रीकृष्ण यांची कृपा संपादन करून आणि साधनेने बळ वाढवून हिंदु राष्ट्र आणूया आणि रामराज्याची सुंदर पहाट पहाण्यास सिद्ध होऊया !

गुरुदेव, आजच्या दैनिकातील श्रीगणेशाची विडंबनात्मक दृश्ये पाहून मनाला पुष्कळ खंत वाटत होती. त्यातून आपणच बाहेर काढून हे विचार सुचवलेत, ते आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक समर्पित करते.

– सौ. रजनी साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment