विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व

Article also available in :

‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी ‘विवाहसंस्कार’ हा महत्त्वाचा संस्कार आहे. विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत भारतात पूर्वीपासून प्रचलित आहे. विवाहाचा उद्देश आणि त्या अनुषंगाने वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

१. विवाहाचा उद्देश (वैदिक दृष्टीकोन)

‘पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने विश्वनिर्मिती झाली. वैदिक परिभाषेत पुरुषाला अग्नि आणि प्रकृतीला सोम म्हटले आहे. एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री ही ‘अर्धेंद्र’ म्हणजे अपूर्ण असते. पुरुषरूपी अग्नि आणि स्त्रीरूपी सोम यांच्या ऐक्याने जीवनाला पूर्णत्व येते. विवाहबद्ध झालेला पुरुष आणि स्त्री हे ‘धर्मपालन’ करण्यासाठी एकमेकांस पूरक आणि साहाय्यक होतात. धर्मपालन केल्याने मनुष्याला ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते.

विवाहसंस्कार हा गृहस्थाश्रमाचा आरंभबिंदु होत. गृहस्थाश्रमात राहून दांपत्याला यज्ञ, पूजा आदी कृती केल्यामुळे ‘देवऋण’, संतान उत्पन्न केल्यामुळे ‘पितृऋण’ आणि अतिथींची सेवा केल्यामुळे ‘समाजऋण’ फेडता येते. विवाह संस्कारामुळे कुटुंबव्यवस्था टिकून राहून पर्यायाने समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था उत्तम रहाते.

 

२. विवाह निश्चित करतांना कोणत्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे ?

विवाह निश्चित करतांना जोडीदाराचे कुल (घराणे), विद्या (बुद्धीमत्ता आणि शिक्षण), वय, शील (प्रकृती आणि स्वभाव), धन (अर्थार्जन करण्याची क्षमता), रूप (शारीरिक स्थिती) आणि रहाण्याचे ठिकाण यांची स्थिती विचारात घ्यावी. याविषयी काही विवेचन पुढे दिले आहे.

अ. वर आणि वधू समान कुलातील असल्यास दोन्ही घराण्यांचे कुलाचार, चालीरीती, कुटुंबियांची मानसिकता, कुटुंबियांची वैचारिक पातळी आदींमध्ये सारखेपणा असल्याने दांपत्याला एकमेकांशी आणि कुटुंबियांशी जुळवून घेण्यास सुलभ जाते.

आ. मुलासाठी २५ ते ३० आणि मुलीसाठी २० ते २५ हे वय विवाहासाठी योग्य समजले जाते.

इ. ‘मुलगा आणि मुलगी यांची प्रकृती आणि स्वभाव एकमेकांशी किती प्रमाणात जुळतो ?’ हे कळण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे साहाय्य घेतले जाते.

ई. पती-पत्नीचे गुण, कर्म आणि स्वभाव यांत सारखेपणा असल्यास त्यांच्याद्वारे उत्पन्न होणारी संतती त्यांच्याहून श्रेष्ठ गुणांनी संपन्न असते.

श्री. राज कर्वे

३. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्यामागील उद्देश

‘वर आणि वधू यांची प्रकृती आणि स्वभाव एकमेकांना पूरक असावेत’, हा जन्मकुंडल्या जुळवण्यामागील उद्देश आहे. असे दांपत्य जीवनातील समस्यांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतील. व्यक्तीची प्रकृती आणि स्वभाव जन्मकुंडलीवरून चांगल्याप्रकारे समजतो. त्यामुळे विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत भारतात प्रचलित आहे. जन्मकुंडल्या जुळवतांना कुंडलीतील पुढील घटकांचा विचार केला जातो.

३ अ. लग्नरास

कुंडलीत प्रथम स्थानात असणार्‍या राशीला ‘लग्नरास’ म्हणतात. लग्नराशीवरून व्यक्तीची शारीरिक प्रकृती, कार्यक्षमता, कार्यक्षेत्र आदी गोष्टींचा बोध होतो. वर आणि वधूची लग्नरास एकमेकांच्या शुभ योगात असल्यास त्यांचे व्यक्तीमत्त्व परस्परांना पूरक असते. ज्योतिषशास्त्रात १२ राशींची पृथ्वी, आप, तेज आणि वायू या ४ तत्त्वांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यांपैकी पृथ्वी आणि आप या तत्त्वाच्या राशी एकमेकांच्या शुभयोगात येतात, तसेच तेज आणि वायू या तत्त्वाच्या राशी एकमेकांच्या शुभयोगात येतात म्हणजे एकमेकांना पूरक असतात.

३ आ. जन्मरास

कुंडलीत चंद्र ज्या राशीत असतो, ती रास व्यक्तीची ‘जन्मरास’ असते. चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे जन्मराशीवरून व्यक्तीच्या आवडी-निवडी, स्वभाव-वैशिष्ट्ये, भावनाप्रधानता, मानसिक धारणा आदी गोष्टींचा बोध होतो. वर आणि वधू यांच्या जन्मराशी एकमेकांच्या शुभयोगात असल्यास त्यांचा स्वभाव एकमेकांना अनुकूल असतो. वधू-वरांच्या जन्मराशी आणि जन्मनक्षत्र यांची परस्पर-पूरकता समजण्यासाठी ‘गुणमेलन’ करण्याची (३६ गुण जुळवण्याची) पद्धत भारतात पूर्वीपासून प्रचलित आहे. तथापि गुणमेलनाच्या जोडीला कुंडलीतील अन्य घटक विचारात घेणे आवश्यक असते.

३ इ. ग्रहस्थिती

वर आणि वधू यांच्या जन्मकुंडल्यांतील ग्रहस्थितीचा अभ्यास करून त्यांचे आरोग्य, आर्थिक स्थिती, गृहसौख्य, संततीसौख्य इत्यादी गोष्टींचा विचार करून ‘वैवाहिक जीवन किती प्रमाणात यशस्वी होईल ?’, याचा विचार केला जातो.

 

४. विवाह प्रारब्धाधीन आहे, तर जन्मकुंडल्या पहाण्याची आवश्यकता काय ?

हिंदु धर्मातील तत्त्वज्ञानानुसार व्यक्तीचा जन्म, विवाह आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. असे असतांना ‘विवाहासंदर्भात जन्मकुंडल्या पहाण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न मनात येऊ शकतो. सध्याच्या काळानुसार मानवाचे प्रारब्ध ६५ टक्के असून क्रियमाण कर्म ३५ टक्के आहे. विवाह प्रारब्धानुसार असला तरी ‘योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रयत्न करणे’ हे आपले क्रियमाण कर्म आहे. ज्याप्रमाणे मनुष्य निरोगी रहावा यासाठी आयुर्वेदात व्यायाम, योग्य आहार-विहार आदींचे पालन करण्यास सांगतले आहे, त्याप्रमाणेच वैवाहिक जीवन सुखी असावे म्हणून सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडल्या जुळवण्यास सांगितले आहे. बुद्धीला कळण्यास कठीण असणार्‍या काही गोष्टी उदा. व्यक्तीच्या प्रारब्धाची तीव्रता, व्यक्तीला असणारा सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादींचा बोध जन्मकुंडलीद्वारे होतो. जन्मकुंडल्या पाहिल्यामुळे व्यक्तीला तिच्या जोडीदाराची प्रकृती माहित होऊन तिला समजून घेण्यासही साहाय्य होते.

 

५. सनातन धर्माने मानवाला निसर्गाला
अनुकूल असे आदर्श जीवन जगण्याची शिकवण देणे

पाश्चात्त्य जीवनशैलीच्या प्रभावामुळे भारतातील विवाहसंस्थेवर आणि कुटुंबव्यवस्थेवर मोठा दुष्परिणाम झाला आहे. भारतात घटस्फोटांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये आणि सुशिक्षित लोकांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. घटस्फोटांमुळे होणारे दुष्परिणाम भयावह आहेत. पाश्चात्त्य विचारसरणी मुख्यतः जडवादावर आणि भोगवादावर आधारलेली आहे. त्यामुळे स्वच्छंदीपणे जीवन जगण्याकडे तेथील लोकांचा कल आहे; परंतु ईश्वराने निर्माण केलेले विश्व स्वच्छंदीपणे नव्हे, तर ठोस नियमांवर चालते. सनातन धर्माने मानवाला निसर्गाला अनुकूल असे आदर्श जीवन जगण्याचे नीती-नियम आखून दिले आहेत. विवाहाच्या बाबतीत जोडीदाराची निवड मनस्वीपणे न करता कुल, शील, वय आदी गोष्टी विचारात घेतल्यास वैवाहिक जीवन यशस्वी होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढेल.’

 

वाचकांना नम्र आवाहन !

जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी करावयाचे संस्कार हिंदु धर्माने सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा ‘विवाहसंस्कार’ ! विवाहातील धार्मिक विधींमागील शास्त्र सांगण्यासह विवाहातील अपप्रकारांवर बोट ठेवतांनाच विवाह आदर्शरित्या कसा करावा, याचे दिशादर्शन सनातन संस्थेचा लघुग्रंथ ‘विवाहसंस्कार – शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’ यात केले आहे. सनातन संस्थेचे ग्रंथ Sanatanshop.com या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ उपलब्ध आहेत. याचा वाचकांनी अवश्य लाभ घ्यावा !

1 thought on “विवाह निश्‍चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व”

Leave a Comment