भारतात पुन्हा एकदा ‘रामराज्या’ची गुढी उभारण्यासाठी कटीबद्ध होऊया !

Article also available in :

गुढीपाडव्यानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘हिंदु संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नसून, तो अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेला अत्यंत शुभ दिवस आहे. प्रभु श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून आणि आसुरी शक्तींचा विनाश करून जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येतील भाविक नागरिकांनी आनंद आणि विजय यांचे प्रतीक म्हणून घराघरांवर गुढ्या उभारल्या होत्या. तोच विजयोत्सव आणि तीच आदर्शाची गुढी आजही आपल्याला खर्‍या अर्थाने ‘रामराज्य’ स्थापन करण्याची प्रेरणा देत आहे. रामराज्यातच खर्‍या सुखाचा आणि आनंदाचा अनुभव घेता येतो.

रामराज्य, म्हणजे असे राज्य जिथे आध्यात्मिक श्रद्धा सुशासनामध्ये परावर्तित होते. आजच्या काळातही भारतात आदर्श राजा, सात्त्विक प्रजा, सुशासन आणि सुरक्षा असलेले रामराज्य आणणे, हीच खरी कालानुसार धर्मसंस्थापना आहे. रामराज्यासाठी नागरिकांची पात्रता, म्हणजे ते ‘साधक’ (नित्य साधना करणारे किंवा भगवद् भक्त ) असणे होय. जेव्हा समाजातील व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि धर्मसंस्कारी होते, तेव्हाच खर्‍या अर्थाने आदर्श राष्ट्ररचना साकार होते.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण घराबाहेर गुढी उभारण्यासह रामराज्याच्या सिद्धांतावर आधारित राष्ट्ररचनेसाठी योगदान देण्याचा आणि साधना करण्याचा संकल्प करूया. भारतात पुन्हा एकदा ‘रामराज्या’ची गुढी उभारण्यासाठी कटीबद्ध होऊया !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment