गुरुपालट (गुरु ग्रहाचा मेष राशीत प्रवेश)

२२ एप्रिल २०२३ या दिवशी शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु या ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला ! त्या निमित्त…

‘शुक्रवार, २१.४.२०२३ या दिवशी, म्हणजे वैशाख शुक्ल प्रतिपदा या तिथीला उत्तररात्री २९.१५ वाजता, म्हणजे २२ एप्रिल शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु या ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते. १.५.२०२४ या दिवशी गुरु हा ग्रह वृषभ राशीत प्रवेश करील.

गुरु ग्रहाचा मेष राशीत प्रवेश

 

१. गुरु ग्रहाचा मेष राशीत प्रवेश आणि गुरु ग्रहपालटाचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व

‘शुक्रवार, २१.४.२०२३ या दिवशी, म्हणजे वैशाख शुक्ल प्रतिपदा या तिथीला उत्तररात्री २९.१५ वाजता म्हणजे २२ एप्रिल शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु हा ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाल शनिवारी पहाटे ३.२४ पासून सकाळी ७.०६ पर्यंत आहे. पीडापरिहारार्थ पुण्यकालात जप, दान, पूजा करणे इत्यादी पुण्यकारक आणि पीडापरिहारक आहे.’ (साभार : दाते पंचांग)

गुरु ग्रह एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याचा हा संधीकाळ आहे. संधीकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. गुरु हा सत्स्वरूपाचा कारक ग्रह आहे. ज्या व्यक्तींना या संपूर्ण पुण्यकालात नामजप करणे शक्य नसेल, त्यांनी न्यूनतम गुरु ग्रहाचा राशीत प्रवेश होण्यापूर्वीची १५ मिनिटे आणि राशीत प्रवेश झाल्यानंतरची १५ मिनिटे नामजप करावा.

सौ. प्राजक्ता जोशी

 

२. ‘गुरु’ या ग्रहाचे महत्त्व !

गुरु हा शुभ ग्रह असून लौकिकदृष्ट्या या ग्रहाला सर्व ग्रहांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदु धर्मामध्ये उपनयन, विवाह आदींसारख्या कोणत्याही शुभ कार्यांमध्ये गुरुबळ पाहिले जाते. धर्मशास्त्राप्रमाणे गुरूच्या अस्तामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही. गुरु सत्स्वरूपाचा कारक ग्रह आहे. हा ग्रह आकाशतत्त्वाचा असून आकाशतत्त्व पंचतत्त्वांपैकी सर्वांत श्रेष्ठ तत्त्व होय. हा ग्रह सत्त्वगुणी, व्यासंगी, न्यायी, दयाळू, परोपकारी, महत्त्वाकांक्षी आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे. साधनेसाठी गुरुबळ उत्तम असणे आवश्यक असते.

 

३. मेष राशीतील गुरूचे होणारे परिणाम

गुरु हा ग्रह सूर्यमालेतील आकाराने सर्वांत मोठा असलेला ग्रह आहे. मेष राशीचा राशीस्वामी ‘मंगळ’ हा ग्रह आहे. निसर्गकुंडलीत मेष रास लग्नस्थानात (कुंडलीतील प्रथम स्थानात) येते. लग्नस्थान हे कुंडलीतील धर्मत्रिकोण दर्शवणार्‍या ३ स्थानांपैकी एक स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या ‘मित्र’ आणि ‘शत्रू’ राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा मित्र राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. गुरु हा शुभ ग्रह असल्याने प्रत्येक कार्यात गुरुबळ पाहिले जाते. कुंडलीत गुरु ग्रह शुभ असणे महत्त्वाचे असते. शुभ गुरु ग्रहामुळे उच्च शिक्षण, परदेशगमन, प्रसिद्धी, तत्त्वज्ञान, धर्म, कीर्ती; तसेच आर्थिक, धार्मिक आणि आध्यात्मिक या सर्वच क्षेत्रांत यश मिळते.

 

४. राशीपरत्वे गुरूची स्थाने

मेष राशीत प्रवेश करणारा गुरु मेष राशीस पहिला, मीन राशीस दुसरा, कुंभ राशीस तिसरा, मकर राशीस चौथा, धनु राशीस पाचवा, वृश्चिक राशीस सहावा, तूळ राशीस सातवा, कन्या राशीस आठवा, सिंह राशीस नववा, कर्क राशीस दहावा, मिथुन राशीस अकरावा आणि वृषभ राशीस बारावा आहे.

 

५. मीन राशीतील गुरुभ्रमणाचे राशीनुसार परिणाम

अ. ‘गुरु हा ग्रह मकर, कन्या आणि वृषभ या राशींना अनुक्रमे चौथा, आठवा अन् बारावा येत असल्याने या राशीच्या व्यक्तींनी; तसेच ज्या राशीच्या व्यक्तींना लोह पादाने गुरु येत आहे, त्यांनी पीडापरिहारार्थ गुरु ग्रहाच्या उद्देशाने जप, दान, पूजा इत्यादी अवश्य करावी.

आ. मेष, कुंभ, वृश्चिक आणि कर्क या राशींना गुरु हा ग्रह अनुक्रमे पहिला, तिसरा, सहावा अन् दहावा येत असल्याने त्यांनी पुण्यकालात जप, दान आणि पूजा यांपैकी एखादा प्रकार केल्याने त्या पिडेचा परिहार होईल.

इ. वृषभ, कर्क आणि धनु या राशींना गुरु हा ग्रह सुवर्ण पादाने आला आहे. सुवर्ण पादाने आलेल्या गुरूचे फळ ‘चिंता’ आहे.

ई. मेष, कन्या आणि मकर या राशींना गुरु हा ग्रह रौप्य पादाने आला असून त्याचे फळ ‘शुभ’ आहे.

उ. सिंह, वृश्चिक आणि मीन या राशींना गुरु ग्रह ताम्र पादाने आला असून त्याचे फळ श्रीप्राप्ती, म्हणजे लक्ष्मीप्राप्ती (पैसा, धन यांची प्राप्ती) इत्यादी आहे.

ऊ. मिथुन, तूळ आणि कुंभ या राशींना गुरु ग्रह लोह पादाने आला आहे अन् त्याचे फळ ‘कष्ट’ आहे.’(साभार : दाते पंचांग)

 

६. गुरु ग्रह पालटाच्या कालावधीत करावयाची साधना

अ. गुरु ग्रहाची पीडापरिहारक दाने : सुवर्ण, कांसे, पुष्कराज, हरभर्‍याची डाळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र आणि पिवळी फुले.

आ. जपसंख्या : १९ सहस्र

इ. पूजेसाठी गुरूची सुवर्णाची प्रतिमा वापरावी.

ई. गुरु ग्रहाचा पौराण (पौराणिक) मंत्र

देवानां च ऋषीणां च, गुरुं काञ्चनसंनिभम् ।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं, तं नमामि बृहस्पतिम् ।। – नवग्रहस्तोत्र, श्लोक ५

अर्थ : देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अतिशय बुद्धीवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ, अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.

उ. गुरूच्या सुवर्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि दान यांचा संकल्प

उ १. दानाचा संकल्प

‘मम जन्मराशेः सकाशात् अनिष्टस्थान-स्थित-गुरोः पीडापरिहारार्थम् एकादश-स्थानवत् शुभफलप्राप्त्यर्थं सुवर्ण-प्रतिमायां बृहस्पतिपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) (टीप) दानं च करिष्ये ।

अर्थ : ‘मी माझ्या जन्मपत्रिकेत अनिष्ट स्थानी असलेल्या गुरूची पीडा दूर व्हावी आणि तो कुंडलीतील अकराव्या, म्हणजे ‘लाभ’ स्थानात असल्याप्रमाणे शुभ फल देणारा व्हावा’, यासाठी सुवर्णाच्या गुरुमूर्तीची पूजा अन् ‘गुरु महाराज प्रसन्न व्हावेत’, यासाठी ‘अमुक’ वस्तूचे दान करतो.

टीप – ‘अमुक’ या शब्दाच्या ठिकाणी ज्या वस्तूचे दान करायचे असेल, त्या वस्तूचे नाव घ्यावे.

उ २. ध्यान

अहो वाचस्पते जीव सिन्धुमण्डलसम्भव एह्यङ्गिरससम्भूत हयारूढ चतुर्भुज ।
दण्डाक्षसूत्रवरद कमण्डलुधर प्रभो महान् इन्द्रेति सम्पूज्यो विधिवन्नाकिनां गुरुः ।।

अर्थ : हे वाचस्पति, तुझा जन्म आकाशगंगेतून झाला आहे. तू चिरंजीव हो. हे अंगिरसपुत्रा, तू अश्वावर आरूढ झालेला आहेस. तू तुझ्या तीन हातांत दंड, जपमाळ आणि कमंडलू धारण केला आहेस. तुझा चौथा हात वर देण्याच्या मुद्रेत आहे. तू महान आहेस. तू ज्ञानाचा स्वामी आहेस. तू देवांचा गुरु आहेस. आम्ही तुझे विधीवत् पूजन करतो.

६ उ ३. दानाचे महत्त्व

बृहस्पतिप्रीतिकरं दानं पीडानिवारकम् ।
सर्वापत्तिविनाशाय द्विजाग्याय ददाम्यहम् ।।

अर्थ : गुरु महाराजांना प्रिय असे दान दिल्यावर पिडांचे, तसेच सर्व आपत्तींचे निवारण होते. असे हे दान मी श्रेष्ठ अशा ब्राह्मणाला देत आहे.

 

७. ग्रहांच्या अशुभ स्थितीत साधनेचे महत्त्व !

गोचर कुंडलीतील (चालू ग्रहमानावर आधारित कुंडलीतील) ग्रह अशुभ स्थितीत असेल, तर साधना न करणार्‍या व्यक्तीला अधिक त्रास होण्याचा संभव असतो; याउलट साधना करणार्‍या व्यक्तीला सात्त्विकतेमुळे ग्रहांच्या होणार्‍या अशुभ परिणामांचा फारसा त्रास होत नाही. या कालावधीत अधिकच त्रास होत असेल, तर ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करावा. वर दिलेला गुरूचा पौराण मंत्रही म्हणू शकतो.

अध्यात्मातील एक वैशिष्ट्य असे आहे की, अनुकूल काळापेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे साधकांनी अशुभ ग्रहस्थितीचा परिणाम मनावर करून न घेता साधनेचे प्रयत्न अधिकाधिक वाढवण्याकडे लक्ष द्यावे.’

– सौ. प्राजक्ता संजय जोशी, ज्योतिष फलित विशारद आणि अंक ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (६.४.२०२३)

Leave a Comment