कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ !

वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी चालू झाली. त्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. या सत्संगांत विविध राज्यांतील अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले आणि त्यांनी सत्संगांत सांगितल्याप्रमाणे साधना करणे चालू केले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

 

१. मध्यप्रदेश

१ अ. सौ. स्वाती शेकटकर, जबलपूर

१ अ १. आचारधर्मामागील वैज्ञानिक पैलूंचा बोध झाल्यामुळे सनातन संस्कृतीवरील श्रद्धा अन् अभिमान वाढणे

‘या ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या रूपात आमच्या घरी ज्ञानगंगाच आली आहे. आपण परंपरेने चालत आलेल्या आचारधर्माचे पालन करत असतो. त्याला असलेला तर्कसंगत आधार आणि त्यामागील वैज्ञानिक पैलू यांचा बोध मला या सत्संगांतून होत आहे. त्यामुळे मी मुलांना त्याविषयी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत आहे आणि माझी सनातन संस्कृतीवरील श्रद्धाही दृढ होऊन मला तिचा अभिमान वाटत आहे. ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा आहे. प.पू. गुरुदेव आणि सर्व सद्गुरु यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

१ आ. सौ. अर्चना जोशी, भोपाळ

१ आ १. कुलदेवीचा नामजप केल्यावर एका रात्री आलेले संकट दूर होणे

‘एकदा मध्यरात्री माझ्या कुटुंबावर एक संकट आले होते. त्या रात्रीच मी आमच्या कुलदेवीचा नामजप चालू केला होता. माझ्या समवेत माझ्या दोन्ही मुलींनीही कुलदेवीचा नामजप केला. सकाळ होईपर्यंत त्या समस्येवर पुष्कळ चांगला उपाय मिळाला. त्यामुळे आमच्या कुटुंबाला पुष्कळ शांतता मिळाली. हा नामजपाचाच चमत्कार होता.

१ आ २. मुलीला पुष्कळ ताप आल्यामुळे ‘बोर्डा’च्या परीक्षेच्या ठिकाणी जाऊन ‘ड्युटी’ (कामकाज) करणे शक्य नसणे आणि रात्री कुलदेवीचा नामजप केल्यावर परीक्षाच रहित झाल्याची बातमी कळणे

मला आणखी एक अनुभूती आली. एकदा मला ‘बोर्डा’च्या परीक्षेच्या वेळी ‘ड्युटी’ (कामकाज) लागली होती. दुसर्‍याच दिवशी माझ्या मुलीला पुष्कळ ताप आला. त्यामुळे मी परीक्षेच्या कामावर जाण्यास असमर्थ होते. मी शाळेत भ्रमणभाष केल्यावर परीक्षा अधिकार्‍याने मला सांगितले, ‘‘तुमच्याऐवजी दुसरे कुणी काम करायला सिद्ध झाले, तरच तुमची ‘ड्युटी’ रद्द करता येईल !’’ मी माझ्या मैत्रिणींना भ्रमणभाष करून विचारले; पण कोणीही काम करण्यास सिद्ध झाले नाही. त्या रात्री मी कुलदेवीचा नामजप केला. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मी वर्तमानपत्र वाचले, तर ती परीक्षाच रहित करण्यात आली होती. हा नामजपाचाच चमत्कार होता !’

१ इ. सौ. नीता कुशवाहा, ग्वाल्हेर

१ इ १. सत्संगात सांगितल्यानुसार नामजप करणे

‘सत्संगातील धर्मशास्त्र सांगणार्‍या कृती ऐकून मी त्या माझ्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हे दोन्ही नामजप करत आहे. त्यामुळे मला सकारात्मकता जाणवत आहे. मी आमचा परिवार आणि मित्रमैत्रिणी यांच्याशी याविषयी चर्चा करते.

१ इ २. विवाहानंतर २ वर्षे अनेक उपचार करूनही गर्भ न रहाणे आणि नामजप करू लागल्यानंतर गर्भधारणा होणे

माझ्या विवाहाला आता दोन वर्षे पूर्ण होतील. मला ‘थायरॉइड’ ग्रंथी आणि ‘पी.सी.ओ.डी.’ (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम – गर्भाशयातील बीजांड कोशासंबंधी) यांची समस्या आहे. मी आधुनिक वैद्यांकडे जाऊन यांवरील उपचारांसाठी पुष्कळ पैसे व्यय केले; परंतु आम्हाला संतानप्राप्ती झाली नाही. आता दत्तगुरु आणि कुलदेवी यांच्या कृपेने मी ३ मासांची गर्भवती आहे.

१ इ ३. अकस्मात् प्रकृती बिघडल्याने ‘सोनोग्राफी’ ही तपासणी केल्यावर गर्भ स्वस्थ असल्याचे दिसून येणे

सर्व काही व्यवस्थित चालू असतांनाच मागील आठवड्यात अकस्मात् माझी प्रकृती बिघडली. आधुनिक वैद्यांनी मला ‘सोनोग्राफी’ ही तपासणी करायला सांगितले. मी पूर्ण दिवस ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि इष्ट देवतेचा नामजप केला. सुदैवाने ‘सोनोग्राफी’मध्ये गर्भ एकदम स्वस्थ असल्याचे दिसून आले. ‘यापुढेही सर्व काही चांगले रहावे’, अशी मी ईश्वराला प्रार्थना करते.’

१ ई. सौ. मंदिरा हळवे, भोपाळ

१ ई १. मन सकारामक होणे

‘गेल्या  ८ मासांपासून मी नियमित सत्संग ऐकत आहे. सनातन संस्थेद्वारे दिली जाणारी माहिती उद्बोधक आहे. या सत्संगांमुळे माझ्या मनातील बर्‍याच शंका आणि संभ्रम दूर झाले आहेत. मी नामजप, पूजापाठ इत्यादी कृती विधीवत् करून आनंद अन् सकारात्मकता अनुभवत आहे, उदा. मन शांत रहाणे, समस्यांच्या निवारणाची क्षमता वाढणे, इत्यादी.’

१ उ. श्री. नीरज भालेराव, भोपाळ

१ उ १. दिवसभर उत्साही वाटणे

मी ‘ऑनलाईन’ सत्संगाची पुष्कळ प्रतीक्षा करतो. सत्संगात मला पुष्कळ नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता माझा पूजा करण्याचा उत्साह वाढला असून मला दिवसभर उत्साही वाटते.’

१ ऊ. सौ. माधवी परांजपे, जबलपूर

१ ऊ १. सत्संगामुळे स्वतःच्या स्वभावदोषांची जाणीव होणे

‘सत्संगात नामजपाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे मी नामजपाला आरंभ केला आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणि गुरूंप्रती शरणागतभाव वाढला आहे. मला माझे स्वभावदोषही लक्षात आले आहेत. आता माझ्याकडून चुका झाल्यास मी त्वरित संबंधित साधकाची क्षमा मागते.’

१ ए. सौ. अरुणा परमार, इंदूर

१ ए १. सत्संग ऐकू लागल्यापासून स्वतःत पुष्कळ पालट झाल्याचे जाणवणे

‘मी सनातन संस्थेच्या संपर्कात आहे’, हे सांगतांना मला अतिशय अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात आम्ही सर्व जण आपापल्या घरांत अडकून पडलो होतो. अशा वेळी सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ सत्संगांतून दिलेल्या सकारात्मक विचारांमुळे या गंभीर रोगाशी लढण्यासाठी आम्ही सिद्ध झालो. मी सत्संगात सहभागी होऊ लागल्यापासून माझ्यात पुष्कळ पालट झाले आहेत. आता मी कधी नकारात्मक विचार करत नाही. दुसर्‍यांना साहाय्य करण्यास मी नेहमी तत्पर असते. सत्संग ऐकतांना मला माझ्या अंतर्मनातून चांगले जाणवते.’

१ ऐ. सुश्री उषा सेन, भोपाळ

१ ऐ १. सत्संगामुळे साधनेचे प्रयत्न वाढणे

‘मी नेहमी ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकते. त्यामुळे माझे साधनेचे प्रयत्न वाढत आहेत. नामजप केल्यामुळे माझ्या मनाला पुष्कळ शांती मिळाली. मी या सत्संगाची पुष्कळ आतुरतेने वाट पहाते.

१ ओ. श्री. सुशील खनंग, जबलपूर

‘ऑनलाईन’ सत्संगामुळे मला पुष्कळ चांगले वाटले आणि माझ्या मनाला शांतीची अनुभूती आली.’

 

२. हरियाणा

२ अ. सौ. गार्गी दुरेजा, फरिदाबाद

२ अ १. आरंभी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना पुष्कळ त्रास होणे आणि नंतर चांगले वाटणे

‘सत्संगात मंत्रजपाची योग्य पद्धत सांगितल्यामुळे मला पुष्कळ चांगल्या अनुभूती आल्या. घरातील सर्वांमध्ये सकारात्मकता जाणवत आहे. आरंभी मला श्री दत्तगुरूंच्या ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाने त्रास झाला; परंतु नंतर पुष्कळ चांगले वाटले. मी माझ्या मैत्रिणींनाही नामजप करण्यास सांगितले असून त्यांनीही नामजप करायला आरंभ केला आहे.

२ अ २. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर मैत्रिणींना आलेल्या अनुभूती

अ. माझ्या एका मैत्रिणीच्या कुटुंबाचे कुणाशी तरी भांडण झाले आणि ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. तेव्हा मैत्रीण आणि तिची मुलगी दोघी नामजप करत होत्या. त्या भांडणाचा निर्णय मैत्रिणीच्या बाजूने लागला आणि ‘हे नामजपामुळेच झाले आहे’, असा तिला विश्वास वाटू लागला.

आ. माझ्या एक मैत्रिणीला रात्री झोप लागत नव्हती. नामजप करायला लागल्यापासून तिला चांगली झोप लागत आहे.’

२ आ. सौ. शोभना शर्मा, फरिदाबाद

२ आ १. कुठलेही काम करतांना ‘ईश्वराची सेवा करत आहे’, या भावाने केल्यामुळे थकवा किंवा राग न येणे

‘काही दिवसांपासून मी सनातन संस्थेचे सत्संग ऐकत आहे. नामजप ऐकल्यानंतर पूर्ण दिवसभर माझ्याकडून नामजप होत रहातो. । ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप मी सतत करते. मला सत्संगाचाही पुष्कळ लाभ होतो. माझ्या मनात आता चुकीचे विचार येत नाहीत आणि चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्नही माझ्याकडून होतात. कुठलेही काम करतांना माझ्या मनात ‘मी ईश्वराचीच सेवा करत आहे’, हा विचार असतो. त्यामुळे काम करतांना मला थकवा किंवा राग येत नाही.’

२ इ. सौ. आरती नागर, फरिदाबाद

२ इ १. नामजपामुळे मनावरील ताण आणि चिंता न्यून होणे

‘सत्संग ऐकल्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. नामजपामुळे माझी चिंता थोडी न्यून झाली असून मला आतून पुष्कळ शांत वाटू लागले आहे. काही वेळा मनावर ताण आल्यावर मी नामजप केला. तेव्हा तो ताण न्यून झाला. माझा भगवंतावरील विश्वास आता वाढला आहे. ‘भगवंत माझ्या समवेत आहे’, असे मला काही वेळा जाणवते. त्यामुळे बाहेरच्या जगाकडचे माझे लक्ष न्यून झाले आहे.’

 

३. उत्तरप्रदेश

३ अ. श्री. विपिनकुमार कौशिक, गाजियाबाद

३ अ १. सत्संगामुळे मन सकारात्मक आणि शांत होणे

‘मी एप्रिल २०२० मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. तेव्हा मीही सर्व लोकांप्रमाणे कोरोनाच्या त्रासाशी झुंजत होतो. मी ‘ऑनलाईन’ सत्संगात भाग घेतला. तेथे मिळालेल्या ज्ञानानुसार मी कृती करायला चालू केल्यावर माझ्या जीवनात पुष्कळ सकारात्मक पालट झाले. आज मी मानसिकदृष्ट्या पुष्कळ सक्षम आणि शांत झाल्याचे अनुभवत आहे.’

 ३ आ. सौ. बबीता सिंह, आग्रा

३ आ १. ‘परात्पर गुरु डॉक्टरच सत्संग घेत आहेत’, असे वाटणे

‘सत्संगामुळे आम्हाला पुष्कळ लाभ झाला आणि पुष्कळ आधार मिळू लागला. सत्संगाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच आमच्यासाठी सत्संग घेत आहेत’, असे आम्हाला वाटत होते. बाहेरची भयानक स्थिती विसरून आम्हाला सात्त्विक वातावरण अनुभवता येत होते. मुलांनाही सत्संग ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यांनाही आध्यात्मिक माहिती मिळाली.’

 

४. झारखंड

४ अ. सौ. अर्चना सिंह (अर्चना कुमारी), जमशेदपुर

४ अ १. घरातील सर्वांनी नामजप करायला आरंभ केल्यावर घरातील वातावरण चांगले होणे आणि घरच्या परिस्थितीत चांगली सुधारणा होणे

‘माझे नामजप करणे जवळजवळ बंदच झाले होते; परंतु ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे माझा नामजप पुन्हा चालू झाला आणि घरातील वातावरणही चांगले झाले. माझे यजमान आणि मुलगा यांनीही नामजप करायला आरंभ केला आहे. खरेतर दळणवळण बंदीमुळे वेतन अल्प मिळत आहे; परंतु गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कृपेने आमचे सर्व व्यवस्थित चालले आहे. आमची गुरुपौर्णिमेला काहीतरी अर्पण करण्याची इच्छा होती; म्हणून आम्ही अर्पण केले. त्यानंतर आमच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाली.

मी देवपूजा करतांना गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. तेव्हा माझ्या डोळ्यांतून आपोआप भावाश्रू येऊ लागतात. आम्हा सर्वांवर गुरुदेवांची पुष्कळ कृपा आहे. माझ्या यजमानांचे कामही चांगले चालले आहे आणि माझ्या मुलाचे शिक्षणही चांगले चालले आहे.’

 

५. राजस्थान

५ अ. नीशा लाहोटी, कोटा

‘मागील ६ मासांपासून मी या सत्संगाचा आनंद घेत आहे. या सत्संगामुळे मला वेगवेगळ्या संतांची माहिती मिळाली. मानस दर्शन करतांना मला अनेक मंदिरांचे दर्शन झाले. या मंदिरांविषयी मला आतापर्यंत काहीच ठाऊक नव्हते. हे सत्संग ऐकल्यानंतर माझ्या मनात सकारात्मकता निर्माण झाली आहे. ज्या दिवशी सत्संग ऐकायला मिळत नाही, त्या दिवशी मला खूप वेगळे आणि रितेपण जाणवते. ‘कोरोना’रूपी आपत्काळात या सत्संगांमुळे पुष्कळ आधार मिळाला आहे. सत्संग घेणार्‍या सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांच्या आवाजात तर मन मोहून घेणारी जादूच आहे.’

(वर्ष २०२०)

Leave a Comment