धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?

यंदा रक्षाबंधनाला भद्रा काळ, आहे की नाही ? राखी नेमकी कधी बांधावी ? यामागील शास्त्र काय ? चला, जाणून घेऊया !

रक्षाबंधनासाठी ‘भद्रा’ काळ वर्ज्य मानला जातो. भद्रा ही सूर्याची कन्या आणि शनिदेवांची बहीण असून तिचे अस्तित्व शुभ कार्यात अडथळे निर्माण करते, असे शास्त्र सांगते. पण यंदा भावा-बहिणींना वेळेची चिंता करण्याची गरज नाही.

‘यावर्षी २७ आणि २८.८.२०२६, असे २ दिवस ‘श्रावण पौर्णिमा’ ही तिथी आहे. त्यात ‘रक्षाबंधन कधी करावे ?’, याविषयी काही ठिकाणी संभ्रम आढळून येतात.

 

१. ‘रक्षाबंधन कधी करावे ?’, याविषयीचे संदर्भ

अ. २७.८.२०२६ या दिवशी पौर्णिमा ही तिथी सकाळी साधारण ९ नंतर चालू होते; मात्र हा भद्रा करणाचा अशुभ कालावधी असल्याने त्या वेळेत रक्षाबंधन निषिद्ध असते. त्यामुळे या दिवशी पौर्णिमा असूनही भद्रा संपेपर्यंत रक्षाबंधन करणे वर्ज्य आहे. भद्रासमाप्तीची वेळ रात्री साधारण ९.३० ही आहे.

‘निर्णयामृत’ या ग्रंथात सांगितले आहे, ‘रक्षाबंधन भद्रा असतांना कदापि करू नये. भद्रा संपल्यानंतर रात्रीही अवश्य करावे.

आ. ‘रक्षाबंधन प्रतिपदायुक्त पौर्णिमा या तिथीला करू नये’, असे ‘मदनरत्न’ या ग्रंथात ब्रह्मवैवर्तऋषि सांगतात.

श्री. अमर जोशी

 

२. सारांश

यावरून रक्षाबंधनासाठी पुढीलप्रमाणे कालावधी लक्षात येतो.

२ अ. सर्वोत्तम काळ

२७.८.२०२६ या दिवशी रात्री ९.३० नंतर

२ आ. मध्यम काळ

२८.८.२०२६ या दिवशी सूर्योदयापासून सकाळी साधारण ९.४५ पर्यंत

२ इ. गौण (नाईलाजास्तव घ्यावा लागणारा) काळ

२८.८.२०२६ या दिवशी सकाळी १० नंतर

असे असले, तरी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत काही ठिकाणी अशी सामाजिक मान्यता अथवा परंपरा आहे की, नारळी पौर्णिमेपासून दिवाळीपर्यंत कधीही राखी बांधलेली चालते. याला शास्त्रीय आधार अजून तरी मिळालेला नसला, तरी ‘आपापल्या श्रद्धेप्रमाणे आणि प्राप्त परिस्थितीनुसार सारासार विचार करून पर्याय निवडावा’, अशी वाचकांना नम्र विनंती !’

(साभार : ‘निर्णयसिंधु’)

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा, गोवा. (२३.८.२०२६)

Leave a Comment