‘दीप अमावास्ये’चे वैज्ञानिक कारण आणि त्याचे महत्त्व

Article also available in :

हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टा आणि विकृत विनोद यांचे जे सण आहेत, त्यात वटपौर्णिमेनंतर ‘दीप अमावास्या’ हा सण येतो. व्यक्तीगत पातळीवर ही अमावास्या साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे; पण ‘दीपपूजेच्या ऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये’, असे वाटते. आपण आपला धर्म, आपली संस्कृती, आपला सण यांचे का म्हणून विडंबन करायचे ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तीभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे आपण आपल्या सणांचे विडंबन टाळायला हवे.

 

गताहारी (जो आहार गेला आहे तो) अमावास्या

आपल्याकडे आषाढी अमावास्येच्या नंतर आहारात पालट केला जातो. या दिवसाला ‘गताहारी (जो आहार गेला आहे तो) अमावास्या’ असेही म्हणतात. आपल्या प्रत्येक सणांची नावे संस्कृतवर आधारित आहेत. Gutter हा इंग्रजी शब्द दीप अमावास्येला खोडसाळपणे जोडलेला आहे. ‘आपली लायकी गटारात लोळायची आहे’, असे आपल्याला हिणवले गेले आणि दुर्दैव हे आहे की, आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलो आहोत. खरेतर आपण आपल्या महान हिंदु संस्कृतीची जाणीव ठेवायला हवी. आपल्या प्रत्येक सणाला विशेष आहे. आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाही.

 

गटार (Gutter) नव्हे, गताहार !

गत म्हणजे मागील, जुने, गेलेले, आता नाही ते. आहार म्हणजे भोजन. गत+आहार = गताहार. जसे शाक + आहारी = शाकाहारी, तसे गत + आहारी = गताहारी. गत + आहारी + अमावास्या = गताहारी अमावास्या. या दिवशी दीपपूजन करतात.

 

दीप अमावास्येपासून आहारात पालट होण्यामागील वैज्ञानिक कारणे

सहस्रो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्यांच्या शरिरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र आवश्यकता आणि आपली प्रथा आपल्या पूर्वजांनी किती दूरदर्शीपणे योजली आहे, हे यातून प्रकर्षाने अधोरेखित होत आहे.

१. ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.

२. बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली, तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा सार्‍या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत आणि शासकीय पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

३. या दिवसांत बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरिराच्या आत आणि त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. मांसाहारी पदार्थ शिजवतांना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणार्‍याला त्रास होऊ शकतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास वातावरणातील ओलावा आणि हवेतील वाढलेले जंतू यांमुळे त्यांच्या कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

४. आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके आणि औषधे उपलब्ध असूनही विविध संसर्गांना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी या प्राण्यांच्या शरिरावर वाढणार्‍या जंतूंमुळे पसरतात; म्हणून या दिवसांत मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका न्यून होतो.

 

दीप अमावास्येपासून शाकाहार करण्यामागील शास्त्रीय कारणे

१. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पहायलाही मिळत नाहीत. शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.

२. तुलनेने शाकाहाराचे या दिवसांत नीट पचन होते.

३. विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या जाणार्‍या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक आपोआप शरिराला लाभतात.

४. कायम मांसाहार करणार्‍यांच्या पचनसंस्थेवर नेहमी येणारा ताण या शाकाहारी पालटांमुळे काही काळ न्यून होतो.

अशा सर्व कारणांमुळे दीप अमावास्येला धार्मिक जोड दिल्यास आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो. त्यामुळे दीप अमावास्येची कुप्रसिद्धी टाळा आणि धार्मिक वृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पाळा !

(साभार : सामाजिक संकेतस्थळ)

Leave a Comment