वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

वडाच्या झाडाच्या पूजनानंतर औक्षण करतांना सुवासिनी

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि ७ जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतिक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला. यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी ३ दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. भरतखंडामध्ये प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्यचे प्रतीकही मानले जाते.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)

‘वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने सुवासिनीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत वडाच्या झाडाचे पूजन करणार्‍या सुवासिनीच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर ‘यू.ए.एस.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. तसेच सुवासिनीने पूजलेल्या वडाच्या झाडाच्या पूजनापूर्वी (वटपौणिमेच्या आदल्या दिवशी) आणि पूजनानंतर (वटपौणिमेच्या दिवशी सुवासिनीने वडाच्या झाडाचे पूजन केल्यानंतर) केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. वडाच्या झाडाचे पूजन केल्यानंतर सुवासिनीतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे

सुवासिनीमध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ १.०६ मीटर होती. सुवासिनीने वडाच्या झाडाचे पूजन केल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.

२ अ २. वडाच्या झाडामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. पूजनानंतर वडाचे झाड आणि सुवासिनी यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे
चाचणीतील घटक घटकांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ  (मीटर)
पूजनापूर्वी  पूजनानंतर सकारात्मक ऊर्जेच्या
प्रभावळीत झालेली वाढ
१. वडाचे झाड १.४२ २.९६ १.५४
२. सुवासिनी ०.५१ १.८० १.२९

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. पूजनानंतर वडाचे झाड आणि सुवासिनी यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे
चाचणीतील घटक घटकांची एकूण प्रभावळ (मीटर)
पूजनापूर्वी पूजनानंतर एकूण प्रभावळीत झालेली  वाढ
१. वडाचे झाड १.९३ ४.३२ २.३९
२. सुवासिनी १.८० २.९४ १.१४

 

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. वडाच्या झाडामध्ये शिवतत्त्व आकृष्ट करून प्रक्षेपित करण्याची क्षमता असणे

हिंदु धर्मात वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे वृक्ष पवित्र अन् यज्ञवृक्ष असल्याचे सांगितले आहे. हे वृक्ष सात्त्विक असून त्यांच्यामध्ये विशिष्ट देवतांची तत्त्वे आकृष्ट करून ती वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता असते. वडाच्या झाडामध्ये शिवतत्त्व आकृष्ट करून प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे.

३ आ. वटपौर्णिमेला पूजनानंतर वडाच्या झाडाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होण्यामागील कारण

चाचणीतील वडाच्या झाडामध्ये पूजनापूर्वीही सकारात्मक ऊर्जा आढळली. वटपौणिमेला सुवासिनी स्त्रियांनी वडाच्या झाडाचे पूजन केल्याने झाडातील शिवतत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. त्यामुळे पूजनानंतर वडाच्या झाडाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाली.

३ इ. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे भावपूर्ण पूजन केल्याने सुवासिनीला चैतन्य मिळणे

हिंदु धर्मात विशिष्ट तिथींना आध्यात्मिक महत्त्व असून त्या दिवशी विशिष्ट व्रते करण्यास सांगितली आहेत. त्यामागे ‘व्रत करणार्‍याला आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळावा’, हा उद्देश असतो. ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी सौभाग्यवृद्धीसाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाचे भावपूर्ण पूजन करतात आणि दिवसभर व्रतस्थ रहातात. चाचणीतील सुवासिनीने वडाच्या झाडाचे भावपूर्ण पूजन केल्याने तिला चैतन्य मिळाले. त्यामुळे तिला ‘तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे आणि तिच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे,’ असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.’

– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२७.८.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment