सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची सत्य माहिती मिळत असल्याचे पाहून प्रसन्नता वाटली ! – महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज

डावीकडून पू. सिंगबाळ आणि सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना ‘श्री विश्‍व धर्मशास्त्र’ हा ग्रंथ भेट देतांना महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज अन् स्वामी दिलीप योगीराज महाराज

प्रयागराज (कुंभनगरी), २८ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन पाहिल्यावर मला पुष्कळ चांगले वाटले. सद्गुरु (डॉ.) पिंगळे हे आमचे पूर्वीचे मित्र आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. प्रदर्शनात भारतीय संस्कृतीची सत्यतापूर्वक माहिती देत असल्याचे पाहून मला मोठी प्रसन्नता वाटली आहे, असे प्रतिपादन ‘संत नामःभारत साधू समाजा’चे राष्ट्रीय संघटनमंत्री महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी येथे केले.

१. महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी जगद्गुरु विश्‍वकर्मा शंकराचार्य स्वामी दिलीप योगीराज महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ उपस्थित होते.

२. या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज यांचा, तर पू. नीलेश सिंगबाळ यांनी स्वामी दिलीप योगीराज महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान केला.

३. त्यानंतर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज आणि स्वामी दिलीप योगीराज महाराज यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे अन् पू. नीलेश सिंगबाळ यांना ‘श्री विश्‍व धर्मशास्त्र’ हा ग्रंथ भेट दिला.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले साहित्याद्वारे सनातन धर्माचा प्रचार
करत आहेत ! – जगद्गुरु विश्‍वकर्मा शंकराचार्य स्वामी दिलीप योगीराज महाराज

या वेळी जगद्गुरु विश्‍वकर्मा शंकराचार्य स्वामी दिलीप योगीराज महाराज म्हणाले, ‘‘सनातनचा अर्थ ‘कधीही नाश न होणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातन धर्माला पुढे करून भारतासह विश्‍वात ‘साहित्याविना आपण काही करू शकत नाही’, हे लक्षात आणून दिले आहे. तसेच वैदिक परंपरा काय आहे, हेसुद्धा सांगितले आहे. भारत धर्मप्रधान देश असून या देशात साहित्याला सर्वाधिक महत्त्व आहे. हे साहित्य घेऊनच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती मोठा प्रचार करत आहेत. हे साहित्य वाचून लोक त्याचा अनुभव घेतील. आपल्याला काय करायला हवे आणि आपण काय करत आहोत, याचे साहित्याच्या माध्यमातूनच मार्गदर्शन होते. यासाठी मी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना पुष्कळ शुभेच्छा देतो. भारतात आणि विश्‍वात सनातन धर्माचा ध्वज फडकला पाहिजे अन् सनातन संस्था ही साहित्याचा असाच प्रचार करत राहो.’’

भारतीय संस्कृती आणि सनातन संस्था दैन्यता अन् पलायनवाद
यांना रोखण्यास सक्षम आहेत ! – महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज

महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज या प्रसंगी म्हणाले, ‘‘गीतेत एक श्‍लोक आहे, ‘न दैन्यं न पलायनम्’ म्हणजे ‘दैन्य दाखवणार नाही आणि पलायनही करणार नाही, अशा महाभारताच्या वेळी अर्जुनाच्या दोन प्रतिज्ञा होत्या. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि सनातन संस्था दैन्यता आणि पलायनवाद यांना रोखण्यास सक्षम आहेत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment