देवीचे पूजन झाल्यावर शेवटी आरती केली जाते. आरती म्हणणार्या प्रत्येकालाच आरती कोणत्या चालीत म्हणावी, त्या वेळी कोणती वाद्ये वाजवावीत आदी शास्त्र ठाऊक असतेच, असे नव्हे. ती त्रुटी या लेखाद्वारे थोड्याफार प्रमाणात भरून काढण्यात आली आहे.
१. आरती म्हणण्याची योग्य पद्धत कोणती ?
‘देवीचे तत्त्व, म्हणजेच शक्तीतत्त्व हा तारक-मारक शक्तीचा संयोग आहे. त्यामुळे देवीच्या आरतीतील शब्द हे अल्प आघातजन्य, मध्यम वेगाने आणि आर्त चालीत, तसेच उत्कट भावात म्हणणे इष्ट ठरते.
२. आरतीच्या वेळी कोणती वाद्ये वाजवणे योग्य आहे ?
देवीतत्त्व हे शक्तीतत्त्वाचे प्रतीक असल्याने देवीची आरती करतांना शक्तीयुक्त लहरी निर्माण करणारी चर्मवाद्ये हलक्या हाताने वाजवावीत.
३. आरती करतांना देवीला एकारतीने ओवाळावे कि पंचारतीने ?
हे देवीला आरती ओवाळणार्याचा भाव आणि त्याची आध्यात्मिक पातळी यांवर अवलंबून असते.
अ. पंचारतीने ओवाळणे
पंचारती
पंचारती हे अनेकत्वाचे, म्हणजेच चंचलरूपी मायेचे प्रतीक आहे. आरती ओवाळणारा नुकताच साधनेला प्रारंभ केलेला प्राथमिक अवस्थेतील साधक (५० टक्क्यांपेक्षा अल्प आध्यात्मिक पातळी असलेला) असल्यास त्याने देवीला ओवाळतांना पंचारतीने ओवाळावे.
आ. एकारतीने ओवाळणे
एकारती
एकारती हे एकत्वाचे प्रतीक आहे. भाव असलेल्या आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाने देवीला एकारतीने ओवाळावे.
इ. आत्मज्योतीने ओवाळणे
७० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी असलेला आणि अव्यक्त भावात प्रवेश केलेला उन्नत जीव स्वतःतील आत्मज्योतीनेच देवीला अंतर्यामी न्याहाळतो. आत्मज्योतीने ओवाळणे, हे एकत्वातील स्थिरभावाचे प्रतीक आहे.
४. आरती ओवाळण्याची योग्य पद्धत कोणती ?
देवीला आरती ओवाळतांना ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने ओवाळावी.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.२.२००५)
या लेखात आरतीसंबंधाने सांगण्यात आलेले शास्त्र समजून घेऊन तशी आरती करणार्या सर्व देवीभक्तांना देवीचा कृपाशीर्वाद मिळो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !