महर्षि अरविंद यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीकार्यातील सहभाग !

महर्षि अरविंद

१. इंग्लंडमधील वास्तव्यातच इंडियन मजलीस या भारतीय विद्यार्थ्यांच्या संस्थेत महर्षि अरविंद भारताच्या राजकीय स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारविनिमयात सहभागी होत असत.

२. कमल आणि कट्यार या सशस्त्र क्रांतीच्या गुप्त संघटनेचेही ते सभासद होते.

३. त्यांनी क्रांतीकार्य करतांना देशसेवकांची संघटना उभारली.

४. सशस्त्र क्रांतीचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी उच्च लष्करी शिक्षण घेण्यास आपल्या मित्राला पाठवले.

५. प्राचार्य असतांना त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेच्या आडून शस्त्रास्त्र उद्योग चालू केला.

६. उदयपूरच्या एका सरदाराने काढलेल्या गुप्त संघटनेच्या महाराष्ट्र विभागात ते सहभागी झाले होते.

७. क्रांतीकार्य करणे सुलभ व्हावे, यासाठी त्यांनी प्राचार्यपदाचा त्याग केला.

८. समर्थ रामदास स्वामी, जोसेफ मॅझिनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरुण राष्ट्रसेवकांच्या जशा संघटना निर्माण केल्या, त्याप्रमाणे अरविंदांनी भवानी मंदिर या संघटनेचे विचार-आचार-राष्ट्रकार्य यासाठी एक संहिता निर्माण केली.

९. कोलकात्याला माणिकतोळाबाग या ठिकाणी क्रांतीकारक आणि राष्ट्रोद्धारक तरुणांचे केंद्र निर्माण झाले.

१०. सबंध भारतात अशी अनेक केंद्रे निर्माण करण्याची योजना होती; पण खुदीराम बोस या क्रांतीकारकाने घडवलेल्या स्फोटाने सगळे क्रांतीकारक पकडले गेले. त्यांच्यात अरविंद असल्यामुळे त्यांनाही अटक करून इतरांसमवेत अलीपूरच्या कारागृहात वर्षभर ठेवले होते.

११. अलीपूरच्या कारागृहात राहूनही गीता-उपनिषदांचे सखोल अध्ययन करून साधनेद्वारे वासुदेवदर्शन घेणे

६ फूट लांब आणि ४ फूट रूंद अशी अलीपूरची कोठडी होती. जवळ केवळ जाडेभरडे खरखरीत खुटे होते. जाळीच्या दारातून पाऊस, वादळ, केरकचरा कोठडीत सतत येत असे. पाण्याचे एकच भांडे, कीटक-धूळमिश्रित भात, गवत-पाने मिसळलेली भाजी, पांचट सार हेच त्यांचे जेवण होते. उन्हाळ्यात कोठडी ही भट्टी बनत असे. तशा कोठडीत त्यांनी गीता-उपनिषदांचे सखोल अध्ययन केले आणि साधनेच्या द्वारे वासुदेवदर्शन घेतले.

१२. दैवी आदेशाप्रमाणे राष्ट्रकार्य करणार असल्याचे अरविंदांनी स्पष्ट करणे

अलीपूरच्या कारागृहातून मुक्त झाल्यानंतर कोलकात्यातील उत्तरपाडा येथे १० सहस्र श्रोत्यांसमोर भाषण करतांना दैवी आदेशाप्रमाणे आपण राष्ट्रकार्य करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या आदेशाप्रमाणे कोणतीही पूर्वसिद्धता किंवा पुढील व्यवस्था नसतांना ते प्रथम चंद्रनगर येथे आणि नंतर पाँडेचरी येथे गेले. स्मशानाच्या जवळची एकच खोली, एकच दिवा अशा परिस्थितीत ते आणि त्यांचे ६ सहकारी तेथे रहात असत. केवळ चार आणे (२५ पैसे) उरले, इथपर्यंत दारिद्य्र त्यांनी सहन केले. भारताचे स्वातंत्र्य आणि उन्नती यांसाठी त्यांनी केलेल्या योगसाधनेत त्यांच्याएवढी संकटे पूर्वीच्या कोणत्याही योगीपुरुषाला आली नसतील अन् पुढेही कदाचित् येणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. १५ ऑगस्ट या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळणे, हे सत्य त्यांच्या योगसाधनेवरचा दैवी ठसा (शिक्कामोर्तब) आहे, असे त्यांनी संदेशात लिहिले. अरविंद यांच्या संपूर्ण जीवनाचा वेध न घेता विद्वान मंडळीही त्यांनी राष्ट्रकार्याचा त्याग करून योगधर्म स्वीकारला, असे आजही म्हणतात. काही सुशिक्षित लोकांना अरविंद कोण, हे ठाऊक नाही आणि काही जणांना ते हिमालयातील कोणीतरी योगी वाटतात.

 

महर्षि अरविंदांविषयी लोकमान्य टिळकांचे उद्गार !

लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे, अरविंद हे संपूर्ण त्यागी तपस्वी आहेत.. अरविंदांनी शतावधी तरुणांमध्ये सर्वस्व त्यागाची प्रेरणा निर्माण केली… अरविंद हे ज्ञानोपासना, ध्येयनिष्ठा आणि त्यागामध्ये अद्वितीय सर्वश्रेष्ठ आहेत.

लेखक : श्री. प्रभाकर पुजारी (मासिक धर्मभास्कर)

 

महर्षि अरविंद यांचा क्षात्रधर्म !

१. सूक्ष्मातील क्षात्रधर्माचा अध्याय शिकवणारे महर्षि अरविंद

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी भारतविरोधी शक्तींपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी महर्षि अरविंद  स्वत: सूक्ष्मातून युद्ध लढले. महर्षि अरविंद यांनी त्यांच्या शिष्याला या सूक्ष्मातील महायुद्धाची जाणीव करून देतांना सांगितले, काही राष्ट्रांचे इतरांविरुद्ध युद्ध किंवा भारताविरुद्धचे युद्ध या दृष्टीने तुम्ही युद्धाकडे पाहू नका. त्या संघर्षामागे उभ्या असलेल्या शक्तींशी आपल्याला लढायचे आहे. या कार्यासाठी लढणारे ईश्‍वराच्या बाजूने आणि असुरांच्या संभाव्य राजवटीच्या विरुद्ध लढा देत आहेत, असे त्यांनी प्रतिपादन केले होते.

२. महर्षि अरविंद यांनी केलेला क्षात्रधर्म

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी महर्षि अरविंद यांनी साधनेच्या बळावर क्षात्रधर्म केला. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आणि इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी यांच्या व्हायटल बॉडीचाच ताबा सूक्ष्मातील असुराने घेतला होता. हिटलरचा म्हणजेच त्याच्यातील असुराचा भारतावर ताबा मिळवण्याचाच विचार होता. त्या वेळी महर्षि अरविंद यांनी सूक्ष्मातील महायुद्ध लढून अनिष्ट शक्तीला भारताच्या विरोधातील युुद्ध करण्याचा निर्णय पालटण्यास भाग पाडले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment