चोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण

सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण करतांना संत बालयोगीजी महाराज (उजवीकडे), डावीकडे १. हिंदु जनजागृती समितीचे श्री. यशवंत चौधरी, २. श्री. अनिल पाटील

जळगाव – सनातन संस्थेचे कार्य अतिशय दैदीप्यमान असून खर्‍या अर्थाने धर्म वाचवण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे. या संस्थेला माझे सदैव आशीर्वाद आहेत, असे गौरवोद्गार येथील जय नारायण संप्रदायाचे संत बालयोगीजी महाराज यांनी काढले. सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते. संत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग – २०१८ आणि सात्त्विक आकाशकंदिल यांचे अनावरण करण्यात आले. या वेळी सनातनचे श्री. अनिल पाटील, श्री. सुधाकर चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. यशवंत चौधरी, दोडेगुजर संस्थानचे विश्‍वस्थ श्री. प्रवीण पाटील, नगरसेवक प्रकाश पाटील, जय नारायण संप्रदायाचे गोपाल पाटील, नंदकिशोर पाटील, आर्.आर्. पाटील यांच्यासह भक्त परिवार उपस्थित होता.

संत बालयोगीजी महाराज म्हणाले,

१. हिंदु धर्मातील देवतांची म.फी. हुसेन यांनी अश्‍लील चित्रे काढली, तरीही हिंदू पेटून उठत नाहीत.

२. एक वेळ मंदिरात गेले नाही, तरी चालेल; पण राष्ट्र आणि धर्म कार्य करणे आज आवश्यक आहे.

३. हिंदु धर्मीय संघटित व्हावेत, या प्रामाणिक इच्छेतून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती कार्य करत आहे. या कार्यात सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. मीही सनातनचा पुरस्कर्ता असून अनेक कार्यक्रमातून सनातनचा उल्लेख करतो.

संत बालयोगीजी महाराज आणि सनातन संस्था

संत बालयोगीजी महाराज यांनी वर्ष २००३ मध्ये १००८ कुंडी यज्ञाचे आयोजन केले होते. त्या वेळी त्यांनी सनातनच्या साधकांचे कौतुक केले होते, तसेच ‘योग्य पद्धतीने सेवा कशी करावी, हे सनातनच्या साधकांकडून शिकावे’, असे त्यांच्या भक्तांना सांगितले. १००८ कुंडी यज्ञामुळे जळगाव जिल्ह्यात पुष्कळ पाऊस पडला होता. आजपर्यंत तसा पाऊस झालेला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment