श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

 

१. श्री गणेशचतुर्थीचे व्रत कुटुंबात कोणी करावे ?

श्री गणेशचतुर्थीचे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी.

 

२. प्रतिवर्षी वेगवेगळ्या भावाच्या घरी गणपती बसवणे योग्य आहे का ?

द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती विभक्त असेल, तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे गणपति बसवणे योग्य आहे, असे शास्त्रात सांगितले आहे; मात्र काही कुटुंबांत कुलाचाराप्रमाणे किंवा पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे. अशा ठिकाणी गणपति प्रतिवर्षी वेगवेगळ्या भावाच्या घरी बसवतात, असे आढळते. हे योग्य कि अयोग्य ?

(परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले : कुलाचाराप्रमाणे किंवा पूर्वापार चालत आलेली एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा मोडायची नसेल, तर ज्या भावामध्ये गणपतीविषयी अधिक भक्तीभाव असेल, त्याच्याच घरी गणपति बसवणे योग्य आहे.

 

३. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ?

पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे –

श्री गणेशचतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात सर्वाधिक शक्ती येईल. अधिक शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात; म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज आणि तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी जास्त वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्तीला शक्य नसते.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ गणपति)

 

४. श्री गणपति बसवला जात नसणार्‍या घराच्या बंद दारासमोर श्री
गणेशचतुर्थीच्या आदल्या रात्री अन्य कुणी श्री गणेशमूर्ती आणून ठेवल्यास काय करावे ?

काही ठिकाणी गावात कुणी नवीन वास्तू बांधल्यास किंवा कुणाच्या घरी श्री गणपति बसवला जात नसल्यास अशांच्या बंद दारासमोर त्यांच्या नकळत अन्य अज्ञात लोक श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या रात्री श्री गणेशमूर्ती आणून ठेवतात. अशा वेळी त्या घरातील व्यक्तींनी काय करावे ?

उत्तर : या गणेशमूर्तीचे पूजन करावेसे वाटले, तर करावे, नाहीतर त्या मूर्तीचे विसर्जन करावे.

 

५. पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

उत्तर : ‘शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे, त्या त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे.

अ. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी एखाद्याचे सांवत्सरिक श्राद्ध असल्यास ते त्याच दिवशी करावे. श्राद्धाच्या स्वयंपाकातीलच नैवेद्य श्री गणपतीला दाखवावा.

आ. सर्वसाधारणपणे सूर्य वृश्‍चिक राशीत असेपर्यंत महालय श्राद्धाचा काळ सांगितला आहे. पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत. सांप्रत मृत व्यक्तीच्या (मृत्यू झालेल्या) तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. ज्यांच्या घरी २१ दिवसांचा गणपति पूजला जातो, त्यांच्या घरी श्री गणपति असेपर्यंत जर श्राद्ध तिथी येत असेल, तरीही त्यांनी त्याच तिथीला महालय श्राद्ध करावे. जननाशौच किंवा मरणाशौच (सुवेर-सूतक) किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास ते सर्वपित्री अमावास्येला करावे. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावास्या आणि व्यतीपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करता येते.

इ. श्राद्धाच्या दिवशी इतर विधी, उदा. श्री गणेशयाग, लघुरुद्र इत्यादी अनुष्ठाने करू नयेत.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति – खंड १’)

1 thought on “श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे”

Leave a Comment