‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कु. कुशावर्ता आणि संध्या माळी यांनी कलेविषयीचे शिक्षण घेतले आहे. साधनेत आल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाची जाणीव झाली. त्यांना सात्त्विक रांगोळ्या सुचण्याची प्रक्रिया, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याविषयी केलेले मार्गदर्शन आणि ‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकांची केलेली जडणघडण यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

नित्य धार्मिक रूढी म्हणून काढण्याच्या रांगोळ्यांसंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी केलेले हे संशोधन नाविन्यपूर्ण आहे. रांगोळीसह मेंदीच्या कलाकृतींतूनही देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित होईल, अशा विविध कलाकृती साधकांनी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध केल्या आहेत. या सर्व कलाकृती सनातनचा लघुग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’, मोठा ग्रंथ सात्त्विक रांगोळ्या (भाग १)’, ‘सात्त्विक मेंदी’ आणि ‘मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे प्रकार’ यांद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

देवतांचे तत्त्व आकृष्ट करणार्‍या मेंदीच्या सात्त्विक कलाकृती, हे कलाक्षेत्रातील नवे योगदान !

संध्या माळी

कु. कुशावर्ता माळी

१. सात्त्विक रांगोळ्या सुचण्याची प्रक्रिया

१ अ. वर्ष २००६ मध्ये ‘स्वतः काढलेल्या
रांगोळ्यांचे पुस्तक काढूया’, असा विचार मनात येणे

‘वर्ष २००६ पर्यंत मी प्रसारात सेवा करत होते. तेव्हा आमच्या घराच्या अंगणात मी ज्या रांगोळ्या काढायचे, त्या वहीत उतरवून ‘रांगोळ्या आणि मेंदी यांचे पुस्तक काढूया’, असा विचार मनात येत होता; कारण ‘समाजात काढल्या जाणार्‍या रांगोळ्यांच्या तुलनेत मला सुचणार्‍या रांगोळ्या पुष्कळ चांगल्या आहेत’, असे मला तीव्रतेने जाणवले. बाजारात रांगोळीच्या इतर पुस्तकांच्या तुलनेत माझे पुस्तक सर्वांत अधिक विकले जाईल’, असे मला निश्‍चितच वाटत होते. (साधनेत आल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे रांगोळ्या चांगल्या सुचतात आणि ‘पुस्तक काढण्याचे आणि ‘ते पुस्तक सर्वाधिक विक्री होईल’, हे सर्व विचार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने येत होते’, हे मला लिखाण करतांना लक्षात आले.)

१ आ. ‘कोणत्या रांगोळीत कोणते तत्त्व आहे ?’,याचा
अभ्यास केल्यावर देवाने त्याविषयी सुचवणे आणि त्या-त्या रांगोळीखाली सूक्ष्म स्तरावर जाणवलेले देवतेचे तत्त्व लिहून योग्य-अयोग्य कळण्यासाठी ती वही गोव्याला पाठवणे

वर्ष २००६ मध्ये आमच्या अंगणात काढलेल्या रांगोळ्या काही वेळा चांगल्या वाटायच्या, तर काही वेळा ‘त्यांच्याकडे बघू नये’, असे वाटून त्या पुसून टाकाव्याशा वाटत. अभ्यास करण्यासाठी अशा २० ते २५ रांगोळ्या मी वहीत काढून ठेवल्या. त्यानंतर लक्षात आले, ‘काही रांगोळ्या त्रासदायक वाटतात, तर काही रांगोळ्यांमध्ये देवतांचे तत्त्व जाणवते. (‘हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले लक्षात आणून देत होते’, हे लिखाण करतांना लक्षात आले.) त्या वेळी गोवा येथील आश्रमातून घरी आल्यावर कुशावर्ताताईने मला सांगितले, ‘‘कोणत्या रांगोळीत कोणते तत्त्व आहे ? कोणती रांगोळी कोणत्या देवासमोर काढायची ?’, असा विचार कर.’’ त्यानंतर देवाने ‘कोणत्या रांगोळीत कोणते तत्त्व आहे ?’, याची माझ्या मनाला जाणीव करून दिली. त्या त्या रांगोळीखाली सूक्ष्म स्तरावर जाणवलेले देवतेचे तत्त्व लिहिले आणि ते योग्य-अयोग्य कळण्यासाठी ती वही कुशावर्ताताईसमवेत गोव्याच्या आश्रमात पाठवली.

१ इ. साधनेत आल्यानंतर एक रांगोळी सुचणे आणि
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ती लक्ष्मीतत्त्वाची रांगोळी असल्याचे सांगणे

साधारण वर्ष २००० मध्ये शिक्षण घेत असतांना मी साधनेत आले. त्याच मासात (महिन्यात) मला एक रांगोळी सुचली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पहाण्यात आल्यावर ती लक्ष्मीतत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

१ ई. सात्त्विक रांगोळीच्या संदर्भात
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लाभलेले अमूल्य मार्गदर्शन !

देवतांचे तत्त्व असलेल्या काही रांगोळ्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवल्यावर त्यांनी काही रांगोळ्यांत पालट सांगितले. रांगोळीत देवतांचे तत्त्व येण्यासाठी आणि ते वाढवण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले मार्गदर्शन करून रांगोळीचे पुढचे-पुढचे टप्पे शिकवत. यांत काही रांगोळ्या सगुण, तर काही निर्गुण स्तरावरच्या आहेत. वर्ष २००७ मध्ये ‘सात्त्विक रांगोळ्यांचा ग्रंथ करूया. त्यामुळे ‘सात्त्विक रांगोळ्या’ असा शब्द लोकांना ठाऊक होईल’, असे त्यांनी सांगितले. सगुणापेक्षा निर्गुणात अधिक आनंद असतो; म्हणून नंतर त्यातील सर्वच आकार निर्गुण होण्यासाठी ते मार्गदर्शन करत. ‘पुढील १५ वर्षे आणि त्याहून अधिक काळ हे संशोधन चालू राहील. यात प्रत्येक देवतेच्या सगुण आणि निर्गुण रूपांच्या, संप्रदायांनुसार आणि संतांच्या रांगोळ्या असतील’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे.

१ उ. सात्त्विक रांगोळीच्या संदर्भात
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लाभलेले अमूल्य मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सनातनचा सात्त्विक रांगोळ्यांचा ग्रंथ करूया’, असे सांगितले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर ‘सात्त्विक मेंदीचा ग्रंथ करूया’ आणि त्यानंतर ‘सात्त्विक रांगोळ्यांचा मोठा ग्रंथ करूया’, असे त्यांनी सांगितले होते. त्या वेळी मला दिवसभर सलग मेंदीच्या नक्षी, रांगोळ्या सुचायच्या आणि ‘आता नक्षी पुष्कळ झाल्या आहेत, आता काढू नको’, असा त्यांचा निरोप मिळाल्यावर त्याच क्षणी सुचणे बंद व्हायचे.

१ ऊ. रांगोळी सुचण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले
यांनी विचारल्यावर त्यामागील प्रक्रिया लक्षात येऊन कृतज्ञता वाटणे

रांगोळी काढण्याच्या ठिपक्यांचे ३ प्रकार आहेत. ‘किती ठिपक्यांची आणि कोणत्या प्रकारची रांगोळी काढायची आहे, हे तुला कसे कळते ?’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला एकदा विचारले. तेव्हा मी म्हणाले, ‘‘देव सुचवत आहे’, अशी मनाला एक वेगळी संवेदना येते. काही वेळा रांगोळीचे विविध आकार दिसायला लागतात. ते विचार मनात येत असतांनाच मी रांगोळीच्या ठिपक्यांच्या तीन प्रकारांपैकी कोणताही एक ठिपक्यांचा कागद घेऊन रांगोळी पूर्ण करते. त्यानंतर लक्षात येते, ‘रांगोळीतील सर्व आकार ठिपक्यांत बसले आहेत.’’ ‘देवाकडून रांगोळी सुचण्याची प्रक्रिया होत असतांना माझ्याकडून बुद्धीचा वापर न होता अशी कृती होते’, याची मला जाणीव नव्हती. प्रश्‍न विचारल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच सर्व करवून घेत आहेत आणि ते सर्वज्ञ आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.’

२. ‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथाच्या सेवेच्या माध्यमातून
अशी केली परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकांची जडणघडण !

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘तुझी रांगोळी निवडली;
म्हणून आनंद झाला का ?’, असे विचारल्यावर त्या वेळी अशा विचारांकडे लक्ष नसल्याचे जाणवणे

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘तुझी रांगोळी निवडली; म्हणून आनंद झाला का ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘नाही.’’ त्या वेळी ‘कोणती रांगोळी निवडली ?’, याकडे माझे लक्ष नव्हते. हा प्रश्‍न त्यांनी मला दुसर्‍यांदा विचारला होता. तेव्हा चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले की, ‘कुणाची रांगोळी निवडणार ?’, असा विचार माझ्या मनात आला नाही. अशा विचारांकडे माझे लक्ष नसल्याचे माझ्या लक्षात आले.

२ आ. सेवा करत राहिल्याने विचारांचे प्रमाण अल्प
होऊन आनंद मिळत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

एकदा परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्याशी माझा पुढीलप्रमाणे संवाद झाला.

परात्पर गुुरु डॉ. आठवले : तू पूर्वीपेक्षा आनंदी दिसतेस.
मी : विचार अल्प झाले. आध्यात्मिक त्रासही अल्प झाला.
परात्पर गुुरु डॉ. आठवले : ‘रांगोळी’ ग्रंथ पूर्ण झाल्याने नाही, तर सेवा करत राहिल्याने तुझे विचार पुष्कळ अल्प झाले. सेवा करत रहाण्यात आनंद आहे. अशीच आयुष्यभर सेवा करत रहा.

२ इ. ‘रांगोळी’ ग्रंथाच्या संदर्भातील सर्व गोष्टी देवाच्याच
इच्छेने होणार आहेत’, हे लक्षात आल्यावर ध्यानी,मनी आणि स्वप्नीही देवाला
आवडेल, अशा रांगोळ्या काढणे आणि त्या माध्यमातून देवाशी अनुसंधान चालू असल्याचे जाणवणे

‘रांगोळी’ ग्रंथ पूर्ण होणे, न होणे, तो कधी होणार ? कसा असणार ?’, याविषयी माझे सगळेच अंदाज आणि कल्पना बाजूला रहायच्या. परात्पर गुुरु डॉ. आठवले नवीन सूत्रे सांगत. त्यामुळे ‘हे सगळेच देवाच्याच हातात आहे आणि देवाच्याच इच्छेने होणार’, असा विचार होऊ लागला. त्यामुळे ध्यानी, मनी आणि स्वप्नीही देवाला आवडेल अशा रांगोळ्या काढणे चालू असायचे, उदा. गणेशाची रांगोळी बनवणे काही दिवस चालू होती. तेव्हा गणेशाचे अस्तित्व अंतर्बाह्य जाणवायचे. झोपेतही ‘त्या-त्या देवतेशी बोलत आहोत, तसेच ‘रांगोळीत काय पालट आणि सुधारणा करायच्या ? अजून चांगले कसे करता येईल ?’, यासंदर्भात सहसाधिका आणि परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलत आहोत’, असे जाणवायचे. ‘रात्री मधूनच जाग आल्यावर आणि सकाळी उठल्यावर आम्ही नवीन रांगोळ्यांचा विचार करत असायचो.’ मग लक्षात यायचे की, मी हे सर्व स्वप्नात अनुभवत आहे. असे अनुसंधानही त्यांच्या कृपेने होत होते.

२ ई. ईश्‍वरेच्छेने वागता येणे

कलेची सेवा करणार्‍या सहसाधिकांना आणि दायित्व साधिकांना योग्य वाटतील ते निर्णय स्वीकारण्यास मनाची सिद्धता आपोआप होत होती. असेच इतर विचारांविषयीही स्वेच्छा सोडून परेच्छा स्वीकारण्यास परात्पर गुरु डॉ. आठवले मला आतून सिद्ध करत होते. याविषयी ते म्हणाले, ‘‘तू स्वेच्छेतून परेच्छेत आणि परेच्छेतून ईश्‍वरेच्छेत गेली आहेस.’’

२ उ. परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी मनोलय,बुद्धीलय आणि अहंलय करवून घेणे

आता मला ‘देवाविना काही नको’, असे वाटते. मन सर्वकाही स्वीकारण्यास सिद्ध होते. बुद्धीच्या तर्क-वितर्कांपेक्षा ‘सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, यातच मी गुंग होते. अहं उफाळून न येता तो देवाला शरण गेला होता; कारण जी रांगोळी मला किंवा कलेतील जाणकार साधिकांना चांगली वाटत असे, ती परात्पर गुुरु डॉ. आठवले ‘योग्य नाही’, ‘नको घेऊया’, असे त्या वेळी सांगायचे. त्यामुळे मनोलय, बुद्धीलय आणि अहंलय होत होता. साधनेतील महत्त्वाचे टप्पे परात्पर गुुरु डॉ. आठवले अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि रांगोळीच्या सुंदर माध्यमातून करवून घेत होते.’

– कु. कुशावर्ता माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ ऊ. साधनेत येण्यापूर्वी लोकेषणा असणे; पण साधनेत आल्यानंतर
कला हे ईश्‍वरप्राप्तीचे साधन असल्याचे लक्षात आल्यावर लोकेषणा न्यून होणे

या आधी आम्ही शिक्षण घेत असतांना एखाद्या स्पर्धेमध्ये ‘मला पारितोषिक मिळावे’, असे वाटायचे. कलेचे शिक्षण घेत असतांना आणि त्यानंतर एखादे चित्रकला प्रदर्शन, सामाजिक उपक्रमातील भित्तीपत्रक कल्पना (poster project) यांमध्येे ‘माझ्या कलाकृतीची निवड व्हावी, पारितोषिक मिळावे, कौतुक व्हावे’, असे प्रत्येक कलाकाराला वाटते, तसे माझे विचार असायचे. काही सेवा करतांना माझ्या मनात ‘माझी सेवा इतरांपेक्षा चांगली आहे’, असे विचार यायचे. सेवेच्या फळाची अपेक्षा असायची.

‘कलेचा उद्देश ‘कलेसाठी कला, लोकेषणा अथवा पैसे मिळवण्यासाठी कला’, असा नाही. एखाद्या जिवाला एखादी कला ‘ईश्‍वरप्राप्तीचे (आनंदप्राप्तीचे) साधन’ या उद्देशानेच ईश्‍वरानेच दिलेली असते, तसेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ हा आध्यात्मिक सिद्धांत आहे’, हे सनातनमध्ये आल्यावर कळाले.

२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करवून घेणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव करून देऊन ते घालवण्यास सांगितले. त्यांनी मला सहसाधिकेतील समष्टी गुण शिकून घेण्यास सांगितले होते.

२ ऐ. ‘कार्यापेक्षा साधना होणे महत्त्वाचे आहे’, हे मनावर बिंबवणे

‘रांगोळी’ ग्रंथ झाला नाही, तरी चालेल; पण तुमची साधना झाली पाहिजे’, असे ते सांगायचे. ‘यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कार्यापेक्षा साधकांची साधना होणे महत्त्वाचे आहे, त्यालाच ते महत्त्व देतात’, हे लक्षात आले. त्यासाठी ते साधकांना प्रयत्न करायला सांगायचे. त्यांचा पाठपुरावा घ्यायचे. त्यातील अडचणींवर उपाय सांगायचे आणि ‘त्यांनुसार कृती होत आहेत ना ?’, याचीही ते विचारणा करायचे. त्यामुळे साधना करायला प्रेरणा मिळत असे, तसेच ‘कार्यापेक्षा साधनेला महत्त्व आहे’, याची जाणीव टिकून रहाण्यास साहाय्य होत असे.

२ ओ. रांगोळी काढण्याची सेवा करतांना असा होत होता अहं लय !

देव नवीन सुचवत असलेल्या रांगोळ्या मी कागदावर अथवा संगणकावर काढल्यावर त्या परात्पर गुरु डॉ. आठवले पहायचे. त्यात सुधारणा सांगितल्यावर रांगोळीच्या सेवेत असलेल्या इतर साधिका अथवा मी त्या संगणकावर सिद्ध करून त्यात सांगितलेल्या सुधारणा करायचे. त्यानंतर ती रांगोळी अंतिम व्हायची. या सेवेत एक रांगोळी अंतिम होईपर्यंत ती साधारण २० ते २५ पद्धतींनी काढली जायची. रांगोळीच्या सेवेत असलेल्या सहसाधिकाही काही पालट सुचवायच्या. त्यामुळे ‘एकाच साधिकेने रांगोळीतील सर्व टप्पे पूर्ण करून ती अंतिम केली’, असे होत नसे. त्यामुळे ‘मला रांगोळी सुचली आणि मी ती पूर्ण केली आहे’, असा विचार करायला आमच्यापैकी कुणालाही वाव रहात नसे. सहसाधिकांनी रांगोळीत काही पालट सांगितल्यावर इतर साधिका त्यावर चर्चा करायच्या किंवा तशा प्रकारे रांगोळी काढून बघायच्या. त्यातील चांगले आकार घेऊन अन्य पालट करून ती एका टप्प्याला पूर्ण करायच्या.’

साधना करवून घेतांना परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी देवतांसाठी रांगोळ्या काढणे, ही आमच्या प्रकृतीशी निगडित सेवा दिली. यांतून परात्पर गुुरु डॉ. आठवले यांनी आमची कला आणि ईश्‍वर यांना जोेडले. रांगोळी ग्रंथाची सेवा करता करता लोकेषणा न्यून झाली होती. या कालावधीत ते आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन ही प्रक्रियाही सहजपणे करवून घेत होते. ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे त्यांनी आम्हाला कधी आणि कसे नेऊन ठेवले’, हे आम्हाला कळले नाही; कारण आम्हाला केवळ आनंदच मिळत होता.

– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment