तिसर्‍या महायुद्धात होणारी हानी आणि त्यापासून वाचण्यासाठी करावयाची सिद्धता

कु. मधुरा भोसले
कु. मधुरा भोसले

सध्याची जागतिक परिस्थिती आणि देशादेशांतील संबंधांचा अभ्यास करून राजकीय विश्‍लेषक आणि तज्ञ मंडळींनी ‘तिसरे महायुद्ध’ होण्याची भीती व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर महायुद्ध झाल्यास त्याने होणारी संभावित हानी आणि त्यांपासून वाचण्यासाठी करावयाची सिद्धता यांचा वेध घेणारा हा लेख !

 

 

१. मुसलमान राष्ट्रांमध्ये उद्भवलेल्या
लढाईचे रूपांतर तिसर्‍या महायुद्धात होणार असणे

     ‘मुसलमान राष्ट्रांमध्ये उद्भवलेल्या लढाईचे रूपांतर तिसर्‍या महायुद्धात होऊ शकते. मुसलमान राष्ट्रांच्या दोन गटांमध्ये चालू झालेल्या लढाईत विविध मित्र राष्ट्रांचा सहभाग वाढत जाऊन संपूर्ण जगातील राष्ट्रांचे ‘मित्र आणि शत्रू’ अशा दोन स्तरांवर विभागणी होऊन लढाईला महायुद्धाचे स्वरूप प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कोणतेही राष्ट्र तिसर्‍या महायुद्धाच्या परिणामांपासून अलिप्त राहू शकणार नाही. तिसरे महायुद्ध झाल्यास त्याची झळ संपूर्ण जगाला पोचणार आहे.

 

२. तिसर्‍या महायुद्धात होणार्‍या हानीचे स्वरूप

      आधीच्या दोन महायुद्धांपेक्षा तिसर्‍या महायुद्धातील भीषणता सर्वाधिक असल्याने या युद्धामुळे संपूर्ण जगताची अपरिमित हानी होणार आहे. यांत वित्तहानीसमवेत जीवित हानी पुष्कळ प्रमाणात होऊन जगातील ५० टक्के लोकसंख्या नष्ट होण्याची शक्यता आहे.

 अ. खेडेगावांपेक्षा शहरांना अधिक झळ पोचणे

 तिसर्‍या महायुद्धात वापरण्यात येणारी क्षेपणास्त्रे आणि परमाणू बॉम्ब यांमुळे खेडेगावांपेक्षा शहरांना अधिक प्रमाणात लक्ष्य केले जाणार आहे. दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणूबॉम्ब पडल्यामुळे झालेल्या हानीच्या ३०० पट हानी परमाणू बॉम्ब आणि अत्याधुनिक रासायनिक बॉम्ब यांच्या अतीवापरामुळे होणार आहे. त्यामुळे जगभरातील शहरांमध्ये रहाणार्‍या कोट्यवधी लोकांचे प्राण काही क्षणांत जातील आणि तेथे वित्त, तसेच जीवित हानी पुष्कळ प्रमाणात होईल. मुंबई, देहली, कोलकता, चेन्नई यांसारख्या शहरांना लक्ष्य करण्यात येण्याची शक्यता आहे.

उपाय : शहरापासून जवळ असणार्‍या सात्त्विक गावी जाऊन रहाण्याची सिद्धता करणे

मुंबई, देहली, कोलकता, चेन्नई येथे रहाणार्‍या व्यक्तींनी आतापासूनच शहरापासून दूर वास्तव्य करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे. शहरापासून जवळ असणार्‍या सात्त्विक तालुक्यात राहू शकतो. रहाण्याची व्यवस्था आधीच केली असेल, तर महायुद्धाला आरंभ होताच व्यक्तीनी शहरे सोडून आजूबाजूच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावी आश्रय घेऊन स्वत:च्या प्राणांचे रक्षण करावे. रज-तम प्रधान तालुका किंवा खेडेगाव यांपेक्षा सात्त्विक गावाचे रक्षण होणार आहे. त्यामुळे आश्रय निवडतांना सात्त्विकतेचा निकष लावून पहावा. ज्या गावात संतांची समाधी, जागृत देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र असेल, अशा ठिकाणी वास्तव्य केल्यास रक्षणाची शक्यता अधिक असेल.

 

आ. मोठमोठे कारखाने आणि इंडस्ट्रीयल प्लांट
या ठिकाणी सिद्ध होणार्‍या ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होणे

मोठमोठे कारखाने आणि इंडस्ट्रीयल प्लांट यांना लक्ष्य केल्यामुळे तेथे काम करणार्‍या सहस्रो कामगारांचे प्राण क्षणात जाण्याची शक्यता आहे; परंतु त्याचसमवेत तेथे सिद्ध होणार्‍या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट होऊन त्यामुळे अधिक हानी होऊ शकते. भोपाळ गॅस दुर्घटनेसारख्या दुर्घटना होऊ शकतात.

 

उपाय

अ. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये ज्वलनशील पदार्थांचा अत्यंत अल्प साठा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे प्रयोजन करावे.

आ. बंकरमध्ये (भूमीखाली) आश्रय घेतलेल्या लोकांच्या प्राणांचे रक्षण काही प्रमाणात होणार असल्याने तेथे काम करणार्‍या कामगारांना भुयारी मार्गाने त्वरित बंकरमध्ये आश्रय घेण्याची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

इ. ‘उपचार उशिरा मिळाल्यामुळेही प्राण दगावण्याची संभावना अधिक असल्यामुळे ‘अपघात घडल्यावर कोणते उपचार कुठे आणि कुणी करायचे ?’, याचेही परिपूर्ण नियोजन आधीच करून ठेवणे आवश्यक आहे.

 

 इ. ‘क्ष’ किरणांप्रमाणे होणार्‍या लहरींच्या
प्रक्षेपणामुळे शरिरावर विपरीत परिणाम होणे

उपाय 

अ. ‘क्ष’ किरणांच्या प्रक्षेपणापासून अधिकाधिक व्यक्तींचे संरक्षण होण्यासाठी कोणती उपायोजना काढता येईल ?’, याचा विचार आतापासूनच करायला हवा.

आ. घातक किरणांच्या प्रक्षेपणाच्या त्रासावर कोणते औषधोपचार करायचे ?, याची सिद्धताही आतापासूनच करायला हवी.

 

३. घ्यावयाची काळजी आणि करावयाची उपाययोजना 

अ. पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध करणे : पिण्याच्या पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा लागेल. यासाठी सीलबंद बाटल्यांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याचा साठा करून ठेवायला हवा.

 

आ. भूक भागवण्यासाठी कोरड्या खाऊचा साठा पुरेशा प्रमाणात करून सीलबंद पाकिटांमध्ये घालून ठेवावा लागेल.

 

इ. प्रत्येक व्यक्तीने प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घ्यायला हवे ! : प्रथमोपचाराचे प्रशिक्षण प्रत्येक व्यक्तीला आले पाहिजे; कारण ‘महायुद्धात कोण घायाळ होणार आणि कोण वाचणार ?’, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे अल्प घायाळ असणार्‍यांना अधिक घायाळ असणार्‍यांवर उपचार करता यावेत, यासाठी सर्वांनाच आधीपासूनच प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.

 

ई. अग्नीशमन प्रशिक्षणही घेणे आवश्यक ! : ज्वलनशील पदार्थांचा स्फोट, तसेच अकस्मात् आग पेटून अपघात होणे, यांसारखे प्रसंग अधिक प्रमाणात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्नीशमन प्रशिक्षणही घ्यायला हवे आणि त्याचा सराव आतापासूनच चालू करायला हवा.

 

उ. औषधांचा साठा करून ठेवणे : बरेच दिवस न खराब होता टिकून रहातील, अशा नित्योपयोगी आणि सामान्य लक्षणांसाठी लागणार्‍या औषधांचा साठा करून ठेवावा लागेल. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तीन मुख्य प्रकारांची औषधे उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांचे विविध आजारांनुसार वर्गीकरण करून त्यांचा साठा करण्यास प्रारंभ करायला हवा.

 

ऊ. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी सरपण गोळा करून ठेवणे : चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सरपण गोळा करून ठेवू शकतो आणि धातूपेक्षा मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचा सराव आतापासूनच करू शकतो. सौरऊर्जेच्या उपकरणांचा काही ठिकाणी वापर करता येईल. यासाठी ‘सौर उपकरणांची उपलब्धता सर्वत्र होऊन त्यावर स्वयंपाक कसा सिद्ध करता येईल ?’, हे पहावे.

 

३ ए. बराच वेळ अन्न आणि पाणी यांविना रहाता येण्यासाठी हठयोगाद्वारे इंद्रियनिग्रह, तसेच प्राणायामादी उपायांचा सराव आतापासूनच करू शकतो.

 

४. करावयाची सिद्धता 

अ. शारीरिक सिद्धता

आपत्काळात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी, तसेच इतरांना साहाय्य करण्यासाठी धावपळ करावी लागेल. यासाठी निरोगी आणि सक्षम शरिराची नितांत आवश्यकता भासेल. त्यामुळे प्राथमिक व्यायामप्रकार, सूर्यनमस्कारादी योगासने आणि प्राणायाम यांचे नियमित वर्ग आतापासून चालू करून आरोग्य सुदृढ करू शकतो. प्रथमोपचार आणि अग्नीशमन प्रशिक्षण प्रत्येकाने घ्यायला हवे, तसेच विविध प्रकारची वाहने चालवण्याचे परवाने काढून वाहने चालवण्याचा सरावही करू शकतो.

 

आ. मानसिक सिद्धता

महायुद्धात सर्वत्र रक्तपात होऊन अनेक विध्वंसक दृश्य पहावयास लागतील. अनेकांना रक्तपात पहाण्याची सवय नसल्याने पाहिल्यावर घेरी येते, तसेच विध्वंसक दृश्य पाहून रक्तदाब वाढणे, भीती वाटून हृदयविकाराचा झटका येणे, यांसारखे त्रास होतात. ‘येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी तूच आम्हाला बळ दे’, अशी शिवशंकराला प्रार्थना करून भयानक प्रसंगाला सामोरे जात असल्याचा प्रसंगाचा सराव आतापासून केला, तर मन खंबीर होऊ शकेल. अर्धवट जळलेले शरीर, अपघाती मृत्यू आणि शत्रूने केलेल्या आक्रमणात ठार झालेली माणसे, यांचे सामूहिक अंत्यसंस्कार आपल्याला करावे लागतील. त्याची सिद्धता आतापासूनच करायला हवी.

 

इ. आध्यात्मिक सिद्धता

षट्चक्रांवर देवतांची सात्त्विक चित्रे लावणे, अत्तर आणि कापूर यांनी आवरण काढणे अन् संरक्षक कवच निर्माण करणे, देवीकवच आणि रामरक्षा यांचे सकाळ-सायंकाळ नियमितपणे पठण करणे, युद्ध चालू झाल्यावर महामृत्युंजय मंत्राचा जप करणे, भावपूर्ण नामजप अन् प्रार्थना करणे, तसेच भाववृद्धीचे प्रयत्न सतत करत रहाणे आदी आध्यात्मिक उपाय काटेकोरपणे केल्यास येणार्‍या घोर आपत्काळात देव आपले संरक्षण करील. काळानुसार बारीक-सारीक चुका आणि अल्प तीव्रतेचे स्वभावदोष यांकडे लक्ष न देता प्रमुख स्वभावदोषांचे निर्मूलन करणे अन् ढोबळ, तसेच गंभीर चुका टाळून प्रामुख्याने गुणसंवर्धन करणे, यांवर अधिक भर द्यायला हवा.’

 

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१६)