भोजन बनवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम अथवा हिंडालियम यांची भांडी वापरू नका !

१. शरिराला हानीकारक असलेले अ‍ॅल्युमिनियम

पूर्वी भारतामध्ये मातीच्या किंवा पितळ्याच्या कल्हई केलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याची परंपरा होती. स्व. राजीव दीक्षित वेळोवेळी सांगत असत की, इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. अ‍ॅल्युमिनियम किंवा हिंडालियम (अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेला एक मिश्रधातू) यांच्यापासून बनवलेली भांडी आरोग्याला हानीकारक आहेत. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. अन्नाद्वारे धातूंचा अंश शरिरात जाऊन विविध आजार बळावणे

अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यांवर स्टीलचा साधा चमचा जरी जोरात ओढला, तरी या धातूचे कण बाहेर पडतात. या भांड्यांत बनवलेले अन्न खाल्ल्यास धातूंचा अंश जेवणातून शरिरात जातो. प्रतिदिन अन्नातून साधारणतः ५ मिलिग्रॅमएवढे अ‍ॅल्युमिनीयम सेवन केले जाते.

आ. आम्लीय पदार्थांमुळे भांड्यातील आयन्स अन्नात लवकर विरघळणे

लिंबू, टोमॅटो यांसारखे आम्लीय पदार्थ या भांड्यात शिजवले, तर भांड्यातील आयन्स (विद्युत्भारित कण) अन्नात लवकर विरघळतात. असे अन्न शरिरासाठी अपायकारक असते.

इ. शरिरामध्ये साठत गेलेले अ‍ॅल्युमिनीयम
स्लो पॉयझन (हळूहळू कार्य करणारे विष) बनणे

मानवी शरिरामध्ये अशा धातूंना बाहेर काढून टाकण्याची मर्यादित क्षमता असते. या क्षमतेच्या बाहेर शरिरामध्ये असे धातू गेल्यास ते मांसपेशी, मूत्रपिंडे, यकृत (लिव्हर), हाडे इत्यादी ठिकाणी हळूहळू साठू लागतात. अ‍ॅल्युमिनीयम धातू मेंदूच्या पेशींवरही हानीकारक परिणाम करतो. अशा प्रकारे शरिरामध्ये साठत गेलेले अ‍ॅल्युमिनीयम स्लो पॉयझन बनते.

ई. अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्याने होणारे आजार

नैराश्य, चिंता, काळजी, स्मृतीलोप, हाडांशी संबंधित आजार (ऑस्टीओपोेरोसिस), डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडांची क्षमता घटणे, अतिसार, अतिआम्लता (हायपरअ‍ॅसिडटी), अपचन, पोटदुखी, आतड्याला सूज येणे (कोलायटिस), वारंवार तोंड येणे, इसबसारखे (एक्झिमासारखे) त्वचारोग होतात.

उ. अ‍ॅल्युमिनियम हा धातू मेंदूंच्या पेशींवर हानीकारक परिणाम करतो.

 

२. अ‍ॅल्युमिनियम आणि हिंडालियम यांना पर्याय

अ. मातीची भांडी हा सवोत्तम पर्याय आहे. पेठेत ही भांडी न मिळाल्यास स्थानिक कुंभाराकडून ती बनवून घ्यावीत. जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरल्यास शरिराला आवश्यक ती खनिजे जेवणातून मिळतात. मातीच्या भांड्यांत बनवलेल्या जेवणाची चव ज्याने चाखली, तो पुन्हा कधीही इतर भांड्यांचा विचारही करणार नाही.

आ. मातीची भांडी वापरणे शक्य नसल्यास तांब्या-पितळ्याची कल्हई केलेली भांडी वापरावीत. ही भांडी आंबट पदार्थांसाठी वापरू नयेत.

इ. स्टेनलेस स्टीलची भांडी वापरणे, हा त्यातल्या त्यात सोपा पर्याय आहे. अजूनपर्यंत तरी स्टेनलेस स्टीलचे दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.

 

३. आरोग्याच्या संदर्भात हेळसांड करू नका !

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे निरोगी शरीर साधना करण्यासाठी प्रथम साधन आहे, असे शास्त्रवचन आहे. ईश्‍वराने दिलेल्या या शरिराचे मूल्य पैशांमध्ये करता येणेच शक्य नाही. ज्यांना घरातील अ‍ॅल्युमिनियमची भांडी एकदम पालटणे शक्य नसेल, ते टप्प्याटप्याने भांडी पालटू शकतात. नवनवीन भ्रमणभाष संच, अनावश्यक सौंदर्यप्रसाधने, शरिराला हानीकारक असलेले कपड्यांचे-भांड्यांचे साबण, टूथपेस्ट, कोणतेही पोषणमूल्य नसलेले नूडल्स, कुरकुरे यांसारखे पदार्थ, बिनकामाचा आणि डोकेदुखी वाढवणारा दूरदर्शन संच, डिश अँटिना इत्यादींवर होणारा अनावश्यक व्यय बंद करून याच पैशांत आरोग्यासाठी आवश्यक अशी मातीची अथवा पर्यायी भांडी विकत घेऊन निरोगी रहाणे सहज शक्य नाही का ?

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, गोवा. (२३.१.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment