धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य !

अनुक्रमणिका

आदर्श राज्याचा विचार मनात आला की, प्रत्येकाला रामराज्यच आठवते. ‘असे रामराज्य आपल्या वाट्याला का येऊ नये’, असेही अनेकांना वाटते. आपण प्रयत्न केल्यास पूर्वीसारखेच रामराज्य आताही अवतरू शकेल. त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, ते या लेखात पाहू.

 

१. धर्माचरणाचा अभाव, हेच राष्ट्राच्या सध्याच्या दुःस्थितीचे मूळ

‘अधर्म एव मूलं सर्व रोगाणाम् ।’ म्हणजे अधर्म (व्यक्ती आणि समाज धर्माचरणापासून विन्मुख होणे), हाच सर्व रोगांचे मूळ आहे. समाज आणि राष्ट्र यांवरील धर्माचा अंकुश नाहीसा झाल्याने व्यक्तीगत जीवनात स्वार्थ, अधिकार, हव्यास, भोगलालसा आदी दोष आणि राष्ट्रीय जीवनात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, सत्तापिपासूपणा, चारित्र्यहीनता, नीतीहीनता आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.

 

२. समाजाला धर्माचरणापासून दूर लोटून राष्ट्राला अधोगत बनवणारी सध्याची निधर्मी राज्यव्यवस्था

राष्ट्राने ईश्वरप्राप्तीच्या दिशेने टाकलेल्या पावलांवरून राष्ट्राची प्रगती कळते. ही राष्ट्राची खरी प्रगती असते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात रुजलेल्या निधर्मी राज्यव्यवस्थेत तर ईश्वरप्राप्तीचे माध्यम असलेला ‘धर्म’च राज्यकर्त्यांनी नाकारला. म्हणजे राष्ट्राची पावले उलटी पडत गेली आणि स्वातंत्र्यानंतर (२०१४ या वर्षी) ६६ वर्षांत झालेली राष्ट्राची अधोगती आपण पहातच आहोत.

धर्म नाकारून राष्ट्राची ध्येयधोरणे निश्चित केल्याने शालेय शिक्षण, शासकीय धोरणे, सामाजिक जीवन अशा सर्वच ठिकाणी स्वार्थ, अधिकाराची (हक्काची) जाणीव, नैतिकतेची पायमल्ली आदींचा अतिरेक झाला. राज्यव्यवस्थेत धर्माचे अधिष्ठान न राहिल्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमध्येही धर्माने शिकवलेला त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठा, सदाचार, चारित्र्यशीलता यांसारख्या गुणांचा विकास झाला नाही. ‘यथा राजा तथा प्रजा’, यानुसार प्रजेचीही स्थिती तशीच झाली.

 

३. आदर्श धर्मराज्यांची उदाहरणे

राजा कैकय, प्रभु श्रीराम ते अलीकडील काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मराज्याचा आदर्श घालून दिला; म्हणून हिंदु समाजासाठी ते आजही संस्मरणीय आणि वंदनीय ठरतात.

 

४. धर्माचरण हाच धर्मराज्याचा (हिंदुराष्ट्राचा) पाया

धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, कर्तव्यभावना, नीतीमत्ता, चारित्र्यशीलता इत्यादी गुण सर्व समाजानेच अंगिकारलेले असणे, हे आदर्श समाजव्यवस्थेचे साध्य आहे. त्यासाठी धर्म हा महत्त्वाचा घटक आहे; कारण धर्माच्या आधारेच मनुष्याचा अभ्युदय साधतो, म्हणजे लौकिक आणि पारमार्थिक जीवन उन्नत होते, तसेच मोक्षप्राप्ती होते.

 

५. धर्मराज्याची निर्मिती म्हणजे क्रांती नव्हे, तर विश्वबंधुत्वाच्या निर्मितीची प्रक्रिया

धर्मराज्याच्या निर्मितीत क्रांती होत नाही, तर उत्क्रांती होते. क्रांतीत विध्वंस असतो. उत्क्रांतीत विध्वंस नसतो, तर उद्धार असतो. जनतेला धर्मशिक्षण देऊन, तिच्यातील दोषांचे निर्मूलन करून आणि सद्गुण वाढवून तिला सात्त्विक बनवले जाते आणि तिच्यात विश्वबंधुत्व निर्माण केले जाते. प्रभुकृपा झालेले राष्ट्रसंत आणि साधक आपले आदर्श, सद्गुण, संस्कृती अन् अनुभव यांद्वारे धर्मराज्याची निर्मिती करतात. त्यामुळे रक्तहीन क्रांतीच्या, म्हणजे वैचारिक क्रांतीच्या माध्यमातून साकार होणारे आगामी धर्मराज्य, हे जगासमोर एक आदर्श निर्माण करील.

 

६. सांप्रत ‘हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, ही साधना’, हे शिकवणारे (सनातनचे प्रेरणास्थान) प.पू. डॉ. जयंत आठवले !

‘हिंदु संस्कृती आणि हिंदुभू यांच्या थोरवीचे अगणित पैलू आहेत. ‘गुरु-शिष्य परंपरा’ हा असाच एक अनमोल पैलू ! ‘गुरु-शिष्य’ म्हटले की, तपस्वी मुनी आणि त्यांची सेवा करणारे शिष्य, असे दृश्य डोळ्यांसमोर उभे रहाते. गुरु-शिष्याचे हे एक रूप झाले. स्वधर्म, स्वसंस्कृती आणि स्वराष्ट्र यांच्या रक्षणाचा अन् सुराज्यव्यवस्थेचा आदर्श उभा करणारे दुसरेही एक रूप आहे. श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदासस्वामी-शिवाजी महाराज अशी उदाहरणे आठवा, मग हे रूप डोळ्यांसमोर सहजतेने उभे राहील.

६ अ. सनातनचे प्रेरणास्थान ‘प.पू. डॉ. जयंत आठवले’ – द्रष्टे धर्मगुरु आणि राष्ट्रसंत !

१. स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ नंतर सहस्रोेंंच्या मनात सळसळता राष्ट्राभिमान अन् धर्माभिमान जागृत करणार्‍या ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाचे संस्थापक-संपादक असलेले प.पू. डॉ. आठवले, हे सध्याच्या काळातील खरेखुरे लोकनायक होत !

२. कित्येक क्रांतीकारकांची ‘गीता’ असलेल्या स्वा. सावरकरांच्या क्रांतीविषयक ग्रंथांनंतर सहस्रोेंंना राष्ट्ररक्षण आणि आदर्श राष्ट्ररचना यांविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ लिहिणारे प.पू. डॉ. आठवले, हे सध्याच्या काळातील वैचारिक क्रांतीचे खरेखुरे अध्वर्यू होत !

३. देशाची फाळणी टाळण्यासाठी कायमच हिंदुराष्ट्राच्या आवश्यकतेचा घोष करणार्‍या स्वा. सावरकरांनंतर देशाच्या सर्वच समस्यांवर ‘धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राची स्थापना’, हाच एकमेव प्रभावी उपाय आहे’, असे ठामपणे प्रतिपादणारे आणि त्याविषयी अव्याहत मार्गदर्शन करणारे प.पू. डॉ. आठवले, हे सध्याच्या काळातील खरेखुरे द्रष्टे आणि देशाचे भाग्यविधाते होत !

४. स्वातंत्र्यपूर्व काळात महर्षी अरविंद यांसारख्या अनेक ज्ञात-अज्ञात संतांच्या आध्यात्मिक पाठबळामुळे स्वातंत्र्यलढ्याला ईश्वरी अधिष्ठान लाभले आणि अखेर स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला. आता भ्रष्टाचार निर्मूलनासाठी होणारे योगऋषी रामदेवबाबांचे आंदोलन असो, लोकपाल विधेयकासाठी होणारे अण्णा हजारे यांचे आंदोलन असो, संभाव्य तिसर्‍या महायुद्धाची झळ अल्प व्हावी यासाठीची सिद्धता असो किंवा हिंदुराष्ट्र-स्थापनेचे ध्येय असो… या सार्‍या राष्ट्रविधायक कार्यांना आध्यात्मिक बळ पुरवणारे आणि या कार्यांच्या यशस्वीतेसाठी साधकांना नामजप आणि प्रार्थना करण्यास सांगणारे प.पू. डॉ. आठवले, हे सध्याच्या काळातील केवळ भारताचे धर्मगुरु नव्हेत, तर जगद्गुरुच होत !

६ आ. प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुराष्ट्र-स्थापनेचे कार्य करण्याचे महत्त्व

महाभारतीय युद्धात अर्जुनासमोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य यांसारखे सर्वश्रेष्ठ योद्धे असतांनाही अर्जुनाचा जय झाला; कारण गुरु भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी होता. हिंदुराष्ट्र-स्थापनेच्या कार्याला प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे धर्मगुरु आणि राष्ट्रसंत यांचा आशीर्वाद, मार्गदर्शन आणि पाठबळ असणे अत्यावश्यक आहे, तरच ते कार्य सफल होईल. आज ‘सनातन संस्थे’चे सहस्रो साधक जणू शिष्य बनून प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हिंदुराष्ट्र-स्थापनेसाठी कार्य करत आहेत. साधकांना ही वाटचाल करतांना आतापर्यंत धर्मद्रोह्यांच्या द्वेषाला आणि निधर्मी राज्यकत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मार्गात अनंत अडथळे आले आहेत; तरी गुरु आणि भगवंत यांवर श्रद्धा ठेवल्याने आतापर्यंत मार्ग सुकर झाला आहे.

 

७. धर्मराज्य (हिंदुराष्ट्र) स्थापनेचा राजमार्ग आणि या
स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच !

पू. श्री. संदीप आळशी

धर्मराज्याच्या स्थापनेची प्रक्रिया, म्हणजे सत् आणि असत् यांच्यातील लढा असल्याने धर्मराज्याच्या स्थापनेला दुर्जनांकडून विरोध हा होईलच. हा विरोध मोडून काढण्यासाठी राष्ट्रहिताची तळमळ असलेल्या नीतीमान आणि धर्मपालक व्यक्तींनी वैचारिक क्रांतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. या वैचारिक क्रांतीमुळे व्यापक जनजागृतीची लाट पसरेल आणि मग हिंदुराष्ट्राची स्थापना सहज शक्य होईल.

वैचारिक क्रांती कशी करता येईल, याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. धर्मद्रोही राज्यकत्र्यांना सदाचे हटवून त्यांच्या ठिकाणी धर्मपालक, जनकल्याणकारी, निःस्वार्थी अन् जनतेवर पितृवत प्रेम करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ राज्यकत्र्यांना सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करावा.

आ. लाच घेणार्‍यांना रंगेहात पकडण्याची चळवळ उभारावी, जेणेकरून भ्रष्टाचार्‍यांना लाच घेण्याचे भय वाटेल.

इ. संशयित शासकीय कंत्राटांची ‘माहितीच्या अधिकारा’खाली माहिती घेऊन भ्रष्ट ठेकेदार आणि संबंधित शासकीय अधिकारी यांच्या विरोधात गार्‍हाणे मांडावे.

ई. कामे करण्यात चालढकलपणा करणार्‍या कर्मचार्‍यांविरुद्ध त्यांच्या वरिष्ठांकडे गार्‍हाणे (तक्रार) मांडावे.

उ. भेसळ करणारे, वजनात फसवणारे, मालाचा अवाजवी दर आकारणारे, दिशाभूल करणारी विज्ञापने करणारे इत्यादींच्या विरोधात चळवळ उभारावी.

ऊ. खोटी आणि एकांगी वृत्ते देणार्‍या, वृत्ते देण्यासाठी पैसे घेणार्‍या (‘पेड न्यूज’) प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घालावा.

धर्मराज्याची स्थापना, हे शिवधनुष्य आहे. ते पेलण्यासाठी राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ हिंदूंचे संघटन, हाच प्रभावी उपाय आहे. प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे धर्मगुरु आणि राष्ट्रसंत यांच्या मार्गदर्शनानुसार होणार्‍या हिंदुराष्ट्र-स्थापनेच्या कार्याला साक्षात भगवंताचा आशीर्वाद आहे. या कार्यात आपण यथाशक्ती सहभागी झालो, तर भगवंताची कृपा आपल्यावर निश्चितच होईल. यासाठी उठा, आता थांबू नका, मागे तर कधीच फिरू नका, ‘सदैव साधका पुढेच जायचे’, यानुसार प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार पुढे पुढेच चालत रहा. ‘जेथे धर्म, तेथे जय’, या आशीर्वचनानुसार आपण विजयी होऊ, हे सुनिश्चित आहे. या मार्गाने गेल्यानेच आपल्याला ईश्वरप्राप्ती होईल.’

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यात आपणही सहभागी व्हा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

1 thought on “धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य !”

Leave a Comment