सनातन संस्थेच्या सौ. कांचन पवळे यांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान !

पुणे येथे ‘श्वास फाऊंडेशन’च्या वतीने ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा !

सौ. कांचन पवळे यांचा सन्मान करतांना (डावीकडे) ‘श्वास फाऊंडेशन’च्या सरचिटणीस सौ. ज्योत्स्ना गणेश गवारे

पुणे, १६ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीप्र्रीत्यर्थ यावर्षी पासून ‘श्वास फाऊंडेशन’च्या वतीने १५ जून या दिवशी ‘वीर सावरकर हिंदु गौरव पुरस्कार २०२५’ वितरित करण्यात आले. समाजामध्ये सामाजिक, धार्मिक, पर्यावरण, आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यंदा सनातन संस्थेच्या साधिका सौ. कांचन पवळे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. कल्याणीनगर येथील गणपति मंदिर सभागृह येथे हा सोहळा पार पडला.

श्वास फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. गणेश गवारे यांनी सांगितले की, हा आमचा पहिलाच कार्यक्रम आहे. समाजातील जे निःस्वार्थ भावनेने समाजसेवा करत आहेत, त्यांना शोधून त्यांचा गुणगौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

श्री. अक्षय जोग यांना ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ भेट देतांना युवराज पवळे (डावीकडे)

सामाजिक आणि जागृतीपर कार्यक्रमांसाठी श्री. संजय ढोले, वाचन सेवा / संस्कृतीसाठी श्री. जगन्नाथ कोतवाल, तसेच पर्यावरण सेवेसाठी श्री. चंद्रकांत वारघडे अशा ११ जणांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यानंतर सर्व ११ पुरस्कारकर्त्यांच्या वतीने सौ. कांचन पवळे यांनी वीर सावरकरांची माहिती आणि सनातन संस्था करत असलेल्या कार्याची माहिती सांगितली. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने प्रसारसाहित्य आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. सावरकर अभ्यासक आणि लेखक श्री. अक्षय जोग यांना प्रदर्शन कक्षावर ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

धर्मकार्य करतांना येणार्‍या अडचणींवर मात करून ध्येयनिष्ठ रहायला शिकले पाहिजे ! – सौ. कांचन पवळे

सौ. कांचन पवळे

हा पुरस्कार मी माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी अर्पण करते. धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ निःस्वार्थी भावाने सेवा कार्य करणार्‍या सनातनच्या कार्याची नोंद घेऊन पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार ! सावरकर यांनी अद्भुत साहस, जिद्द आणि मातृभूमीवरील प्रेम यांसाठी अशक्य वाटणार्‍या प्रसंगातही ध्येयासाठी प्राण पणाला लावले. आपणही धर्मकार्य करतांना अडचणींवर मात करून ध्येयनिष्ठ रहाणे शिकावे.

कार्यक्रमाचा आरंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले, तसेच कार्यक्रमाच्या आरंभी विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली अर्पण केली. मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार तुळशीचे रोप, शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला.

माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे, सावरकर अभ्यासक, लेखक श्री. अक्षय जोग, श्वास फाऊंडेशन, पुणेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश गवारे, ‘गीताधर्म मंडळा’चे अध्यक्ष श्री. मुकुंद दातार आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली.

Leave a Comment