पुरुषोत्तम आवरे-पाटील यांचे अश्लाघ्य हिंदुद्रोही लिखाण !

धर्मद्रोही युवराज मोहिते संपादित साप्ताहिक कलमनामामधून
पुरुषोत्तम आवरे-पाटील यांचे अश्लाघ्य हिंदुद्रोही लिखाण !

(म्हणे) दुर्जनांच्या नाशासाठी सनातन संस्थेचा खतरनाक अजेंडा !

१. खर्‍या वारकर्‍यांचा जादूटोणाविरोधी कायद्यास विरोध नसल्याचा कांगावा !
२. ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आदींचा बोगस वारकरी असा उल्लेख

मुंबई – धर्मद्रोही पत्रकार युवराज मोहिते संपादित साप्ताहिक कलमनामाच्या २१ जुलै २०१३ च्या अंकात पुरुषोत्तम आवरे-पाटील यांनी वारीतील सनातनी वाटमारे या मथळ्याखाली लेख लिहिला आहे. या लेखात सनातन संस्था, ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आदींसह अनेक वारकर्‍यांवर टीका करण्यात आली आहे. वारकर्‍यांना बोगस वारकरी आणि ब्राह्मणी ठरवण्यात आले आहे. (सातत्याने निधर्मीपणाचा टेंभा मिरवणारे राज्यकर्ते वारीमध्ये फूट पाडून जातीयवादी लिखाण करणार्‍यांवर कोणतीही कारवाई करणार नाहीत; कारण या राज्यकर्त्यांपैकीच काही जणांच्या पाठिंब्याने हिंदूंमध्ये पद्धतशीरपणे फूट पाडण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. वारकर्‍यांनो, तुमच्यामध्ये फूट पाडणार्‍या या धर्मद्रोह्यांसह त्यांना पाठीशी घालणार्‍या राज्यकर्त्यांना ते भेटतील तेथे वैध मार्गाने खडसवा ! – संपादक)

वारकर्‍यांना जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधात भडकवण्यामागे सनातन संस्था आणि ब्राह्मण यांचे नियोजनबद्ध कटकारस्थान असल्याचे या लेखात लिहिले आहे. तसेच दुर्जनांच्या नाशासाठी सनातन संस्थेचा खतरनाक अजेंडा आहे, अशी माथेफोडही या लेखात करण्यात आली आहे. (जर सनातन संस्थेने खरोखरच खतरनाक अजेंडा राबवला असता, तर संपादक युवराज मोहिते आणि पुरुषोत्तम आवरे-पाटील यांच्यासारख्यांनी सनातनच्या विरोधात ब्र तरी काढण्याचे धैर्य केले असते का ? साप्ताहिक कलमनामा मधील या लिखाणाच्या संदर्भात सनातनच्या वतीने अधिवक्त्यांचा सल्ला घेण्यात येत आहे ! – संपादक) १२ जुलैच्या कलमनामाच्या अंकात संजय सोनवणी यांनी भरकटलेली वारी या लेखातून वारी आणि वारकरी यांवर टीका केली होती. त्यानंतर आता केवळ काही महत्त्वाच्या आणि ज्यांच्या मागे पुष्कळ मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे, अशा वारकर्‍यांसह सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात आले आहे.

(म्हणे) सनातन संस्थेने बोगस वारकरी निर्माण केले !

वारीतील सनातनी वाटमारे या लेखात पुढे असे नमूद केले आहे की

१. हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा मूळ अजेंडा घेऊन डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची सनातन संस्था दुर्जनांचा नाश करण्यासाठी काम करते. (सनातन संस्थेने कधीही आजवर अशा प्रकारची व्याख्या कोणत्याही लिखाणात केलेली नाही. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती या एकमात्र उद्देशाने सनातन संस्था कार्यरत आहे. विश्वकल्याणार्थ कार्यरत सात्त्विक लोकांनी चालवलेले राज्य, असा हिंदु राष्ट्राचा अभिप्रेत अर्थ सनातनने अनेक वेळा स्पष्ट केला आहे. – संपादक)

२. सनातन प्रभात हे दैनिक आणि साप्ताहिक चालवते. जे वेद, चातुर्वर्ण आणि मनुस्मृती मानत नाहीत, ते दुर्जन. (आवरे-पाटील यांचा जांवई शोध ! सनातन प्रभातने त्यांच्या कोणत्याच नियतकालिकात जे वेद, चातुर्वर्ण आणि मनुस्मृती मानत नाहीत, ते दुर्जन, असे प्रसिद्ध केलेले नाही. यातून आवरे-पाटील यांचे सनातन प्रभातविषयीचे द्वेषमूलक धोरण स्पष्ट होते. – संपादक)

३. अशांचा नाश करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब यांना वर्ज्य नाही. परभणी, नांदेड, ठाणे येथे झालेल्या बाँबस्फोटात काही सनातन साधकांची नावे यापूर्वीच आली आहेत. (परभणी किंवा नांदेड येथील बाँबस्फोटांत सनातनच्या साधकांची नावे असल्याचे कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सांगितलेले नाही. असे असतांना सनातनच्या विरोधात गरळओक करण्याच्या हेतूने ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ याप्रमाणे लिखाण करणारे पुरुषोत्तम आवरे-पाटील यांना कोण आवरणार ? – संपादक) यावरून त्यांचा छुपा अजेंडा किती खतरनाक असू शकतो याचा अदमास घेता येतो. (सनातन संस्थेने आजवर कोणतीही छुपी भूमिका घेतलेली नाही. प्रत्येक राष्ट्रहानी आणि धर्महानी यांच्या विरोधात स्वच्छ भूमिका घेऊन समविचारी संघटनांच्या साहाय्याने अनेक आंदोलने वैध मार्गानेच यशस्वी केली आहेत. या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी आणि एरव्हीसुद्धा सनातनने आपली भूमिका कागदावरसुद्धा जशीच्या तशी उतरवली आहे. असे असतांना केवळ सनातनचा बाऊ करून सनातनद्वेष पसरवण्यासाठीच आवरे-पाटील हे सर्व करत आहेत ! – संपादक)

४. वारीमध्ये प्रस्तावित जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधात पोपटासारखे बोलणारे दोघे वारकरी, हे वारकरी नव्हते, तर गेली दोन वर्षे या कायद्याच्या विरोधात वारकर्‍यांना पटवून देण्यासाठी आलेले सनातन संस्थेचे साधक होते. टिळा, टोपी, माळा, अष्टगंध, पेहराव वारकर्‍यांचा; पण अंतरंग सनातन असा हा मामला होता. (सनातन संस्थेने कोणत्याही प्रकारचे बोगस वारकरी सिद्ध केलेले नाहीत. सनातनचे साधक केवळ वारकरीच नव्हे, तर सर्व ठिकाणच्या संतांना जाऊन भेटतात. त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या धर्मकार्यात सहभागी होत असतात. सनातनच्या साधकांवरही कुणी आजवर अमुक प्रकारची वस्त्रे घाला, असे बंधन लादलेले नाही. अनेक वारकर्‍यांच्या भेटी घेऊन साधक प्रबोधन करत असतांना सनातनने कधीही वारकर्‍यांना त्यांच्या पोशाखात वा भूमिकेत पालट करण्याचा आग्रह धरलेला नाही. ज्यांना सनातनने सांगितलेली धर्माची बाजू कळते, ते धर्मरक्षणार्थ सिद्ध होतात. त्यासाठी सनातनला केवळ वारीचे निमित्त लागत नाही, तर संपूर्ण वर्षभर देशभरात सनातनचे साधक धर्मप्रबोधनच करत असतात ! – संपादक)

५. सनातन संस्था आणि रा.स्व. संघ यांच्या ध्येय, कामात बरंच साम्य आहे. (यावरून आवरे-पाटील यांचा सनातनच्या कार्याविषयीचा अभ्यास अत्यंत कच्चा असल्याचे स्पष्ट होते. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती हा सनातनच्या कार्याचा केंद्रबिंदू असून रा.स्व. संघात अशा प्रकारे कोणतीही साधना सांगितली जात नाही. त्यामुळे सनातनचा रा.स्व. संघाशी संबंध जोडणे हास्यास्पद आहे. – संपादक) हिंदू जनजागरण समिती, देशभक्त पत्रकार संघ यासोबतच वारकर्‍यांतही आता यांच्या संघटना काम करत आहेत. (हिंदू जनजागृती समितीचे नावही नीट माहिती नसणारे, समितीच्या किंवा सनातनच्या संदर्भात कसले लिखाण करणार ? त्यामुळे वारकर्‍यांमध्ये सनातनच्या संघटना कार्यरत आहेत, हे म्हणणे ही लोणकढी थाप असल्याचे सांगणे न लगे ! – संपादक)

सगळ्याच वारकर्‍यांविषयी शंका आणि ब्राह्मणांवर अश्लाघ्य टीका !

१. वारीच्या गर्दीत ज्यांचा जयघोष केला जातो, त्या संतांना समजून घेणारा टक्का किती असेल याबद्दल शंका आहे. (वारकर्‍यांनो, या आणि अशा अनेक विधानांतून आवरे-पाटील यांनी तुम्हाला निर्बुद्ध ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. भटी काव्याप्रमाणे राजवाडे, भावे, जोशी, पांगारकर आदींनी विठ्ठलाला मेंढपाळाचा देव ठरवण्याचा प्रयत्न केला; मात्र ते चालले नाही. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी विठ्ठलमहती गाण्यास प्रारंभ केला. (डॉ. रा.गो. भांडारकर, कै. वि.का. राजवाडे, श्री. चि.वि. वैद्य, कै. विष्णुबुवा जोग यांच्यासारख्यांनी विठ्ठलाच्या नावाच्या उत्पत्तीपासून अन्य संशोधनाचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करणारे आवरे-पाटील या सर्वांच्या आधीच्या पिढीच्या गोष्टी कोणत्या आधारे सांगत आहेत ? – संपादक)

३. वैदिकांनी वारी कह्यात घेण्यासाठी त्यांची पोटार्थी माणसं, कीर्तनकार, बुवा, ह.भ.प. यांची झूल पांघरून वारीत सोडली आहेत. ती भोळ्या वारकर्‍यांना फसवत आहेत. उदा. साखरे बुवा, बंडातात्या (संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर), विहिंपचे चिखलीचे प्रकाशबुवा जवंजाळ, दायमा महाराज, श्रीधरस्वामी यांना वारकरी संप्रदायांत घुसवले. यांचा मूळ वारकरी संप्रदाय, वारकरी संत यांच्याशी काही संबंध असल्याचं दिसत नाही. (शासनालाही जमणार नाही, अशी जनजागृती कीर्तनातून करून सहस्रावधी तरुणांना व्यसनमुक्त करण्याचे कार्य संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. वारकरी महामंडळाच्या कार्यातून ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ हे वारकरी समाजाच्या उत्थानाचे कार्य करत असतांना अशा प्रकारची टीका करणार्‍या आवरे-पाटील यांच्या बुद्धीची कीव करावी, तेवढी थोडीच ! – संपादक)

४. वर्षानुवर्षे वारी करणार्‍यांना जिथे तुका कळला नाही, तिथे या उपर्‍यांना तो काय कळेल ? (संत तुकारामांनी जे केले, तेच काम ह.भ.प. बंडातात्या आणि ह.भ.प. जवंजाळ महाराज यांच्यासारखे वारकरी करत असतांना त्यांना तुकाराम कळले नाहीत, असे म्हणणार्‍याची कीव करावी तितकी अल्पच ! – संपादक)

५. संत तुकारामाचे वंशज डॉ. सदानंद मोरे, रामदास महाराज कैकाडी, शामसुंदर महाराज सोन्नर, अजय महाराज बावस्कर यांच्यासारखे लाखो शिष्य असणारे खरे वारकरी या नव्या कायद्याचं स्वागत करत आहेत. (या वारकर्‍यांचा बोलविता धनी कोण आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. यांपैकी काही जणांनी शासनाच्या अनेक सुविधा मिळवल्या आहेत. त्यामुळेच ते स्वतःच्या मुळावर आले, तरी या कायद्याला विरोध करूच शकत नाहीत ! आज राष्ट्रीय वारकरी सेनेचे भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, वारकरी प्रबोधन समितीचे ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, प.पू. आसारामजी बापू, योगऋषी रामदेवबाबा यांच्यासारखे अन्य संप्रदायांतील संतांचाही या कायद्याला विरोध आहे. मग या सर्वांपेक्षा आवरे-पाटील यांना अधिक कळते का ? या सर्वांच्या मागे लक्षावधी भाविक आहेत, आवरे-पाटील यांच्यामागे कुणी आहे का ? – संपादक)

६. पंढरपुरात मुख्यमंत्री आल्यावर ५-२५ बनावट ह.भ.प. एकत्र येऊन जादूटोणाविरोधी कायदा रहित करण्याचा आग्रह धरतात. सनातन, संघ, विहिंपवाले, पंडे, कीर्तनकार हल्लागुल्ला करतात. त्या वेळी मुख्यमंत्रीसुद्धा हबकून जातात. त्यांना वाटतं लाखो वारकर्‍यांचा या कायद्याला विरोध आहे; पण वस्तूस्थिती तशी नाही. (वस्तूस्थिती काय आहे, हे समजून घेण्यासाठी निःपक्षपाती बुद्धी असावी लागते. ज्यांच्या डोक्यात केवळ ब्राह्मणद्वेषाची कीड वळवळत असेल, ते लोकांना कसली वस्तूस्थिती सांगणार ? – संपादक)

७. संत तुकाराम जर आज असते, तर त्यांनी वारीत घुसलेल्या या पेंढार्‍यांना पैजारा मारून हा कायदा व्हावा, यासाठी इंद्रायणी काठावर उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला असता. (जादूटोणाविरोधी कायदा रहित होण्यासाठी असंख्य वारकार्‍यांनी वैध मार्गाने आंदोलन चालवले आहे. त्यांनी कधीही कायदा हातात घेतलेला नाही. त्यामुळे संत तुकारामांच्या पावलांवर पावले कोण टाकत आहे आणि कुणाला पैजारा बसल्या असत्या, हे सुज्ञास सांगणे न लगे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment