वैज्ञानिक प्रयोगाद्वारे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीमध्ये चैतन्य आणि ऊर्जास्रोत असल्याचे पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी सिद्ध करून दाखवणे

Sant_Dnyaneshwar

१. समाधी घेतलेल्या ठिकाणी संत ज्ञानेश्‍वर महाराज
शरीररूपाने समाधीत असायला हवेत, असा अभ्यासहीन तर्क करणार्‍या
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ते पहाण्यासाठी समाधीचे खोदकाम करण्याचे ठरवणे

पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल
वर्ष १९७२ मध्ये अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीविषयी वाटले, जर संत ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? नसल्यास त्यांची हाडे, हाडांचा सांगाडा तरी त्या ठिकाणी नक्कीच असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे. जिवंत समाधीविषयी म्हणजे संजीवन समाधीविषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणार्‍या कार्यकर्त्यांनी जर अगोदर संजीवन समाधी म्हणजे काय, हे जाणून घेतले असते, तर त्यांना समाधी उकरून काढण्याची आवश्यकता भासली नसती. वैज्ञानिक शास्त्र इतके प्रगत झालेले आहे की, वेगवेगळ्या मापकांच्या साहाय्याने आत काय आहे, आहे कि नाही, नसल्यास का नाही आणि आहे म्हणतात, तर ते नेमके काय आहे, हे कळते. वाचकांना ते कळावे, म्हणून या ठिकाणी त्या वेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर ऊहापोह करत आहे.

 

 

२. संजीवन समाधी घेतल्यावर शरिरातील पंचमहाभूते
ब्रह्मांडातील पंचतत्त्वांशी एकरूप होऊन विरून जात असल्याने
त्या ठिकाणी फक्त चैतन्य, ऊर्जा किंवा स्पंदने शिल्लक रहात असणे, तसेच
अशी समाधी घेणार्‍यांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून शरीर धारण करणे शक्य असणे

संजीवन समाधी म्हणजे काय, हे पातंजलयोगशास्त्रात सांगितलेले आहे. जेव्हा एखादे साधू वा संत संजीवन समाधी घेतात, तेव्हा ते पातंजलयोगशास्त्राप्रमाणे पंचमहाभूतात्मक होतात. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा ते साधू वा संत संजीवन समाधीत उतरतात, तेव्हा ते सजग असतात. आपल्या सगळ्यांना दिसणारी शरिराच्या अवयवांतील पंचतत्त्वे त्यांना दिसत असतात. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरिरातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे भाग बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांत विरून जातात, एकरूप होऊन जातात. ज्यांचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते, त्याचे त्याला परत देऊन साधू-संत निर्देही होतात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक रहात नाही. त्या ठिकाणी जर काही शिल्लक रहात असेल, तर ते चैतन्य, ऊर्जा, स्पंदने. याचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, या साधूसंतांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून आपले शरीर धारण करता येते. ज्या संतमहंतानी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्या सगळ्यांना हे सर्व शक्य असते.

 

३. समाधीचे खोदकाम करून आत काय आहे, हे पहाण्यास येणार्‍या
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टीने
समाधीचे महत्त्व समजावून देऊन त्यांना समाधीची मोडतोड करण्यापासून
परावृत्त करण्यास वैज्ञानिक असलेल्या डॉ. शुक्ल यांना वारकर्‍यांच्या प्रमुखांनी सांगणे

संजीवन समाधी या विषयाचा सखोल अभ्यास, सखोल ज्ञान या कार्यकर्त्यांना असते, तर संजीवन समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी खोदून त्यातून हाडे मिळतात कि संत ज्ञानेश्‍वर महाराज जिवंत सापडतात, हे पहाण्याचा उद्योग त्यांनी केला नसता. त्यांनी कुणा जाणकाराजवळ चौकशी करून माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि पातंजलयोगात काय आहे, हेही पडताळून पहाण्याचे त्यांनी कष्ट घेतले नाहीत. रात्री ११.३० वाजता अचानक हरिभक्तपरायण आणि वारकर्‍यांचे अध्वर्यू असलेल्या मामा दांडेकरांचा मला दूरभाष आला. पुण्याहून डॉ. फाटकांचाही दूरभाष आला, तू वैज्ञानिक आहेस, तेव्हा तुझे साहाय्य आम्हाला हवे आहे. प्रकार असा होता की, ट्रकमधून दोनअडीचशे माणसे पुण्याहून आळंदीला जाणार असून ती ज्ञानेश्‍वरांची समाधी फोडून पहाणार होती. त्यांना मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून पटवून द्यावयाचे होते की, संजीवन समाधी म्हणजे नेमके काय घडते आणि काय उरते. मी त्या दोघांना आश्‍वासन दिले, मी माझ्या पद्धतीने त्यांना पटवून देण्याचा अवश्य प्रयत्न करीन. मला खात्री होती की, मी त्यांना पटवून देऊन तोडफोड करण्यापासून परावृत्त करू शकेन; तेही योग्य आणि चांगल्या प्रकारे.

४. समाधीचे खोदकाम करण्यासाठी येतांना
कार्यकर्त्यांनी ते फार आधुनिक असल्याचे दाखवून देण्यासाठी
समवेत काही डॉक्टर्स आणि परदेशातील तीन व्यक्तींना बरोबर आणणे

सकाळी लवकर ठराविक माणसे समवेत घेऊन आम्ही आळंदीला पोहोचलो. इतरांना कुणाला याची काहीच कल्पना येऊ दिली नव्हती. मी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर. एक्सरे, अल्फा, गॅमा, बिटा इत्यादी नावांचे जे किरण किंवा ऊर्जा असतात, ते एखाद्या ठिकाणी आहेत कि नाहीत, ते त्या मीटरवर दाखवले जाते. तो संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला. दुसर्‍या मीटरला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फ्रारेड आहेत कि नाही, हे पहाता येेते. तोही मीटर समाधीजवळ ठेवला. तिसरा होता फ्रिक्वेन्सी मीटर रडार. (रेडिओ, दूरदर्शन यांच्याकरिता रडार फ्रिक्वेन्सी वापरली जाते.) हा मीटरही त्याठिकाणी ठेवला. ठरल्याप्रमाणे ट्रक भरून दोन-अडीचशे माणसे आळंदी देवस्थानाजवळ घोषणा करीत आली. सगळी आळंदी हा काय प्रकार आहे, हे पहाण्यासाठी जमा झाली. अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांसमवेत काही डॉक्टर्स आणि बाहेरच्या देशातील तीन इंग्लिश माणसे आली होती. त्यामागचे कारण आम्हाला नंतर कळले. ते असे, आम्ही फार आधुनिक आहोत. आम्ही काय करतो, हे प्रत्यक्षच पहा, हे त्यांना दाखवून द्यायचे होते.

 

५. समाधीच्या ठिकाणी तीन वेगवेगळी मीटर्स
(गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर, थर्मिस्टर बोलोमीटर आणि फ्रिक्वेन्सी मीटर रडार)
लावून नंतर समाधीवर तीन वेगवेगळ्या धातूंची आवरणे घालून
पाहिल्यावर प्रत्येक आवरणाच्या वेळी मीटरच्या रीडिंगमध्ये फरक आढळणे
अन् आवरण काढल्यावर ठराविकच (समाधीच्या आतील स्पंदनांचे) रीडिंग दाखवणे

आम्ही अंधश्रद्धा-निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या जमावाला दाराजवळ थोपवले आणि शांतपणे त्यांना सांगितले, तुम्हाला जे करावयाचे आहे, ते अवश्य करा. आम्ही तुम्हाला अडवणार तर नाहीच, उलट कुदळ फावडे घेऊन तुम्हाला तुमच्या कामात साहाय्य करणार आहोत. त्यांच्यातील डॉक्टरांकडे मी, मामा दांडेकर आणि डॉ. फाटक गेलो आणि त्यांना विनंती करून सांगितले, या समाधीवषयी आम्ही सांगतो, त्या पद्धतीने अगोदर प्रयोग करून पहा. समाधीवर झाकण्यासाठी मी जस्ताचे, पितळेचे आणि लोखंडाचे अशी तीन प्रकारची वेष्टणे आणली आहेत. आम्ही या ठिकाणी तीन मीटर्स ठेवलेले आहेत. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर ठेवून प्रत्येक मीटरवर काय दिसते, ते पहावयाचे आहे. तुम्ही पहाल, त्या वेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू. त्यांच्यातील दहाबारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना आम्ही गाभार्‍यात नेले आणि त्यांना माहिती देऊन आम्ही गाभार्‍याबाहेर निघून गेलो. आमच्यापैकी कोणीही तेथे थांबले नाही. त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून पाहिला. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर टाकले की, जो काटा काही प्रमाणात वर यायचा, तोच वेष्टण काढल्यावर एकच ठराविक रीडींग दाखवायचा. आम्ही तर आत नव्हतो. आम्ही काटा हलवण्याचा प्रश्‍नच येत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी मीटरला हातदेखील लावत नव्हते. मग काटा रीडींग का दाखवत होता ? आतील रीडिंग दाखविणारे चैतन्य, स्फुरण, स्पंदने कोठून आली ? आवरण घातल्यावर रीडिंग बंद का होते ? वेष्टण काढल्यावर रीडिंग का दाखवले ? त्यांना तीनही प्रकारची वेष्टणे घालून पहावयाला सांगितले होते. त्या प्रत्येक वेष्टणाच्या वेळी रीडिंगमध्ये वेगवेगळा फरक का येत होता ? यात कसलीही हातचलाखी नव्हती अथवा जादूटोणा नव्हता, हे त्यांच्या लक्षात आले.

 

६. ज्याप्रमाणे क्ष किरण दिसत नसले, तरी
त्यांच्यामुळे शरिराच्या आतील भागातील छायाचित्र
काढता येत असल्याने त्यांचे अस्तित्व कळते, तसे संजीवन समाधीतील
चैतन्य, ऊर्जा आणि स्पंदने दिसत नसली, तरी त्यांचे आस्तित्व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध होणे

शास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर आणि संजीवन समाधी म्हणजे काय, हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणी निश्‍चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. वेगवेगळ्या धातूंची वेष्टणे घातल्यावर त्या चैैतन्यलहरींना जो अडथळा निर्माण होतो, त्यामुळे प्रत्येक आवरणाच्या गुणधर्मानुसार निरनिराळ्या प्रकारची रीडींग्ज मीटरवर दिसतात. शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने त्यांच्या लक्षात आले की, चैतन्य दिसत नसले, तरी त्याचे अस्तित्व असते. अल्फा, गॅमा, बीटा, रडार, क्ष किरण इत्यादी दिसत नसले, तरी त्यांंचे अस्तित्व आपण नाकारत नाही. त्यांच्यामुळे होणारे परिणाम आपण दृश्य स्वरूपात पहातो. क्ष किरणांमुळे शरिराच्या आतील फोटो काढला जातो, हे दृश्य झाले. पण मग क्ष किरण दिसले नाही; म्हणून त्यास नाकारावे, याला अर्थच नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्यांनी न चुकता समाधीच्या दर्शनासाठी आळंदीस येऊ लागली. तीन परदेशी माणसांपैकी एकाने तर स्वतःला आळंदीला वाहून घेतले आहे. ही १९७२ सालातील घटना आहे.
जेव्हा विज्ञानाचा उपयोग काय, असा प्रश्‍न विचारला जातो, तेव्हा विज्ञानाचा सदुपयोग असाही होऊ शकतो, हे छातीठोकपणे सांगता येते. सर्वसामान्य माणसाला सहजपणे आणि सुलभपणे पटवून देण्यासाठी हा एक सोपा आणि सरळ मार्ग आहे. आळंदीप्रमाणे पंढरपूर, गाणगापूर, देहू ही चैतन्यमय आणि जागृत ठिकाणे आहेत.
– (पू.) डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल (अलख निरंजन दीपावली विशेषांक, २००७)