हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळाव्यात
सनातन संस्था चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे हिंदुना आवाहन  !

दीपप्रज्वलन करतांना ह.भ.प. राजीवजी झा महाराज, (मध्यभागी) श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. चेतन राजहंस

जळगाव – अनादी अनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळी भारतात ५६६ राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला. वर्ष १९७६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द घुसडले. भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते जळगाव येथील ला.ना. हायस्कूलमधील भैय्यासाहेब गंधे सभागृहात २ ऑक्टोबर या दिवशी आयोजित ‘हिंदूसंघटन मेळाव्या’त बोलत होते. मेळाव्याला ह.भ.प. राजीवजी झा महाराज, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापक स्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला जळगावसह जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने मेळाव्यास प्रारंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या गेल्या २० वर्षांतील कार्याचा परिचय आणि स्वसंरक्षक प्रात्यक्षिकांच्या ध्वनिचित्रफीती दाखवण्यात आल्या.

Leave a Comment