सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) ! (भाग २)

अनुक्रमणिका

भाग १ वाचण्यासाठी भेट द्या (भाग १)

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःमधील
कर्तेपणाची जाणीव होऊन ‘मिळालेली प्रत्येक सेवा स्वीकारायची’, असा मनाचा निश्चय होणे

एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘एका सेवेचे दायित्व तुला घ्यायचे आहे. याविषयी विचार करून मला सांग.’’ माझ्याकडील सेवांचा विचार करून मी त्यांना सांगितले, ‘‘मला ही सेवा जमणार नाही.’’ माझे वाक्य पूर्ण होताच त्या मला म्हणाल्या, ‘‘तू सेवा करणार असशील, तर तुला कोणतीच सेवा जमणार नाही; पण तुझ्या माध्यमातून देव सेवा करणार असेल, तर तू कोणतीही सेवा करू शकतेस. तुझी क्षमता आहे. तुझ्यात अभ्यास करण्याची क्षमता आहे. तू केवळ प्रयत्न वाढव.’’ त्यांच्या या वाक्याने मला माझ्यातील कर्तेपणा, माझी चूक आणि माझ्यातील संकुचितपणा याची जाणीव झाली. त्यानंतर केवळ त्यांच्या कृपेनेच ‘इथून पुढे कोणत्याही सेवेला नकार द्यायचा नाही’, असा पक्का निर्धार झाला आणि माझ्या मनात कधीच ‘मला सेवा जमणार नाही’, असा विचार आला नाही. यातून ‘संतांच्या एखाद्या वाक्यानेही मनातील अयोग्य विचार कसे नष्ट होतात ?’, हे मी अनुभवले. त्यानंतर कोणतीही सेवा करतांना ‘ती माझीच सेवा आहे’, या विचाराने करता येऊ लागली. या प्रसंगानंतर माझी समष्टी सेवेची तळमळ वाढायला आरंभ झाला.

 

८. आध्यात्मिक प्रगतीविषयी झालेली विचारप्रक्रिया

८ अ. आध्यात्मिक पातळीचा विचार मनात न येता,
‘सेवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आवडली असेल का ?’, असा विचार येणे

‘मी साधनेत दायित्व घेऊन सेवा करायला लागल्यापासून ‘सेवा अधिकाधिक कशी करता येईल ? सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढेल ? सेवा वेळेत पूर्ण होण्यासाठी काय प्रयत्न करू शकते ?’, यांसाठीचे प्रयत्न अधिक होऊ लागले. ‘सेवा करतांना परात्पर गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे प्रयत्न करायचे आहेत’, असा विचार अधिक असतो. ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, यापेक्षा ‘मी केलेली सेवा गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आवडली असेल का ? सेवा पाहून ते काय म्हणतील ?’, अशी माझी विचारप्रक्रिया अधिक असते.

८ आ. आध्यात्मिक पातळी न वाढल्यावर ‘स्वतः
कुठे न्यून पडत आहे ? कोणते प्रयत्न वाढवायला हवेत ?’, याचे चिंतन होणे

गुरुपौर्णिमा २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत माझी आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली होती. या कालावधीत अनेक साधक मला आध्यात्मिक प्रगतीविषयी विचारत असत. तेव्हा मी मनात म्हणायचे, ‘गुरुदेव, मला आध्यात्मिक पातळीत अडकायचे नाही. मला तुम्हाला अपेक्षित अशा हिंदु राष्ट्रासाठी घडायचे आहे.’ साधकांनी मला पातळीविषयी विचारल्यावर मला वाईट न वाटता माझ्याकडून ‘मी कुठे न्यून पडत आहे ? मी नेहमी कोणते प्रयत्न वाढवायला हवेत ?’, याचे चिंतन होत असे.

 

९. साधनेच्या प्रवासात स्वतःमध्ये जाणवलेले पालट

९ अ. आवड-नावड न्यून होणे

पूर्णवेळ साधना करायला लागण्याआधी माझ्या आवडी-नावडी पुष्कळ होत्या. आश्रमात रहायला गेल्यानंतर माझ्या आवडी-नावडी न्यून होऊ लागल्या.

९ आ. कधी कुठेही एकटीने प्रवास केलेला नसतांना सेवेसाठी एकटीने सहजतेने प्रवास करू शकणे

मी कधीच एकटीने प्रवास केला नव्हता. ‘रेल्वेने प्रवास कसा करायचा ?’ हेही मला ठाऊक नव्हते. मी साधनेत आल्यावर माझ्याकडे सेवेचे दायित्व आले. त्यानंतर मला सनातनच्या पनवेल, मिरज आणि रामनाथी (गोवा) येथील आश्रमांत, तसेच मंगळुरू आणि काही जिल्ह्यांतही सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने एकटीने प्रवास करतांना मला कधीही भीती वाटली नाही किंवा कुठली अडचणही आली नाही. ‘मी एकटीने प्रवास करत आहे’, असे मनाला कधी जाणवायचेही नाही. हे केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच मला अनुभवता आले.

९ आ १. प्रवासात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आवश्यक तिथे साहाय्य करत आहेत’, असे अनुभवता येणे

एकदा मी मंगळुरू ते पनवेल असा प्रवास प्रथमच रेल्वेने करत होते. समवेत असलेले अन्य प्रवासी कन्नड भाषिक होते. प्रवासात तिकीट तपासनिसाने (टी.सी.ने) मला काहीतरी विचारले; पण मला कन्नड भाषा येत नसल्याने मला ते कळले नाही. त्यामुळे मी केवळ ‘मुंबई’ एवढेच सांगितले. त्यानंतर संपूर्ण प्रवासात त्याने मला पुन्हा काही विचारले नाही. तेव्हाही मला कसली भीती वाटली नाही. ‘आवश्यक तो एक शब्दही गुरुदेवांनीच माझ्याकडून बोलून घेतला’, असे माझ्या लक्षात आले.

९ इ. नियोजनकौशल्य शिकता येणे

साधनेत येण्यापूर्वी मी कधीच कसलेही नियोजन केले नव्हते. साधनेत आल्यावर सेवांचे दायित्व येत गेले, तसे नियोजनकौशल्य वाढत गेले. पूर्वी एखाद्या सेवेचे नियोजन करतांना माझ्याकडून ‘सेवेचा आरंभ कधीपासून करायचा आणि त्यासाठीची पूर्वसिद्धता’ या गोष्टी पाहिल्या जायच्या. काही दिवसांनी ‘एखादी सेवा कधी चालू करायची ? त्यासाठी किती साधक उपलब्ध आहेत ?’, हे पाहून ती सेवा कधी पूर्ण होऊ शकेल ?’, याचा विचार करून नियोजन करणे जमू लागले. काही दिवसांनी मला प्रत्येक सेवेचे नियोजन अशा प्रकारे करता येऊ लागले. देवाच्या कृपेने केलेल्या नियोजनामध्ये कधी अडचण आली, तरी ती सेवा त्या वेळेतच पूर्ण होते’, असेही अनुभवता आले. गुरुकृपेने हे आत्मसात करता येत आहे.

९ ई. नियोजनातील पालट स्थिर राहून स्वीकारता येणे

१. एखाद्या साधकाला सेवा सांगितल्यानंतर त्याला काही अडचण आली किंवा अन्य काही कारणाने त्याच्यामध्ये पालट झाला, तर ताण न येता त्यावर उपाययोजना काढून ती सेवा पूर्ण करता येते.

२. काही वेळा तातडीने सेवेसाठी दुसऱ्या आश्रमात जावे लागते. अशा वेळीही ताण न येता अल्प वेळेत सर्व सिद्धता करायला जमू लागली आहे.

यातून ‘देवाने सर्व नियोजन आधीच केलेले असते. आपण केवळ सकारात्मक राहिलो, तर सर्व आपोआपच होते’, असे मला शिकायला मिळाले.

९ उ. स्वतःचा शारीरिक त्रास न स्वीकारता, तशाच स्थितीत सेवा करत रहाणे

काही वर्षांपूर्वी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर माझी परात्पर गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) भेट होत असे. तेव्हा ते माझ्या प्रकृतीची विचारपूस करायचे आणि सांगायचे, ‘‘अजून पुष्कळ सेवा करायची आहे. प्रकृतीकडे लक्ष द्यायला हवे.’’ तेव्हा मला ‘प्रकृतीकडे लक्ष द्यायचे म्हणजे काय ?’, हेच कळत नसे. आता मला मान आणि हात यांत वेदना होत असल्यामुळे शारीरिक सेवा करणे जमत नाही. माझ्या वेदनांचे प्रमाण वाढल्यावर सहसाधक मला विश्रांती घ्यायला सांगत असत; परंतु माझ्यातील अहंमुळे माझ्याकडून ते स्वीकारले जायचे नाही. त्याही स्थितीत मी सेवा करत रहायचे. त्यामुळे माझी पुष्कळ चिडचिड होत असे. आता माझा स्वतःच्या दुखण्याकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात पालट होऊ लागला आहे.

९ उ १. शारीरिक स्थिती स्वीकारून विश्रांती घेतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सेवेसंबंधीची काही सूत्रे सुचवत आहेत’, असे जाणवणे

आता मी आधुनिक वैद्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करत आहे. ‘मला होत असलेला त्रास म्हणजे माझ्या मागील जन्मींचे प्रारब्ध आहे’, हे लक्षात घेऊन मला तो त्रास पूर्णपणे स्वीकारता येत आहे. आता मी आवश्यक तेवढी विश्रांती घेते. ‘विश्रांती घेत असतांना मी कोणती सेवा करू शकते ?’, याचा विचार करून तसा प्रयत्न करते. विश्रांतीच्या वेळेत अधिकाधिक व्यष्टी साधनेचे प्रयत्न करते. असे प्रयत्न केल्याने आता त्रासाविषयी मला काही वाटत नाही. प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच माझ्यामध्ये हे पालट झाले. बऱ्याचदा विश्रांती घेत असतांना ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सेवेतील काही सूत्रे सुचवत आहेत’, असेही आता अनुभवता येते.

९ उ २. उजवा हात दुखण्याचे प्रमाण वाढल्यावर देवाने डावा हात वापरण्याचा विचार देणे आणि त्याचा पुष्कळ लाभ होणे

हळूहळू माझे उजव्या हाताचे दुखणे वाढले. मला उजव्या हाताने ‘माऊस’ वापरणे अशक्य झाले. आधुनिक वैद्यांनी मला एक मास पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितली; पण ज्या दिवशी आधुनिक वैद्यांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली, त्याच दिवशी एका संतांनी मला सेवेतील काही अक्षम्य चुकांची जाणीव करून देऊन त्या सुधारण्याचा निरोप पाठवला. ‘संतांनी म्हणजे श्री गुरूंनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) सांगितले आहे’, असा विचार होऊन ती सेवा करायलाच हवी’, या विचारात असतांनाच श्री गुरूंनीच मला डाव्या हाताने ‘माऊस’ वापरण्याचा विचार दिला. त्या दिवसापासून मी उजवा हात दुखू लागल्यावर डाव्या हाताने ‘माऊस’ वापरण्यास आरंभ केला. त्यामुळे गुरुकृपेने सेवेतील एक अडचण दूर झाली. मला त्याचा अजूनही लाभ होत आहे.

 

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अगाध कृपा !

१० अ. एका प्रसंगात ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप एकाग्रतेने होऊन प्रसंगाला न घाबरता सामोरे जाता येणे

वर्ष २००८ मध्ये माझे रामनाथी आश्रमात सेवेसाठी जाण्याचे नियोजन झाले. भगवंताच्या कृपेने तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्या साधनेला आरंभ झाला. त्यानंतर एका प्रसंगात माझा ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप अगदी एकाग्रतेने होत होता. त्यामुळे मला या प्रसंगाला न घाबरता सामोरे जाता आले. यापूर्वी मी कधीही ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप केला नव्हता आणि इतक्या एकाग्रतेने माझा नामजप कधीही झाला नव्हता. ‘हे कसे घडले  ?’, हे त्या सनातन संस्थेच्या निर्मात्यांनाच ठाऊक ! पूर्वी मला केवळ एकदाच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला होता; मात्र या प्रसंगानंतर माझी श्री गुरूंवरील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील) श्रद्धा वाढत गेली.

१० आ. सेवेविषयी पूर्ण अनभिज्ञ असतांना इतरांच्या चुकांमधून गुरुकृपेने सेवा शिकणे

‘माझ्याकडे एका सेवेचे दायित्व असले, तरी उत्तरदायी साधक सांगतील, ते प्रामाणिकपणे करणे’, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. माझे शिक्षण कला शाखेतून झाले असल्याने या सेवेतील अनेक बारकाव्यांचे मला थोडेसेही ज्ञान नव्हते किंबहुना ‘ती सेवा म्हणजे काय ?’, हेही मला ठाऊक नव्हते. अनेक साधक काही वर्षांपासून ही सेवा करत होते आणि त्या सर्वांमध्ये मी नवीन होते. काही दिवसांनी या सेवेतील चुका उत्तरदायी साधकांनी नियमितपणे लक्षात आणून देण्यास आरंभ केला. माझ्यासाठी हे सर्व नवीन असल्याने एक चूक म्हणजे या सेवेतील एक नवीन विषय मला समजत होता. अशा प्रकारे मला या सेवेतील अनेक विषय समजू लागले. जवळपास वर्षभर हे सर्व चालू होते. एका प्रकारे ही शुद्धीकरण प्रक्रियाच चालू होती. ‘यातून योग्य काय असायला हवे ?’, हे मला समजत होते. एका प्रकारे ही ‘श्री गुरूंची माझ्यावर पुष्कळ मोठी कृपाच होत होती’, हे आता माझ्या लक्षात येते.

 

११. आश्रमातील फलकावर सेवेच्या चुकांविषयी चौकट
लिहिलेली वाचून सेवा चांगली करण्याचा मनाचा निश्चय होणे

आमच्या सेवेतील चुकांविषयी आश्रमातील फलकावर अनेक चुकांच्या चौकटी लागत असत. यामध्ये एकदा ‘ईश्वरी राज्यात अशा चुका करणारे साधक नसतील’, अशा आशयाची चौकट लागली होती. त्यातील चुका आणि त्याचे परिणाम मला फारसे कळले नव्हते; मात्र चौकटीचा मथळा माझ्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम करून गेला. ‘ईश्वरी राज्यात ‘असे साधक’ असतील, अशी चौकट लागायला हवी’, असा विचार मनात येऊन गेला. त्यासाठी माझ्याकडून ‘प्रामाणिकपणे आणि उत्तरदायी साधक सांगतील, तसे प्रयत्न करायचे’, असा निश्चय आपोआप झाला. ‘हा विचार देणारे गुरुदेवच होते’, हे आता अनुभवता येत आहे. याविषयी मी कधी कुणाला काही बोलले नव्हते. पुढे काही दिवस अधून-मधून मला वरील विचाराची आठवण यायची. त्यानंतर मी तो विचार पूर्णपणे विसरून गेले. १०.३.२०२२ या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याशी बोलतांना मला वरील विचाराची आठवण झाली. त्यांनीच ‘हे सूत्र लिहून द्यायला हवे’, हे माझ्या लक्षात आणून दिले.’

 

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याची आलेली प्रचीती !

१२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा माझ्या सेवेसाठी झालेला संकल्प !

काही दिवसांनी उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘रत्नमालासह अन्य दोन साधिका काही सेवांचे दायित्व पहातील.’ त्या वेळी ‘मी उत्तरदायी सेवक म्हणून सेवा पहायची आहे’, हे माझ्या लक्षात आले नाही. असे असले, तरी ‘सेवा कधी आणि कशी चालू झाली ?’, ते माझ्या लक्षातही आले नाही. पूर्वी एकदा आम्ही काही साधक परात्पर गुरुदेवांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) काही कारणानिमित्त गेलो होतो. तेव्हा परात्पर गुरुदेव आजारी असल्याने झोपून होते. त्यांच्याशी माझी ओळख करून दिल्यावर ते म्हणाले, ‘‘आता सर्व हीच पहाणार ना !’’ त्यांच्या या वाक्याचा अर्थ मला तेव्हाही कळला नव्हता किंवा ‘त्यामध्ये काहीतरी वेगळे आहे’, हे तेव्हाही माझ्या लक्षात आले नव्हते; मात्र ‘आजही माझ्याकडून ज्या सेवा ते सूक्ष्मातून करवून घेत आहेत, त्या सेवा मी करत नसून त्यांचा संकल्पच करत आहे’, हे मी क्षणोक्षणी अनुभवत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यामुळे साधक जेव्हा मला विचारतात, ‘‘तुला हे सर्व कसे जमते ?’’, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार येतो आणि तो म्हणजे ‘श्री गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) संकल्प !’

कुठलीही सेवा असली, तरी माझा ‘ती प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातील आनंद घ्यायचा’, एवढाच विचार असतो.

१२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘कुठलीही सेवा त्या त्या दिवशी पूर्ण
व्हायला हवी’, असे सांगितल्यावर त्या दिशेने प्रयत्न करण्याचा निश्चय होणे

एकदा परात्पर गुरुदेव म्हणाले होते, ‘‘कुठलीही सेवा त्याच दिवशी पूर्ण व्हायला हवी.’’ इथेच गुरुदेवांचा संकल्प झाला. गुरुदेवांचे हे वाक्य माझ्या मनात पुष्कळ खोलवर रुजले आणि मी त्या दिशेने प्रयत्न करायचा निश्चय केला. प्रत्यक्षात ही गोष्ट पुष्कळ कठीण होती; परंतु तरीही तेव्हा माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला नाही किंवा मला ताणही आला नाही. गुरुदेवांनी दिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले. ‘आजही काही कारणाने सेवा प्रलंबित रहात आहे’, असे माझ्या लक्षात आले, तर परात्पर गुरु डॉक्टरांच्या वरील वाक्याची आठवण येऊन ‘अजून काय प्रयत्न करायला हवेत ?’, असा विचार येतो आणि ‘काय करायला हवे ?’ हेही तेच मला आतून सुचवतात.

 

१३. सेवेची व्याप्ती वाढणे आणि देवानेच त्या सेवा करून घेण्याचे बळ दिल्याची प्रचीती येणे

१३ अ. सेवांची वाढलेली व्याप्ती आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे सेवांचा ताण येणे

वर्ष २०१४ मध्ये सेवेच्या अंतर्गत कार्यपद्धतीमध्ये पालट झाले. त्यामुळे माझ्या सेवेची व्याप्ती पुष्कळ वाढली. त्याच काळात सेवा करणारे दोन साधक त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे घरी गेले. ‘सेवेची वाढलेली व्याप्ती आणि अपुरी साधकसंख्या’ यांमुळे ‘सेवा वेळेत कशी पूर्ण होणार ?’, हा विचार आणि माझ्यातील कर्तेपणा यांमुळे मला पुष्कळ ताण आला. माझ्या मनात ‘पूर्वीप्रमाणे चुका व्हायला नकोत’, ही भीतीही होती.

१३ आ. एका संतांच्या कृपेने त्यांच्याशी बोलल्यावर ताण न्यून होणे अन् सेवांची घडीही बसणे

याच सुमारास एका संतांनी या सेवेचा आढावा घ्यायला आरंभ केला. मला सेवेचा ताण आल्यावर मी लगेचच त्या संतांना लघुसंदेश पाठवत असे. संत माझ्याशी बोलल्यावर माझा ताण न्यून होत असे. ‘असे करतांना वर्षभरात त्या नवीन कार्यपद्धतीची घडी कशी बसली ?’, हे मला कळलेही नाही. ही केवळ त्या संतांचीच कृपा होती.

१३ इ. वर्ष २०१६ मध्ये उत्तरदायी साधकांनी अजून एक सेवा करायला सांगणे
आणि ‘ती कशी करायची ?’, तेही सांगितल्यामुळे सेवेचा ताण न येता सेवा होऊ लागणे

वर्ष २०१६ च्या शेवटी उत्तरदायी साधकांनी मला अजून एक सेवा करायला सांगितली. ही सेवाही माझ्यासाठी नवीन होती. एका संतांनी मला या सेवेची कार्यपद्धत घालून दिली आणि ‘ती सेवा कशी करायची ? त्या सेवेचा आढावा कसा द्यायचा ?’, हेही त्यांनीच मला शिकवले. त्यामुळे मला त्या सेवेचा किंचित् ही ताण आला नाही किंवा माझ्या मनात ‘मला जमेल का ?’, असा विचारही आला नाही.

 

१४. ‘रामनाथी येथे येऊन संतांना या सेवेचा आढावा द्यायचा आहे’, असे
एका संतांनी सांगितल्यावर ‘संतांना भेटता येणार’, याचाच मला अधिक आनंद होणे

त्या संतांनी मला सांगितले, ‘‘प्रत्येक २ – ३ मासांनी रामनाथी (गोवा) येथे येऊन या सेवेचा आढावा द्यायचा. श्री गुरूंच्या कृपेने मिळालेल्या सेवेचा लाभ करून घे.’’ या सेवेपेक्षा ‘मला संतांकडे जायला मिळणार’, याचाच मला फार आनंद झाला होता.

 

१५. सर्वसामान्य जिवांकडूनही योग्य सेवा करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आरंभी मी सेवेच्या अंतर्गत ‘साधकांच्या सेवांचे समन्वय आणि सेवांचे नियोजन करणे’ या सेवा करत होते. वर्ष २०२१ पासून माझ्यावरील सेवेचे दायित्व वाढल्यावर खऱ्या अर्थाने मला श्री गुरूंची कृपा अनुभवता येऊ लागली. या सेवेसंबंधी मला कसलाही अनुभव नसतांना ‘ही सेवा करणे’ ही माझ्यासाठी अशक्यच गोष्ट होती; मात्र ‘गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली काहीच अशक्य नाही’, हे माझ्या प्रकर्षाने लक्षात आले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य जिवाकडूनही गुरुदेव ही कठीण सेवा करवून घेत आहेत.

यातून ‘गुरुदेवांचा शब्द किंवा संकल्प यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?’, हे मला अनुभवता येत आहे.

(‘संस्थेतील अनेक साधक ही अनुभूती घेत आहेत. साधकांचे शिक्षण, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांमध्ये असामान्य क्षमता निर्माण करून अशक्यप्राय वाटणारी सेवाही त्यांच्याकडून लीलया करवून घेतात.’ – संकलक)

 

१६. कुटुंबियांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी पूर्णवेळ साधनेला आरंभ केल्यापासून आतापर्यंत देवाच्या कृपेने मला घरातून कधीच विरोध झाला नाही. ‘मी घरी यावे’, यासाठीही कुटुंबियांनी कधी आग्रह केला नाही. काही अवघड प्रसंगांच्या वेळी मी आश्रमात होते, तेव्हाही कुटुंबियांनी कोणतेही गाऱ्हाणे केले नाही किंवा मला घरी बोलावले नाही. माझ्या कुटुंबियांनी मला केलेल्या साहाय्यामुळेच आज मी साधनारत आहे. यासाठी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता !’

– (पू.) कु. रत्नमाला दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment