उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

अनुक्रमणिका

तीव्र प्रारब्धभोग आनंदाने भोगले ।
भाव अंतरीचा, गुरूंनीच यातून तारले ।।
‘अनुसंधान’ हेच साधनेचे खरे मर्म जाणले ।
पू. मालखरेआजीरूपी संतपुष्प गुरुचरणी स्थिरावले ।।

पू. (श्रीमती) सुलभा मालखरे

देवद (पनवेल) – येथील सनातनच्या आश्रमातील उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातन संस्थेच्या १३६ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. हा भावसोहळा २३ नोव्हेंबर २०२५ ला देवद आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी पू. आजींची सेवा करणारे आणि त्यांच्या संपर्कातील साधक उपस्थित होते. सर्वच साधकांना पुष्कळ आनंद झाला.

१. असे उलगडले पू. मालखरेआजींच्या संतत्वाचे गुपित !

देवद आश्रमात एका अनौपचारिक सत्संगात पूर्णवेळ सेवा करणारे आणि आश्रमात वास्तव्य करणारे वयस्कर साधक ‘वय किंवा शारीरिक त्रास यांचा विचार न करता झोकून देऊन साधना कशी करतात ?’, याविषयी सांगत होते. त्या वेळी श्रीमती सुलभा मालखरेआजी यांनीही त्यांच्या पूर्वायुष्यातील कठीण आणि खडतर प्रसंगांत साधनेचे प्रयत्न कसे केले ?, तसेच प्रारब्धभोग आनंदाने कसे भोगले ?, यांविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव सांगितले. ‘परात्पर गुरुदेवांनीच मला सनातनच्या आश्रमात आणले आणि त्यांनीच माझ्या जीवनाचे कल्याण केले’, असेही आजींनी सांगितले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. आजी म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत माझ्याकडून देवाला अपेक्षित अशी साधना किंवा सेवा झाली नाही. आताही मी केवळ नामजपच करते.’’

यानंतर पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आजींविषयीचा संदेश वाचून दाखवला आणि मालखरेआजी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. ‘संत’ झाल्याचे समजताच पू. आजींना पुष्कळ आनंद झाला.

 

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आजींविषयीचा संदेश

जीवनाची खडतर वाट चालतांना ‘अतूट श्रद्धा, अल्प अहं अन् स्वतःला पालटण्याची तळमळ’ आदी गुणांद्वारे सनातनच्या १३६ व्या संतपदी विराजमान झालेल्या देवद आश्रमातील श्रीमती सुलभा मालखरे (वय ८४ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मूळच्या धाराशीव येथील श्रीमती सुलभा मालखरे यांचे पूर्वायुष्य पुष्कळ खडतर गेले. त्यांना जीवनात अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. ‘देवच यातून तारणार’, या दृढ श्रद्धेने आजी धीरोदात्तपणे त्या प्रसंगांना सामोर्‍या गेल्या.

वर्ष २००३ मध्ये त्यांना सनातन संस्थेची माहिती अवगत झाली आणि त्यांनी व्यष्टी-समष्टी साधना करण्यास आरंभ केला. साधनेची तळमळ असल्याने उतारवयात, म्हणजे वर्ष २०१९ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी आजी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात रहायला आल्या. खरेतर वृद्धापकाळी स्वतःत पालट करण्याची इच्छा न्यून होत जाते; पण आजींनी आवडी-निवडींना मुरड घालून प्रयत्नपूर्वक आश्रमाचे रहाणीमान स्वीकारले आणि आश्रमजीवनाशी समरस झाल्या. ‘उत्साह, तत्त्वनिष्ठता, साधनेची तळमळ आणि भाव’ यांमुळे ‘तरुण साधकांनाही जमणार नाही, असे पालट’ त्यांनी स्वतःमध्ये केले. त्यांचा संपूर्ण दिनक्रम शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असतो. दिवसभर आजी तळमळीने नामजप करतात. त्यांना ‘शिवण, पाककला, गायन’ इत्यादी कलांची आवड असून प्रत्येक क्षण त्या आनंदाने जगतात. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचेच अध्यात्मीकरण केले आहे.

निर्मळ मन, स्वावलंबी, तत्त्वनिष्ठता, अल्प अहं आणि सतत देवाच्या अनुसंधानात असलेल्या श्रीमती सुलभा मालखरेआजी यांनी तीव्र प्रारब्धावर मात करून वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. साधनेची तीव्र तळमळ असलेल्या आजींची शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती होत आहे. आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘व्यष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या १३६ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.

‘पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी यांची पुढील प्रगतीही जलद गतीने होवो’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.११.२०२५)

 

३. शिष्यभावाने साधना केल्याने पू. आजी संतपदी पोचल्या ! – पू. (सौ.) अश्विनी पवार

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

मालखरेआजी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. तेव्हापासून त्या प्रत्येक ४ – ५ महिन्यांनी ‘मी साधनेत काय प्रयत्न करू ?’, असे मला विचारायच्या. मी त्यांना प्रयत्नांच्या संदर्भात सांगितल्यावर आजी त्याच क्षणापासून प्रयत्नांना आरंभ करायच्या आणि पुन्हा ४ महिन्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा द्यायच्या. असे प्रयत्न करणे, हे खरे शिष्यत्व होय. आजींनी शिष्यभावातून साधना केल्याने त्या संतपदी पोचल्या.

पू. आजी मायेच्या पलीकडे गेल्या आहेत. त्या बोलत असतांना आनंद जाणवतो. हा अंतर्मनाचा आनंद आहे. निर्मळता, सहजता, मोकळपेणा, तत्त्वनिष्ठता आदी सर्व दैवी गुण त्यांच्यात आहेत, असे जाणवते.

 

४. संतसोहळ्याच्या वेळी वातावरणात अनुभवलेला वैशिष्ट्यपूर्ण पालट !

संतसोहळा चालू झाल्यावर सोहळ्याच्या कालावधीत सर्वांनाच पुष्कळ आनंद अनुभवण्यास येत होता. तेथे आनंदाची स्पंदनेच जाणवत होती. पू. आजींच्या बोलण्यातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचेही उपस्थित साधकांना जाणवले.

संतपदाची आनंदवार्ता सांगणारा फलक वाचतांना पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी, समवेत पू. (सौ.) अश्विनी पवार

५. क्षणचित्रे

१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी यांचा सन्मान केला. सन्मानानंतर पू. (सौ.) अश्विनी पवार या पू. आजींच्या चरणी नतमस्तक झाल्या.

२. संपूर्ण सोहळ्यात पू. आजींचा मोकळा स्वभाव आणि सहजतापूर्ण बोलणे यांमुळे वातावरणात पुष्कळ हलकेपणा जाणवत होता.

३. पू. आजींच्या वाक्यांमधून मधे मधे त्यांच्यातील बालकभावाचे दर्शन होत होते.

६. पू. (श्रीमती) सुलभा मालखरे यांनी साधकांना दिलेला संदेश !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सूत्रे आचरणात आणा आणि ‘संत’ व्हा !

७. प.पू. गुरुमाऊलींनी माझ्या जन्माचे कल्याण केले ! – पू. मालखरेआजी

संत म्हणून घोषित केल्यावर पू. आजींनी व्यक्त केलेले मनोगत !

माझ्यावर गुरुदेवांची पुष्कळ कृपा झाली. मला आनंद झाला. प.पू. गुरुमाऊलींनी माझ्या जन्माचे कल्याण केले. सर्व काही त्यांनीच मला शिकवले आहे. मी तर काहीच केले नाही.

मी साधनेत येण्यापूर्वी गुरुदेवांनीच मला सर्व काही दिले आणि त्यांनीच मला सांभाळले. त्यामुळे त्यांचेच त्यांना अर्पण म्हणून मी माझ्याकडील धन संस्थेच्या कार्याला अर्पण केले आहे.

 

८. पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी सांगितलेली पू. (श्रीमती) सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे) यांची गुणवैशिष्ट्ये

८ अ. उच्चभ्रू कुटुंबातून आल्या असूनही सर्वांमध्ये मिसळणे

‘पू. मालखरेआजी मूळच्या धाराशिव येथील आहेत. त्या उच्चभ्रू कुटुंबातून आल्या आहेत. त्यांच्या घरात कामाला गृहकृत्य साहाय्यक होते. काही वर्षांपूर्वी पू. आजी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाजवळील सनातन संकुलात रहायला आल्या. तेथेही त्यांच्या घरातील सर्व कामे करण्यासाठी गृहकृत्य साहाय्यक होते. त्या उच्चभ्रू कुटुंबातून आल्या असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधी त्याचा उल्लेख नसतो. त्या सर्वांमध्ये मिसळतात.

८ आ. स्वीकारण्याची वृत्ती

वर्ष २०१९ मध्ये आजी त्यांच्या संकुलातील घरातून आश्रमात रहायला आल्या. त्या वयाच्या ८० व्या वर्षी आश्रमातील लहान खोलीत साधिकेच्या समवेत राहू लागल्या. या वयात त्यांनी हे सर्व स्वीकारणे, ही फार मोठी गोष्ट आहे.

८ इ. धर्माभिमानी

पू. आजींचे वडील प्रखर धर्माभिमानी होते. पू. आजींनाही पुष्कळ धर्माभिमान आहे. त्या अन्य धर्मियांच्या दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करत नाहीत.

८ ई. प्रांजळपणा

एकदा मी पू. आजींना भेटायला त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांच्या खोलीतील भिंतींवर पू. आजींच्या हातातील एक वस्तू लागून १ – २ ओरखडे उमटले होते. तेव्हा आजींनी ते ओरखडे मला दाखवले आणि सांगितले, ‘‘हे ओरखडे माझ्यामुळे उमटले आहेत. ही माझी चूक आहे.’’

८ उ. मनाची निर्मळता

पू. आजींचे मन निर्मळ आहे. त्यांच्या मनात कुणाविषयी कधीच गार्‍हाणे किंवा नकारात्मकता नसते.

८ ऊ. इतरांचा विचार करणे

पू. आजी देवद आश्रमात रहायला आल्यावर पहाटे ५ वाजता उठत असत. त्यांच्या खोलीतील साधिकेने त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही पहाटे ५ वाजता उठल्याने माझी झोपमोड होते. तुम्ही पहाटे ५.३० वाजता उठलात, तर चालेल का ?, म्हणजे मला अर्धा घंटा जास्त वेळ झोपायला मिळेल.’’ पू. आजींनी ते त्वरित स्वीकारले आणि त्या सकाळी ५.३० वाजता उठू लागल्या.

८ ए. जिज्ञासू वृत्ती आणि आध्यात्मिक उन्नती होण्याची तळमळ

पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित झाल्यापासून आतापर्यंत (वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत) त्या त्यांना साधनेविषयी असलेला प्रत्येक प्रश्न एका कागदावर लिहून ठेवतात. त्यांची आणि माझी (पू. (सौ.) अश्विनी पवार यांची) भेट झाल्यावर त्या मला प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतात. काही वेळा त्या शंकानिरसन करून घेण्यासाठी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेत असत.

८ ऐ. चुकांविषयी संवेदनशील

आजींकडून एखादी चूक झाली असेल आणि त्यांना ‘ती गंभीर चूक आहे’, असे वाटत असेल, तर त्या मला बोलावून घेतात आणि स्वतःची चूक सांगतात. मगच त्यांना शांत वाटते. अन्य साधिकांच्या संदर्भातही काही चुका झाल्यास आजी त्यांची क्षमा मागतात.

८ ओ. तत्त्वनिष्ठता

पू. आजी त्यांच्या खोलीतील साधिकांच्या चुका त्यांना तत्त्वनिष्ठतेने सांगतात. तसेच उत्तरदायी साधकांनाही सांगतात.

८ औ. त्याग

पू. आजींनी त्यांचे संकुलातील घर साधकांना सेवा करण्यासाठी वापरायला दिले आहे.

८ अं. स्वतःला पालटण्याची तळमळ

८ अं १. स्वयंसूचना घेऊन भूतकाळातील विचारांवर मात करणे

पू. आजींना एक नात (मुलीची मुलगी) आहे. त्यांचे अन्य नातेवाईक आता हयात नाहीत. पूर्वी पू. आजींना एकटेपणा वाटून त्या भूतकाळातील विचारांमध्ये अडकत असत. त्यांनी स्वयंसूचना घेऊन त्यावर मात केली. आता त्या आनंदी आहेत.

८ अं २. चुकांची जाणीव करून दिल्यावर त्यावर प्रयत्न करून स्वभावदोषांवर मात करणे

पू. आजी आश्रमात आल्यावर आरंभी त्यांच्या बोलण्याने साधिका दुखावल्या जायच्या. पू. आजींना त्यांच्या स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर त्यांनी प्रयत्न करायला आरंभ केला. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षानंतर स्वयंसूचना घ्यायला आरंभ केला आणि स्वतःच्या स्वभावदोषांवर मात केली.

९. श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणे

या वयात नातेवाइकांच्या आधाराची आवश्यकता असते; मात्र पू. आजींनी भावनांवर मात केली. त्या श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असतात.

१०. पू. आजींकडे पाहून प्रसन्न वाटणे

पू. आजींकडे पाहून प्रसन्न वाटते. त्यांच्या सहवासात आनंद मिळतो.’

– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, पनवेल. (२३.११.२०२५)

 

Leave a Comment