सुप्रसिद्ध कोकणी आणि मराठी कवी श्री. महेश पारकर यांचा सनातनच्या रामनाथी आश्रमात साजरा झालेला वाढदिवस अन् आश्रम पाहिल्यावर उपस्थितांच्या मनातील सनातन संस्थेविषयीचे अपसमज दूर होऊन सनातन संस्थेच्या कार्याची त्यांना झालेली खरी ओळख !

सुप्रसिद्ध कोकणी आणि मराठी कवी, तसेच हिंदुत्वनिष्ठ विचारवंत श्री. महेश पारकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा (६० वा वाढदिवस) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १४.७.२०१९ या दिवशी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्री. पारकर यांचे नातेवाईक आणि समाजातील मान्यवर परिचित आश्रमात आले होते. कार्यक्रमानंतर त्या सर्वांनी आश्रम पाहिला आणि आश्रमात चालणार्‍या धर्मप्रसार कार्याची माहिती करून घेतली. आश्रम पाहिल्यानंतर नातेवाईक आणि आप्तेष्ट यांनी श्री. पारकर यांच्याजवळ आश्रम अन् सनातन संस्थेचे कार्य यांविषयी कौतुकोद्गार काढले. त्यातून ‘या कार्यक्रमामुळे त्यांच्या मनातील सनातन संस्थेविषयीच्या शंकांचे काही प्रमाणात निरसन झाले’, असे श्री. पारकर यांच्या लक्षात आले. ‘सनातन संस्थेचे कार्य समाजात सर्वत्र पोचणे अत्यंत आवश्यक आहे’, या तळमळीपोटी श्री. पारकर यांनी पुढील विचार व्यक्त केले.

‘सनातन संस्थेच्या पवित्र वास्तूमध्ये माझा सत्कार सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याने मला अतीव समाधानाची अनुभूती दिली. माझे बहुतांश सगेसोयरे (नातेवाईक) आणि आप्तेष्ट या सोहळ्यानिमित्त एकत्र आलेे, तसेच सनातन संस्थेचे अनेक साधक अन् मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यामुळे मला विशेष आनंद झाला.

श्री. महेश पारकर

 

१. सनातन संस्थेविषयी निर्माण केलेल्या अपसमजांमुळे
नातेवाइकांच्या मनात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली असणे

माझ्या आप्तेष्ट मंडळींपैकी कोणीही या आधी आश्रमाच्या वास्तूत प्रवेश केला नव्हता. सनातन संस्था आणि तिचे संघटनात्मक कार्य यांविषयी प्रत्येकाच्या मनात अनेक समज अन् अपसमज होते. आपल्या सभोवतालच्या समाजात म्हणा किंवा अखिल भारतीय पातळीवर म्हणा, ज्या प्रकारे सनातन संस्थेविषयी नकारात्मक प्रतिमा बनवली गेली आहे, तशीच प्रतिमा उपस्थित सग्यासोयर्‍यांच्या मनात ठामपणे निर्माण झाली होती.

 

२. समाजात गडबड-गोंधळाच्या वातावरणात होणारे कार्यक्रम आणि
आश्रमात शांत, शिस्तबद्ध अन् आपुलकीच्या वातावरणात झालेला कार्यक्रम
यांतील भेद उपस्थितांच्या लक्षात येऊन त्यांच्या मनातील शंकाकुशंका दूर होणे

आश्रमात प्रवेश करतांना आश्रमातील शिस्त आणि टापटीपपणा यांचा अनुभव प्रत्येकालाच आला. वाहने व्यवस्थित ठेवणे, वहाणा योग्य ठिकाणी ठेवणे, यांपासूनच याला आरंभ झाला. भारावलेल्या स्थितीतच प्रत्येकाने आश्रमाच्या सभागृहात प्रवेश केला आणि प्रवेश करताक्षणी ‘आश्रम म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार आहे’, अशी त्यांच्या मनाची स्थिती झाली. इतर कुठेही आणि कसलाही कार्यक्रम असला की, सगळा गोंधळ अन् गडबड असण्याची सवय झालेल्या या नवीन लोकांना सभागृहातील प्रसन्न वातावरणाने कमालीचे धक्के दिले. प्रत्यक्ष सोहळा चालू झाल्यावर ‘आपण काहीतरी वेगळे बघत आहोत आणि अनुभवत आहोत’, अशीच भावनिक प्रतिक्रिया त्यांंच्या तोंडवळ्यावर दिसत होती. विशेषतः ज्या आपुलकीने आणि आदराने सनातन संस्थेचे स्वयंसेवी साधक येणार्‍या आप्तजनांसमवेत वावरत होते, त्यांना समारंभस्थळी आपुलकीने आणून त्यांची विचारपूस करत होते, त्यामुळे अनेकांच्या मनातील शंकाकुशंका त्याच क्षणी संपल्या.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य आणि आश्रमातील
वातावरण यांचा सकारात्मक परिणाम सग्यासोयर्‍यांवर होत असल्याचे जाणवणे

‘सनातनच्या रामनाथी आश्रमातील सभागृहात होणारा प्रत्येक कार्यक्रम चैतन्यमय वातावरणातच होतो’, याचा अनुभव मी नेहमीच घेतला आहे. प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आश्रमात असल्यामुळे ‘आश्रमाचा कुठलाही भाग हा त्याच चैतन्याचा एक भाग आहे’, याचा अनुभव मी प्रत्येक वेळी घेतला आहे. ‘पहिल्यांदाच आलेल्या माझ्या सगळ्याच सग्यासोयर्‍यांवर या वातावरणाचा परिणाम सकारात्मक पद्धतीने होत आहे’, अशी अनुभूती मला प्रत्येक क्षणी येत होती.

 

४. अनावश्यक गोष्टींना फाटा देत साजरा
झालेला वाढदिवस म्हणजे उपस्थितांसाठी वेगळा अनुभव !

नंतर प्रार्थना आणि श्‍लोकपठण यांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला आरंभ झाला. सुवासिनींनी वाढदिवसानिमित्त माझे औक्षण केले. उपस्थितांसाठी हा वेगळाच अनुभव होता. विशेष म्हणजे अनावश्यक गोष्टींना फाटा देत प्रत्येक गोष्ट नेमकेपणाने करण्याची सनातन संस्थेतील कार्यक्रमांची पद्धत उपस्थितांवर योग्य परिणाम करून गेली.

 

५. आधुनिक यंत्रप्रणाली आणि पारंपरिक आचारपद्धत यांची उत्तम
सांगड घालून चालू असलेले आश्रमातील कामकाज पाहून सर्वांना अचंबा वाटणे

सर्व अनुभवांचा परमोच्च बिंदू म्हणजे रामनाथी आश्रम पाहणे ! सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांच्या दृष्टीने ‘आश्रम पाहणे’ हा तसा अनावश्यक भाग होता; परंतु संपूर्ण कार्यक्रमातील भावपूर्ण वातावरणाचा परिणाम असा झाला असावा की, सग्यासोयर्‍यांपैकी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने आश्रम पाहिला. त्यांनी प्रत्येक ठिकाणी चाललेल्या कार्याची, तसेच धर्मजागृती आणि धर्मसंघटन यांच्या दृष्टीने चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती चिकित्सक बुद्धीने जाणून घेतली. आधुनिक यंत्रप्रणालींच्या आधारे आश्रमातील कामकाज व्यवस्थित चालले आहे. आधुनिकता आणि पारंपरिक आचारपद्धत यांची योग्य सांगड घालून, तसेच मुख्यतः शिस्तबद्ध रितीने ‘आश्रमातील सर्व दैनंदिन व्यवहार कसे चालतात ?’, हे समजून घेणे माझ्या तमाम हिंदु धर्मीय सग्यासोयर्‍यांना धक्कादायक असेच होते. याचे कारण ‘हिंदु धर्म म्हणजे बुरसट आचारविचारांनी भरलेला, तसेच त्याच त्याच कर्मकांडांचे कमालीचे ओं गळवाणे मिश्रण असलेला’, अशा पारंपरिक धारणांना छेद देणारी आश्रमांतील आधुनिक कार्यप्रणालीने युक्त अशी सर्व यंत्रणा बघून ‘ते सर्वजण कमालीचे अचंबित झाले’, हे मी बघितले. त्यांच्यासमवेत झालेल्या वार्तालापातून मी ते अनुभवले.

 

६. स्वतःला विचारवंत समजणार्‍या आणि बुद्धीवादाचा अहंकार बाळगणार्‍या
समाजातील लोकांनी चिकित्सक अन् संशोधक दृष्टीने सनातनचे कार्य समजून घेणे आवश्यक !

आज आपल्या समाजात स्वतःला विचारवंत समजणारे आणि बुद्धीवादाचा अहंकार बाळगून हिंदु धर्मावर सतत आसूड ओढणारे पत्रकार अन् लेखक मोठ्या संख्येने आहेत. त्यांची मानसिकता आणि आश्रमात प्रवेश करण्यापूर्वीची माझ्या सग्यासोयर्‍यांची अवस्था यांमध्ये विशेष भेद नव्हता. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, आश्रमातील एकंदर शिस्त बघून सर्वजण भारावून गेले होते. ‘हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्या सर्वांगीण अन् नैतिक प्रगतीसाठी अशाच प्रकारच्या वातावरणाची आवश्यकता आहे’, असे त्यांनी बोलून दाखवले.

एकंदर व्यवहार, तसेच आदर्शवत यंत्रणा यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे जी गोष्ट माझ्या सग्यासोयर्‍यांच्या संदर्भात घडली, त्याच प्रकारे ‘हिंदु समाज आणि आश्रमाविषयी विनाकारण आकस बाळगणारे बुद्धीवादी म्हणवणारे विचारवंत यांचीही होऊ शकते’, असे मला वाटले. आजवर या लोकांनी आश्रमातील कामकाजाचे प्रत्यक्ष दर्शन कधीच घेतलेले नाही किंवा चिकित्सक आणि संशोधक दृष्टीने ते जाणून घेऊन अभ्यासण्याचाही कधीच प्रयत्न केला नाही. अशाने ‘त्यांच्या मनातील अपसमज कधीतरी दूर होतील का ? त्यांचे प्रत्यक्ष निराकरण होईल का ?’

‘‘आश्रम पाहून भारावल्यासारखे झाले’, ‘हे एवढे कार्य येथे चालू आहे, हे आम्हाला ठाऊकच नव्हते. ‘आपल्या हिंदु धर्माच्या प्रगतीसाठी हे कार्य चालले आहे’, हे बघून फार चांगले वाटले. ‘सनातन विषयी आम्ही आधी काय काय (नकारात्मक) ऐकले होते’ अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही ऐकायला मिळाल्या. अनेकांच्या मनातील या सहज प्रतिक्रियाच होत्या. त्या ऐकून मी एका बाजूने हसत होतो, तर दुसर्‍या बाजूने अस्वस्थ झालो होतो.

 

७. सनातन संस्थेविषयीचे अपसमज दूर करून समाजाला हिंदु धर्म आणि
हिंदु धर्मीय यांच्यासाठी चाललेल्या महान कार्याची ओळख करून देणे आवश्यक !

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझे आप्तेष्ट आणि सगेसोयरे यांच्या शंकांचे निरसन काही अंशी झाले. हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यासाठी चाललेल्या या महान कार्याचे ओझरते का होईना, त्यांना दर्शन घडले ! एवढा मोठा आश्रम आणि सनातन संस्था अन् त्यांच्या चांगल्या प्रयत्नांकडे कलूषित आणि प्रदूषित दृष्टीकोनातून बघणारे समाजातील आपले बांधव ! ‘त्यांच्या मनातील संस्थेविषयीची जळमटे दूर सारण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करायला हवेत’, ही जाणीव मला या माझ्या छोट्याशा प्रयत्नानंतर प्रकर्षाने जाणवली. ‘परात्पर गुरु डॉक्टरच आम्हा साधकांकडून तसे प्रयत्न करून घेतील’, ही भावना मात्र माझ्या मनात दृढ होत आहे.’

– श्री. महेश पारकर, साहित्यिक, शिरोडा, गोवा.

Leave a Comment