स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये

Article also available in :

वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्मप्रसार करून
आदर्श समाजच्या निर्मितीसाठी कार्यरत सनातन संस्था !

१. स्थापना

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना २२.३.१९९९ मध्ये केली.

२. श्रद्धास्थाने

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सद्‍गुरु इंदूरनिवासी संत प.पू. भक्‍तराज महाराज हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. हिंदु धर्मातील सर्व देवता, धर्मग्रंथ, तीर्थस्थळे, संप्रदाय आणि संतमहंत यांच्याविषयी ‘सनातन संस्था’ पूज्यभाव बाळगते.

३. उद्देश

अ. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे आणि धर्मशिक्षण देणे.

आ. साधकांना वैयक्‍तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्‍वरप्राप्तीपर्यंतची वाट दाखवणे.

इ. आध्यात्मिक संशोधन करणे आणि त्यातील निष्कर्षाद्वारे अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणे.

ई. अध्यात्मातील तात्त्विक (थेअरी) आणि प्रायोगिक भाग (प्रॅक्टिकल) शिकवणे.

उ. समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वचदृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.

४. वैशिष्ट्ये

१. विविध पंथियांना त्यांच्या पंथाप्रमाणे मार्गदर्शन !

२. संकुचित सांप्रदायिकता नव्हे, तर हिंदु धर्मातील व्यापक दृष्टीकोनानुसार शिकवण !

३. ‘व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला आवश्यकता आणि क्षमता यांनुसार साधनाविषयक दिशादर्शन !

४. शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्व योगमार्गांना सामावून घेणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गानुसार साधना !

५. वैयक्‍तिक साधनेबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करायच्या साधनेची शिकवण !

भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आदी विविध योगमार्गातील साधकांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे, हा सनातनच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार करणे, हा सनातन संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. साप्ताहिक सत्संग, दूरचित्रवाहिन्यांवरील धर्मसत्संग, ग्रंथसंपदा, प्रदर्शने, पत्रके आदींद्वारे धर्मशिक्षणाचा प्रसार केला जातो. हिंदु आचार, धार्मिक कृती, देवतांची उपासना, ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना, बालसंस्कार, राष्ट्र्रक्षण, धर्मजागृती आदी विविध विषयांवर संस्थेने सप्टेंबर २०१८ पर्यंत १७ विविध भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये ३१० ग्रंथांच्या ७३ लाख ६७ सहस्त्र प्रती प्रकाशित केल्या आहेत. अजून ३ सहस्र ७१० ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील, इतके ज्ञान संग्रही आहे. याशिवाय सुसंस्कार करणारे बालसंस्कार वर्ग आणि शाळांमध्ये आध्यात्मिक प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम आयोजित केले जातात. गुरु-शिष्य परंपरेच्या संवर्धनासाठी प्रतिवर्षी २०० हून अधिक गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित केले जातात. धर्मशिक्षण देणारे सात्त्विक पुरोहित घडवणारी सनातन साधक-पुरोहित पाठशाळा असे उपक्रमही सनातन संस्था राबवते.

राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा चळवळ, देशाचा अयोग्य नकाशा दाखविणार्‍यांच्या विरोधात अखंड भारत चळवळ, सीमेवर जाऊन भारतीय सैन्य दलासाठी ताणतणाव नियंत्रण कार्यक्रम, अशा स्वरूपाचे राष्ट्रप्रेम वृद्धींगत करणार्‍या चळवळी संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात. धार्मिक स्तरावर गणेशोत्सव, होळी, रंगपंचमी, नवरात्रोत्सव, अशा सार्वजनिक उत्सवांत जबरदस्तीने वर्गण गोळा करणे, मद्य पिऊन भांडणे करणे, महिलांची छेडछाड, जबरदस्तीने गुलाल फासणे, धाक दाखवून पैशांची लूट आदी धर्म आदी धर्मविसंगत अन् समाजविघातक अपप्रकार रोखण्यासाठी सनातन या संदर्भात चळवळ राबवून जनजागृती करते. पोलिसांच्या सहकार्याने असे गैरप्रकार रोखत आहे. विविध धार्मिक उत्सवांच्या विधींमागील शास्त्राची लोकांना समजावी म्हणून संस्था लोकांना धर्मशिक्षण देत आहे. त्याचा देशभरातील ८० लाखांहून अधिक लोक दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून लाभ घेत आहेत.

त्याचबरोबर सामाजिक स्तरावर सामाजिक वनीकरण, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, आदिवासी आणि गरीब यांना मोफत कपडे वाटप, मोफत चष्मे वाटप, वृद्धाश्रमात मोफत फळे वाटप, अमलीपदार्थाच्या विरोधात जनजागृती, जत्रा सुनियोजन चळवळ, खडकवासला (पुणे) जलाशय रक्षण चळवळ आणि मंदिर व ग्राम स्वच्छता उपक्रम यांना जनतेचा विशेष प्रतिसाद लाभला आणि त्यामुळे शासनाला विशेष सहकार्य झाले. २००२-२००३ साली नाशिक येथे कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत सनातनच्या प्रथमोपचार पथकामुळे पीडित भाविकांना वेळीच मदत मिळाली. संस्थेच्या कार्याचे अनेक संत, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन, सैन्यदल, विविध संस्था आणि मान्यवर यांनी प्रमाणपत्र देऊन कौतुक केले आहे. वर्ष २०१५ आणि वर्ष २०१६ मध्ये अनुक्रमे नाशिक आणि उज्जैन येथे झालेल्या महाकुंभपर्वातही सनातनने धर्मप्रसाराचे व्यापक कार्य केले, तसेच गर्दी नियंत्रण आणि अन्य बाबींमध्ये पोलिसांना साहाय्य केले. सनातनच्या निस्पृह कार्यामुळे अनेक साधू-संत यांनी यंदाच्या कुंभमेळ्यात सनातनच्या कार्याचा गौरवच केला आहे.

सनातन संस्था जिज्ञासूंना साधनाविषयक मार्गदर्शन व शंकानिरसन करून ईश्‍वरप्राप्तीसाठी मार्ग दाखवते. सनातनच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत ८१ साधक (ऑगस्ट २०१८ पर्यंत) संत झाले असून इतर अनेकजण संत होण्याच्या मार्गावर आहेत. तर शेकडो साधकांनी चांगल्याप्रकारेे आध्यात्मिक उन्नती केली आहे. या साधनामार्गाचे विदेशातील जिज्ञासूही आचरण करून स्वत:चे जीवन उद्धरत आहेत. सध्या जनता भ्रष्टाचार, महागाई, दुष्काळ, आतंकवाद्यांची आक्रमणे, असुरक्षितता यांमुळे त्रस्त आहे. अशा बिकट स्थितीत सनातनसारख्या धार्मिक संघटना हिंदुधर्म आणि संस्कृती यांचा प्रसार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती, राष्ट्र यांविषयी जागृती करत आहे. त्यामुळे समाज नैतिकता आणि धर्माचरण यांच्याकडे वळून सुखशांतीच्या आणि समृद्ध जीवनाच्या मार्गाकडे जात आहे. सनातन संस्थेचे धर्म, राष्ट्र आणि समाज यांच्याप्रतीचे निस्पृह कार्य पाहून अनेक संत, डॉक्टर, मानसोपचारतज्ञ, अभियंता, अधिवक्ता, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त सनदी अधिकारी, उद्योजक, ज्येष्ठ पत्रकार, समाजातील विचारवंत आणि मान्यवर व्यक्ती संस्थेच्या कार्यात सहभागी होऊन राष्ट्र् अन् धर्म यांसाठी कार्य करत आहेत. संस्थेच्या प्रेरक आणि स्फूर्तीदायी कार्यातून प्रेरणा घेऊन आदर्श समाजच्या निर्मितीसाठी देश-विदेशात सहस्त्रो साधक आणि धर्मप्रेमी हे निष्कामपणे तन, मन आणि धन यांचा त्याग करून पूर्णवेळ कार्य करत आहे.

Leave a Comment