चेन्नई येथील सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

श्री. श्रीकांत साठे यांचा सत्कार करतांना सनातनच्या सौ. उमा रविचंद्रन्

चेन्नई : मूळचे मुंबई येथील रहाणारे आणि ५० वर्षांपासून चेन्नई येथे स्थायिक झालेले सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे (वय ७५ वर्षे) श्रीकृष्णाष्टमीच्या शुभदिनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले. त्यानिमित्त त्यांचा ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. माया साठे आणि सनातनचे साधक उपस्थित होते.

श्री. साठे काका यांचा परिचय

श्री. श्रीकांत साठे मूळचे मुंबई येथील रहाणारे असून ५० वर्षार्ंपूर्वी ते चेन्नई येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी नैसर्गिक औषधांवर आधारित एक आस्थापना चालू केले. वर्ष २००२ मध्ये चेन्नई येथील महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हापासून ते विज्ञापने आणि अर्पण यांच्या माध्यमातून धर्मकार्यात सहभागी आहेत.

दुर्धर आजारातही आनंदी रहाणे आणि परिस्थिती स्वीकारणे

श्री. साठे यांना गेल्या ३ वर्षांत अनेक आजारांना सामोर जावे लागले. त्यांची हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. बसमधून प्रवास करतांना तोल गेल्याने ते खाली पडले. त्यामुळे त्यांना ‘स्पायनल कॉर्ड इंज्युरी’झाली. त्यामुळे त्यांना पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. याच काळात त्यांना प्रोस्टेटचा कर्करोग झाला. त्यानंतर त्यांना ‘अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट’चा कर्करोग झाला. या सगळ्यांमुळे त्यांचे वजन ३५ किलो न्यून झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आस्थापनाचे दायित्त्व मोठी मुलगी सौ. दीपा साठे ह्यांना सोपवले आणि घरी राहून सतत नामस्मरण आणि ईश्‍वराचे अनुसंधान साधले. या घटनांना ते खंबीरपणे सामोरे गेले. ‘ईश्‍वर आजाराच्या माध्यमातून माझे प्रारब्ध भोग संपवत आहे आणि मला अधिकाधिक नामस्मरण करण्यासाठी वेळ देत आहे’, असे समजून त्यांनी आनंदाने परिस्थिती स्वीकारली आहे.

प्रामाणिकपणे व्यवहार करतांना इतरांनाही साहाय्य करणे

त्यांच्या आस्थापनात अनेक जण नोकरीसाठी मुलाखत द्यायला यायचे. मुलाखत झाल्यावर नोकरी नाकारल्यांना ते प्रत्यक्षात जाऊन भेटायचे आणि कोठे सुधारणा करायला पाहिजे, हे उमेदवारांना मित्रांप्रमाणे सांगायचे. त्यामुळे अनेक युवकांना त्यांचे भवितव्य घडवण्यात साहाय्य झाले.

काकांची इतर वैशिष्ट्ये

१. काकांचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. त्यांच्या दोन्ही मुली उच्चशिक्षित आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी काकांना अतिशय चीड आहे. त्यासाठी ते सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी होतात. त्यांच्याकडे विज्ञापन घेण्यास जाणार्‍या साधकाची ते प्रेमाने विचारपूस करतात.

२. लहानपणी काकांमध्ये एकलकोंडेपणा हा दोष होता. हा दोष जाण्यासाठी त्यांनी मुद्दामहून ‘मार्केटिंग’ची नोकरी पत्करली. दोष जाण्यासाठी ते अजूनही प्रयत्न करत आहेत.

३. यापूर्वी काका चेन्नई येथे झालेल्या सनातनच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या वयातही त्यांना चेन्नई येथील सर्व साधकांची नावे आठवतात आणि ते सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment