टाकाऊ विदेशी सफरचंदापेक्षा भारतीय फळे खा !

Article also available in :

वैद्य सुविनय दामले

१. सफरचंद या मातीतील नव्हेच !

भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ? यांविषयी आम्हाला काहीही माहिती नाही; कारण ते मुळात भारतातील फळच नाही. इंग्रजांनी आपल्या समवेत ते भारतात आणले आणि या दोन राज्यांतील अती थंड वातावरण त्या फळाला पोषक असल्याने, ते झाड येथे राहिले, जसा चहा राहिला !

२. आरोग्यदृष्ट्या अत्यल्प उपयोगी, तरी केवळ
व्यापारी गुणधर्मामुळे जगभर प्रसिद्ध पावलेले फळ

अन्य फळांप्रमाणे सफरचंद कच्चे कधी, पक्के कधी, हे कळत नाही; कारण त्याचा रंग, रूप, वास आणि चवही पालटत नाही. अन्य कोणतेही कडक फळ पिकल्यानंतर मऊ होते, उदा. कैरीचा आंबा होतो किंवा मऊ फळ पिकल्यावर टणक होते, उदा. मऊ शहाळ्याचा टणक नारळ होतो. केवळ अधिक काळ टिकणे, या सफरचंदाच्या व्यापारी गुणधर्मामुळेच ते जागतिक स्तरावरील फळ झाले आहे. प्रत्यक्षात त्या फळात कोणतेही विशेष औषधी गुणधर्म नाहीत. भारतीय फळांमध्ये मात्र असे औषधी गुणधर्म पुष्कळ आहेत.

३. ‘दैनंदिन एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवते’, ही म्हण सपशेल फसवी !

अती थंड प्रदेशांत सफरचंदापेक्षा दुसरे मोठे फळच पिकत नाही. लिची, स्ट्रॉबेरी, मलबेरी, चेरी अशी अन्य जी फळे तिथे पिकतात, ती अगदीच लेचीपेची, नाजूक आणि न टिकणारी असतात. त्यातल्या त्यात सफरचंद जरा मोठे दिसणारे आणि टिकाऊ; म्हणून म्हणे त्यावर संशोधन केले गेले आणि म्हण रूढ केली गेली, ‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे, कीप्स द डॉक्टर अवे’ म्हणजे दैनंदिन एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवते. ही म्हण सफरचंद जिथे पिकते तिथेही लागू होत नाही; कारण प्रतिदिन सफरचंद खाल्ले जाते अशा थंड विदेशी प्रदेशांत विकार आणि रुग्ण यांची संख्या भारताच्या तुलनेत अधिक आहे. फळांच्या गुणांवरून एखादी म्हण भारतासाठी बनवायची झाल्यास ‘अ‍ॅन आवळा अ डे, किप्स द डॉक्टर अवे’ म्हणजे दैनंदिन एक आवळा डॉक्टरला दूर ठेवतो, अशी हवी !

४. भारतीय फळांच्या तुलनेत सफरचंद टाकाऊच !

आयुर्वेदानुसार आंबा हा जर फळांचा राजा असेल, तर डाळिंब हा महाराजा आहे; पण आज इंग्रजाळलेल्या वैद्यकानुसार आमचा आवळा आणि डाळिंब बिचारे मागे पडलेत. त्यांना कोणी गॉड फादर नाही किंवा कोणी साखरसम्राटांचा लॉबीवाला नाही ! अर्थात, यामुळे त्यांचे गुण काही अल्प होणार नाहीत. असो. भारतात सर्वत्र मिळणार्या, कोणत्याही फळांच्या तुलनेत सफरचंद हे फळ टाकाऊच आहे, हे मात्र खरे !

५. थंड प्रदेश सोडून अन्यत्र सफरचंद खाणे, म्हणजे विविध विकारांना आमंत्रण देणे !

सफरचंदाची स्तुती करणार्या स्तुतीपाठकांनी एक लक्षात घ्यावे, जिथे पिकते तिथेच ते मानवते, हा आयुर्वेदातील एक न्याय आहे. जिथे हे सफरचंदाचे झाड उगवते, तेथे बाराही महिने अती थंड वातावरण असते. त्या झाडाच्या मुळांशी बर्फ असतो. यामुळे आपल्या अंगी वात वाढविणारे गुण घेऊनच हे फळ जन्माला येते ! त्यामुळे सफरचंद खाणार्या व्यक्तींना आणि बालकांना वारंवार सर्दी होणे, नाक गळणे, कानातून पाणी येणे, घशातील गाठी वाढणे, लघवीचे विकार, मधुमेह यांसारखे रोग प्रकृतीनुसार अल्प-अधिक प्रमाणात होतच रहाणार. त्यांच्या आहारातून केवळ सफरचंद जरी बंद केले, तरी हे विकार बहुतांशी न्यून होतात, असा अनेक वैद्यांचा अनुभव आहे.

६. मेणाचा थर देऊन कृत्रिमपणे टिकवलेले सफरचंद पोटातील विकारांना आमंत्रण देणारे

सफरचंद अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर काही रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यावर अती पातळ असा मेणाचा थर दिला जातो. त्यामुळे त्यावरील सुरकुत्या दिसत नाहीत, ते वाळलेले वाटत नाही आणि दिसायला चकचकीत दिसते. मेणाच्या थरामुळे बाह्य वातावरणाचा फळाच्या सालीशी संपर्क येत नसल्याने त्यातील पाण्याचा अंशही अधिक दिवस रहातो आणि ते टिकाऊ बनते; पण हाच टिकाऊपणा शरिराला टाकाऊ बनवतो ! त्यातील पातळ मेण आणि अन्य बुरशीजन्य वाढ डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे असे सफरचंद मलावरोध, लघवी तुंबणे वा आतड्यांच्या विकार यांना कारणीभूत होते. हा थर ओळखण्यासाठी सफरचंद उष्ण पाण्यात टाकल्यास मेणाचा तवंग स्पष्टपणे पाण्यावर तरंगतांना दिसतो किंवा विकत घेतांना हळूवारपणे नखाने घासल्यास त्यावरील मेण नखांना लागते.

७. पाश्चमात्त्य सफरचंदाला त्याहून सरस असे भारतीय पर्याय

भारतात प्रत्येक ऋतूनुसार निर्माण होणारी करवंद आणि जांभूळ यासारखी फळे आहेत. कोकणात फणस, आंबा, काजू; तर घाटमाथ्यावर द्राक्षे आणि चिकू आहेत, तसेच बारमाही पिकणारी केळी, अननस, पपई, असा अनेकविध स्वस्त फळांचा सक्षम पर्याय सफरचंदासाठी उपलब्ध आहे, तरी बाहेरून आयात कराव्या लागणार्या, पाश्चात्त्यांंच्या महागड्या सफरचंदाच्या मागे लोक आणि डॉक्टरसुद्धा का लागतात, हेच कळत नाही !

– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग.

Leave a Comment