पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी अधिवेशन आणि सनातनचा आश्रम यांबद्दल व्यक्त केलेले मनोगत

१९ ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, फोंडा, गोवा येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेले हे अधिवेशन गोवंश हत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहाद आदी आघातांच्या संदर्भात उपस्थितांना कृतीशील होण्यास उद्युक्त करत आहे.

या अधिवेशनात सहभागी झालेल्या मान्यवरांनी येथील नियोजन, व्यवस्थापन आणि उत्साही अन् चैतन्यमय वातावरण यांचा त्यांच्यावर कोणता परिणाम होत आहे, याविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

१. अधिवेशनाला येण्यापूर्वी

१ अ. प्रकृती स्वस्थ होणे : गेल्या २० – २५ दिवसांपासून मी अतिशय रुग्णाईत होतो. प्रकृती सुधारल्यावर मी अधिवेशनाला जाण्याचे ठरवले आणि अधिवेशनात जाण्याच्या इच्छेमुळे मी लवकर ठीकही झालो. अधिवेशनात मी शिकण्यासाठी येत आहे. – श्री. गोविंदराज नायडू, संयोजक, हिंदू युवा मंच, दुर्ग, छत्तीसगड.

१ आ. सातारा येथून अधिवेशनासाठी येतांना सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आवाजातील मार्गदर्शनाची ध्वनीफीत (ऑडिओ) ऐकतांना अन्य काहीच ऐकू येत नव्हते.

१ इ. प्रवासात केवळ नामजप चालू होता. – श्री. सुधन्वा गोंधळेकर, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा.

२. अधिवेशनाचे नियोजन प्रत्यक्ष अनुभवल्यावर

२ अ. उत्कृष्ट नियोजन : एम्.बी.ए.चे विद्यार्थीसुद्धा नियोजन करू शकत नाहीत, इतके उत्कृष्ट नियोजन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनाचे केले आहे. ते पाहून आम्ही पुष्कळ प्रभावित झालो आहोत ! – श्री. रमेश पडवळ, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर.

२ आ. अधिवेशनातील नियोजन, आदरातिथ्य आणि प्रेमभाव आवडला ! : मी अधिवेशनाला एकाच दिवसासाठी येणार होतो. त्या वेळी एक दिवस तरी मी थांबू शकेन का ?, असा विचार माझ्या मनात आला होता; पण येथील नियोजन, आदरातिथ्य आणि प्रेमभाव यांमुळे आणखी काही दिवस येथे थांबण्याची ओढ निर्माण झाली. मी पुढच्या वेळी पूर्ण कुटुंबाला घेऊनच येईन.- अधिवक्ता शरदचंद्र मुंडरगी, बेळगाव

२ इ. सात्त्विक जेवण मिळाले ! : अधिवेशनात हिंदु धर्माभिमान्यांची भोजनाची व्यवस्था अत्यंत चांगली केली आहे. आश्रमातील साधकांकडून आम्हाला सात्त्विक जेवण मिळत आहे.- अधिवक्ता निरंजन चौधरी, जळगाव

२ ई. कार्यस्थळी गोंगाट नाही ! : आम्ही चार जण जरी घरी असलो, तरी आमचा खूप आवाज असतो; मात्र या अधिवेशनाच्या ठिकाणी पुष्कळ मोठ्या संख्येने साधक आणि धर्माभिमानी असूनही आवाज अत्यल्प आहे. – श्री. श्रीहरि पन्नमवार, नगर प्रमुख, शिवसेना, इंदूर, तेलंगणा.

२ उ. हिंदू अधिवेशनातील सकारात्मक वातावरण पाहून हिंदु राष्ट्र येणार, याची निश्‍चिती झाली ! – श्री. संजीव शर्मा, आग्रा, उत्तरप्रदेश.

३. अधिवेशनाच्या संदर्भातील अनुभूती

३ अ. वातानुकूलन यंत्रणेचा त्रास न होणे : मला १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ वातानुकूलन यंत्रणा सहन होत नाही आणि १० मिनिटांतच माझे डोके दुखू लागते; परंतु अधिवेशनात ३ दिवस झाले, तरी त्याचा मला त्रास झाला नाही. – श्री. चारुदत्त पोतदार, कोल्हापूर

३ आ. साधक आणि मान्यवर यांंचे मार्गदर्शन ऐकतांना भावजागृती होणे : पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पूर्वीच्या सर्व अधिवेशनांमध्ये सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मार्गदर्शन करतांना चांगले वाटत होते; पण आताच्या पंचम हिंदू अधिवेशनात आता साधकांप्रमाणे अन्य मान्यवरांंचे मार्गदर्शन ऐकतांनाही चांगले वाटत आहे. भावजागृती होत आहे ! – श्री. जयराज शालियान, दक्षिण कन्नड, कर्नाटक

३ इ. स्वतः न बोलता प.पू. डॉक्टरच विषय मांडत असल्याची अनुभूती येणे : माझा विषय मांडण्यापूर्वी काय मांडावे, हे लक्षात येत नव्हते. त्या वेळी मी प.पू. डॉक्टरांचे स्मरण करत होतो. नंतर मी विषय मांडण्यास आरंभ केला. मी काय बोललो, ते मला आठवत नाही; पण प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून बोलत होते, असे मला वाटत होते. विषय मांडून झाल्यावर अनेकांनी भेटून विषय फार चांगला मांडला, असे सांगितले. सर्व काही देवानेच माझ्याकडून करून घेतले. – श्री. मनीष सहारिया, होशंगाबाद, मध्यप्रदेश.

३ ई. कुटुंब भावना वाढली ! : पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आल्यावर सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये एक कुटुंब भावना निर्माण झाली. एकमेकांविषयी जवळीकता वाटत आहे. – श्री. रमेश पडवळ, कार्यकर्ता, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर.

३ उ. पू. सिरीयाक वाले यांच्या भाषणातील चैतन्यामुळे विषयाचे आकलन झाले ! : पू. सिरीयाक वाले यांचे भाषण इंग्रजीत होते; मात्र त्यांनी ते इतक्या चांगल्या पद्धतीने केले की, ते जणू हिंदी भाषेतच बोलत आहेत, असे जाणवून त्यांचे सर्व भाषण पूर्णपणे लक्षात आले. संतांच्या चैतन्यामुळे हे शक्य झाले ! – श्री. रमेश पडवळ, कार्यकर्ता, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर.

४. सनातन आश्रम आणि आश्रम व्यवस्थापन

४ अ. आश्रमाचे व्यवस्थापन पुष्कळ आवडले ! : येथे सर्व कसे चालते, तेच कळत नाही; पण सर्वकाही अचूकपणे आणि परिपूर्णतेने चालू असून हे सर्व आपोआप होत आहे.- श्री. संजीव शर्मा, आग्रा, उत्तरप्रदेश. (प्रत्यक्ष ईश्‍वरी शक्ती कार्यरत असल्याची ही अनुभूती आहे. – संकलक)

४ आ. एकमेव आश्रम : सनातन आश्रमासारखा आश्रम विश्‍वात कुठेच पाहिला नाही. येथील शिस्त, नम्रता आणि प्रेम दुसरीकडे कुठेच पहायला मिळाले नाही ! – मध्यप्रदेशमधील हिंदुत्वनिष्ठ

४ इ. अत्यंत प्रभावित झालो ! : आश्रमात आल्यावर आम्ही अत्यंत प्रभावित झालो आहोत. मध्यंतरी मी काही काळ दूर गेलो होतो. आता पुन्हा कार्यरत झालो आहे. आता जिल्ह्यात गेल्यावर पुन्हा जोमाने कार्यरत होणार ! – श्री. रमेश पडवळ, कार्यकर्ता, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर.

४ ई. मला योग्य मार्ग मिळाला ! : सनातनचा आश्रम पाहिल्यावर ७० वर्षांनंतर अशी जाणीव झाली की, आयुष्यातील एवढी वर्षे गेल्यावर आता मला योग्य मार्ग मिळाला ! मला येथूनच पुढे कार्य करायचे आहे.- श्री. भानुप्रताप सिंह पवार, सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, भारत रक्षा मंच, उज्जैन, मध्यप्रदेश.

४ उ. माझ्या मुलीला स्वयंपाक विभागात शिकण्यासाठी पाठवीन ! : सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वयंपाक विभाग पाहिल्यावर असे वाटले की, हा स्वयंपाक विभाग केवळ सीतामाईंचा असू शकतो. या विभागात मी माझ्या मुलीला शिकण्यासाठी पाठवीन ! – श्री. राजू पी.टी., थ्रिसूर, केरळ.

५. अधिवेशन आणि सनातन संस्थेचे कार्य जवळून अनुभवल्यावर मान्यवरांनी दिलेले उत्स्फूर्त अभिप्राय

५ अ. प.पू. गुरुदेवांनी घडवलेले हिंदु राष्ट्र म्हणजे सनातनचा आश्रम ! : आतापर्यंत आम्ही बाहेरचे जग पाहिले होते. आता गोव्यात आल्यावर आपण हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे किती मोठे कार्य केले आहे, हे पहायला मिळाले. प.पू. गुरुदेवांनी घडवलेले हिंदु राष्ट्र म्हणजे सनातनचा आश्रम आहे ! – श्री. अनिल (राजू) यादव, करवीर तालुका-प्रमुख आणि श्री. संभाजी भोकरे, उप जिल्हाप्रमुख, शिवसेना, कोल्हापूर, महाराष्ट्र.

५ आ. सनातन संस्थेचे कार्य सर्वत्र पोचवूया ! : सनातन संस्थेचे कार्य इतके चांगले आहे की, सर्व लोकांपर्यंत त्याची व्याप्ती पोचली पाहिजे. यासाठी आपण जिल्ह्यांत नियोजन करूया ! – अधिवक्ता शरदचंद्र मुंडरगी, बेळगाव

५ इ. समितीचे हिंदूसंघटन कार्य पाहिल्यावर आपण एकटे नाही, याची जाणीव झाली ! : आतापर्यंत हिंदुत्वाचे कार्य करतांना आम्हाला एकटे वाटत होते; पण हिंदु जनजागृती समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य पाहिल्यावर आम्ही एकटे नाही, याची जाणीव झाली. भारतातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आता संघटित झाल्या असून आता हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना रहाणार नाही. आता आम्ही आणखी जोमाने कार्य करू ! – श्री. गणेश यादव, हिंदू सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश.

५ ई. कार्य पाहून स्वाभिमान जागृत झाला ! : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे महान कार्य पाहून माझा स्वाभिमान जागृत झाला. सनातन संस्थेने हा विषय हातात घेतला, हे आवडले !
– श्री. राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून कश्मीर, पुणे, महाराष्ट्र

५ उ. साधनेची अनिवार्यता ध्यानी आली ! : आतापर्यंत आम्ही राष्ट्र-धर्मावरील आघात रोखण्यासाठी प्रखरपणे कार्य करत होतो; पण हे कार्य करतांना साधनेची आवश्यकता आहे. ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे, हे आम्हाला या अधिवेशनातून शिकायला मिळाले ! – हिंदू सेवा परिषदेचे कार्यकर्ते, मध्यप्रदेश

५ ऊ. पुढच्या वेळी २५ जणांना अधिवेशनासाठी घेऊन येईन ! : माझ्यासोबत आसाम येथील २ तरुणी आल्या; मात्र त्या स्वतःला हिंदु न समजता आदिवासी समजत आहेत. त्यांनी स्वतःला हिंदु समजणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी तळमळीने त्यांचे प्रबोधन करत होतो. पुढच्या वेळी मी २५ जणांना अधिवेशनासाठी घेऊन येईन. – श्री. शिब शंकर कुंडू, हिंदू सेवा मंच, ढुबरी, आसाम.

५ ए. अपप्रचार करणार्‍यांना आश्रम दाखवा ! : सनातनविषयी प्रसिद्धीमाध्यमे अपप्रचार करतात. सनातन आश्रम दाखवल्यावर त्यांच्या लक्षात येईल की, सनातनचे कार्य किती चांगले आहे !
– श्री. अनिल (राजू) यादव आणि श्री. संभाजी भोकरे, कोल्हापूर

५ ऐ. आमच्या कार्यकर्त्यांतील निर्भयता वाढली असून सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेचेे आम्ही अनुकरण करत आहोत ! : पूर्वी बीरपूरमित्र (ओडिशा राज्य) या जिल्ह्यात मुसलमान प्रत्येक ठिकाणी दंगली घडवत होते. आता मात्र जागृत झालेला हिंदू त्यांना योग्य भाषेत उत्तर देत आहे. त्यामुळे मुसलमान घाबरू लागले आहेत. आमचे कार्यकर्ते कारागृहात जाण्यास घाबरत नाहीत. प्रत्येक कार्यकर्ता एकदा तरी कारागृहात जाऊन यावे, असे म्हणत आहे. हे सर्व आपल्या कार्यशैलीनुसार करतांना आम्हाला जी साधना समजली, ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेचेे आम्ही अनुकरण करत आहोत.
– श्री. जयराज ठाकूर, संस्थापक सदस्य, हिंदू सेना, सुंदरगढ, ओडिशा.

५ ओ. पूर्णवेळ धर्मसेवाच करणार ! : मी आश्रमात आईला सोबत घेऊन आलो आहे. आई येथेच राहिल्यास मी पूर्णवेळ धर्मसेवाच करण्याचे ठरवले आहे. – श्री. शिब शंकर कुंडू, हिंदू सेवा मंच, ढुबरी, आसाम.

५ औ. काश्मिरी हिंदूंचे प्रश्‍न सुटण्यासाठी प्रयत्न करीन ! : मी या हिंदू अधिवेशनासाठी आले; मात्र माझ्या शारीरिक त्रासामुळे मी काहीच करू शकत नाही. साधकांनाच माझे करावे लागत आहे. येत्या सहा मासांत मी स्वतःची इतकी सिद्धता करीन की, १९ जानेवारी २०१७ या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी काश्मीरला जाईन ! – सौ. स्वर्णलता, कार्यकर्ती, शक्ति केंद्रम्, भाग्यनगर, तेलंगणा

तुमचे कार्य पुष्कळ व्यापक आहे ! – महंत पू. इच्छागिरी महाराज

रामनाथी आश्रम पाहिल्यावर धाराशीव, महाराष्ट्र येथील महंत इच्छागिरी महाराज म्हणाले, तुमचे कार्य पुष्कळ व्यापक आहे आणि योग्य दिशेने चालू आहे. मला आश्रमाचा स्वयंपाक विभाग पुष्कळ आवडला. त्याचे छायाचित्र मला हवे आहे. त्याचा फ्लेक्स करून मी आमच्या स्वयंपाक विभागात लावणार आहे. आमच्या आखाड्यांच्या परंपरेनुसार जे आमचा स्वयंपाक बनवतात, त्यांना आम्ही दक्षिणा देतो. (त्यानुसार स्वयंपाक बनवणार्‍या पाच साधिकांना महाराजांनी दक्षिणा दिली.) ते पुढे म्हणाले, अधिवेशनात मी स्वागत करण्यापासून ते निरोप देईपर्यंत कसे आचरण करतात, याचे निरीक्षण केले. हेे सर्व मी आमच्या येथेही राबवणार आहे.

आश्रमदर्शनानंतर महाराजांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता की, महाराष्ट्रात होणार्‍या तालुका पातळीवरील १० हिंदू अधिवेशनांचे दायित्व त्यांनी स्वतःहून स्वीकारले आहे ! – श्री. राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात