केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !

Article also available in :

१. शरीर निरोगी रहाण्यासाठी अवेळी खाणे टाळा

अ. रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण इत्यादी खात असाल, तर सावधान !

‘झोपण्या-उठण्याच्या वेळा निश्चित नाहीत, व्यायाम नाही, नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, भाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती तुमची पूर्वपुण्याईच म्हणावी लागेल; परंतु लक्षात घ्या ! ही पूर्वपुण्याई संपली की, आता चालू असलेल्या चुकीच्या सवयींचे परिणाम रोगाच्या रूपाने दिसू लागतील. मग ‘त्या वेळी चांगल्या सवयी लावल्या असत्या, तर बरे झाले असते’, असे म्हणायची पाळी येईल. आपण साधक आहोत. शरीर निरोगी राहिल्यास साधना चांगली होते. त्यामुळे आपल्याला साधनेसाठी निरोगी शरीर हवे. शरीर निरोगी रहाण्यासाठी केवळ दोनच गोष्टी करा ! २ वेळा पुरेसा आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा !’

आ. कोणताही आवडीचा पदार्थ अवेळी न खाता जेवणाच्या वेळीच खा !

‘आयुर्वेदाला चटपटीत आणि चवदार पदार्थांचे वावडे आहे का ? मुळीच नाही. उलट रुची घेऊन जेवल्याने समाधान मिळते. त्यामुळे पदार्थांच्या चवींमध्ये विविधता हवीच; परंतु एखादा पदार्थ कितीही आवडणारा असला, तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे. तसे केले नाही, तर त्याचा आज ना उद्या त्रास होणारच. ‘कोणताही आवडीचा पदार्थ पचत असेल, तर खाण्यास काहीच आडकाठी नाही; मात्र तो पदार्थ जेवणाच्या वेळेतच खावा. अवेळी खाऊ नये.’ हा नियम पाळल्यास शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होईल आणि साधनाही चांगली होईल.’

प्रश्न : मला शरीर निरोगी राखण्यासाठी दिवसभरात केवळ २ वेळाच आहार घ्यायचा आहे; परंतु सकाळी किंवा सायंकाळी अल्पाहार केला नाही, तर थरथरायला होते. काही वेळा पोटात आग पडते. असे असतांना मी केवळ २ वेळाच आहार घेणे, माझ्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का ?

उत्तर :

२. निरोगी जीवनासाठी केवळ २ वेळाच आहार घेण्याची चांगली सवय अंगी बाणवायला हवी !

आपण शरिराला जशी सवय लावू, तसे शरीर वागते. आपण चांगल्या सवयी लावल्या, तर आरोग्य लाभते. आपण चुकीच्या सवयी लावल्या, तर रोग होतात. आतापर्यंत आपल्याला ४ – ४ वेळा खाण्याची चुकीची सवय होती. आता आपण एकाएकी २ वेळा आहार घेण्याचे ठरवले आहे; परंतु पूर्वीच्या सवयीनुसार आहाराची वेळ झाली की, शरिरामध्ये पित्त स्रवणारच. काही जणांची शारीरिक क्षमता चांगली असते. त्यांना या स्रवलेल्या पित्ताचा काही त्रास होत नाही आणि ते सहजपणे ४ वेळा खाण्याची चुकीची सवय मोडून २ वेळा आहार घेण्याची चांगली सवय अंगी बाणवू शकतात. यामध्ये मनाची भूमिकाही महत्त्वाची असते. मनाचा ठाम निश्चय असेल, तर चुकीच्या सवयी मोडून चांगल्या सवयी लावणे सोपे जाते.

 

३. थरथरायला होणे किंवा पोटात आग पडणे यामागील कारण

आधुनिक शास्त्रानुसार जेवणाच्या वेळेत जठरामध्ये आम्ल (हायड्रोक्लोरिक ॲसिड), तर आतड्याच्या पहिल्या भागामध्ये (‘ड्युओडीनम’मध्ये) पित्त (बाईल) आणि स्वादुपिंडाचे स्राव (पॅन्क्रिॲटिक ज्यूस) स्रवतात. जेव्हा आपण खातो, तेव्हा खाल्लेले अन्न या स्रावांमध्ये मिसळले जाते आणि त्या स्रावांची तीक्ष्णता (तीव्रता) न्यून होते. खाल्ले नाही, तर स्रावांची तीक्ष्णता न्यून होत नाही. काहींना ही तीक्ष्णता (तीव्रता) सहन होत नाही. त्यामुळे थरथरायला होते किंवा पोटात आग पडल्यासारखे होते.

 

४. तुपाच्या साहाय्याने ४ – ४ वेळा खाण्याची चुकीची सवय मोडणे सहज शक्य !

आरोग्य मिळवायचे असेल, तर ४ – ४ वेळा खाण्याची चुकीची सवय मोडून २ वेळा आहार घेण्याची चांगली सवय अंगी बाणवणे आवश्यक आहे. यासाठी वाढलेल्या पित्तावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ‘पित्तस्य सर्पिषः पानम् ।’ म्हणजे ‘पित्तावर ‘तूप पिणे’ हे सर्वश्रेष्ठ औषध आहे’, असे आयुर्वेदात (अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय १३, श्लोक ४ यात) सांगितले आहे. तुपाचा वापर करून आहाराच्या ४ वेळांवरून २ वेळांवर येणे अत्यंत सोपे आहे.

 

५. हे करा !

अ. आरंभी तुमच्या मनाला ‘२ वेळा आहार घेण्याची सवय लावल्याने आरोग्य मिळणार आहे आणि तुपाचा वापर केल्याने वाढलेल्या पित्ताचे शमन होऊन आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही’, हे समजावून सांगा. असे केल्याने तुमचे मन या मोहिमेमध्ये आनंदाने सहभागी होईल.

आ. आता दिवसातून २ वेळाच आहार घेणे चालू करा.

इ. आहारावर कोणतेही बंधन घालू नका. जे पचेल ते खा. आवडीचा कोणताही पदार्थ पचत असेल, तर तो खाता येऊ शकतो; मात्र असे पदार्थ केवळ जेवणाच्या वेळेतच खा.

ई. जेवणाच्या २ वेळा सोडून कधीही अवेळी भूक लागली, तर चमचाभर तूप चघळून खा. चघळल्याने शरिराच्या उष्णतेने तूप पातळ होते. निवळ तूप खाणे कठीण वाटत असेल, तर तुपात थोडी साखर किंवा गूळ घालून खाल्ले, तरी चालेल. (तूप मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरा. पातळ झालेले तूप १ चमचा प्रमाणात घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे तूप थिजलेले असल्यास त्या अनुमानाने घ्या.)

उ. तूप खाल्ल्यावर साधारण १५ मिनिटांनी भूक शमेल. ती शमली नाही, तर पुन्हा १ चमचा तूप खा. अशाप्रकारे भूक शमण्यासाठी किती तूप खावे लागते, याचे अनुमान घेऊन पुढील वेळेस थेट तेवढे तूप खाल्ले, तरी चालू शकते. सामान्यतः जास्तीतजास्त ४ चमचे तुपाने भूक शमते. शरिराच्या जडणघडणीनुसार हे प्रमाण न्यूनाधिक असू शकते.

ऊ. चुकून तुपाचे प्रमाण जास्त झाले आणि त्याचे अपचन होईल कि काय अशी शंका येत असेल, तर अर्धी वाटी गरम पाणी प्या.

ए. औषध घेण्यासाठी खावे लागत असेल, तर तुमच्या वैद्यकीय चिकित्सकाला तुम्ही ठरवलेल्या आहाराच्या वेळा सांगून ‘औषध कधी घ्यावे’, हे विचारून घ्या.

ऐ. घेतलेले तूप पचण्यासाठी प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करा.

 

६. तुपाचे लाभ

अवेळी भूक लागल्यावर तूप प्यायल्याने भूक शमते. थरथरायला होत नाही. पोटात आग पडल्यासारखे वाटत असेल, तर तेही तात्काळ न्यून होते. वाढलेल्या पित्ताचे योग्य रितीने शमन होते. (‘शमन होणे’ म्हणजे ‘शांत होणे’) तूप उत्तम शक्तीवर्धक आहे. त्यामुळे थकवाही दूर होतो. काही दिवसांनी शरिराला २ वेळाच आहार घेण्याची सवय लागते. मग अवेळी भूक लागणे बंद होते. त्या वेळी तूप खाण्याची आवश्यकता रहात नाही. मग जेवणातच २ – २ चमचे तूप घ्यावे. असे नियमित चालू ठेवल्यास जेवणाच्या २ वेळांत शरिराला आवश्यक त्या प्रमाणात भूक लागते आणि आवश्यक तेवढा आहार घेतला जातो. त्यामुळे कृश व्यक्तींनी २ वेळा आहार घेतल्यास त्यांचे वजन न्यून होईल, अशी भीती बाळगू नये. स्थूल व्यक्तींनी आहारावर नियंत्रण ठेवल्यास त्यांचे वजन न्यून होण्यास साहाय्य होते.

 

७. सारांश

याचा सारांश व्यावहारिक भाषेत असा समजून घेता येईल. ‘पित्त’ हा एक कर्मचारी आहे. त्याला त्याच्या ठिकाणी, म्हणजे पोटात काम मिळाले नाही, तर तो दुसर्‍या ठिकाणी, म्हणजे रक्त इत्यादी ठिकाणी उपद्व्याप निर्माण करील. हे उपद्व्याप म्हणजे थरथरायला होणे किंवा पोटात आग पडणे. त्या पित्तरूपी कर्मचार्‍याला तूप पचवण्याचे काम दिले की, तो कामांत गुंतून रहातो आणि इतरत्र त्रास देत नाही.

 

८. स्वतःच्या क्षमतेनुसार लेखातील सूत्रांचे आचरण करा !

मनाचा निश्चय असेल आणि ४ दिवस कळ सोसण्याची सिद्धता असेल, तर या लेखात दिल्याप्रमाणे आहाराच्या वेळा ४ वरून २ वर आणणे सहज शक्य आहे; परंतु बर्‍याच जणांची तशी सिद्धता नसते. अशांच्या मनात आरंभ करण्यापूर्वीच अनेक शंका-कुशंका येत रहातात. अशांनी या लेखात दिलेल्या कृती घाईने आरंभ करू नयेत. इतरांनीही त्यांना आग्रह करू नये. साशंक साधकांनी नेहमीप्रमाणे आचरण ठेवावे. त्यांनी साधनेसाठी निरोगी रहाण्याचे महत्त्व स्वयंसूचना देऊन मनावर बिंबवावे, तसेच  https://www.sanatan.org/mr/ayurveda यावरील चौकटी वाचून मनाचा निश्चय करावा. जे दृढनिश्चयी साधक निःशंक मनाने या कृतींचे आचरण करतील, त्यांना निश्चितच त्याचे चांगले फळ मिळेल. त्यांचे चांगले अनुभव ऐकून साशंक साधकांचा आत्मविश्वास वाढेल. मनाचा निश्चयही होईल. तो झाला की, सर्वांना हे सहज करता येईल.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२२)

 

एकदा जेवतो तो योगी. दोन वेळा जेवतो तो भोगी. तीन आणि त्याहून जास्त वेळा जेवतो तो रोगी. 

Leave a Comment