वाराणसी आश्रमातील बुद्धीअगम्य पालट

Article also available in :

वाराणसी आश्रमात चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे दर्शवणारे बुद्धीअगम्य पालट यांविषयी येथे पाहूया.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

 

१. वाराणसी आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे
दर्शवणारे काही बुद्धीअगम्य पालट आणि साधकांना आलेल्या अनुभूती !

१.अ. आश्रमाच्या परिसरातील निसर्गात जाणवलेले पालट !

१.अ.१. ‘वाराणसी येथील आश्रमाच्या प्रांगणात एक पेरूचे झाड आहे. या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात. या झाडाकडे पाहिल्यावर आनंद आणि उत्साह जाणवतो.

१.अ.२. आश्रमाच्या परिसरात आंब्याचे ४ वृक्ष आहेत. या वर्षी या वृक्षांना इतके आंबे लागले की, ते कसे संपवावे ? असा प्रश्न पडला.

१.अ.३. एरव्ही थोडी हवा आली, तरी आंबे पडत असत. यंदा हवा आली, तरी पिकण्यापूर्वी आंबे पडले नाहीत.

१.अ.४. यंदा एक दिवस लक्षात आले की, आंबे आता काढायला पाहिजेत. तसे नियोजन करायचे ठरवले. त्यानंतर १-२ दिवस झाले, तरी आंबे काढता आले नाहीत. शेवटी आम्ही या सेवेसाठी समयमर्यादा घातली आणि त्याच दिवशी सर्व आंबे काढून घेतले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी वादळ आले. जर आम्ही आदल्या दिवशी आंबे काढून घेतले नसते, तर एकही आंबा मिळाला नसता. त्या वेळी असे वाटले की, आमचे आंबे काढून होईपर्यंत देवानेच ते वादळ थोपवून ठेवले होते.

१.अ.५. आश्रमात एक जास्वंदीचे झाड आहे. त्याला अनेक वर्षांनी फुले आली. विशेष म्हणजे एकाच फांदीला २ रंगांची फुले होती. या वेळी आम्हाला जाणवले, ‘एका फुलात प्रभु श्रीरामाचे तत्त्व आहे, दुसर्‍या फुलात भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व आहे.’

१.अ.६. आपल्या शेजारच्या घरांच्या परिसरात असलेले बेल, जास्वंद, आंबे यांसारखे सात्त्विक वृक्षही आश्रमाच्या दिशेने झुकत आहेत.

१.अ.७. आश्रमाच्या परिसरात मुंगुस, खारुताई, मोर आदी पशू-पक्षी सहजतेने वावरतात. ‘त्यांना येथे वावरण्याचे जराही भय नाही’, असे जाणवते. एक दिवस एक सुंदर मोर आश्रमाच्या परिसरात आला होता. सर्वत्र फिरून तो आश्रमाच्या फाटकावर काही काळ बसला. आम्हाला मुंगुसाचेही दर्शन होते, हा एक आध्यात्मिक शुभसंकेत असतो.

निसर्ग, तसेच पशू-पक्षी यांच्याकडून या काही मासांत मिळणारे हे शुभसंकेत पाहून ‘देव या माध्यमातून त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे’, असेच वाटते.

१.आ. लादीवर पाण्यावर लाटा आल्याप्रमाणे तरंग येणे

वाराणसी आश्रमात जुन्या पद्धतीच्या ‘मोझॅक’ लाद्या (टाईल्स) आहेत. त्या लादीवर पाण्यावर लाटा जशा दिसतात, त्याप्रमाणे लाटा आल्या आहेत. रामनाथी आश्रमातील लाद्यांवर जसे पालट दिसून येतात, त्याचप्रमाणे हे पालट जुन्या प्रकारच्या लाद्यांवरही दिसून येतात. आश्रमातील आपतत्त्व वृद्धींगत झाल्याची ही अनुभूती आहे.

१.इ. आश्रमाचे नूतनीकरण करतांना सात्त्विक व्यक्ती धर्मकार्याशी जोडल्या जाणे

१.इ.१. मध्यंतरी वाराणसी येथील आश्रमाचे नूतनीकरण करण्यात आले. त्या नूतनीकरणाच्या कामासाठीही सात्त्विक कामगार मिळाले. त्यांपैकी काही कामगार आता गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत, तर काही कामगार नामजप करू लागले आहेत.

१.इ.२. नूतनीकरणासाठी ज्यांच्याकडून बांधकामाचे साहित्य विकत घेतले, ते वितरक आता पाक्षिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने देतात.

१.ई. नूतनीकरणानंतर साधक आणि धर्माभिमानी यांना आलेल्या अनुभूती

१.ई.१. धर्मप्रेमी काही कालावधीसाठी आश्रमात येतात, तेव्हा ‘आनंद जाणवणे’, ‘शांती अनुभवता येणे’ अशा प्रकारच्या अनुभूती येतात. ‘धर्माभिमानी त्यांची सेवा पूर्ण करून आश्रमातून जातांना त्यांच्यात काहीतरी परिवर्तन झाले आहे’, असे जाणवते.

१.ई.२. कोरोना महामारीमुळे काही साधक आश्रमात येऊ शकले नव्हते. ते २ वर्षांनंतर आश्रमात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘आम्हाला येथे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमासारखी अनुभूती येत आहे.’

१.ई.३. ‘आश्रमाच्या नूतनीकरणानंतर वाढलेल्या चैतन्यामुळे आश्रमातील साधकांची सेवा करण्याची क्षमता वाढली आहे’, असे जाणवते. वाराणसी येथील हवामान अत्यंत प्रतिकूल असते. तेथे हिवाळ्यात पुष्कळ थंडी असते, तर उन्हाळ्यात पुष्कळ उष्णता असते. याचा परिणाम सर्वांनाच जाणवतो. थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी उठून किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र ऊन असतांना समाजातही कोणीच बाहेर पडत नाहीत. आश्रमातील साधक मात्र सर्व स्थितीत सेवारत रहाण्याचा प्रयत्न करतात. साधकांना गुरुदेवांनी इतके बळ दिले आहे की, साधकांच्या सेवेत नैसर्गिक प्रतिकूलतेचा कोणताच अडथळा जाणवत नाही. ‘नूतनीकरणानंतर साधकांचे सेवाघंटेही वाढले आहेत’, असे लक्षात आले आहे.

– सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती. (२९.६.२०२२)

1 thought on “वाराणसी आश्रमातील बुद्धीअगम्य पालट”

  1. नित्य नूतन “सनातन” असा उच्चार केल्यावर चैतन्यच जाणवते, तर साक्षात श्री विष्णूस्वरुप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डाॅ. जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू.समर्थ सद्गुरु श्री भक्तराज महाराज यांच्या आशिर्वादाने समाज सहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृतिसाठी सनातन संस्थेची स्थापना केली.
    सनातन संस्थेचा प्रत्येक आश्रम, सेवा केंद्र, संत, साधक, सेवक, हितचिंतक हे ईश्वरी अंश आहेत.
    तेथे ईश्वरी चैतन्याची अनुभूती येणारच.

    Reply

Leave a Comment