दृष्ट काढण्यासाठी वापरले जाणारे घटक आणि दृष्ट काढण्याचे प्रकार

Article also available in :

या लेखात आपण मीठ-मोहरीने दृष्ट काढण्याच्या प्रकाराविषयी जाणून घेऊ.

दृष्ट काढण्याच्या विविध पद्धती

दृष्ट काढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या घटकांत रज-तमात्मक लहरी आकृष्ट करून त्या घनीभूत करून मग त्या उच्चाटन करण्याची क्षमता असावी लागते, तरच दृष्ट प्रभावी ठरू शकते. मुख्यत्वे मोहरी-मीठ, मीठ-लाल मिरच्या, मोहरी-मीठ-लाल मिरच्या, लिंबू आणि नारळ या घटकांचा वापर करून दृष्ट काढली जाते. बहुतांश दोन घटकांची संयोगिता ही कार्यातील वेगधारणा वाढवण्यासाठी वापरली जाते. मोहरी, मीठ, लाल मिरच्या आणि नारळ हे घटक त्यांच्या अंतःस्थ गुणधर्मांमुळे रज-तमात्मक लहरींना घनीभूत करून ठेवण्याचे सामथ्र्य दर्शवतात; म्हणून विशेषत्वाने हे घटक प्राधान्याने वापरले जातात.

१. मीठ आणि मोहरी यांच्या साहाय्याने दृष्ट काढण्याची पद्धत

पद्धत :

  • मीठ आणि मोहरी एकत्र करावी. मिठाचे प्रमाण जास्त आणि मोहरीचे प्रमाण अल्प असावे.
  • पाच बोटे जुळवून त्यात मावेल एवढी मीठ-मोहरी दोन्ही हातांत घेऊन हातांच्या मुठी कराव्यात.
  • वळलेल्या मुठी खालच्या म्हणजेच भूमीच्या दिशेने करून हातांची स्थिती ‘फुली’च्या आकारासारखी करून उभे रहावे.
  • त्यानंतर दृष्ट काढणार्‍या व्यक्तीने तिचे हात खालून वरच्या दिशेने गोलाकार पद्धतीने आतून बाहेरच्या दिशेने फिरवावेत.
  • दृष्ट काढून झाल्यावर मीठ-मोहरी निखार्‍यांवर जाळावी.

२. मीठ आणि मोहरी एकत्र का वापरतात ?

मीठ आणि मोहरी यांच्या साहाय्याने दृष्ट काढली असता स्थूलदेहावरील रज-तमात्मक आवरण मिठाच्या साहाय्याने खेचले जाऊन ते मोहरीमध्ये वेगवान लहरींच्या साहाय्याने घनीभूत होऊन नंतर अग्नीच्या साहाय्याने जाळून नष्ट केले जाते. स्थूलदेहावरील आवरण निघाल्यामुळे दृष्ट काढल्यानंतर शरिराला हलकेपणा येतो, तसेच शरिराच्या बधीरतेचे प्रमाणही उणावते.

३. मिठाचा वापर करण्याचे महत्त्व

शुष्क मिठाचा गुणधर्म वायूच्या साहाय्याने रज-तम गुणाला घनीभूत करण्याचा आहे. पाण्यात विरघळलेले मीठ हे संपर्कजन्यतेच्या स्तरावर अधिक उपयुक्त आहे. मिठाभोवती असणारा आद्र्रतादर्शक वायूकोष हा देहावर आलेले काळ्या शक्तीचे रज-तमात्मक आवरण खेचून घेण्यात अग्रेसर असतो. मीठ हातात घेऊन ओवाळण्याच्या प्रक्रियेतून कार्यरत होणार्‍या रजोगुणी लहरींच्या स्पर्शाने मिठाभोवती असणारा आद्र्रताजन्य वायूकोष कार्यमान होतो आणि त्याच्या संपर्कात असलेल्या जिवाच्या देहावरील रज-तमात्मक आवरण खेचून घेऊन त्याला आपल्या कोषात घनीभूत किंवा बद्ध करून ठेवतो. त्यानंतर या मिठातील आद्र्रताजन्य कोष अग्नीच्या संपर्कात आल्यावर नष्ट होतो आणि अशा प्रकारे त्यातील रज-तमात्मक लहरींचे विघटन होण्यास साहाय्य होते. दृष्टीच्या प्रक्रियेत मिठातील आद्र्रताजन्य कोष हा मुख्यतः विघटन करण्याच्या प्रक्रियेपर्यंत रज-तमात्मक लहरींचे एकत्रित वहन करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.

साध्या मिठाच्या तुलनेत खडे मीठ वापरणे का योग्य ?

साध्या मिठावर केलेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे त्याचे वाईट स्पंदने खेचून घेण्याचे प्रमाण खडे मिठापेक्षा अल्प होते.
खडे मीठ हे खड्यांच्या रूपात असल्याने वाईट स्पंदने धरून ठेवण्याची त्याची क्षमता ही साध्या मिठापेक्षा अधिक असते.

४. दृष्ट काढून झाल्यावर मीठ-मोहरी निखार्‍यांवर जाळण्याचे महत्व

अग्नी हा जसा विघटनाला पूरक आहे, तसा तो त्या त्या ठिकाणी घनीभूत असणार्‍या ऊर्जेच्या साठ्याला उद्दिपना देणाराही आहे. त्यामुळे मीठ आणि मोहरी यांनी आकृष्ट केलेल्या काळ्या लहरी अग्नीच्या स्पर्शाने प्रवाही बनून त्यातील तेजात भस्म होतात. तेव्हा विघटनात्मक प्रक्रियेच्या वेळी काळ्या शक्तीच्या तीव्रतेच्या प्रमाणात दुर्गंध सुटतो.

वैशिष्ट्य : मीठ आणि मोहरी अग्नीच्या स्पर्शाने लगेचच काळ्या शक्तीचे खेचलेले आवरण त्यागतात.

५. दृष्ट लागल्याचे प्रमाण किती आहे, हे कसे ओळखावे ?

दृष्ट लागलेली नसणे

दृष्ट लागलेलीच नसेल, तर मीठ आणि मोहरी यांचाच जळल्याचा वास येतो. तो दुर्गंधविरहित असतो.

मंद दृष्ट

कधी कधी मुळीच दुर्गंध येत नाही, त्या वेळी मोहरी आणि मीठ यांनी खेचलेल्या रज-तमात्मक लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने ते अग्नीत लगेचच भस्मसात होते. त्यामुळे तीव्र दृष्ट लागण्याच्या प्रमाणात वायूमंडलात स्थुलातून जाणवणारा तीव्र दुर्गंध निर्माण होत नसल्याने दुर्गंध येण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते. त्या वेळी मंद प्रमाणात दृष्ट लागलेली असते.

तीव्र दृष्ट

दुर्गंधाचे प्रमाण अधिक असेल, त्या वेळी तीव्र प्रमाणात दृष्ट लागलेली असते.

सूचना : वरील सूत्रात (मुद्यात) दिल्याप्रमाणे दृष्ट लागलेलीच नसेल, तर मीठ आणि मोहरी जाळल्यावर दुर्गंध येणार नाही. याचा अर्थ ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास नाही’, असा होतो; परंतु यानंतरही व्यक्तीला स्थुलातून त्रासाची लक्षणे जाणवतच राहिली, तर ‘दृष्ट निघालीच नाही’, असे समजावे आणि एक-एक घंट्याने (तासाने) दृष्ट काढत रहावी. तरीही दृष्ट निघत नसेल, तर दृष्ट काढण्यासाठी पुढच्या टप्प्याचे घटक उदा. नारळ वापरून पहावे. एवढे करूनही त्रास गेला नाही, तर त्याविषयी अध्यात्मातील जाणकार व्यक्तीला किंवा उन्नतांना विचारावे. ते सांगतील त्यानुसार आध्यात्मिक उपाय करावेत.

संदर्भ : दृष्ट काढण्याचे प्रकार (भाग १)