मायेतील बोलणे आणि अध्यात्मविषयक बोलणे यांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास

मायेतील बोलणे आणि अध्यात्मविषयक बोलणे यांचा
व्यक्तीवर होणार्‍या परिणामांचा 'इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग'
या वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचेवैज्ञानिकांना आवाहन

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला खोटे ठरवणारे असतात
तथाकथित 'पुरोगामी', तर अध्यात्म विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी सनातन संस्था आहे खरी पुरोगामी !

मनुष्यजन्माचे ईश्वरप्राप्ती, म्हणजेच मोक्षप्राप्ती हे परमोच्च ध्येय आहे. यासाठी साधना करण्यास सांगितले आहे. संसार करतांनाही, म्हणजेच संसारातील कर्तव्ये पार पाडतांनाही ईश्वरी अनुसंधानात रहाणे, त्याचे स्मरण करणे, केलेली कर्मे त्याला अर्पण करणे, आचारधर्माचे पालन करणे, असे जो करतो, त्याची साधना होते. अशी व्यक्ती संसारात राहूनही मायेपासून अलिप्त असते. अशा व्यक्तीचे बोलणेही मायेतील नसते, ते ईश्वराला स्मरूनच असते. याउलट साधना न करणार्‍यात मायेतील व्यक्तीचे बोलणे स्वविषयी, स्वार्थाविषयी असते. अशी व्यक्ती ईश्वरापासून दूर जाते.

येथे मानवाला धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने मायेतील बोलण्याचा, म्हणजेच स्वार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो आणि अध्यात्मविषयक, म्हणजेच परमार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अभ्यास १४.१.२००९ ते २३.२.२००९ या कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग (Electrosomatographic Scanning) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे करण्यात आला. यामध्ये केलेल्या प्रयोगांची माहिती येथे देत आहोत.

१. इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग
(Electrosomatographic Scanning) या वैज्ञानिक पद्धतीची ओळख

या स्कॅनिंग पद्धतीत संपूर्ण शरिरातील सर्व अवयव आणि संस्था यांच्या कार्याचा आलेख – इलेक्ट्रोसोमॅटोग्राम (Electrosomatogram – ESG) काढण्यात येतो. हा इलेक्ट्रोसोमॅटोग्राम काढण्यासाठी सर्वज्ञात असलेले हृदयालेख (ECG) आणि मेंदूआलेख (EEG) काढण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान वापरले जाते. या पद्धतीद्वारे व्यक्तीतील कुंडलिनीचक्रांच्या स्थितीचा अभ्यास करता येतो.


२. प्रयोग

हे प्रयोग १० साधकांवर, तसेच ४ संतांवर करण्यात आले. प्रथम त्यांच्या कुंडलिनीचक्रांच्या स्थितीच्या मूळ नोंदी घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी प्रथम मायेतील बोलणे हा प्रयोग केला आणि नंतर साधनेविषयी बोलणे हा प्रयोग केला. या प्रयोगांत त्यांच्या सप्तचक्रांवर होणार्‍या परिणामांच्या नोंदी इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग उपकरणाद्वारे ठराविक कालावधीने घेण्यात आल्या. त्यांची सप्तचक्रे मूळ स्थितीत येईपर्यंत या नोंदी घेण्यात आल्या. या नोंदी स्तंभीय आलेखांच्या आणि संख्यांच्या स्वरूपात प्राप्त होतात. या नोंदी कशा असतात, हे कळण्यासाठी येथे आपण प्रातिनिधिक स्वरूपात एका साधकाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या नोंदी बघूया. मायेतील बोलणे या प्रयोगात एका साधकाच्या सप्तचक्रांच्या मूळ नोंदींमध्ये कसा फरक पडला, हे यावरून लक्षात येईल.

प्रयोगामध्ये एखाद्या चक्राच्या नोंदीची संख्या त्या चक्राच्या मूळ स्थितीतील नोंदीपेक्षा न्यून होणे, म्हणजे ते चक्र निष्क्रीय होणे आणि याउलट ती संख्या वाढणे, म्हणजे ते चक्र सक्रीय किंवा कार्यरत होणे. वरील सारणीवरून मायेतील बोलणे या प्रयोगामध्ये सहस्रार, आज्ञा आणि विशुद्ध ही वरील तीन चक्रे निष्क्रीय झाली आहेत, असे लक्षात येते. वरील सारणीच्या संदर्भातील आलेख वरती दिला आहे.


३. प्रयोगातील निरीक्षणे

अ. साधनेविषयी बोलल्यावर १० साधकांपैकी ३ साधकांची सहस्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत या वरील ४ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली, तर ४ साधकांच्या वरील ४ आणि मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या खालील ३ चक्रांचीही निष्क्रीयता न्यून झाली.

आ. मायेतील विषयावर बोलल्यावर १० साधकांपैकी ५ साधकांच्या वरील ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली, तर ३ साधकांच्या खालील ३ चक्रांची निष्क्रीयता वाढली.

इ. तीन साधकांनी साधनेविषयी आणि मायेतील विषयावर बोलल्यावर त्या दोन्ही वेळी त्यांच्या कुंडलिनीच्या वरील ४ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली.

ई. दोन साधकांनी साधनेबद्दल बोलल्यावर त्यांच्या कुंडलिनीच्या वरील ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली; परंतु मायेतील विषयावर बोलल्यावर निष्क्रीयता न्यून झाली.

उ. दोन संतांनी साधनेविषयी बोलल्यावर त्यांच्या कुंडलिनीच्या वरील ४ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली; पण खालील ३ चक्रांची निष्क्रीयता वाढली, तर मायेतील विषयावर बोलल्यावर वरील ४ चक्रांची निष्क्रीयता वाढली; पण खालील ३ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली.

ऊ. दुसर्‍या दोन संतांनी साधनेविषयी बोलल्यावर त्यांच्या कुंडलिनीच्या सातही चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली; परंतु मायेतील विषयावर बोलल्यावर त्यांच्या कुंडलिनीच्या वरील ४ चक्रांची निष्क्रीयता न्यून झाली आणि खालील ३ चक्रांची निष्क्रीयता वाढली.

४. वैज्ञानिकांना आवाहन

या प्रयोगांचे निष्कर्ष आणि व्यक्तीवर होणारे परिणाम यांच्या संदर्भात सनातन संस्था संशोधन करत आहे. यामध्ये पुढील गोष्टीही अभ्यासणे चालू आहे.

अ. प्रत्येक वस्तूमध्ये सत्त्व-रज-तम या गुणांचे ठराविक प्रमाण असते आणि त्याचा इतर गोष्टींवर परिणाम होतो. तसा मायेतील बोलणे आणि साधनेविषयी बोलणे यांतील त्रिगुणांचा सप्तचक्रांवर काय परिणाम झाला ?

आ. व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीचा काय परिणाम होतो ?

इ. व्यक्तीच्या सप्तचक्रांवर सात्त्विकता किंवा असात्त्विकता यांचा वेगवेगळा परिणाम होतो का ?

या संशोधनातील निरीक्षणांमागची आध्यात्मिक कारणमीमांसा संत सांगू शकतात; पण सामान्यजनांना प्रयोगांचे निष्कर्ष वैज्ञानिक भाषेत कळावेत, यासाठी वैज्ञानिकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या विषयांवर शास्त्रीय संशोधन करणार्‍यांकडून साहाय्यता मिळाल्यास आम्ही आभारी होऊ. (संपर्क : पू. डॉ. मुकुल गाडगीळ, इ-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment