महाबळेश्‍वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय

Article also available in :

पुरातत्व विभागाकडून अत्यंत दुर्लक्षिले गेलेले महाबळेश्‍वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय !

हिंदूंनो, देवालयाच्या रक्षणासाठी संघटित व्हा !

महाबळेश्‍वर येथील दुर्लक्षित राहिलेले श्रीकृष्णामाईचे देवालय

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण, तसेच पर्यटनस्थळ आहे. तेथील जुने महाबळेश्‍वर हे क्षेत्र महाबळेश्‍वर या नावानेही ओळखले जाते. क्षेत्र महाबळेश्‍वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. महाबळेश्‍वराला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक हिंदू श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा देवालयाला भेट देतात; परंतु श्री महाबळेश्‍वर देवालयाच्या मागच्या भागात असलेल्या श्रीकृष्णामाईच्या देवालयात मात्र अल्प प्रमाणात भाविक /पर्यटक जातात. तेथे काही अंतर पायी गेल्यावर पोहोचता येते. कामानिमित्ताने महाबळेश्‍वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

 

१. देवालयाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

१. श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. हे देवालय पवित्र आणि चैतन्यमय असून ते एकप्रकारे जागृत तीर्थस्थानही आहे. जवळजवळ पाच सहस्र वर्षांपूर्वी पांडवांनी या देवालयाची निर्मिती केली आहे. संपूर्ण देवालय दगडांपासून निर्मित केलेले आहे.

२. तेथील गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. त्याच्या खालून पाण्याची सतत धार चालू असते. येथूनच कृष्णेचा उगम झाला आहे.

३. या ठिकाणी नामजप अथवा ध्यान करणार्‍या साधकाला येथील चैतन्याची अनुभूती सहजपणे येते. मोठ्याने ॐकाराचा जप केल्यास त्याची कंपने सहजतेने अनुभवायला येतात.

४. गर्भगृहासमोर एक कुंड आहे. त्या कुंडात गोमुखातून अखंडितपणे पाण्याची धार वाहत असते. तीच पुढे नदीरूपाने वाहत जाते. गोमुखातून वाहणारे हे पाणी म्हणजे चैतन्यमय तीर्थ आहे.

५. या देवालयासमोर मनमोहक असा नैसर्गिक देखावा आहे.

हे देवालय सद्यस्थितीत भारतीय पुरातत्व खात्याने अधिग्रहित केलेले आहे, तसेच पुरातत्व खात्याद्वारे हे अत्यंत दुर्लक्षित झाले आहे, असे लक्षात येते. या देवालयाच्या मागच्या बाजूने कळस आणि भिंतीच्या भागाची पडझड झालेली असून येथे कुठलीही सुधारणा वा दुरुस्ती केलेली आढळून येत नाही.

 

२. देवालय दुर्लक्षिले असण्याची आणि त्याला भेट देणार्‍यांची संख्या अल्प असण्यामागील कारणे

वर्षभरात लाखो पर्यटक महाबळेश्‍वर येथे येतात; परंतु त्यातील अल्प लोक श्री कृष्णामाईच्या देवालयाला भेट देतात. यामागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. येथील मुख्य दर्शनीय स्थळांमध्ये श्री कृष्णामाईच्या देवालयाचे नाव नाही.

२. देवालयापर्यंत जाणारा मार्ग कच्चा आहे. देवालयापर्यंत जाणार्‍या मार्गाची निर्मिती स्थानिक प्रशासनाने केलेली नाही. काही ठिकाणच्या पायर्‍या कच्च्या आहेत. प्रत्यक्ष देवालयाच्या परिसरात प्रवेश करण्यासाठीच्या पायर्‍याही केवळ दगड रचून केलेल्या आहेत.

way_to_krishnadevi_temple
श्री कृष्णामार्इ देवळाकडे जाण्यासाठी अरुंद वाट

३. स्थानिक मार्गदर्शक (गाईड) पर्यटकांना तेथपर्यंत नेत नाहीत.

४. हिंदूंची अनास्था : जे हिंदू या देवालयाकडे जातात, ते कृष्णामाईच्या दर्शनापूर्वी मार्गात लागणार्‍या स्ट्रॉबेरीच्या बागेत जाण्यास आणि तेथे वेळ घालवण्यास अधिक प्राधान्य देतात, तसेच देवालयासमोरील नैसर्गिक सौंदर्य बघणे आणि छायाचित्रे काढणे यांकडेही लक्ष देतात.

५. देवालयाची होणारी पडझड रोखण्यासाठी पुरातत्व खाते काहीही प्रयत्न करत नाही आणि इतरांनाही काही करू देत नाही.

६. देवालयाजवळ अथवा मार्गात कोठेही या देवालयाचे महत्त्व सांगणारा कोणताही फलक लावलेला नाही.

 

३. हिंदूंनो, आपल्या अस्मितेची प्रतीके असलेल्या चैतन्यमय स्थळांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाचा पाठपुरावा घ्या !

भारतीय पुरातत्व खात्याकडे देशभरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे उत्तरदायित्व असतांनाही ते हिंदूंची प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे अन् देवालये स्वत:च्या कह्यात घेण्याचेच कार्य करत आहे; परंतु हिंदूंच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या या स्थळांच्या देखरेखीविषयी मात्र उदासीनता दाखवत आहे. सद्यस्थितीत सहस्रो ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे भारतीय पुरातत्व विभागाच्या कह्यात आहेत.

हिंदूंनो, तुमच्या अस्मितेची प्रतीके असलेल्या स्थळांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाकडे आग्रह धरायला हवा. ऐतिहासिक आणि धार्मिक, तसेच चैतन्याचे स्रोत असलेली स्थळे / देवालये नष्ट होण्यापूर्वी जागृत होऊन आपल्या लक्षात आलेली आणि पुरातत्व खात्याद्वारे दुर्लक्षिलेली प्रत्येक वास्तू किंवा देवालयाच्या संदर्भातील माहिती लोकांसमोर आणा. यासाठी सनातन प्रभातसारखी नियतकालिके, तसेच इतर हिंदुत्ववादी प्रसिद्धीमाध्यमे यांचे साहाय्य घ्या. हिंदूंनी आग्रही होऊन पुरातत्व खात्यास हिंदूंच्या अस्मितेची प्रतीके असलेल्या चैतन्यमय स्थळांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी बाध्य करायला हवे !

– श्री. रवींद्र बनसोड, भांडुप