गोव्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिदिन १ घंटा नामजप करून समष्टी स्तरावर आपले योगदान द्या !

 

१. गोव्यात उष्णतेची लाट आली असणे

‘गोवा राज्यात उष्णतेची लाट आली असल्याने काय परिणाम होत आहेत ?’, हे आपण ५ मार्च २०२३ पासून पहात आहोत. वने, शेतातील गवत, घरे, दुकाने इत्यादींना आगी लागल्याच्या घटना घडत आहेत. सात दिवस झाले, तरी वनांतील आग आटोक्यात आलेली नाही. ‘उष्णतेची लाट येणे’, या नैसर्गिक आपत्तीमुळे काय होऊ शकते ?’, याचा अनुभव गोवावासीय घेत आहेत.

 

२. या आपत्कालीन परिस्थितीत गोवा शासनाने
जाहीर केलेल्या सूचनेचे पालन करण्याबरोबरच आध्यात्मिक
स्तरावरील उपाययोजना म्हणून देवाचा नामजप करून देवाला प्रसन्न करून घ्या !

‘उष्णतेची लाट येणे’ या आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केली पाहिजे ?’, याची सूचना गोवा शासनाने जाहीर केली आहे. त्याचे पालन लोकांनी करायचेच आहे. या आधिदैविक आपत्तीवर नुसती शारीरिक किंवा मानसिक स्तरावर उपाययोजना करून उपयोगाची नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही उपाययोजना केली पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील उपाययोजना म्हणजे देवाचा नामजप करून आणि देवाला शरण जाऊन त्याला प्रसन्न करून घेणे आणि नैसर्गिक आपत्तीला देवाच्या साहाय्याने थोपवणे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

 

३. उष्णतेची लाट थोपवून धरण्यासाठी समष्टी स्तरावरील
आध्यात्मिक उपाय म्हणून प्रत्येकाने  पुढील नामजप प्रतिदिन १ घंटा करावा !

उष्णतेची लाट थोपवून धरण्यासाठी ‘सनातन संस्थे’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने देवतांचा पुढील नामजप शोधून काढला आहे.

‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । ॐ नमः शिवाय ।’

हा ५ नामजपांचा मिळून १ नामजप आहे आणि तो दिलेल्या क्रमाने पुनःपुन्हा करावा. हा नामजप गोव्यातील प्रत्येकाने दिवसभरात १ घंटा केल्यास तो समष्टी स्तरावर नामजप होऊन त्याचा योग्य तो परिणाम आध्यात्मिक स्तरावर दिसून येईल आणि उष्णतेची लाट थोपवण्यात यश मिळेल. प्रत्येक जण हा नामजप जितका भावपूर्ण आणि आर्ततेने करेल, तितका लवकर परिणाम दिसून येईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने यासाठी  योगदान देऊन आपापला खारीचा वाटा उचलावा.

गोवा राज्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कुठे उष्णतेची लाट आली असल्यास तेथील लोकही हा नामजप प्रतिदिन १ घंटा करू शकतात.

 

४.  उष्णतेच्या लाटेचा परिणाम होऊन शरिरात आग आग होत असेल,
तर पुढील नामजप वैयक्तिक स्तरावरील आध्यात्मिक उपाय म्हणून १ घंटा करावा !

एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक स्तरावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम होऊन तिला शरिरात आग आग होत असेल, तर औषधोपचाराबरोबरच पुढील नामजपही प्रतिदिन १ घंटा करावा.
‘श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’

हा नामजपही ५ नामजपांचा मिळून १ नामजप आहे आणि तो दिलेल्या क्रमाने १ घंटा करावा.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (१३.३.२०२३)

 

Leave a Comment