तणावमुक्तीसाठी स्वभावदोष दूर करण्यासह गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. वैदेही पेठकर, सनातन संस्था

शिक्षकांना मार्गदर्शन करतांना सौ. वैदेही पेठकर, त्यांच्या बाजूला हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया, समितीचे कोषाध्यक्ष श्री. विष्णु उमडेकर आणि प्राचार्य श्री. जगदीश श्रीवास

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – आज व्यक्ती, परिवार, कार्यालय आणि समाज अशा प्रत्येक ठिकाणी तणाव दिसून येतो. या तणावामुळे व्यक्ती दु:खी असून त्याला जीवनाचा आनंद घेता येत नाही. एवढेच नाही, तर विद्यार्थीही तणावग्रस्त दिसून येत आहेत. हा तणाव दूर करण्यासाठी मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील दोषांवर परिणामकारक ठरणार्‍या गुणांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे आणि हे काम शिक्षकांच्या माध्यमातून होणे सहज शक्य आहे. त्यामुळे सनातन संस्था शिक्षक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैदेही पेठकर यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील वीरांगना लक्ष्मीबाई स्मारक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाला हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, विद्यालयाचे प्राचार्य श्री. जगदीश श्रीवास, वीरांगना लक्ष्मीबाई समितीचे सहसचिव श्री. हेमंत खेडेकर, समितीचे कोषाध्यक्ष श्री. विष्णु उमडेकर, तसेच विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.

व्याख्यानाला उपस्थित शिक्षक

सौ. पेठकर पुढे म्हणाल्या, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेनेही आपल्या आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अंगासह आध्यात्मिक अंग महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट केले आहे. अशा वेळी स्वतःच्या ऊर्जावान मनाला तणावामध्ये न ठेवता त्याचा विकास करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण केले, तर मनाची ऊर्जा व्यय न होता ती वाढेल आणि जीवन आनंदमय होईल.’’

सनातन संस्थेविषयी वीरांगना लक्ष्मीबाई स्मारक
उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पदाधिकार्‍यांनी काढलेले गौरवोद्गार !

या वेळी सहसचिव श्री. हेमंत खेडेकर म्हणाले, ‘‘आज विश्व आणि भारत यांची सध्याची परिस्थिती पालटण्यात सनातन संस्थेचे मोठे योगदान असेल. संस्थेचे हिंदु संस्कृतीचे आदान-प्रदानाचे कार्य कौतुकास्पद आहे.’’ प्राचार्य श्री. जगदीश श्रीवास म्हणाले, ‘‘आध्यात्मिक दृष्टीकोनातून स्वतःचे व्यवहार आणि जीवन यांच्यामध्ये साधनेच्या माध्यमातून कसा पालट करावा ? विद्यार्थ्यांच्या समस्या दूर कशा कराव्यात ? यासाठी आज सनातन संस्थेकडून कौतुकास्पद मार्गदर्शन प्राप्त झाले.’’

संपादकीय भूमिका

आध्यात्मिक दृष्टीकोनातून स्वत:चे व्यवहार आणि जीवन चांगले करण्यासाठी साधना करायला हवी !

Leave a Comment