सनातन संस्थेशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे संपादक दिनकर रायकर !

दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची सनातनचे संत पू. शिवाजी वटकर आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

दिनकर रायकर

 

१. प्रदीर्घ अनुभव असूनही अतिशय विनम्र व्यक्तीमत्त्व असलेले दिनकर रायकर !

दिनकर रायकर यांच्या निधनाची वार्ता ही सर्वांनाच धक्कादायक होती. ते ८० वर्षांचे होते. शेवटपर्यंत ते अथकपणे कार्यरत होते. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असूनही अतिशय विनम्र व्यक्तीमत्त्व असलेले त्यांचे उदाहरण विरळाच म्हणावे लागेल. ‘मी समूह संपादक आहे’, याचा अविर्भाव त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही दिसला नाही. वर्ष २००८ मध्ये प्रथमच माझा त्यांच्याशी संपर्क आला. कुणाचाही संदर्भ न घेता रायकर यांच्याकडे आम्ही गेलो होतो. तत्कालीन राज्य सरकारकडून सनातन संस्थेच्या कार्यात विविध प्रकारच्या अडचणी आणल्या जात होत्या.

श्री. अभय वर्तक

 

२. वस्तूनिष्ठता बाळगणारे संपादक !

रायकरसाहेबांना भेटल्यावर त्यांनी आमची (सनातनची) बाजू ऐकून घेतली. आम्हाला कोणत्याही दडपणाखाली ठेवले नाही. ‘सनातनचे कार्य कौतुकास्पद आहे’, हे त्यांचे बोल होते. सनातन आश्रमाचे सर्व कार्य त्यांती अतिशय आपुलकीने समजून घेतले. त्यानंतर त्यांना जे जे शक्य होते, ते ते साहाय्य त्यांनी वेळोवेळी केले.

 

३. सतत कार्यरत आणि मनमोकळे संपादक !

ते शेवटच्या श्वासापर्यंत ‘लोकमत’ वृत्तपत्रात कार्यरत होते. त्यांना अनेक वेळा मी म्हणायचो, ‘साहेब आता निवृत्त का होत नाही ?’ त्यावर ते म्हणत, ‘मी निवृत्त झालो, तर मी आजारी पडीन. मी नोकरी पैशांसाठी करत नाही. मला वेळ रिकामा घालवायला आवडत नाही. मी इकडे असलो की, सतत व्यस्त असतो.’ ते अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगत. ‘जीवनात माझ्यावर कसे प्रसंग आले ?’, ‘मी त्यातून काय शिकलो ?’ हे ते सांगत. ‘पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध अनुभवही ते मोकळेपणाने सांगत असत. त्यांच्या आणि माझ्या वयात बरेच अंतर असले, तरी आमच्यात अगदी मित्रत्वाचे नाते होते. त्यांना कोणतीही अडचण सांगितली, तरी ती ते पटकन् सोडवायचे. त्यांना शक्य नसल्यास ते मनमोकळेपणाने त्यातील अडचणी सांगायचे; पण त्यांनी कधीही आम्हाला अंधारात ठेवले नाही. प्रसंगानुरूप ‘आध्यात्मिक उपचार’ या विषयी चर्चा होत असे. त्यांनी नामजप करण्यास आरंभ केला होता. त्यामुळे त्यांना विविध अनुभूतीही येत.

 

४. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येणे राहून गेले !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची त्यांची इच्छा होती. कोरोना महामारीच्या संकटामुळे ते राहून गेले. याची हुरहुर मनाला कायमच राहील. धर्मप्रचारानिमित्त मी मुंबईबाहेर असलो, तरी त्यांच्याशी दूरभाषवरून संपर्क असायचा. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून दु:ख झाले. महाराष्ट्राने एक संवेदनशील आणि प्रगल्भ संपादक गमावला आहे. सनातन परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

– श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था, देहली.

५. सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी अनुभवलेले संपादक रायकर !

पू. शिवाजी वटकर

‘श्री. दिनकर रायकर वर्ष १९९२ पासून, म्हणजे ‘मुंबई येथील प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा होती’ त्या वेळेपासून सनातनला साहाय्य करायचे. ते त्या वेळी इंग्रजी दैनिक ‘दी इंडियन एक्सप्रेस’मध्ये संपादक होते. त्याचप्रमाणे सनातन संस्थेवर ज्या वेळी काही कठीण प्रसंग यायचे, त्या वेळी ते मोलाचे सहकार्य करत असत. जवळजवळ २५ वर्षे माझा त्यांच्याशी संपर्क होता आणि त्यांनी नेहमीच सकारात्मक राहून मला, सनातन संस्थेला आणि धर्मकार्याला साहाय्य केलेले आहे. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’

– पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment