वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा)

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आयुष्यभर समर्पित भावाने कार्य करणारे योद्धा संत ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते !

हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला. त्यांचे वय ८७ वर्षे होते. पू. वक्ते महाराज यांनी सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम केले. हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांना त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमी लाभत होते. राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१६-१७ या वर्षाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांना देण्यात आला होता.

देवता, धर्म, संत, व्रत, हिंदु धर्मग्रंथ यांचा अपमान करणार्‍यांविरोधात संपूर्ण आयुष्य संघर्ष करण्यात घालवणारे ते महाराष्ट्रातील योद्धा संत होते. धर्मावर टीका करणार्‍यांचे पू. वक्तेबाबा यांनी वेळोवेळी योग्य आणि परखड स्वरूपात खंडण केले. राष्ट्रभक्ती आणि जाज्वल्य धर्माभिमानाचे ते चालते बोलते प्रतीक होते. त्यांची कीर्तने आणि प्रवचने या मध्यमांतून ते धर्मावरील आघात अन् राष्ट्रावरील संकटे यांविषयी उपस्थितांना अवगत करत. धर्माचरण आणि राष्ट्रभक्ती करण्याविषयी ते लोकांना कळकळीने आवाहन करत. विशेषतः ‘मनुस्मृति का वाचली पाहिजे’, हे त्यांनी वेळोवेळी ठामपणे सांगितले.

१. पू. वक्ते महाराज यांनी वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षापासून कुटुंबियांसमवेत मुक्ताबाई आणि पंढरपूर येथील वारी करण्यास प्रारंभ केला होता.

२. ‘ब्रह्मचित्कला दर्शन’, ‘विठ्ठल कवच’, ‘विठ्ठल सहस्रनाम’, ‘विठ्ठल स्तवराज’, ‘विठ्ठल अष्टोत्तरनाम’, ‘विठ्ठल हृदय’, ‘मुक्ताबाई चरित्र’, ‘ज्ञानेश्‍वर दिग्विजय’, ‘वाल्मिकी रामायण’, ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन’ अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.

३. पू. वक्ते महाराज यांनी आरंभी सिद्ध करण्यात आलेला ‘जादूटोणा विरोधी कायदा’ कसा हिंदुविरोधी आहे, हे सातत्याने सांगितल्यामुळे त्यातील अनेक नियम शासनाला रहित करावे लागले.

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे धर्मकार्य

पवित्र ते कुळ, पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ।

वारकरी संप्रदायातील पितामह, परखड वक्ते, धर्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु धर्मभूषण, धर्मभास्कर, साधकांचे मायबाप, महाराष्ट्र्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले श्री गुरु ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते  यांनी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजे २१ डिसेंबर या दिवशी देह ठेवला. त्यांच्या चरणी शतशः नमन !

१. पूर्वायुष्य

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३४ या दिवशी खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे झाला. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी आजीसमवेत ६४ किलोमीटरची मुक्ताईची पायी वारी चालू केली. १२ ते १८ वर्षांपर्यंत त्यांनी गायींची सेवा केली. गायी चरत असतांना त्यांनी अडीच सहस्र अभंग पाठ केले. वर्ष १९५२ मध्ये श्री. विश्‍वनाथ पाटील यांची कन्या सुभद्रा हिच्यासमवेत त्यांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले आणि २ कन्या झाल्या. पू. वक्ते महाराजांमध्ये अभियंते, अधिवक्ते, आधुनिक वैद्य, शास्त्रज्ञ, तज्ञ, समाजसुधारक, राज्यकर्ते यांना सल्ला देण्याचे सामर्थ्य होते.

२. अध्ययन आणि अध्यापन

वर्ष १९५४ ते १९५८ या काळात ते साखरे महाराज मठात आळंदी येथे राहिले. श्री गुरु नीलकंठ मोडक यांच्याकडे पू. वक्ते महाराजांनी अध्ययन केले. वर्ष १९५७ ते १९९२ या कालावधीत त्या काळातील थोर पंडित संत-महात्मे, ह.भ.प. परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारूरकर, गोपाळ शास्त्री आदी अनेकांकडे संस्कृत आणि प्राकृत प्रस्थानत्रयी, धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ, पुराण ग्रंथ यांचा पंढरपूर येथे अभ्यास केला. अध्ययन-अध्यापनाचे चातुर्मासामध्ये ६० वर्षांपासून कार्य चालू आहे. ४ मास पंढरपूर आणि ८ मास संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कीर्तन, प्रवचन, भागवत, रामायण कथा यांचे कार्यक्रम केले.

३. ह.भ.प. (पू.) वक्ते महाराजांनी केलेले धर्मकार्य

‘धर्माचे पालन करणे पाखंड खंडण ।’, हे त्यांच्या जीवनात घेतलेले व्रत आहे.

अ. ‘रीडल्स इन हिंदुइझम्’ आणि हिंदु धर्मावर केलेल्या सहस्रो आरोपांचे खंडण ‘रामायण भाष्या’मध्ये करून पू. वक्ते महाराजांनी जगावर मोठे उपकार केले आहेत.

आ. ‘संत तुकाराम महाराज खून कि वैकुंठगमन’ या पुस्तकाची शासनाकडे तक्रार करून सर्व आक्षेपांचे खंडण केले आणि ‘वादात हरलो, तर अग्निकाष्ठ भक्षण करीन’, अशी प्रतिज्ञा पू. वक्ते महाराजांनी केली.

इ. धर्मरक्षणार्थ श्रीक्षेत्र आळंदी येथे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन केले.

ई. प्रारंभीचा जादूटोणा विरोधी कायदा हा हिंदु धर्माविरुद्ध आहे, हे सिद्ध करून दिले आणि वारकर्‍यांमध्ये जनजागृती केली.

उ. श्रीराम सेतू सिद्ध ऐतिहासिक असल्याचे दाखले गोळा करून राष्ट्रपतींना पत्र पाठवले.

ऊ. महानुभव पंथियांनी लिहिलेल्या वारकरी संप्रदायाच्या अपकीर्तीजनक पुस्तकांचे खंडण लिहिले.

ए. अंनिसच्या हिंदु धर्माविरुद्धच्या ७ पुस्तकांचे एका साप्ताहिकामधून खंडण दिले.

ऐ. अंनिसचे गणपतीची मूर्ती दान घेणे आणि गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन अभियान उधळून लावले.

ओ. डाऊ आस्थापन हटवण्यासाठी आळंदी अधिवेशनात प्रथम निषेध ठराव मांडला.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील कुंभमेळ्यामध्ये अनेक शास्त्री, पंडित, धर्माचार्य, महामंडलेश्‍वर मुख्य होते. त्यांना वारकर्‍यांच्या वतीने २८ प्रश्‍न केले. पांढर्‍या वेशातील हे खरे संन्यासी आणि विद्वान असून ४ पिठांच्या शंकराचार्यांनी त्यांचा महावस्त्र आणि दक्षिणा देऊन सर्वांसमोर सन्मान केला होता.

४. ह.भ.प. (पू.) वक्ते महाराजांची ग्रंथसंपदा

विठ्ठलकवच, विठ्ठल हृदय, मुक्ताबाई चरित्र, ज्ञानेश्‍वर दिग्वीजय (ओवीबद्ध टीका) आदी पू. महाराजांच्या ग्रंथांतून मानवाला सदाचार, भक्ती, ज्ञान, धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, स्वामीभक्ती यांचा प्रकाश मिळतो. त्यांच्या ऋणातून देशबांधव आणि धर्मानुरागी कधीच मुक्त होणार नाहीत.

५. पू. महाराजांच्या जीवनातील ईश्‍वरी कृपेची घटना

महाराजांना ज्ञानवर्धक ग्रंथ शिकण्याची आवड होती; पण ते कळत नव्हते. अचानक एकदा एक ब्राह्मण विठ्ठल मंदिरासमोर आला. त्याने गुरुवार करण्याचा उपदेश करून आशीर्वाद दिले. महाराजांनी त्याला विचारले, ‘‘आपण कुठे रहाता ?’’ तो म्हणाला की, मी २४ घंटे मंदिरात रहातो. नंतर महाराजांनी चौकशी केली; पण ते गृहस्थ भेटले नाहीत. विठ्ठलच त्या रूपात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

महाराजांच्या कार्याविषयी महाराष्ट्रातील तमाम भाविक, भक्त, वारकरी आणि सर्व संघटना यांच्या वतीने त्यांच्या चरणी कृतज्ञता ! आणि अनंत लोटांगणे !

– ह.भ.प. गोविंद महाराज हांडे, नगर

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे संतपद घोषित !

ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज (डावीकडे) यांचे औक्षण करतांना परात्पर गुरु पांडे महाराज (वर्ष २०१६)

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी वर्ष २०१६ मध्ये सनातनच्या देवद येथील आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळीच त्यांचे संतपद घोषित करण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला. सन्मानप्रसंगी सनातनचे पू. (आताचे सद्गुरु) राजेंद्र शिंदे यांनी ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराजांविषयी माहिती कथन केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘धर्मप्रसाराचे कार्य धडाडीने करणारे, धर्मद्रोही आणि विद्रोही यांच्या लिखाणाचे खंडण करणारे ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते हे आधीपासूनच संतपदावर पोचलेले आहेत.’’

सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र पाहून ‘ते माझे रूप आहे’, असे सांगणे !

सनातनच्या आश्रमदर्शनाच्या वेळी ध्यानमंदिरातील सनातननिर्मित श्री दुर्गादेवीचे मारक रूपातील चित्र पाहून ‘‘हे माझेच रूप आहे’’, असे ते म्हणाले. ‘सनातनच्या सात्त्विक गणेशमूर्तीविषयी सनातनने प्रबोधन केल्यानेच समाजात चांगला पालट दिसून येतो’, असेही त्यांनी सांगितले.

सनातन संस्थेविषयी ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांनी काढलेले गौरवोद्गार !

आज धर्मप्रचार करणार्‍या अनेक संघटना आहेत; पण त्या केवळ प्रसंग आणि घटना यांना धरून प्रचार करतात. सनातन संस्थेला ईश्‍वरी अधिष्ठान आहे. त्यामुळे संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतर सगळे केवळ प्रचारक आहेत. सनातन संस्थेचे साधक उपासक आहेत ! सनातनचा आश्रम म्हणजे ऋषिमुनींचा आश्रम आहे. प्रत्येक साधकाचे वागणे, बोलणे, सेवा करणे धर्मशास्त्राला धरून आहे.

सनातन प्रभातविषयी काढलेले गौरवोद्गार

सनातन प्रभात हे जगातील एकमेव दैनिक आहे. तेच धर्माविषयी उघडपणे कटू सत्य मांडते.

‘तुम्ही पुष्कळ मोठे ईश्‍वरी कार्य करत आहात’, असे म्हणून सनातनच्या साधकांना आश्‍वस्त करणारे पू. वक्ते महाराज !

१. पू. वक्ते महाराज यांचे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्याविषयी पू. वक्ते महाराजांच्या मनात श्रद्धा होती. त्यांना परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्याविषयी आदर होता.

२. जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या भूमिकेला पू. वक्ते महाराजांनी नेहमीच पाठिंबा दिला. या कायद्याच्या विरोधातील आंदोलन असो अथवा मुख्यमंत्र्यांची भेट असो किंवा पंढरपूरमध्ये वारीच्या काळात सर्व महाराजांची घेतलेली बैठक असो यांमध्ये पू. वक्ते महाराज यांचा सक्रीय सहभाग असायचा.

३. पू. वक्ते महाराजांना सनातनचे साधक भेटायला गेल्यावर ‘साधक कुठे रहात आहेत ?’, ‘साधकांची रहण्याची व्यवस्था झाली आहे ना ?’, ‘त्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे ना ?’, याची ते नेहमी आपुलकीने चौकशी करत असत. ते साधक आणि कार्यकर्ते यांना कौतुकाने म्हणत, ‘‘तुम्ही पुष्कळ मोठे ईश्‍वरी कार्य करत आहात.’’

४. त्यांनी अनेक वेळा हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमांना मुक्ताबाई मठही उपलब्ध करून दिला आहे.

५. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात त्यांनी तळमळीने त्यांची परखड मते वारंवार समाजासमोर मांडली.

६. दैनिक ‘सनातन प्रभात’चे ते नियमित वाचक होते. त्यांचे मूळ गाव असलेल्या टाकळीहाट (शेगाव) येथे त्यांच्या कुटुंबातील आणि गावातील लोकांना सनातन संस्थेचे धर्मकार्य कळावे यासाठी त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ स्वखर्चाने चालू केले होते.

ह.भ.प. (पू.) वक्ते महाराज यांच्या देहत्यागाविषयी वाहिलेली श्रद्धांजली

धर्मावर होणारी आक्रमणे रोखणारा धर्मयोद्धा हरपला ! – हिंदु जनजागृती समिती

‘धर्माचे पालन । करणे पाखंड खंडण ॥’ हा धर्मरक्षणाचा बीजमंत्र घेऊन अखंडपणे कार्यरत रहाणारे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू पूज्य निवृत्ती महाराज वक्ते यांच्या देहत्यागामुळे धर्मावर होणारी आक्रमणे रोखणारा एक लढवय्या धर्मयोद्धा हरपला, अशा भावपूर्ण शब्दांत हिंदु जनजागृती समितीने आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

समितीने म्हटले की, बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेले पूजनीय वक्ते महाराज यांनी श्रीक्षेत्र पंढरपूरातील मुक्ताई मठात राहून महाराष्ट्रभरात धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांचे मोठे कार्य केले. कीर्तन-प्रवचनांतून, तसेच अनेक जाहीर सभांतून पूज्य वक्ते महाराज यांनी तरुणांमध्ये धर्मप्रेम वाढवण्यासह धर्मद्रोही विचारांचे खंडणही केले आहे. वारकरी संप्रदायातील संतविभूती म्हणून परिचित असलेल्या महाराजांचे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याशी जवळचे संबंध होते. धर्मविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असो कि पुरोगामी आणि नास्तिक यांनी धर्मावर केलेली टीका असो या सर्वांच्या विरोधात पूजनीय वक्ते महाराज मैदानात उतरले. अनेक प्रसंगी पदरमोड करून महाराष्ट्रभरात जनजागृती केली. प्रतिवर्षी आळंदी, पंढरपूर वा पैठण येथे वारकरी अधिवेशन बोलावून हिंदु धर्मावर होणार्‍या विविध आघातांच्या विरोधात लढण्यासाठी ते वारकर्‍यांना कृतीशील करत असत. त्यांचे वय झालेले असतांना ऊन, वारा, पाऊस, थंडी आदींचा विचार केला नाही. धर्मरक्षणासाठी कार्यरत राहणार्‍या या संतविभूतीचा सन्मान करण्याचे भाग्य हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना लाभले. सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे (पूज्य) शिवाजी वटकर यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला.

पूज्य वक्ते महाराज यांचा वेद, स्मृती, पुराणे आदींचा केवळ गाढा अभ्यास नव्हता, तर ते चालते-बोलते विद्यालयच होते. तसेच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे लिखाणही केले होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त झाला होता. संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनावर टीका करणारे असोत कि हिंदूंच्या धर्मग्रंथांवर अश्‍लाघ्य टीका करणारे नास्तिक असोत, महाराजांच्या सडेतोड वैचारिक प्रहारांतून कोणीही सुटत नसे. पूज्य वक्ते महाराजांनी अनेक वारकर्‍यांमध्ये धर्मप्रेम निर्माण करून त्यांनाही धर्मरक्षणासाठी कृतीशील केले आहे. पूज्य वक्ते महाराजांचे हे धर्मरक्षणाचे कार्य पुढे चालवणे हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल !

वारकरी संप्रदायाची संरक्षक भिंत ढासळली ! – आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची संरक्षक भिंत ढासळली आहे. समाजात महाराजांचा वैचारिक ठेवा तेवत ठेवण्याचे दायित्व सर्वच संप्रदाय मंडळींचे असणार आहे.

आपले विचार आम्हाला नेहमी पथदर्शन करतील ! – ह.भ.प. (सौ.) डॉ. नीलमताई पाचुपते (येवले, मुंबई)

हे दु:ख कायम राहील की, ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज यांची प्रत्यक्ष भेट कधी होऊ शकली नाही, तरी त्यांची तेजस्विता नेहमी जाणवली. स्पष्टवक्तेपणा, वारकर्‍यांविषयीची तळमळ यांसाठी आम्हाला (पू.) निवृत्ती बाबांचे उदाहरण देण्यात आले. त्यांचेे विचार आम्हाला नेहमी पथदर्शन करत रहातील.

पू. वक्ते महाराज यांनी वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले होते ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

पू. वक्ते बाबा हे वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य होते. त्यांनी हिंदु धर्मावर होणारा अन्याय कदापि सहन केला नाही. त्यांचे व्यक्तीमत्त्व त्यागी होते. त्यांनी वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले होते. अशी व्यक्ती जाण्याने वारकरी संप्रदायाची पुष्कळ मोठी हानी झाली आहे. आताच्या कालखंडात पू. बाबांसारखे व्यक्तीमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांनी हिंदु धर्माचे रक्षण होण्यासाठी पुष्कळ मोठे कार्य केले आहे.

वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे ! – ह.भ.प. राणा महाराज वासकर, पंढरपूर

वारकरी संप्रदायातील धर्माचार्य, धर्मवेत्ता आणि कट्टर वारकरी असा एक धर्मसूर्य ज्यांनी पंढरीचे आणि वारकर्‍यांचे महत्त्व वाढवण्यासाठी देह झिजवला. त्यामुळे वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे. त्यांची उणीव भरून न येणारी आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट केले आहे, ‘वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, अखंड ज्ञानदानपरायण, तसेच शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार प्राप्त झालेले ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’

 

Leave a Comment