श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी, कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) – भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल, गार्‍हाण घालल. कोरोना माझ्या पायाशी घेईन, त्याचं गाडप (नष्ट) करीन. ३३ कोटी देवांच दरबार बंद पडल्यात. खडकाचा दरबार (जिथे यात्रा होते, जिथे भाकणूक होते ते ठिकाण) उघडा आहे. चालू राहील, ही धर्माची गादी हाय. ‘धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा’, असे आशीर्वचन श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाने भक्तांना दिले. ही भाकणूक ३ नोव्हेंबर २०२० या दिवशी पहाटे ४.१५ वाजता पू. भगवान वाघापुरे (डोणे) महाराज यांच्या माध्यमातून सांगण्यात आली.

​या भाकणुकीत ‘भगवा झेंडा राज्य करील, शत्रूराष्ट्र चीन भारतावर आक्रमण करील, भारत-पाक सीमेवर रण चालेल, पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल, स्त्रीवर्ग राजकारणात बाजी मारेल, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, मुसलमान राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशावरून पुसून जातील’, असे पुढे सांगण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांमुळे या वेळी आप्पाचीवाडी, कुर्ली, रायबाग, चिक्कोडी, निपाणी, संकेश्‍वर, कोल्हापूर आदी गावांतील भक्तगण अल्प संख्येत उपस्थित होते.

​श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ! (ही भाकणूक कशा स्वरूपाची असते, हे सर्वांना कळावे, यासाठी ती येथे आहे तशी प्रसिद्ध करत आहोत. या भाकणुकीचा सर्वसाधारण अर्थ वाचकांना समजावा, यासाठी त्यातील काही वाक्यांचा अर्थ कंसामध्ये दिला आहे. – संपादक)

(संकलक : सेवेकरी श्री. वीरभद्र विभूते आणि श्री. राजेंद्र विभूते, कुर्ली, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव.)
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे खडक मंदिरात भाकणूक सांगतांना पू. भगवान डोणे महाराज आणि उपस्थित भाविक

 

१. आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल ।

​काढावं काढावं पोथी पुराण काढावं, वाचून दाखवाव, भर सभेत बोलवं. खोटं तू बोलशील सिद्धा खरं मी करीन, सादर राहीन. चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन अगा ये गा बाबा, धरतो हालसिद्धाआप्पा मेघ यान माळा माझ्या आकाशाच्या फळा अमृताच्या धारा मेघ उदंड आहे. बांधा आड बांध, शिवा आड शिव (एका शेतात पाऊस पडेल, तर शेजारच्याच एका शेतात पाऊस पडणार नाही, तसेच एका गावात पाऊस पडेल, तर शेजारच्याच दुसर्‍या गावात पडणार नाही. म्हणजे श्री हालसिद्धनाथांनी सध्याची पाऊस पाण्याची परिस्थिती सांगितली आहे.), मेघाची कावड गैरहंगामी उदंड. (नको असेल, त्या वेळी पाऊस पडेल म्हणजेच अवेळी पाऊस पडेल. जो सध्या पडत आहे.)

​मेघाच्या पोटी आजार आहे. (पूर्वी पाऊस योग्य त्या वेळी योग्य त्या मासात पडत असे. याउलट सध्या मानवनिर्मित प्रदूषणामुळे पावसाचे पाणीही प्रदूषित होत आहे. त्यामुळे ‘मेघाच्या पोटी आजार आहे’, असे म्हटले आहे.) पिक पाण्यावर, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. दुनिया न्याहाळू लागलाय. त्याच्या मागं अंधार म्होरं अंधार पडलाया. (सध्याच्या जनतेच्या पापकर्माचा अंधार पडला आहे.) कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय. नऊ दिन नम, सात दिन भोंब बरोबर हाय. (ज्याप्रमाण नवरात्र नऊ दिवस असते, तशी देवाची यात्रा सात दिवस असते.) वाडी कुर्लीचा अगाध मोठा, जगात झेंडा (वाडी कुर्लीचा महिमा मोठा असून त्याची कीर्ती जगात पसरेल.) भोंबच्या पुनवला माझा सोहळा निघतोया (कोजागरी पौर्णिमेला माझी यात्रा होते.) चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय. (या ठिकाणी नाथांची संजीवन समाधी आहे.) कारीच्या माळाला (देवांचे विश्रांतीसाठी असलेले एक ठिकाण.) माझी विश्रांती हाय. खडकाच्या माळाला भाषण चाललया (ज्या ठिकाणी यात्रा भरते ते ठिकाण, म्हणजेच भाकणूक ज्या ठिकाणी होते ते ठिकाण), खडकाच्या माळाला फार पूर्वीच्या काळाला आसन टाकलयां निशाण रोवलया. (फार पूर्वीपासून देवांचे निवासस्थान या ठिकाणी आहे. माझे हेच स्थान आहे, असे देव सांगत आहे.)

​माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. खडकाच्या माळाला ३३ कोटी देवांचा दरबार भरलाय. कांबळ्याच्या खोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड (संपूर्ण विश्‍वात ज्या घडामोडी चालू आहेत त्यावर देवाचे नियंत्रण आहे.) करत बसलोय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी तीर्थक्षेत्र प्रतिशिर्डी होईल. तिरुपती बालाजीचा इथं अवतार हाय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी वाडी कुर्लीच आगार हालसिद्धनाथाच दरबार, हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील.

 

२. हालसिद्धनाथाचा त्रिभुवनात जयजयकार चाललं ।

​पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील. (भंडार्‍याचा (भंडारा पिवळ्या रंगाचा असतो) महिमा सर्वत्र पसरेल) हालसिद्धनाथाचा त्रिभुवनात जयजयकार चाललं. वाडी-कुर्लीच्या पुजारी मानकर्‍यांना माझा आशीर्वाद हाय. वाडी-कुर्लीच्या छबिन्यात फूट पाडशिला, तर यमपुरी पाहशीला. भोळा शंकर हालसिद्धनाथांचा धावा करल, गार्‍हाण घालल. कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन, त्याच गाडप (नष्ट) करीन. ३३ कोटी देवांच दरबार बंद पडल्यात. खडकाचा दरबार उघडा आहे. चालू राहील, ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा.

 

३. देवधान्य बहुत पिकेल, राजधान्य उदंड पिकेल ।

​पिंजर्‍यातला राघू भाषण करील, (देवाचा ‘संचार’ झाल्यावर अवस्था कशी असते त्याची कल्पना देणारे वाक्य – देह म्हणजे पिंजरा. या पिंजर्‍यात ज्याला सूक्ष्म ज्ञान आहे, असा आत्मा प्रवेश करून ही भाकणूक करतो.) अश्‍विनी, भरणी, कात्या, कृतिका, रोहिणी मिरगाच्या बहिणी, सरती रोहिणी निघता मृग कोकण बंधारी कुरी मिरवेल. (कुरी म्हणजे पेरणी यंत्र म्हणजे त्या भागातील पेरणी होईल) बांधा आड बांध, शिव आड शिव. रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा. हातात भाकरी खांद्यावर चाबूक. सरता मृग निघत्या आडद्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल. (सरता मृग म्हणजे नक्षत्राचा शेवटचा भाग आणि आडद्रा नक्षत्राचा प्रथम भाग होय.  शेतकर्‍यांना केलेले हे मार्गदर्शन आहे. मृगाचा शेवटचा भाग आणि निघत्या आडद्रा म्हणजे आद्रता नक्षत्राचा प्रथम) सरत्या आडद्रा निघता तरणा आलम दुनियेचा पेरा होईल. (जगाचे देवाने तीन भाग केले असून पहिल्या भागाला कोकण विभाग, दुसरा मध्य, उर्वरित भाग म्हणजे आलम दुनिया.) कुरी थार्‍याला बसेल. (यावर्षीचे काम पूर्ण झाल्यावर कुरी जाग्यावर बसेल म्हणजे आता याचे काम पुढच्या वर्षीचे असेल.) रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल. (दीर्घकालीन पिकासाठी पूरक असा पाऊस होईल.) देवधान्य बहुत पिकेल (तांदूळ भरपूर पिकेल), राजधान्य उदंड पिकेल (जोंधळा भरपूर पिकेल), धारण धोरण जगाचं जीवन. (या धान्याचा दर ठरवण्याची प्रक्रिया त्यावर अवलंबून आहे, असे धोरण. ज्यावरच शेतकर्‍याचे पुढचे सगळे अवलंबून असते.) खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणतील. तीन मापटी म्हणता शेरावर येईल, शेर म्हणता मापट्या-चिपट्यावर येईल. (धान्याचा दर सर्वसाधारण राहील. तो तीन मापटी म्हणजे सर्वसाधारण दोन किलो धान्य होय !)

 

४. मूग, कडधान्य, तूर, सोयाबीन उदंड पिकल, डाळीचा भाव तेजीत राहील ।

​खरीप भोरीप बहुत उदंड जमिनीला धान्य बहुत बेईमान. तांबडी रास मध्यम काळी रास सुफळ, मूग, कडधान्य, तूर, सोयाबीन उदंड पिकल, डाळीचा भाव तेजीत राहील. पांढर धान्य उदंड पिकल. गोरगरिबाला पुरावा करल. दीड महिन्याच धान्य इथून पुढ पिकल, तांबडी कळी मध्यम पिकल, ताजव्यातून जोखल.(मिरची मध्यम पिकेल; पण दर चांगला मिळेल.) धान्य दारात वैरण कोणात, वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा. (पूर्वी काळ असा होता की धान्य घरी असायचे आणि वैरण हे रानात असायचे. यापुढे काळ असा येइल की एकवेळ धान्य शेतात राहील; पण वैरण जपून ठेवावी लागेल. म्हणजे वैरण अल्प होईल, असे देवाला सांगायचे आहे.)

 

५. दिवसाढवळ्या डाके-दरोडे पडतील, लुटालुट होईल ।

​महाराष्ट्र राज्यात एन्रॉनची वीज येईल, विजेअभावी जनजीवन विस्कळीत होईल. दिवसाढवळ्या डाके-दरोडे पडतील, लुटालुट होईल. सीमाप्रश्‍न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील. सीमाभागात मोठा गोंधळ माजल. निपाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील, जाळपोळ करतील, कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठ भगदाड पडल. कर्नाटक राज्याचा चौथाई कोना ओसाड पडल, जलमय होईल. (सर्वसाधारणपणे शत्रूने बाँबवर्षाव केल्याने एखादे मोठे धरण फुटून कर्नाटक राज्यातील एक चतुर्थांश भाग ओसाड पडेल, अशी आम्हाला दाट शक्यता वाटते. – संकलक)

 

६. उसाच्या काड्यांन दुधाच्या भांड्यान राजकारणाला मोठी कलाटणी लागल ।

​उसाच्या काड्यांन दुधाच्या भांड्यान गावागावांत, तालुका, जिल्ह्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल. (प्रत्येक वर्षी उसाचे आंदोलन होते. यामुळे गाव-तालुकास्तरावरील राजकारण पालटत जाते. सत्ताकेंद्र पालटत जाईल.) सत्तेसाठी भांडून खेळतील. शेतकरीवर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करतील. कष्ट करून गुरढोर घेतील. उगानिगा करतील, उगानिगा करून दूध काढतील. (वैरण आणण्यापासून ते गुरांना घालण्यापर्यंत, जनावरांचे पालनपोषण करून शेतकर्‍यांच्या हातात प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही.)

​दूध काढून डेरीला घालतील, डेरीचा मॅनेजर मलई खाईत राहील. गुर राखणारा कर्जात राहील, गाई-म्हशींचा भाव गगानाला भिडल. शर्यतीतला बसवा तुम्हाला शाप देईल.(बैलगाड्यांच्या शर्यतीला आता हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. शर्यतीत बैल जिंकण्यासाठी बैलाला मद्य पाजणे, बैलाला मारणे अशी बैलाची छळवणूक केली जाते. यामुळे बैलाचा शाप अशा लोकांना लागेल.) दुधाचा भाव वाढत राहील. तुम्ही नेसाल जरीकाठी आई-बापाला सतरा गाठी धडूतं मिळतील. (माणसाचे जग आता मी, माझी बायको, माझी मुले एवढ्यापुरते मर्यादित राहिले आहे.) ऊसाचा काऊस होईल. सडकंवर पडेल. (उसावर जर रोगराई वाढली, तर ऊसाला दर मिळणार नाही. तो ऊस कुणी घेणार नाही. असा ऊस शेतातही ठेवणे शक्य नसल्यामुळे तो ऊस नाईलाजास्तव रस्त्यावर टाकून द्यावा लागेल.)

 

७. धरणीमाता दुभंगून जाईल ।

नदीकाठची जमीन ओसाड पडेल. १२ वर्षांची मुलगी आई होईल. कानानं ऐकशिला, डोळ्यान बघशीला, नीतीमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय. उगवत्या सूर्याला संकट पडलया. (आताची एकूण परिस्थिती पहाता नीतीमत्तेचा र्‍हास, मनुष्याचे अधर्माने वागणे, त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी वाढणे आदींमुळे पृथ्वीचा तोल ढासळत आहे.) जाती-धर्म बाळांनो, बिघडत जातील. जाती-धर्मात वैरत्व वाढल, हाणामार्‍या होतील. पारवं फुल सुफल जाईल, पिवळं फूल उदंड पिकेल मोलानं विकेल, पांढरं फूल मध्यम पिकेल, जांभळ फूल उदंड पिकेल. (वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असून त्या त्या पिकांप्रमाणे त्या त्या फुलांचा रंग असेल. ‘ज्या रंगाची फुले उदंड पिकतील’, असे म्हटले आहे, त्या धान्याचे पीक भरपूर होईल. मध्यम पिकेल म्हणजे ते धान्य मध्यम प्रमाणात येईल.)

 

८. पाकिस्तान देशाचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल ।

मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही. छातीची ढाल करील. पाकिस्तान राष्ट्राशी लढत राहील. पाकिस्तान देशाचा चौथाई कोना ओसाड पडेल (पाकिस्तानशी युद्ध होईल आणि यात इतकी मनुष्यहानी होईल की, पाकिस्तानचा एक चतुर्थांश भाग ओसाड पडेल. – संकलक) आणि भारताच्या ताब्यात येईल. भारतमातेचा तिथं जयजयकार चालंल.

 

९. कपडा-लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल ।

लुगडी-घोंगडी, कपडा-लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल. सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल (मेंढीचे महत्त्व वाढेल, तर सुती कपड्यांना अधिक महत्त्व रहाणार नाही.), जग दुनियेत एक मोठं नवल होईल, मेंढीच्या पोटाला एक मुलगा जन्माला येईल. हे म्होरल भविष्य हाय. (‘पुढे मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल’, असे देवाला सांगायचे आहे.’ – संकलक) मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय, मेंढी माऊली मेंढक्याला जगदुनिया दाखवील. (मेंढीमुळेच मेंढपाळाला जग पहायला मिळते.)

मेंढीमाऊली मेंढक्याची सुखाची सावली होईल. मेंढीबाईला कलम करतील. मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात खेळेल. मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील. मेंढीबाई पालखीतून मिरवल. मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल. (पूर्वी श्रीमंत घरातील महिला पुतळ्याच्या माळा घालत. त्याचप्रकारे यापुढील काळात मेंढीचे महत्त्व वाढत जाईल. ती सोन्यासारखी मौल्यवान होईल.)

धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारंल. (सध्याच्या काळात माणसे रंग पालटत आहेत. बाह्यतः एक, तर अंतरंगात दुसरेच अशी माणसाची अवस्था आहे. त्यामुळे आता आपण ज्याला मेंढी समजतो, तो प्रत्यक्षात अस्वलासारखा, तसेच हिंसक, क्रूर किंवा कपटीही असू शकेल ! म्हणजेच मनुष्याने ज्याच्यावर विश्‍वास ठेवायला हवा, त्याच्यावर विश्‍वास न ठेवता अयोग्य आणि चुकीच्या माणसावर विश्‍वास ठेवत आहे.)

 

१०. साखर आणि गुळ यांचा भाव तेजीत राहील ।

साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. साखरेचं पोतं मोलान विकेल. गुळाचा भाव तेजीत राहील. मांडवाच्या दारी ३५०० म्हणता ३४०० वर येईल ३४०० म्हणता ३३०० वर येईल. (यापुढील काळात साखरेचा भाव एका क्विंटलला किती असेल, ते सर्वसाधारपणे देवाने सांगितले आहे.)

 

११. तंबाखूमुळे घरंदारं बरबाद होतील ।

चढलं उतरलं तंबाखूची पेंढी मध्यम पिकेल. तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. तंबाखूपासून मनुष्याला रोगराई वाढत राहील. घरदार बरबाद होतील. तंबाखूचा बंबाखू होईल. (तंबाखूच्या शेतात तंबाखूसारखेच बंबाखू नावाचे पिक उगवेल. यापुढील काळात हे बंबाखू इतके उगवेल की, त्यामुळे त्या तंबाखूची पूर्णत: हानी होईल. तंबाखूच्या शेजारी उगवणारा बंबाखू हा तंबाखूला लागणारी सर्व पोषक द्रव्ये शोषून घेतो.) मांडवाच्या दारी ३३०० म्हणता ३२०० वर येईल. चढल उतरल ३२०० म्हणता ३००० वर (तंबाखूचा भाव किती असेल, ते सर्वसाधारणपणे देवाने सांगितले आहे.) रसयान भांडं उदंड पिकेल. रसाला धारण माणसाला मरण. (ऊस भरपूर पिकेल. अधिक प्रमाणात ऊस पिकल्याने मनुष्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गरजेपेक्षा अधिक पैसा मिळाल्याने मनुष्य व्यसनाधीन होईल आणि त्यात मृत्यूमुखीही पडेल.)

 

१२. अठरा तर्‍हेचा मनुष्याला एक आजार होईल ।

जाळयान ताप किरम खोकला (सध्या होत असलेले कृमी अथवा जंतांपासून होणारे रोग) उदंड हायं अठरा तर्‍हेचा मनुष्याला एक आजार होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. (‘हे कदाचित् एड्स रोगाच्या संदर्भात असू शकते. सध्या एड्स रोगाला औषध नसून तो अगदी खेड्यापर्यंत पोचला आहे. डॉक्टर लोकही त्यासाठी काही करू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे.’ – संकलक) जरीयान मरीआईची दुनियेवर स्वारी होईल.

आडं चुकेल; पण खेडं चुकणार नाही. (हे कोरोनाच्या संदर्भातील भाकित सध्या सत्यता उतरलेले दिसत आहे. – संकलक) आपली जागा साडेतीन हात आहे. पाची बोटानं मनुष्याने धर्म करावा. उंदराला भिशीला; पण वाघाला भिणार नाही. (ज्या गोष्टी करायला घाबरणे आवश्यक आहे म्हणजे पापकर्म करतांना घाबरणे आवश्यक असतांना मनुष्य घाबरत नाही, तर पुण्यकर्म करतांना घाबरणे आवश्यक नसतांना ते करतांना घाबरत आहे; म्हणजे चांगली कृती करणे टाळत आहे.) चैत्राच्या मासात गायी माळाला जातील. एक रुपया गाडीच्या चकराऐवढी होईल. च्या गा च्या म्या गा म्या करशीला. (प्रारंभीच्या काळात चहा नव्हता, नंतर तो प्रतिष्ठित लोकांकडे होता आणि तो सर्वसामान्यांकडेही आहे. यावरून चहा आता सर्वमान्य झाला आहे आणि सर्वसामान्यांना चहाची चटक लागली आहे ! – संकलक) कापाकापी येईल.

 

१३. स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल ।

नऊ वर्षांची मुलगी भ्रतार मागल (मनुष्याचे आयुष्य अल्प आणि बुद्धी अधिक अशी स्थिती असून मनुष्याचे आयुर्मान अल्प होत आहे. म्हणजे एकूणच जीवनक्रमच अल्प होत आहे. त्यामुळे यापुढील काळात नऊ वर्षांच्या मुलीचा विवाह होईल म्हणजेच तिची मासिक पाळीही लवकर चालू होईल !), दागिनं पैसे मनुष्याला घातक ठरतील. घरातून गेलेला मनुष्य परत येईल; म्हणून आशा धरू नका. तांबे लोखंड मोलाने विकल. सोनं नाणं काही वर्षांनी फुकाचं होईल. चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात मोठा सट्टाबाजार चालल. राजकीय नेते पैसासंपत्ती गोळा करतील. देशाचा बाजार मांडतील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील, कोलांटउड्या मारतील. स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल. सक्रीय राहील. भगवा झेंडा मोठ्या डौलात मिरवल. इतर पक्ष चिंतेत रहातील.

 

१४. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल ।

काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहील. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागेल. राजकारणात राजकीय नेते देवाला विसरून जातील. नोकरवर्ग समाज खाईल. पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही. पंचलोक दोन्हीकडून लाच खाऊन भांडण लावतील. पैशांच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खर्‍याच खोट, खोट्याच खरं. महागाईचा भस्मासूर सुटल. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल. १२ ही महिने लग्न कार्य चालतील.

 

१५. चीन राष्ट्र भारतावर आक्रमण करेल ।

चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल. गुंडांच राज्य चाललंय. अतिरेकी येतील, मोठा घोटाळा करून जातील, बाँबस्फोट होतील. दिल्ली शहराच मोठं नुकसान होईल. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. शहराला लागून असलेली शहरे खेड्याप्रमाणेच होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. दुनिया कालवून जाईल. (जगात हलकल्लोळ माजेल. सध्या कोरोनामुळे हलकल्लोळ माजलेलाच आहे ! – संकलक) भारत-पाक बाँड्रीवर (सीमेवर) रण घुमलं. आया-बहिणींची दिवसा अब्रू लुटतील.

 

१६. मुस्लिम राष्ट्रे जगाच्या नकाशातून पुसून जातील ।

मुस्लिम राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशातून पुसून जातील. पाच सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य जन्माला येईल. (इतक्या अल्प उंचीची माणसे जन्माला येतील की, पाच सेंटीमीटर कापडही त्यांना पुरेसे होईल.) वादळ, भूकंपाने समुद्राची-देशाची उलथापालथ होईल. कृष्णेच्या काठी नऊ लाख बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वहातील. उगावत पेटेल मावळत विझल. (युद्धाची ठिणगी सर्वसाधारणपणे पूर्व दिशेला पडेल आणि ते पश्‍चिम दिशेपर्यंत येऊन विझेल म्हणजेच सारे जग यात ओढले जाईल. – संकलक) आलम दुनियेचा चौथाई कोना ओसाड पडल. (यापुढील काळ इतका भयानक असेल की, जगाच्या एक चतुर्थांश भागातील लोकसंख्या नष्ट होईल. – संकलक) हिल्लाळ पेटतील, काळरात्र येईल. (पुढचा काळ इतका भयानक असेल की, प्रत्येक दिवस काळरात्र असल्यासारखे वाटेल. वीज गेल्यामुळे हिल्लाळ हा मशालीचा प्रकार पेटवावा लागेल.)

 

१७. ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं बघल ।

बारा वर्षाचं बालपण खेळत राहील. चोवीस वर्षांचं तरुणपण काबाडकष्ट करील. पस्तीस वर्षांचं म्हातारपण येईल. (सध्या मनुष्याची जीवनशैली पालटली आहे. पूर्वी लोक १०० वर्षे जगत. आता व्यायाम न करणे, शरिराला पुरक नसलेला आहार खाणे, व्यसनाधीनता यांमुळे शरीर पूर्वीसारखे टिकत नसून मनुष्यास ३५ व्या वर्षीच म्हातारणपण येत आहे.) मनुष्याला बुद्धी अधिक आयुष्य कमी. जग दुनियेत एक मोठ नवाल होईल. बहीण-भावाच प्रेमप्रकरण चालंल. भाऊ-बहिणीचं लग्न-कार्य चालल. भाऊ-बहिणीच्या नात्याला कलंक लागंल. काळीमा फासल. भावाला बहीण ओळखेना. सासर्‍याला सून ओळखेना. धर्म बुडून गेलायं. सत्य फासावर गेलया. डोंगराएवढं पाप, दोर्‍याएवढं पुण्य जगात शिल्लक राहिलंय. दोर्‍याच्या आधारावर डोंगर तरलाया. (सन्मार्गाने चालणारी माणसे अल्प आहेत. अशा अल्प माणसांच्या आधारावरच हे जग चालू आहे.) शेषाच्या फणीवर धरित्रीमाता हाय. पृथ्वीचा करार संपत आलाय (पृथ्वीचा विनाशकाळ जवळ आला आहे.) ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं बघल.

 

१८. शेतीसाठी देशात खून पडतील ।

घरातील लक्ष्मी दडून बसलीया. रानातील लक्ष्मी पळून खेळायला लागलीया. (हे शेतीच्या संदर्भात आहे. एखाद्या वर्षी एखाद्या शेतात चांगले पिक येते, तर दुसर्‍या वर्षी ‘तसे पिक येईलच’, असे नाही. म्हणजे शेती कायमस्वरूपी चांगलीच असेल असे नाही, एखाद्या वर्षी लाभ, तर एखाद्या वर्षी तोटा असे असेल.) कागदाचा घोडा मनुष्याला खुळ लावलं. (नोटाबंदीनंतर लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि लोकांना वेड लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली.) शेतीसाठी देशात खून पडतील. काळी कांडी (शेती) पोटाशी धरावी जतन करावी. एक औत चौघात होईल. (‘भूमीची मशागत करण्यासाठीचे एक अवजार म्हणजे औत (नांगर) होय. हे औत पूर्वी जवळपास प्रत्येक शेतकर्‍याकडे होते. आता यांत्रिक शेती होत असल्याने अनेकांकडे औत नाहीत.’ – संकलक) कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय. (पिकांना भाव न मिळणे, बैल उपलब्ध न होणे, सतत पालटणारे हवामान, तसेच अन्य अनेक गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.) बसव्याच शिंगाट सोन्याचं होईल. (बैलांची संख्या अल्प होऊन बैल सोन्यासारखे दुर्मिळ झाले आहेत आणि महागही झाले आहेत.)

जग दुनियेत तीन राजे आहेत. मेघराजा, बसवराजा, कुळंबी (शेतकरी) राजा. कुळंबीच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे. मेघराजाची तुम्ही वाट बघाला. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा. धर्माचा पाऊस, कर्माचे पीक. पावसाअभावी ऋतुमान बदलत जाईल.

 

१९. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा !

जगाच भविष्य चाललय. कोल्हापूरच्या देवीला मोठ संकट पडलया, रात्री बाराच्या टाइमाला (वाजता) तिच्या नेत्रातून पाणी पडतया. (लोकांकडून होणारे पापकर्म, सद्य:परिस्थिती, दुराचार, अनाचार यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीलाही वाईट वाटत असून तिच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत.)

परमेश्‍वर तिचा निवाडा करील. भाकरीवरील भाजी हाय. सांभाळून खावा. (भाकरी-भाजी खातांना भाजी अल्प असल्यास शेतकरी भाजी पुरवून खातात. त्याचप्रकारे आता एखादी गोष्ट उदा. पेट्रोल, डिझेल, पाणी हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे; म्हणून मनुष्याने कसेही वापरू नये. त्याचा काटकसरीने वापर करावा. भविष्यात या गोष्टींची टंचाई होऊ शकते.) ह्यो बोराटीचा काटा हाय. (माझ्या सेवेत असतांना भक्ती करतांना ती योग्य प्रकारे करा. माझ्याकडे येतांना नीती-नियमाने रहा. मनुष्याला माझे ऐकायचे नसेल, कसेही वागायचे असेल, तर माझ्याकडे येऊ नये अन्यथा जसा काटा टोचतो, त्याप्रमाणे माझ्याकडून शासन (शिक्षा) मिळेल.)

कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेटतील. सातार्‍याच्या गादीवर फूलं पडतील. (हे भविष्य जुन्या काळातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्यांमध्ये वाद निर्माण झाले. त्या वेळी सातारा येथील गादी अधिकृत घोषित होईल; म्हणजेच त्या गादीवर फुले पडतील’, असे देवाला सांगायचे आहे. – संकलक)

काळ्या खडकाच्या लाह्या उडतील. खडकाच्या माळाला. धडका मारशीला. (यापुढील काळात कदाचित् मनुष्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे देव इथून निघून जाईल आणि मग या खडकावर डोके आपटून घेण्याविना कोणताच पर्याय मनुष्यासमोर नसेल. याचा दुसरा अर्थ असा की, कदाचित् संकटावर संकटे इतकी येतील की, मनुष्याला सतत त्या खडकावर डोके आपटून घ्यावे लागेल ! – संकलक) छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा ! छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी जन्माला येणार आहेत.

 

२०. भगवा झेंडा राज्य करेल ।

भगवा झेंडा राज्य करेल. तिरंगा झेंडा भंगला जाईल. नऊ खंड पृथ्वी दहावा खंड काशी, दहाव्या काशीत माझ दफ्तर हाय. करवीर काशीत माझा ठिकाणा आहे. (नऊ खंड एका बाजूला असून दहावा खंड काशी एका बाजूला आहे. त्या काशीत माझा विद्याभ्यास झाला. त्याचप्रकारे कोल्हापूर विभागात माझे वास्तव्य आहे.) हालसिद्धनाथाची करशीला चाकरी, तर खाशीला भाकरी. गर्वान वागू नये. गर्वान वागशीला, तर फसून जाशीला. गर्वाच घर खाली आहे. मी थोरला, तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. गोसाव्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागाव.

 

२१. तुमच दु:ख माझ्या पायाशी घेईन ।

आलोय तुम्हाला सांगत, आलोय. खाशीला थोबाडीत खाशीला. हे मुंबई हायकोर्ट आहे. न्यायनिवाडा करायला. विषाचा पेला हाय. ह्यो बोराटीचा काटा हाय. खैराचा इंंगोला हाय. लई वाईट घालीन घालीन कांबळ्याचा शेव घालीन. (माझ्याजवळ येतांना पवित्र मनाने यायला हवे. तुम्ही अपवित्र मनाने माझ्याजवळ याल, तर शासन (शिक्षा) केले जाईल.) तुमच दु:ख माझ्या पायाशी घेईन. माझ्या झोळीतील तुम्हाला रिद्धि-सिद्धि देईन. गावातील इडा-पिडा दूर करीन. बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन. पांढरीची राखण करीन. छाया धरीन ! (आप्पाचीवाडी-कुर्ली या ठिकाणी श्री राजगिरी महाराजांची समाधी आहे. ती समाधी ११ व्या शतकातील आहे. या ठिकाणी १६/१७ व्या शतकात जेव्हा श्री हालसिद्धनाथ आले, तेव्हा त्यांनी राजगिरी महाराजांशी सूक्ष्मातून संवाद साधला. नाथांनी ‘मला समाधीसाठी ही जागा योग्य वाटत आहे, तरी चालेल का ?’ असे राजगिरी महाराजांना सूक्ष्मातून विचारले. तेव्हा राजगिरी महाराजांनी त्यांना अनुमती दिली; मात्र या पंचक्रोशीतील जनता म्हणजेच कुर्ली परिसरातील भक्तांचे रक्षण करण्याचे वचन घेतले. त्यामुळे प्रत्येक भाकणुकीत देव ‘पांढरीची राखण करीन’, असे सांगतात.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment