आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि समाजबांधव यांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. ज्योत्स्ना नारकर, सनातन संस्था

सिंधुदुर्ग – चक्रीवादळ, पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती, तर कोरोनासारखे मानवनिर्मित संकट यांमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. यासह रस्त्यांवरील अपघात, आकस्मिक दुर्घटना घडत असतात. यांमध्ये होणारे बहुतांश मृत्यू रुग्णाला वेळीच प्रथमोपचार न मिळाल्याने होतात. सध्याच्या काळात वाढती गुन्हेगारी, हिंसाचार, दंगली, अपघात, आतंकवाद पहाता आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि समाजबांधव यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ‘ऑनलाईन’ कार्यशाळेतून प्रथमोपचाराच्या विविध पद्धती शिकूया आणि इतरांनाही शिकवूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योत्स्ना नारकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ सप्टेंबरला या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याचा १८० धर्मप्रेमींनी लाभ घेतला.

या वेळी सौ. नारकर म्हणाल्या, ‘‘इंग्लंडने दुसर्‍या महायुद्धाच्या काळात देशातील नागरिकांनो ठिकठिकाणी सोप्या शब्दांत माहिती दिली होती. प्रथमोपचाराची विशेष पथके उभारली होती. त्यामुळे वेळीच झालेल्या प्रथमोपचारांमुळे सैनिकांना पुन्हा युद्धसज्ज होता आले. सध्या जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशा वेळी आपण प्रथमोपचार शिकून घेतल्यास येत्या युद्धकाळात आपणाला राष्ट्रकार्यात योगदान देता येईल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment