
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. या गोकुळाष्टमीविषयी आपण या लेखात जाणून घेऊया !
गोकुळाष्टमी
तिथी : श्रावण वद्य अष्टमी
इतिहास
भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
महत्त्व
१. जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.
२. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने, तसेच ऋषीपंचमीच्या व्रताने न्यून होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने न्यून होतो.)
उत्सव साजरा करण्याची पद्धत
या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़ त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.
दहीकाला
विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
दहीकाल्याच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखा !
हल्ली दहीकाल्याच्या निमित्ताने वाटमारी, बीभत्स नाच, महिलांची छेडछाड आदी गैरप्रकार सर्रास होतात. या गैरप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होऊन उत्सवातून देवतेच्या तत्त्वाचा लाभ तर होतच नाही, उलट धर्महानी होते. वरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले, तरच उत्सवाचे पावित्र्य टिकून उत्सवाचा खरा लाभ सर्वांना होईल. असे करणे ही समष्टी स्तरावरची भगवान श्रीकृष्णाची उपासनाच आहे.

हिंदूंनाे, धर्महानी राेखून श्रीकृष्णाची कृपा संपादन करा !
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: । (हे अर्जुना, ऊठ, लढायला सिद्ध हो !)
श्रीकृष्णाच्या वरील आज्ञेनुसार अर्जुनाने धर्माचे रक्षण केले आणि तो श्रीकृष्णाला प्रिय झाला ! हिंदूंनो, देवतांचे विडंबन, धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, मंदिरांतील चोर्या, गोहत्या, मूर्तीभंजन या माध्यमांतून धर्मावर होणार्या आघातांविरुद्ध तुम्हीही स्वक्षमतेनुसार वैध मार्गाने लढा द्या !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
श्री कृष्णा चरणी अनंत कोटी प्रणाम…!