विविध रागांनुसार अत्तर

 

१२. संगीत चिकित्सेतील रागांप्रमाणे गंधशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास
चालू केल्यावर त्यातून विविध रागांनुसार अत्तर सिद्ध करण्याची प्रेरणा मिळणे

यानंतर मी अत्तर बनवण्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे चालू केले. ‘अरोमा चिकित्सा’ आणि ‘संगीत चिकित्सा’ या दोन स्वतंत्र चिकित्सा असून समाजात त्यांचा वापर पुष्कळ मोठ्या प्रमाणात केला जात आहे अन् त्यांचा परिणामही पुष्कळ सकारात्मक आहे. पुष्कळ लोकांनी यावर अभ्यास करून शोधनिबंध सादर केले आहेत. आपल्याकडे पुष्कळ वर्षांपासून ‘अरोमा चिकित्सा’, ‘गंधशास्त्र’ आदी चिकित्सा प्रचलित आहेत. आपल्याकडे संगीत चिकित्सेमध्ये स्वरनाद, म्हणजे विशिष्ट मंत्र, विशिष्ट उच्चारण हे त्या त्या स्वरांनी केले जाते. वेद पठणाला एक विशिष्ट प्रकारचा स्वरनाद आहे आणि संगीत चिकित्सेमध्येही विशिष्ट राग गायले जातात. या रागांमध्ये विशिष्ट प्रकारचे रोग बरे होण्याची क्षमता आहे. एखादा राग, उदा. दरबारी कानडा हा राग घेतला, तर ‘त्या रागाचे वैशिष्ट्य काय ?’ ‘तो ऐकल्याने काय होते ?’ असा अभ्यास चालू झाला. हा अभ्यास केल्यावर ‘रागामुळे अशांतता आणि चिंता न्यून होते. मन शांत होते, तसेच झोप लागायला साहाय्य होते’, असे परिणाम लक्षात आले. दरबारी कानडा हा राग जर सतारीवर ऐकला, तर पुष्कळ लवकर झोप लागते.

१२ अ. निद्रानाशावर उपयुक्त असलेल्या ‘दरबारी कानडा’ या रागावरील अत्तर बनवणे

‘दरबारी कानडा’ हा राग निद्रानाशावर उपयुक्त आहे. या संदर्भातील एक प्रसंग म्हणजे आम्ही एका सहलीवरून परतत होतो. त्या वेळी एक मैत्रीण आमच्या गाडीत होती. खरेतर तिला गाडीत कधीच झोप लागत नाही. मी रात्री गाडीत पं. भीमसेन जोशी यांचा ‘दरबारी कानडा’ राग लावला आणि पुण्याला आमचे ठिकाण येईपर्यंत ती गाढ झोपली. ‘स्वतःला गाढ झोप केव्हा लागली ?’, हे तिला कळलेच नाही. उठल्यावर ती म्हणाली, ‘‘आतापर्यंतच्या माझ्या एवढ्या प्रवासात ‘मी पहिल्यांदा गाडीत झोपले.’’ हा संगीताचाच परिणाम म्हणता येईल !

या प्रसंगाचा अभ्यास करून ‘दरबारी कानडा’ या रागाचे अत्तर बनवतांना ‘मी मनातील चिंता आणि अस्वस्थता न्यून करण्यासाठी काय वापरू शकतो ?’ ‘अरोमा चिकित्सेमध्ये यासाठी कोणती तेले वापरली जातात ?’, असा अभ्यास करून त्यांचे मिश्रण केले. त्यानंतर माझ्या अभ्यासानुसार ‘ते आणखी चांगले बनवण्यासाठी काय घालता येईल ?’, असा विचार करून मी ‘दरबारी कानडा’ या रागाचे अत्तर बनवले. पहिल्या वर्षी आमचे ८ – ९ च रागांवर अत्तर सिद्ध झाले.

१२ आ. ‘बहार’ या रागावरील अत्तर सिद्ध करण्याच्या वेळी झालेला विचार !

‘बहार’ या रागाचे अत्तर बनवतांना माझा पुढील विचार झाला, ‘हा राग वसंत ऋतूमध्ये गायला जातो; म्हणून हे अत्तर वसंत ऋतूमध्ये फुलणार्‍या सगळ्या फुलांचे मिश्रण आहे. वसंत ऋतूत वेगवेगळी फुले फुललेली असतात. आपण बागेत चालत असतांना तेथे येणारा गंध थोड्या थोड्या वेळाने पालटतो. वसंत ऋतूशी संबंधित ‘केतकी, जाई, चंपक बन फुले’ ही बंदिशही प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘बहार’ या रागाचे अत्तर बनवतांना ‘पूर्ण बागेला किंवा सृष्टीला बहर आला आहे’, असा विचार करून त्या सर्व फुलांचे मिश्रण करून अत्तर बनवले आहे.

१२ इ. ‘मेघमल्हार’ रागावरील अत्तर बनवतांना झालेला विचार !

‘मेघमल्हार’ नावाच्या अर्थावरून त्याचे अत्तर बनवण्याचा विचार आला. मेघ म्हणजे पावसाळी ढग आणि पाऊस म्हणजे मातीचा सुगंध ! त्यामुळे ‘मेघमल्हार’ रागाचे अत्तर बनवतांना मी मुख्य पाया म्हणून ‘मातीचा सुगंध’ घेतला. जंगलातून जात असतांना झाडांची ओली पाने, मुळे, फळे-फुले आणि माती या सगळ्यांना येणारा सुगंध हा ‘मेघ’ आहे; कारण ‘मेघमल्हार’ हा पावसाळ्यात कधीही गायला किंवा वाजवला जातो आणि कधीही ऐकला, तरी डोळ्यांसमोर पावसाचे तेच वातावरण उभे करतो.

त्यामुळे ‘मेघमल्हार’ बनवतांना फुले तीच (बहार रागातील) आहेत, केवळ ती मातीत भिजलेली आहेत. ‘मेघमल्हार’ रागात ती फुले मातीचा सुगंध घेऊन आली आहेत, तर ‘बहार’ रागात तीच फुले ताज्या फुलांचा सुगंध घेऊन आली आहेत.

१२ ई. कोणतेही अत्तर बनवतांना पंचतत्त्वांशी संबंधित घटकांचा अभ्यास करणे

अशा प्रकारे एकेका रागाचे अत्तर बनवून आतापर्यंत आम्ही १७ रागांची अत्तरे बनवली आहेत. अजूनही काही प्रकारची अत्तरे बनवली जात आहेत; पण जेव्हा वाटते की, अमूक एक अत्तर चांगले झाले नाही, तेव्हा आम्ही थांबतो. तो राग ऐकतांना ‘त्याच्याशी संबंधित गंध कसा असेल ?’, हे मला जाणवते आणि ‘हा घटक अत्तरात वापरावा’, हे माझ्याकडून आपसूक केले जाते. कुठलेही अत्तर म्हटले, तर त्यात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही घटक असतात. आपण ‘आग’ हा शब्द उच्चारला, तर त्याच्याशी संबंधित शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण उभे रहातात. एखाद्या व्यक्तीचे नाव घेतले, तरी त्या नावामुळे ती व्यक्ती पूर्ण उभी रहाते. त्याचप्रमाणे हे गंधशास्त्र आहे.

 

१३. संगीत आराधनेचा निसर्गावर अनुभवलेला परिणाम

१३ अ. घरासभोवतालच्या फळझाडांना मोठ्या आकाराची फळे आल्यावर ‘घरात २० वर्षे
सातत्याने चालू असलेले शास्त्रीय संगीत आणि त्याच्या संगीत लहरी यांचा हा परिणाम आहे’, असे लक्षात येणे

आमच्या घरातील सगळ्यांना निसर्गाची पुष्कळ आवड असून घराच्या सभोवताली आंबा, फणस, चिकू, जांभूळ, नारळ, लिंबू आणि शेवगा यांचे प्रत्येकी एकेक झाड आहे. आमच्या घरातील नारळ, आंबा, चिकू, जांभूळ, आवळा या झाडांच्या फळांचा आकार बाजारातील अथवा अन्य कुठल्याही ठिकाणच्या फळांपेक्षा दुप्पट आहे. गेली २० वर्षे घरात सातत्याने शास्त्रीय संगीत चालू असल्याने घरात सर्वत्र संगीताच्या लहरी पसरलेल्या आहेत. तेव्हा मला लक्षात आले की, हा संगीताचा परिणाम असू शकतो; कारण आमच्या बागेत झाडांसाठी आवश्यक अशी पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात नाहीत. आमचे घर रस्त्याला लागून असल्याने वाहनांचे प्रदूषणही पुष्कळ आहे. सगळे जे खत घालतात, तेच आम्ही घालतो. मी कधी झाडांवर किटकनाशकांची फवारणी केली नाही. त्यामुळे ‘हा कशाचा परिणाम असावा ?’, असा विचार केल्यावर ‘हा संगीत लहरींचा परिणाम आहे’, असे माझ्या लक्षात आले.

१३ आ. घराच्या आवारातील आवळ्याच्या झाडाची फांदी
उन्हाच्या दिशेने न जाता संगीताच्या दिशेने घराच्या सावलीत येणे

मी घरातील माझ्या छोट्या कक्षात पुष्कळ गाणी ऐकायचो. त्या वेळी माझे संगीताचे ध्वनीमुद्रण करण्याचे काम अविरत चालू असायचे. हा माझा कक्ष घरात पूर्वेला आहे आणि तिथेच मागे घराच्या आवारात एक आवळ्याचे झाड आहे. सूर्योदयाचे ऊन नेहमी माझ्या कक्षात यायचे; पण काही काळानंतर कक्षात अंधार पडू लागला आणि अगदी सकाळच्या वेळीसुद्धा मला दिवा लावावा लागू लागला. त्या वेळी ‘एवढ्या सकाळी  ८ – ९ वाजता दिवा का लावावा लागतो ?’, असा मला प्रश्‍न पडला. तेव्हा लक्षात आले की, आवळ्याची संपूर्ण फांदी घरात आली आहे. निसर्गाचा साधारण नियम आहे की, सावलीत कुठेही झाड लावा, ते उन्हाच्या दिशेने मार्ग काढते; परंतु या झाडाची फांदी उन्हाच्या दिशेने न जाता उलट आमच्या कक्षात शिरली होती.

१३ इ. फणसाच्या झाडाचे मोठे मूळ पाण्याच्या दिशेने खाली न जाता घराच्या दिशेने येणे

एकदा आम्हाला काही कारणास्तव घरी खोदकाम करायचे होते. झाडाची मुळे पाण्याच्या शोधात भूमीत खाली जातात. खोदकाम करतांना एका फणसाच्या झाडाचे मोठे मूळ पाण्याच्या दिशेने खाली न जाता आमच्या घराच्या दिशेने आलेले दिसले; मात्र तेथे पाण्याचा कुठलाच उगम नव्हता.

या उदाहरणांवरून ‘संगीताचा परिणाम किती मोठ्या प्रमाणात होतो’, हे आमच्या लक्षात आले. मनोविज्ञानावरसुद्धा संगीताचा पुष्कळ परिणाम होतो. यासारखेच गंधाचेसुद्धा आहे.

 

१४. गंधाचे सगळ्यांत मोठे नाते आठवणींशी असून ‘एकदा घेतलेला
गंध अनेक वर्षांनंतरही ८० टक्के स्मरणात रहाणे’, हे गंधाचे सामर्थ्य असणे

आपल्या नासिकेतून दोन गंधवाहिका (ओलफॅक्टरी नर्व्हस्) आपल्या छोट्या मेंदूच्या प्रमस्तिष्क (सेरेब्रम) या भागात जातात. नाकाने घेतलेला गंध प्रमस्तिष्कात जातो आणि तेथे साठवला जातो. नंतर तेथे आपल्याला त्या गंधाचे (तो कशाचा गंध आहे, याचे) ज्ञान होते. मेंदूच्या ज्या भागात आपल्या भावना आणि आठवणी निर्माण होतात, त्या भागाशी गंध जोडलेला आहे. त्यामुळे गंधाचे सगळ्यांत मोठे नाते आठवणींशी आहे. हा सर्व वैज्ञानिक अभ्यास आहे. माझ्या असे लक्षात आले की, गंध,दृष्टी, स्वर किंवा ऐकणे, तसेच स्पर्श आणि चव यांमध्ये चव हा भाग वेगळा आहे; कारण चव पालटत असते.

‘सेन्स् ऑफ साईट’नुसार ‘आपण पाहिलेले एखादे दृश्य एक वर्षानंतर किंवा सहा मासांनंतर आपल्याला ४० टक्के, ऐकलेली एखादी गोष्ट ६ मासांनंतर ६० टक्के आणि एखादा गंध अनेक वर्षांनंतर ८० टक्के या प्रमाणात आठवू शकतो’, इतके गंधाचे सामर्थ्य आहे. शब्द आणि गंध किंवा स्वर अन् गंध हे एकमेकांना पूरक असतात. ऐकलेले लक्षात रहाते; म्हणून आपल्याकडे समज नसली, तरी पाठांतराला महत्त्व दिले आहे. याचसाठी पूजा किंवा पठण यांसारखी नित्यनैमित्तिक कर्मेही पूर्वीपासून करण्यास सांगितली आहेत.

 

१५. गंधाचा व्यावसायिकपणे उपयोग केल्यावर त्याचा
सकारात्मक परिणाम होणे; कारण विशिष्ट नाद आणि गंध
विशिष्ट वातावरणाची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरत असणे

गंधाचा वापर मी व्यावसायिक दृष्ट्याही करतो, उदा. काही पथिकाश्रम (हॉटेल्स), उपाहारगृह (रेस्टॉरंट्स), तसेच काही ‘स्पा’ज् (मसाज करण्याची केंद्रे) आहेत. त्यांचा जो विषय (थीम) आहे, त्याला अनुसरून मी सुगंध बनवतो. याचा मोठा सकारात्मक परिणाम होत आहे. आमच्या महाविद्यालयाजवळ कॉफीचे एक दुकान होते. आम्ही तिथे कॉफी प्यायला जायचो; परंतु हे दुकान आतील बाजूला असल्यामुळे ‘तेथे दुकान आहे’, हे कोणाच्या लक्षात यायचे नाही. मी त्या दुकानदाराला सांगितले, ‘मी कॉफीचा गंध बनवून देतो. तो तुम्ही दाराला लावा आणि त्याचा काय परिणाम होतो ?’, ते मला सांगा.’’ त्याने काही दिवसांनंतर मला सांगितले, ‘‘आता धंदा दुपटीने वाढला असून दाराला लावलेल्या कॉफीच्या गंधामुळे अनेक जण दुकानाकडे खेचले जात आहेत.’’ या गंधामुळेच कॉफीच्या दुकानात गेलो की, आपण तेथे अधिक वेळ रेंगाळतो. एखाद्या ठिकाणी जर अधिक चांगला गंध येत असेल, तर तिथेही आपण जास्त वेळ बसतो. मंदिरांत धूप, अगरबत्ती किंवा कापूर या गोष्टी सतत लावलेल्या असतात. त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यासाठी सुगंध ही सगळ्यांत पूरक गोष्ट असते. ज्या ठिकाणी घंटा असते, तिथे आपण ड्रम वाजवत नाही; कारण घंटेशी संबंधित मृदुंगाचा नाद आहे. विशिष्ट नाद आणि विशिष्ट गंधच ते वातावरण निर्माण करायला कारणीभूत ठरतात.

श्री. आनंद जोग यांनी सिद्ध केलेली विविध गंधांची अत्तरे

 

१६. गानसमयानुसार अत्तरे बनवणे आणि त्या अत्तरांचे रंग
त्या गानसमयाच्या वातावरणाशी (आकाशाच्या रंगाशी) तंतोतंत जुळणे

मी पहिली ९ अत्तरे बनवली आणि त्यानंतर रागांच्या गानसमयानुसारही अत्तरे बनवली. मी सकाळचा ललत, सूर्योदयानंतरचा बिलावल, दुपारचा सारंग, मध्यान्हीनंतरचा मुलतानी, मारुबिहाग, बहार, चंद्रकंस, रात्रीचा दरबारी कानडा आणि हंसध्वनी हे राग निवडले आणि या रागांची अत्तरे सिद्ध केली. त्या अत्तरांची छायाचित्रे काढण्यासाठी आम्ही पहाटेचा ललत, सूर्योदयानंतरचा बिलावल, दुपारचा सारंग, मध्यान्हीनंतरचा मुलतानी, रात्रीचा मारूबिहाग आणि मध्यरात्रीचा दरबारी कानडा असे सकाळपासून रात्रीपर्यंतच्या रागांचे अत्तर क्रमाने ठेवले. माझ्या छायाचित्रकार मित्राने जेव्हा त्यांचेे छायाचित्र काढले, तेव्हा ‘त्या त्या अत्तराच्या कुपीत त्या त्या रागांच्या परिणामांचे अत्तर सिद्ध झाले आहे’, असे लक्षात आले.

अ. पहाटेचा राग ललत आहे आणि पहाटे सूर्योदयाच्या वेळी आकाशात तांबुस छटा असते. ललत रागाच्या अत्तराला तसाच रंग आला होता.

आ. त्यानंतर आकाशात सकाळच्या उन्हाचा पिवळा (टंगस्टन पिवळा) रंग असतो, बिलावल रागाच्या अत्तराचा रंग तसाच सिद्ध झाला होता.

इ. मध्यान्हीला आकाशाचा रंग गर्द पिवळा असतो, सारंग रागाच्या अत्तराचा रंग तसा होता.

ई. संध्याकाळी आकाशाचा रंग जसा केशरी असतो, तसा मुलतानी रागाच्या अत्तराचा रंग झाला होता.

उ. मारूबिहाग रात्रीचा राग आहे. त्याच्या अत्तराचा रंग लालसर काळा झाला होता.

ऊ. मध्यरात्रीच्या राग दरबारीचे अत्तर काळसर रंगाचे झाले होते.

याचा अर्थ त्या त्या ठिकाणी गंधासमवेत तेजतत्त्वही आले होते. यावरून गंध आणि राग यांच्यात समरसता असल्याचे लक्षात आले. हे सर्व आम्ही विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे होणारच आहे. सगळ्या नद्या जशा शेवटी सागरालाच जाऊन मिळतात, कोणत्याही देवाला केलेला नमस्कार केशवापर्यंत पोचतो; कारण शेवटी सगळे एकच आहे. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, शेवटी तुम्हाला एकच अनुभूती येणार आहे.’’

– श्री. आनंद जोग, पुणे

2 thoughts on “विविध रागांनुसार अत्तर”

Leave a Comment