सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून साधना, राष्ट्र व धर्मरक्षण करण्यासाठी अनेकांना ज्ञान मिळत आहे – आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

प्रयागराज (कुंभनगरी), ३ फेब्रुवारी (वार्ता.) : सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे प्रतिपादन सातारा येथील तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्‍वर मठाचे श्री.ष.ब्र.प्र.१०८ आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज यांनी येथे केले. ३१ जानेवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षण फलकप्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांचा सन्मान केला. या वेळी संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तकही उपस्थित होते.

श्री.ष.ब्र.प्र.१०८ आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज पुढे म्हणाले, ‘‘हिंदु धर्मात भक्ती ही मानव आणि दानव दोघांनाही ईश्‍वर बनवते. अशी पवित्र धर्मपरंपरा मानणारे या देशात रहात आहेत, तरीही या देशाला ‘हिंदु राष्ट्र’ मानले जात नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. शिव, शक्ती, सौर, गाणपत्य, वैष्णव हे सर्व आपापल्या देवतांची पूजा करून राष्ट्राप्रती आपला भाव समर्पित करत असतात. ‘जप-ध्यान यांमुळेच अंतर्मन शुद्ध कसे होते’, ‘गंगामातेचे रक्षण कसे करावे’, यासमवेतच राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी या प्रदर्शनातून अनेकांना ज्ञान मिळत आहे.”

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment