स्वामी श्रद्धानंद !

हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेते स्वामी श्रद्धानंद !swami_shraddhanand

दिशादर्शक नेता ठार झाल्यास हिंदु समुदाय दिशाहीन होतो, हे मानसशास्त्र ओळखून हिंदुद्वेष्ट्यांकडून पद्धतशीरपणे हिंदु नेत्यांना वेचून ठार मारले जात आहे. गेल्या काही वर्षांत एकट्या केरळमध्ये संघपरिवारातील १२५ जणांच्या हत्या करण्यात आल्या. ओडिशा राज्यात वर्ष २००८ मध्ये स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या केली गेली. हिंदुद्वेष्ट्यांच्या या खुनी परंपरेचे पहिले बळी स्वामी श्रद्धानंद होते. २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांध मुसलमानाने त्यांची हत्या केली. आज त्यांचा ९० वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने…

 

१. स्वामीजींनी स्वत:चे नाव ‘श्रद्धानंद’ असे ठेवण्यामागील कारण !

‘स्वामी श्रद्धानंद म्हणजे लाला मुंशीराम. त्यांचा जन्म पंजाब येथील तलवन, जालंधर येथे २२ फेब्रुवारी १८५७ मध्ये झाला. त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी वानप्रस्थाश्रमाची दीक्षा घेतली आणि ते महात्मा मुंशीराम बनले. वर्ष १९०२ मध्ये हरिद्वारजवळील कांगडी भागात त्यांनी गुरुकुलाची स्थापना केली. सर्वप्रथम त्यांचे दोन पुत्र हरिश्‍चंद्र आणि इंद्र हे विद्यार्थी झाले, तर महात्मा स्वतः आचार्य झाले. आज सहस्रावधी विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात आणि गुरुकुल कांगडी आता विश्‍वविद्यालय झाले आहे. सलग १५ वर्षे मुंशीराम यांनी गुरुकुलाची सेवा केली. त्यानंतर वर्ष १९१७ मध्ये महात्मा मुंशीराम यांनी विधिपूर्वक संन्यास दीक्षा घेतली. त्या दीक्षा समारंभात मुंशीराम म्हणाले की, मी स्वतःचे नाव स्वतःच ठेवणार आहे. माझे संपूर्ण जीवन वेद आणि वैदिक धर्माच्या श्रद्धेत व्यय झाले आहे आणि भविष्यातही होईल. यासाठी मी माझेे नाव श्रद्धानंद ठेवत आहे. तेव्हापासून ते स्वामी श्रद्धानंद झाले.

 

२. स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग !

स्वामी श्रद्धानंद यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. पंजाबात मार्शल लॉ हा लष्करी दंडक लावला गेला, तर दुसरीकडे भारतियांवर रौलट अ‍ॅक्ट अन्यायाने लादण्यात आला. देहलीमध्ये त्या दंडकाच्या विरोधात आंदोलन चालू झाले. त्यांचे नेते स्वामी श्रद्धानंद होते. ब्रिटीश शासनाकडून मिरवणुका काढण्यास बंदी (मनाई) होती. त्याला आव्हान देण्यासाठी स्वामीजींनी घोषणा केली की, देहलीत मिरवणूक काढली जाईल. त्यानुसार सहस्रावधी देशभक्तांची मिरवणूक राजधानीच्या चांदणी चौकात आली. टाऊन हॉलच्या पटांगणात गुरख्यांच्या संगीनी, बंदुका आणि मशीनगन इंग्रजांच्या आज्ञेनुसार सज्ज होत्या. वीर संन्याशी श्रद्धानंद निर्भयतेने मोठ्या जमावानिशी घंटाघराच्या खाली पोचले. गोळी सुटताच स्वतः जलदगतीने ते पुढे सरसावले. छाती ताणून त्यानी गर्जना केली की, निर्दोष जनतेवर गोळ्या चालवण्यापूर्वी माझ्या छातीत संगीनी खुपसा. संगीनी खाली झुकल्या आणि मिरवणूक शांतपणे पुढे गेली.

 

३. देहलीच्या जामा मशिदीत उभे राहून वेदमंत्रासह भाषण करणारा वीर संन्यासी !

वर्ष १९२२ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी देहलीच्या जामा मशिदीत भाषण केले. स्वामी श्रद्धानंद यांनी मशिदीच्या मिंबरवर उभे राहून वैदिक मंत्र उच्चारण करून ओजस्वी आणि प्रभावी भाषण केले. एक मुसलमानेतर देहलीच्या जामा मशिदीच्या मिंबरवर चढून वेदमंत्रांसह भाषण देतो, हा सन्मान केवळ वीर संन्यासी स्वामी श्रद्धानंदांना प्राप्त झाला. ही जगातील ऐतिहासिक अद्वितीय घटना होती.

 

४. मुसलमानधार्जिणी काँग्रेस सोडून हिंदु महासभेच्या स्थापनेत सहभागी होणे

स्वामी श्रद्धानंद यांना बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात आले की, मुसलमान काँग्रेसमध्ये येऊनही ते प्रथम मुसलमान बनून रहातात. नमाजासाठी काँग्रेसची सभाही स्थगित केली जाते; परंतु काँग्रेसमध्ये हिंदु धर्माची हानी होते. हे सत्य लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ काँग्रेस सोडली. त्यांनी पंडित मदनमोहन मालवीय यांच्यासह हिंदु महासभा स्थापन केली.

 

५. धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी केलेले महत्कार्य !

मुसलमानांची संख्या वाढत आहे आणि हिंदूंची संख्या घटत आहे, या चिंतेचे निराकरण करण्यासाठी स्वामीजींनी शुद्धीकरणाचे पवित्र कार्य आरंभले. त्यांनी याच काळात अखिल भारतीय क्षत्रिय उपकारिणी सभेची स्थापना केली. या सभेचे प्रधान शहापुराधीश नाहरसिंहजी होते. सभेचे एक कार्यालय आग्रा येथे उघडण्यात आले. आग्रा, भरतपूर, मथुरा आदी क्षेत्रांमध्ये रहाणार्‍या नुकत्याच मुसलमान झालेल्या काही रजपुतांना परत हिंदु धर्मात येण्याची इच्छा होती. ५ लक्ष रजपुतांना शुद्ध करून आपल्या भाऊबंदांशी जोडण्याचा प्रश्‍न आग्रा येथील आर्य समाजाच्या विचाराधीन होता. हिंदु रजपुतांनी या शुद्ध हेतूस संमती दिली. तसेच ते त्यांना सामाजिक अधिकारही देण्यास सिद्ध झाले. या सगळ्या कार्यामध्ये स्वामी श्रद्धानंद यांचा पुढाकार होता. त्यानंतर एका भव्य संमेलनाचे आयोजन करून त्यात स्वामीजींनी आपल्या दुरावलेल्या बांधवांना जवळ केले आणि मोकळ्या मनाने शुद्ध करून घेतले. गंगाजल घेणे, यज्ञात आहुती देणे इत्यादी प्रकारे शुद्धीचक्र चालवले गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गावे शुद्ध करण्यात आली. या महान शुद्धीकार्यामुळे भारतातील हिंदूंमध्ये नवचैतन्य, नवी शक्ती, उत्साह संचारला आणि हिंदूंच्या संघटना वाढत गेल्या. कराची येथील अजगरीबेगम या मुसलमान महिलेला स्वामीजींनी हिंदु धर्मात घेतले. या घटनेमुळे मुसलमानांमध्ये आगडोंब उसळला आणि स्वामीजींचे नाव सर्वत्र झाले.

 

६. जिहादच्या हत्यार्‍या परंपरेचा बळी !

२३.१२.१९२६ या दिवशी देहलीत रशीद नावाचा धर्मांध मुसलमान युवक स्वामीजींच्या घरी पोहोचला आणि ‘स्वामीजींसमवेत इस्लामवर चर्चा करावयाची आहे’, असे त्याने सांगितले. तो घोंगडे पांघरून आला होता. घोंगड्याच्या आत त्याने पिस्तूल लपवले होते. स्वामीजींसमवेत त्यांच्या सेवेसाठी धर्मपाल नावाचे गृहस्थ होते. त्यामुळे त्याला काही करता आले नाही. त्याने पिण्यास पाणी मागितले. त्याला पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर धर्मपाल पाण्याचा पेला ठेवण्यासाठी गेल्यावर रशीदने स्वामीजींवर पिस्तुलातील गोळ्या झाडल्या. धर्मपाल यांनी रशीदला पकडून ठेवले. सर्व लोक गोळा होईपर्यंत स्वामीजी हुतात्मा झाले होते. नंतर रशीदवर कार्यवाही करण्यात आली. स्वामी श्रद्धानंद जिहादच्या हत्यार्‍या परंपरेचा बळी ठरले; मात्र इतिहासात अजरामर झाले. त्यांनी धर्मासाठी केलेले बलीदान हिंदूंसाठी प्रेरणास्रोत ठरले !’

संकलन : सौ. जयश्री जगन्नाथ परांजपे, ओरोस, सिंधुदुर्ग.

 

स्वामी श्रद्धानंद स्थापित गुरुकुल : राष्ट्रभक्त निर्मितीचे केंद्र !

‘स्वामी दयानंद सरस्वती यांची ओजस्वी वाणी, तेजस्वी रूप आणि तत्त्वज्ञान यांमुळे ते प्रभावित झालेे. स्वामी दयानंदांच्या उपदेशामुळे अनेक दुर्व्यसनांनी ग्रस्त मुन्शीराम यांच्या जीवनात आमुलाग्र पालट घडला आणि ते राष्ट्रपुरुष बनले. स्वामी श्रद्धानंदांनी दयानंद सरस्वती यांच्या शिक्षणविषयक दृष्टीकोनांना साकार करण्याचे व्रत घेतले. त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्यासाठी आदर्श गुुरुकुलाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी लाहोर, रावळपिंडी, जालंधर, अंबाला, सहारनपूर, हरिद्वार, रूडकी, देहली आणि ग्वाल्हेर येथे भ्रमण करून दान गोळा केले. वैदिक धर्माचा प्रचार करतांना त्यांनी गुरुकुलासाठी योग्य जागेचा शोधही घेतला. बिजनौर येथील चौधरी अमनसिंह यांनी त्यासाठी कांगडी गावात गुरुकुलासाठी जागा दान दिली, तर एक वर्षापेक्षा कमी काळात त्यांच्याकडे ४० सहस्र रुपये जमा झाले. त्यानंतर कांगडी येथे गुरुकुलाला आरंभ झाला. या गुरुकुलाची दिनचर्या सुनिश्‍चित होती. गुरुकुलातील सर्व पाठ्यविधी ऋषीपद्धतींवर आधारित होते. त्याचबरोबर ज्ञान, विज्ञान, तंत्र आणि व्यवसाय यांचेही शिक्षण त्यात अंतर्भूत होते.

हे गुरुकुल म्हणजे एक राष्ट्रीय संस्था होती. भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे राष्ट्रभक्त तेथे निर्माण केले जात होते. त्यामुळे ब्रिटीश सरकारकडे गुरुकुलाचा भ्रामक आणि संदिग्ध अहवाल तत्कालीन पोलीस संस्थांनी धाडला होता. वर्ष १९१४ मध्ये हिवाळ्यात इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान रेम्जे मैक्डोनल्ड भारतात आले. मैक्डोनल्ड हे स्वामी श्रद्धानंदांच्या कार्याने प्रभावित झाले. पोलीस अधिकार्‍याचा अहवाल त्यांच्या दृष्टीने खोटा ठरला. मैक्डोनल्ड यांनी लिहिले आहे, ‘‘ज्यांनी भारतीय राजविद्रोहाचा अभ्यास केला आहे, त्यांनी कांगडी गुरुकुलामध्ये आर्य विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिक्षणाविषयी ऐकले असेलच. हे गुरुकुल म्हणजे आर्यांची वृत्ती आणि आदर्श यांचे प्रतिबिंब आहे. येथे युवा पिढीला वैदिक सिद्धांंतांनुसार वागण्याची प्रेरणा दिली जाते.’’

स्वामी श्रद्धानंदांच्या या गुरुकुलाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सनातन सूक्त कोरलेली होती आणि तेथे ध्वजा फडकत असेे. या गुरुकुलात ६ ते १० वर्षे या वयात असतांनाच प्रवेश दिला जात आणि २५ वर्षांपर्यंत तेथे रहावे लागे. पहाटे ४ वाजता उठून व्यायाम, शौच इ. सर्व आटपावेे लागेे. त्यानंतर प्रातःसंध्या होत असे. येथील सर्व विद्यार्थी अनवाणी पायांनी का चालत जातात, असे ब्रिटीश पंतप्रधानांनी स्वामी श्रद्धानंद यांना विचारले. त्यावर स्वामी म्हणाले, ‘‘योगायोगाने कधी कठोर जीवन जगावे लागले, तर याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.’’

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, शुद्धी आंदोलन, हिंदु जागृती, पाखंडखंडन, हिंदी प्रचार, समाज संघटन आदी क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्यामुळे स्वामी श्रद्धानंद आदर्श पुरुष ठरले. अशा वीर पुरुषाला विनम्र श्रद्धांंजली !’

संकलन : सौ. जयश्री जगन्नाथ परांजपे, ओरोस, सिंधुदुर्ग.