सोपे आयुर्वेदीय उपचार

१. ताप

पुढील काढा ताप येणार्‍या साधकांनी ७ दिवस दिवसातून ३ वेळा (सकाळी ६ ते १०, दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळांत) प्रत्येकी १०० मि.लि. (१ वाटी) प्रमाणात घ्यावा. २५ जणांसाठी दिवसभरात लागणार्‍या काढ्यातील औषधांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

१ किलो आले, पावणे दोन किलो कडूनिंबाची पाने आणि १५० ग्रॅम काळी मिरी हे सर्व ठेचून १५ लिटर पाण्यामध्ये घालावेत. हे मिश्रण अर्धे (७.५ लिटर) होईपर्यंत उकळावे. काढा गरम असतांनाच घ्यावा. काढा घेतांना यात प्रत्येकाने १ चमचा मध घालून घ्यावा.

(काढा बनवून चहाच्या किटलीत ओतावा. साधकांनी प्रत्येकी पाऊण चहाचा पेला काढा घ्यावा. साधकसंख्येनुसार काढ्यातील औषधांचे प्रमाण न्यून-अधिक करावे.)

२. बद्धकोष्ठता
(शौचाला न होणे किंवा मलाचे खडे होणे)

एका ताटलीत २ चमचे एरंडतेल घ्यावे. एका अख्ख्या सोललेल्या केळ्याला सर्व बाजूंनी हे तेल लावून ते केळे खावे. दिवसातून २ वेळा (सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळांत) एरंडाच्या तेलात एकेक केळे बुडवून खावे आणि यावर कपभर गरम पाणी प्यावे. असे ३ दिवस करावे.
– सिद्धाचार्य पुण्यमूर्ति, तंजावूर, तमिळनाडू. (२४.६.२०१६)

३. डोळ्यांत खाज येणे

द्राक्षांचा रस काढून तो आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यांत अंजन म्हणून तो लावल्यास डोळ्यांची खाज बंद होते.

४. डोळ्यांत धुरकटपणा जाणवणे

या विकाराच्या प्रारंभिक अवस्थेत आवळ्याचा रस थोड्या पाण्यात मिसळून सकाळ, संध्याकाळ प्यायल्याने फायदा होतो.

५. मोतीबिंदू

प्रतिदिन १ थेंब मध डोळ्यांत टाकल्याने एका मासात फरक पडतो. मधामुळे बुबुळांची पारदर्शिता वाढते आणि डोळ्यांवरील ताण न्यून होतो.

६. टायफॉईड

दालचिनीची भुकटी एक चिमूट, दोन चमचे मधात कालवून दिवसातून दोन वेळा चाटल्याने टायफाईडपासून बचाव होतो.

७. घसा बसणे

सर्दी-पडसे यांमुळे घसा बसला असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी पाच-सहा काळी मिरी आणि तेवढेच बत्तासे चावून चावून खा. बत्ताश्यांच्या ऐवजी खडीसाखरही चालेल. हे चावतांना रस गिळत राहिल्यास गळा खुलतो.

८. चष्म्यापासून मुक्ती

२५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम खसखस आणि १० ग्रॅम काळी मिरी वाटून शुद्ध तुपात भाजून घ्यावे. त्यात १०० ग्रॅम खडीसाखर मिसळून घ्यावी. प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी दोन चमचे घेतल्याने नेत्रज्योती वाढते आणि सहा मासांत चष्मा उतरतो.

९. डोकेदुखी

लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यांत सोडल्याने किंवा चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.

(सूचना : मंदाग्नी आणि मधुमेहाच्या लोकांनी हा उपाय करू नये.)

(डॉक्टरांच्या संमतीविना औषधे घेऊ नयेत.)

१०. सततच्‍या सर्दीवर सोपा उपाय

अ. सततच्‍या सर्दीचे एक कारण

‘अनेकांना सकाळी उठल्‍या उठल्‍या नाक चोंदणे, भरपूर शिंका येणे, नाक वहाणे इत्‍यादी त्रास होतात. आपल्‍या नाकाच्‍या भोवताली कवटीच्‍या हाडामध्‍ये पोकळ्‍या असतात. या पोकळ्‍यांना ‘पॅरानेझल सायनसिस्’ असे म्‍हणतात. रात्री आपण झोपलेलो असतो त्‍या वेळी या पोकळ्‍यांमध्‍ये स्राव जमा होऊन थबकून रहातो. यामुळे या पोकळ्‍या चोंदतात आणि सकाळी उठल्‍यावर चोंदलेले स्राव मोकळा होण्‍यासाठी शिंका येऊ लागतात.

आ. उपचार

१० आ १. शुंठी (सुंठ) चूर्ण : हा त्रास न्‍यून होण्‍यासाठी रात्री झोपण्‍यापूर्वी चहाचा पाव चमचा ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’ अर्धी वाटी कोमट पाण्‍यात मिसळून प्‍यावे. यामुळे अधिक प्रमाणात स्राव साठणे न्‍यून होते.

१० आ २. चेहरा शेकणे : सकाळी उठल्‍यावर चेहरा गरम कपड्याने शेकावा. यामुळे नाकाच्‍या भोवतालच्‍या पोकळ्‍यांतील स्राव पातळ होण्‍यास साहाय्‍य होते.

१० आ ३. शीर्षासन : यानंतर सर्वांत महत्त्वाचा उपाय म्‍हणजे ‘शीर्षासन’ करणे. शीर्षासन म्‍हणजे ‘खाली डोके वर पाय’ या स्‍थितीमध्‍ये थांबणे. (हे ज्‍यांना जमते त्‍यांनीच करावे किंवा तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या मार्गदर्शनाखाली शिकून मग करावे. चुकीच्‍या पद्धतीने शीर्षासन केल्‍याने त्रास होऊ शकतो.) असे साधारण ३० सेकंद केल्‍याने नाकाच्‍या भोवतालच्‍या पोकळ्‍यांमधील स्राव सहजपणे बाहेर पडून निघून जातात. साधारण ७ – ८ दिवस असे नियमित केल्‍याने नाकाभोवतालच्‍या पोकळ्‍यांमध्‍ये स्राव साठण्‍याची प्रवृत्ती नाहीशी होते.

१० आ ४. शीर्षासनाला पर्याय : ज्‍यांना शीर्षासन जमत नाही, त्‍यांनी सूर्यनमस्‍कारातील स्‍थिती क्रमांक २ किंवा ७ (चित्र पहा) मध्‍ये साधारण ३० सेकंद थांबावे.

शीर्षासन केल्‍यावर किंवा डोके उलटे करून थांबल्‍यावर आरंभी १ – २ दिवस शिंकांचे प्रमाण वाढते; परंतु नंतर ते अल्‍प होत जाऊन शिंका येणे बंद होते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)

 

३. औषध सेवन करतांना म्हणायचा मंत्र

शरीरे जर्जरे भूते व्याधिग्रस्ते कलेवरे ।

औषधं जाह्नवीतोयं वैद्यो नारायणो हरिः॥

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, अंक ६)

४. उष्ण काळात उष्ण गुणधर्माची औषधे काळजीपूर्वक वापरावीत !

‘बहुतेक वेळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा कफाच्या विकारांना प्रतिबंध करण्यासाठी सांगितली जाणारी घरगुती औषधे उष्ण गुणधर्माची असतात, उदा. कोमट किंवा गरम पाणी, सुंठ, मिरी, पिंपळी, लवंग, दालचिनी, लसूण, तुळस, गोमूत्र. सध्या वातावरणात उष्णता वाढलेली असल्याने सर्वांनी सरसकट अशी औषधे वापरणे योग्य ठरणार नाही. उष्ण काळात अशी औषधे घेतल्याने काहींना तोंड येणे, वारंवार तहान लागणे, लघवीच्या मार्गाची जळजळ होणे, अंगाची आग होणे, अंगावर पुरळ येणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात उष्ण औषधे वापरायचीच झाली, तर ती सूर्याचा ताप नसतांना, म्हणजे सकाळी लवकर किंवा रात्रीच्या जेवणानंतर वापरावीत. उष्ण गुणधर्माच्या घरगुती औषधांचा वापर करतांना वर दिलेले दुष्परिणाम दिसू लागल्यास ती बंद करून अन्य पर्याय वापरावेत किंवा वैद्यांचा सल्ला घ्यावा.

 

५. औषधांच्या वापरापेक्षा मूलभूत पथ्ये पाळणे महत्त्वाचे !

‘रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, मल-मूत्रांचे वेग रोखून न धरणे, नियमित व्यायाम करणे, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जेवणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि रुग्णाईत (आजारी) असतांना दूध आणि दुधाचे पदार्थ टाळणे’ ही आयुर्वेदातील मूलभूत पथ्ये आहेत. ही आचरणात आणल्याने रोगप्रतिकारक क्षमता आपोआप वाढते. ही पथ्ये सर्वांना समान आहेत. स्वतःच्या मनाने प्रकृती, प्रदेश, ऋतू आदींचा विचार न करता आयुर्वेदीय औषधे घेण्यापेक्षा अशी निर्धोक मूलभूत पथ्ये पाळणे कधीही चांगले. या मूलभूत पथ्यांविषयीचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ यात केले आहे.’

(काही दिवसांपूर्वी प.पू. श्रीधरस्वामी यांच्या आज्ञेनुसार प.पू. दास महाराज यांनी तुळस आणि गोमूत्र यांचा उपाय सांगितला होता. ही औषधे उष्ण असली, तरी हा उपाय सकाळी लवकर करता येऊ शकतो.)

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२०)