सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपू‌‌र्ण वातावरणात आरंभ !

दीपप्रज्वलनाच्या प्रसंगी डावीकडून सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव, सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि पू. अशोक पात्रीकर

सत्संगात राहून स्‍वतःला आध्यात्मिक ऊर्जेने भारित करा ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

फोंडा (गोवा), २१ ऑगस्ट – साधना करणे आणि सत्संगात रहाणे, हे एकप्रकारे व्यक्तीतील चैतन्याचे ‘चार्जिंग’ (भारित) करण्यासारखे आहे. जसा आपण भ्रमणभाष भारित करतो आणि त्यामुळे ‘बॅटरी चार्ज’ होते, तसे साधनेमुळे व्यक्तीतील चैतन्य वाढते. जन्मोजन्मीचे मनातील संस्कार नष्ट होतात, तसेच नकारात्मक आवरण नष्ट होते. आश्रम, तसेच सत्संग हे चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे अधिकाधिक सत्संगात राहून स्वतःला आध्यात्मिक ऊर्जेने भारित करा आणि साधनेचे दृष्टीकोन आत्मसात् करून ते कृतीत आणा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी येथे केले. २१ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या ‘गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिरा’ला भावपूर्ण वातावरणात आरंभ झाला. या शिबिराच्या उद्घाटनसत्रात त्या मार्गदर्शन करत होत्या.

सतशक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

या शिबिरात साधनेतील अडथळे दूर व्हावेत, साधकांच्या साधनेला गती मिळावी, या उद्देशाने विविध तात्त्विक आणि प्रायोगिक विषय घेतले जाणार आहेत. या शिबिरात देशभरातून २०० हून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले असून अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या संतांचीही ‍वंदनीय उपस्थिती आहे. बांदोडा येथील ‘भारतीय संस्कृती संवर्धन केंद्रा’त हे शिबिर होत आहे. ‘व्यक्तीने केलेले कार्य नाही, तर तिने केलेली ‍साधना व्यक्तीला मोक्षाला नेते. त्यामुळे साधकांनी केवळ स्वतःच्या साधनेचा विचार करण्यापेक्षा अधिकाधिक जणांना साधनेशी जोडण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे मार्गदर्शन उद्घाटन सत्रात उपस्थित कर्नाटक येथील धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, मुंबई क्षेत्राच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केले.

Leave a Comment