हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा सावंत, सनातन संस्था

अस्नोडा येथे हिंदू संमेलनात सनातन संस्थेचा सहभाग

व्यासपिठावर डावीकडून सरपंच श्रीमती मिता नाईक, श्री. श्रीराज शेलार, श्री. श्रीहरि आठले, श्री. अभय मांद्रेकर आणि बोलतांना सौ. शुभा सावंत

अस्नोडा, ८ एप्रिल (वार्ता.) – आपल्या परंपरा, संस्कार आणि सण यांचे महत्त्व सांगून आपण समाजात एकता अन् संस्कृती यांची जपणूक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित अस्नोडा येथील हिंदू संमेलनातील प्रमुख पाहुणे श्री. श्रीराज शेलार यांनी केले. हे हिंदू संमेलन अस्नोडा, येथील श्री शांतादुर्गा मंदिरात उत्साहात पार पडले. या वेळी व्यासपिठावर रा.स्व. संघाचे श्रीहरि आठले, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, अस्नोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती मिता नाईक आणि श्री. अभय मांद्रेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिरसई, साळ, वडावल, खरपाल, कासारपाल, नानोडा, अस्नोडा, अडवलपाल आणि मेणकुरे येथील देवस्थानांमधून आणलेल्या गुढ्यांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. किमया वझे यांनी केले, तर आभारप्रदर्शन मोहन केळकर यांनी केले. या कार्यक्रमाला अस्नोडा आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा सावंत

सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत म्हणाल्या, ‘‘धर्म हा भारताचा प्राण आहे; परंतु आज आपण सणांचे मूळ चैतन्य गमावून बसलो आहोत कि काय ? अशी भीती वाटते. होळीचे रूपांतर ‘रिंग डान्स’मध्ये, नवरात्रीचे ‘हॉटेलमधील गरबा’मध्ये आणि दिवाळीचे महत्त्व केवळ ‘नरकासुर’वध किंवा फटाक्यांपुरते मर्यादित राहिले आहे. सणांमधील हा पाश्‍चात्त्य प्रभाव आपली सांस्कृतिक पाळेमुळे खिळखिळी करत आहे. आज धर्माविषयीचे अज्ञान आणि चुकीच्या ज्ञानाचा प्रसार यामुळे हिंदु समाज असंघटित झाला आहे. याचाच लाभ घेऊन हिंदु समाजावर विविध स्तरांवर प्राणघातक आघात होत आहेत. यासाठी धर्माबद्दलचे अज्ञान दूर करून, कुप्रथांना आळा घालून आणि ‘हिंदु’ म्हणून संघटित झाले पाहिजे. तरच आपण पुन्हा एकदा खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो.’’

Leave a Comment